(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • काळजाला हात घालणारा गायक : मुकेश

    प्रत्येक व्यक्तीच्या घशात “व्होकल कॉर्ड’’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापूद्र्या सारखा दिसणारा हा अवयव आम्हाला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लता दिदीनी आपल्या घशाचा विमा उतरविला आहे. कारण त्यांचा घसा हाच सर्वात महागडा असा अवयव आहे. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते मात्र प्रत्येक आवाजाचा एक विशिष्ठ पोत असतो. या पोतावरूनच आम्हाला सहज ओळखता येते की आवाज कुणाचा आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत गायक गायिकेचा आवाज म्हणूनच आम्ही सहज ओळखू शकतो. चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसविण्यासाठी अनेकजण येत असतात. पण अनेकदा त्याला जे व्हायचं असतं ते मात्र राहून जातं आणि त्याची वेगळीच ओळख तयार होते. लुधियानातील जोरावर चंद आणि चाँद रानी यांच्या पोटी जन्मलेलेल्या एका तरूणाचे काहीसे असेच होणार होते.

    खरं तर दिसायला सुंदरच होता हा तरूण. ३०-४० च्या दशकातल्या चित्रपटातले अनेक नायक स्वत:ची गाणी स्वत:च गात कारण तेव्हा पार्श्व गायन पूर्ण रूजले नव्हते. याला गाताही येत असल्यामुळे नायक होण्याची महत्वकांक्षा होती यात गैर काहीच नव्हते. मोठी बहिण संगीत शिकत असतानां याला लहानपणीच संगीताची गोडी लागलेली. जोरावर चंद् आणि चाँद रानी यांचे एक दूरचे नातेवाईक होते मोतीलाल. चित्रपटसृष्टीतले नामवंत अभिनेते. त्यांनी या तरूणाला बहिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात गाताना ऐकले. त्यांच्या आवाजातील वेगळेपण त्यांच्या लक्षात आले व ते त्याला मुंबईला घेऊन आले. मोतीलाल या तरूणापेक्षा १३ वर्षे मोठे होते. पण त्यावेळी त्यांनी ही कल्पनाही केली नसेल की याच तरूणाचा उसना आवाज घेऊन एके दिवशी त्यानां गावे लागणार आहे. मुंबईत त्याची रहाण्याची सोय मोतीलालनी स्वत:च्या घरातच केली व एक संगीत शिक्षक पण त्याच्यासाठी नेमला. १९४१ मध्ये या तरूणाला शेवटी एका चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. चित्रपट होता ‘निर्दोष’ यातील गाणीही त्याने स्वत: म्हटली होती. त्या काळात कुंदनलाल सैगल गायकात सर्वोच्च शिखरावर होते. आणखी तीन वर्षांनी हा तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेणार होता पण अभिनयाने नव्हे तर आपल्या गोड गळ्याने…….
    मध्ये मजहर खान नावाच्या दिग्दर्शकाचा “पहली नजर” हा चित्रपट थिएटरमध्ये झळकला.

    मोतीलाल, वीणा, मुन्वर सुलताना, बाबूराव पेंढारकर, प्रसिद्ध शाहीर बाळकराम,बिब्बो अशी तगडी स्टार कास्ट होती. दोन पठाण मुस्लिम घराण्यातील शोकातिंका यात दाखविली होती. या चित्रपटाचे संगीतकार होते अनिल विश्वास. सफदर आह सितापूरी यांनी गाणी लिहली होती. पैकी एक गाणे होते “दिल जलता है तो जलने दे……” हे गीत कुणी गायले यावर त्यावेळच्या अनेक चित्रपट रसिकांनी पैजा लावल्याचे बोलले जाते. गाणे कुंदनलाल सैगलचे आहे म्हणणारे बहूतेक रसिक ही पैज हरले होते. स्वत: सैगलही हे गाणे ऐकून अचंबित झाले होते. कारण आवाज थेट तयांच्या सारखाच होता. हे गाणे गायले होते मुकेश चंद जोरावर चंद् माथूर या २२ वर्षीय तरूणाने जो पूढे चित्रपटसृष्टीतला महान गायक मुकेश बनला…….या गाण्याने भारतभर त्याला ओळख मिळवून दिली. नंतर हळूहळू मुकेश सैगलच्या प्रभावातुन मुक्त झाले. प्रत्येक कलावंत मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, सुरूवातीस कुणाच्या तरी प्रभावाखाली असतोच. जर त्याने स्वत:ला यातुन मुक्त केले नाही तर मात्र त्याची ओळख फार काळ टिकू शकत नाही.अनेक गायक-गायिकेच्या बाबतीत असे झाले आहे. मुकेशचा किंचीत अनुनासिक पण दर्दभरा आवाज हीच त्यांची खरी ओळख बनली. संगीतकार नौशाद यांनी दिलीपकुमारसाठी अनेक गाणी गाऊन् घेतली. मेहबूब खानच्या ‘अंदाज’ चित्रपटतील मुकेशची सर्वच गाणी गाजली. तु कहे अगर…..झूमझूम के नाचो आज…..हम आज कही दिल खो बैठे….वगैरे. ‘गाए जा गीत मिलनके’, धरती को आकाश पूकारे (मेला), ये मेरा दिवानपन है (यहुदी), सुहाना सफर और ये मोसम हँसी (मधूमती), जीवन सपना टूट गया (अनोखा प्यार)…इत्यादी. ही सर्व दिलीपकुमार साठी मुकेशने गायलेली गाणी. १९५० नंतर मात्र मुकेशचा गळा खऱ्या अर्थाने राज कपूरलाच शोभला. आणि रफीच्या उदया नंतर दिलीप कुमार रफीच्या आवाजात गाऊ लागला…याच वेळी किशोरदा चा आवाज देव साहबसाठी चपखल बसला.

    मुकेशच्या आवाजात एक वेगळीच आर्तता असायची. महंमद रफी सारखी सर्व सप्तकातील रेंज वा मन्नादाच्या आवाजतला शास्त्रीय टच भलेही नव्हता मुकेशच्या आवाजात मात्र हृदय भेदून जाणारा दर्द नक्कीच होता. काही मोजकीच गाणी सोडली तर संगीतकार तार सप्तकात त्यांना गायला सांगत नसत. ‘मात्र झूमती चली हवा’ हे सोहनी रागातील गाणे (संगीत समांट तानसेन) आणि शिवरंजनी रागातील ‘जाने काहाँ गए वो दिन’ (मेरा नाम जोकर) या गाण्यात मुकेशजीने खूप वरचे स्वर लावले आहेत..जे आजही ऐकतानां हृदयाच्या आरपार जातात. मुकेशची सर्वच गाणी ओठात सहज बसणारी आहेत. त्यांनी गायलेली उडत्या चालीची अनेक गाणी खूप हीट झाली. मेरा जूता है जापानी (आवारा ), किसी की मुस्कूराहटो पर हो निसार सब कुछ सिख हमने(अनाडी), डम डम डिगा डिगा (छलिया), रूक जा वो जानेवली रूक जा (कन्हैया), मेरा जुता है जापानी (श्री ४२०)वगैरे…….राज कपूरसाठी गातानां मुकेश ख्रोखरच अप्रतिम गात असत. राज कपूरचा चेहरा विलक्षण बोलका. चेहऱ्यावरची प्रत्येक नस न नस हलायची. डोळयातील भाव मुकेशच्या आवाजाने अधिक गहिरे होत जायचे. स्वत: राज कपूर पण सुंदर गात असत. मुकेशने त्यांची आठवण सांगतानां म्हटले होते की- ‘मनात आणले असते तर ते माझ्यापेक्षाही उत्तम गायक झाले असते.’ राज कपूरनी मुकेशला वचन दिले होते की मी आयुष्यभर तुझ्याच गळ्याने गायील व ते त्यांनी मुकेश यांच्या शेवटा पर्यंत पाळले देखिल. सत्यम् शिवम सुंदरम हा खरा नायिका प्रधान चित्रपट. पण या चित्रपटात मुकेश यांच्या गाण्यासाठी राज कपूरने प्रसंग निर्माण केले.

    मुकेश प्रत्यक्ष जीवनात अत्यंत भावूक आणि संवेदनशील होते. एकदा एक मुलगी खूप आजारी पडली. तिला मुकेश खूप आवडत असत. आजार वाढू लागला तसे तिने आई जवळ मागणी केली की मला जर मुकेशने गाणे म्हणून दाखवले तर मी लवकर बरी होईल. आईने तिला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला की- ते खूप नामवंत गायक आहेत, ते कसे येऊ शकतील? शिवाय त्यानां खूप पैसेही द्यावे लागणार. पण तिचा हट्ट सुरूच…शेवटी डॉक्टरांनी मुकेशशी संपर्क साधला. आणि खरोखरच मुकेश त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि गाणे ही गायले. मुलीच्या चोहऱ्या वरील आनंद बघून ते म्हणाले- ती आता जितकी आनंदी दिसतेय त्याच्या किती तरी पट आनंद मला झाला आहे. त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे त्यांचे गाणे बहूदा हृदया पासून येत असावे. राज कपूरच्या “श्री ४२०” आणि “आह” चित्रपटात मुकेश तुम्हाला दिसतील. आह मधील ‘छोटीसी ये जिंदगानी’…हे गाणे गाणारा गाडीवान स्वत: मुकेश आहे. स्वत: मुकेशने दोन चित्रपटाची निर्मिती पण केली. १९५१ मध्ये त्यांनी ‘मल्हार’ हा चित्रपट निर्माण केला. यातील प्रमूख भमिका मोती सागर(रामानंद सागर यांचे चिरंजीव) आणि शम्मी यांनी केली होती. यातील मुकेश आणि लताचे ‘बडे आरमानसे रखा है बलम तेरी कसम’…..हे रोशनने संगीत दिलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. दुसरा चित्रपट १९५६ मधील “अनुराग” हा होता. यात त्यांनी प्रमूख नायकाची भूमिका केली होती. या नंतर बहुदा त्यांच्या लक्षात आले असावे की अभिनय हा आपला प्रांत नाही. मग त्यांनी गाण्यावरच लक्ष केंद्रीत केले व आपला ठसा उमटवला.

    ६० च्या दशकातल्या सर्वच संगीतकारानी मुकेश कडून गाणी गाऊन घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे सर्वोच्च शिखर असलेला काळ.सुनील दत्त, मनोज कुमार यांच्यासाठी गायलेली गाणी देखिल तुफान गाजली. १९६७ मध्ये सुनीलदत्त-नुतनच्या “मिलन” मधील ‘सावन का महिना’…. हे लताजी बरोबर गायलेले ड्युअट तुफान लोकप्रिय झाले. त्यावर्षीचे बिनाका मधील ते क्रमांक एक चे गाणे होते….’सब कुछ सिख हमने’( अनाडी: १९५९), ‘सबसे बडा नादान’…(पहचान:१९७०),’जय बोलो बेईमान की…’(बेईमान:१९७२), ‘कभी कभी मेरे दिलमे’…(कभी कभी:१९७६ )असे चार फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाले. तर १९७४ मधील रंजनीगंधा सिनेमातील ‘कई बार यूं देखा है….’या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यांनी रायचंद्र त्रिवेदी यांची मुलगी सरला त्रिवेदी यांच्याशी २२ जुलै १९४६ मध्ये लग्न केले. त्यावेळी गाणे बजावणे हे खालच्या पातळीवरचे समजण्यात येई. त्यामुळे रायचंद यांनी विरोध केला. मग दोघांनी कांदीवलीच्या एका देवळात जाऊन् लग्न केले.त्यावेळी मुकेश २३ वर्षाचे होते. मोतीलाल व आर.डी. माथूर (मुगल-ए-आझम या चित्रपटाचे छायाचित्रकार) यांनी त्यानां मदत केली. त्यानां नितीन मुकेश या गायक मुलासह सह एकूण चार अपत्ये आहेत. अभिनेता नील नितीन मुकेश हा त्यांचा नातू.
    मुकेशजी अनेकदा स्टेज शो देखिल करत असत. गातानां सोबत त्यांची हर्मोनियम नेहमी असे. किशोर कुमार जसे स्टेजवर मस्ती करत त्यांच्या नेमके उलट मुकेशचे असे. टापटीप कोट टाय, वळणदार भांग अशा वेषात ते जेव्हा सूर लावत तेव्हा त्यानां लोक उभे राहून सन्मान देत. त्यांच्या गाण्यात एका प्रकारचा साधेपणा असायचा. त्यांचे गाणे प्रेक्षक अत्यंत शांतपणे ऐकत असत मध्येच शिट्टया वा टाळ्या वाजत नसत. २२ जुलै १९७४ ला मुकेशनी त्यांच्या लग्नाची ३० वर्षे झाल्याचा सोहळा साजरा केला आणि लगेच चार दिवसांनी अमेरिकेला प्रयाण केले. डेट्रईट, मिचीगन येथे त्यांचा स्टेज शो होता. २७ ऑगष्टला एरवी पेक्षा लवकर उठून स्नान केले. कपडे घालतानां त्यांच्या छातीत दुखायला लागले म्हणून त्यानां लगेच डॉक्टरांकडे नेले. पण तो पर्यंत खूपच उशीर झाला होता. हॉस्पीटल मध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शिल्लक राहिलेला स्टेज शो लतादीदी आणि त्यांच्या मुलगा नितीन मुकेश यांनी पूर्ण केला. लताबाई त्यांचे शव घेऊन भारतात आल्या त्यावेळी चित्रपटसृष्टीतले असंख्य मान्यवर उपस्थित होते. राज कपूर यांच्या कानावर जेव्हा वृत्त गेले त्यावेळी त्यांचे उदगार होते-‘आज माझा आवाज हरवला आहे’ त्यांच्या मृत्यू नंतर त्यांनी गाणी गायलेले चित्रपट प्रदर्शीत झाले. मुकेशजी देखिल वयाच्या ५३ व्या वर्षी हे जग सोडून गेले. म्हणजे तसे ते तरूणच होते. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज असे अवेळी का सोडून गेले असावेत? हा प्रश्न मनाला सतत बोचणी लावतो.

    -दासू भगत (२२ जुलै २०१७)

  • सजीवांतील संदेशवहन

    या पृथ्वीतलावर, सजीवांना सुखाने जगता यावे, त्यांचे अस्तित्व टिकून रहावे, इतकेच नव्हे तर त्यांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन सबल प्रजाती निर्माण होऊन त्यांच्या सजीवांची संख्या वाढावी यासाठी निसर्गाने, काळजीपूर्वक भक्कम तजवीज करून ठेवली आहे.

    सजीवांनी, आपले विचार एकमेकास कळविणे आणि ते विचार त्यांना कळणे, या साठी निसर्गाने, कोणती आणि कशी यंत्रणा सिध्द केली आहे, ते या लेखात वाचा.

  • भेसळ

    काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.
    "कसा मस्त आहे की नाही ?"
    "हो ....छान आहे". दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता. पण बायको समोर हो ....छान आहे असे म्हणावे लागले.

    आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस, नासकोणी, खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

    हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.

    आता विचार करा, २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा, त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.

    थोडा विचार + विचारपुस करता "जिलेटिन" + दुध = खरवस हा फॉर्मुला समजला.

    बाटली बंद "लोणची" आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत, लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......

    दोन चार ठिकाणी चाचपणी केली. मग उलगडा झाला. लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल (शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी) असते.

    बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक acid" ची.
    ब्लोटिंग पेपर + सायट्रिक acid = फक्कड लस्सी.

    हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

    हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी" मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्याजी थोडा पानी और.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.

    ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला. पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन" वापरतात्..... थोड्या रसात भरपूर पाणी + सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा. पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.

    टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून" बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो.

    नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...

    ही थोडी झलक.

    एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .

    शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी.

    तो पर्यन्त "वडापावाच्या" लसूण चट्णीत लाकडाचा / नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.

    संकलन - दिपक कोटमे, कोपरगाव

  • शेकडो वर्षांच्या प्राचीन परंपरेचा साक्षी – वासाळामेंढा येथील श्रावणी सप्ताह !

    आमच्या भारतात अनेक आदर्श परंपरा कोणताही गाजावाजा न करता वर्षानुवर्षे सुरु आहेत. यापैकीच एका, उदात्त हेतूने सुरु झालेल्या परंपरेचा हा एक धावता आढावा.

  • श्री. गिरीजात्मज – लेण्याद्री

    या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले.

  • “हलती चित्रे” चा वेबकार – केयुर सेता ……

    मराठी चित्रपट हा ग्लोबल होतो आहे यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. माध्यमं आणि वेबसाइट्स सुद्धा यामध्ये महत्वाची कामगिरी पाडत आहेत, कारण गेल्या काही वर्षांमध्ये मराठी माध्यमांचा उदय होऊन चित्रपटाला मोठी बाजारपेठ मिळाली आहे.

  • श्री शिव भजन

    श्री शिव भजन

  • अटकर बांध्याचा हंसध्वनी

    भारतीय रागसंगीतात एकूणच, बहुतेक सगळे राग हे, धार्मिक, भक्तीभाव समर्पण, प्रणयी किंवा दु:खी असेच भाव दर्शविणारे आहेत. अर्थात ह्या भावना, आपल्या संस्कृतीचा स्थायीभाव असल्याने, या भावनांचे प्रतिबिंब, कलेवर पडणे साहजिक आहे. या समजाला छेद देणारे काही राग आहेत, त्यात हंसध्वनी रागाचा समावेश होतो. एकूणच या रागाची ठेवण, आनंदी, उत्फुल्ल अशी आहे. खरेतर हा राग, कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीतात "आयात" केला गेला आहे पण, आता तो इतका चपखल बसला आहे की,अशी ओळख दिली नाही तर दुसरी बाजू ओळखणे अशक्य!!
    कितीही झाले तरी कर्नाटकी संगीत हे देखील भारतीय संगीत(च) आहे. फरक आहे तो स्वर लावण्यात, सादरीकरणात. अन्यथा स्वर तेच असतात. हंसध्वनी, कलावती सारखे राग उत्तर भारतीय संगीताने आपलेसे केले तर तिलक कामोद राग कर्नाटकी संगीतात मानाने स्थिरावला. हंसध्वनी राग, हा जसा कर्नाटकी संगीतात आहे, तसाच अगदी उचलून, उत्तर भारतीय संगीतात आणला. अर्थात मांडणी वेगळी झाल्याने सत्कृतदर्शनी, हा राग उत्तर भारतीय संगीतातलाच वाटतो. दोन्ही प्रकारात, या रागात, "मध्यम" आणि "धैवत" स्वर वर्ज्य आहेत आणि "पंचम"/"षडज" हे वादी - संवादी स्वर राहिले आहेत. "हंसध्वनी" हे नाव तसे संस्कृत भाषेच्या जवळ जाणारे असल्याने, आणि त्या अनुषंगाने विचार केल्यास, हा रागाचा अगदी प्राचीन ग्रंथांतून देखील उल्लेख आढळतो. तशी या रागाची प्रकृती "अटकर" बांध्याची आहे, एखादी सुडौल तरुणी किंचित नखरेलपणा दाखवीत राजमार्गावरून हिंडावी त्याप्रमाणे या रागाचे थोडे स्वरूप आहे. षडज, पंचम स्वरांचे प्राबल्य असले तरी जेंव्हा निषाद स्वरावर "ठेहराव" होतो, तिथे या रागाची खरी खुमारी जाणवते. आणखी थोडे शास्त्रोक्त लिहायचे झाल्यास, या रागातील "निषाद" स्वर हा चतु:श्रुतिक असल्याने, आरोह संपताना, हा निषाद अगदी वेगळा लागतो. अर्थात, श्रुती आणि स्वरांतर्गत श्रुतीव्यवस्था, हा विषय किचकट आणि प्रचंड मतभिन्नता असल्याने, इथेच थांबतो.
    या रागात, उस्ताद अमीर खान साहेबांनी "जय माते" ही चीज गायलेली आहे. चीजेची सुरवात त्यांनी मध्य लयीत केली आहे. खरेतर पूर्वी, राग हा मध्य लयीत(च) सुरवात करून गात असत.
    वास्तविक पाहता उस्ताद अमीर खान साहेबांची शैली आणि या रागाचा स्वभाव, हे समीकरण काही जुळणारे नव्हे पण तरीही या रागातील गंभीर भाव शोधून काढून, "जय माते" सारखी बंदिश सादर केली आहे. या गायकाची शैली हे बहुतांशी "मंद्र" सप्तकात किंवा "शुद्ध स्वरी" सप्तकात फिरणारी. आवाज अति खर्जातील असल्याने, आणि ठाय लयीत गाणे सादर करण्याची प्रवृत्ती असल्याने, बरेचवेळा या गायकावर टीका देखील झाली आहे परंतु रागाचे शुद्धत्व, स्वरांचे लगाव आणि "राग" सादर करण्याकडे ओढा असल्याने, आजही यांची गायकी अजोड मानली जाते.
    ही बंदिश ऐकताना देखील आपल्याला हेच मिळेल. लय अगदी संथ, त्यामुळे आपण प्रत्येक स्वराचा नुसता आनंदच नव्हे तर प्रत्येक स्वर "न्याहाळू" शकतो. प्रत्येक स्वराला विस्तार करण्याची संधी, हा गायक देतो आणि असे फक्त ठाय लयीतच शक्य असते. इथे प्रत्येक तान, बोलतान, आणि हरकत ऐकण्यासारखी आहे. तान घेतली जाते पण लयीशी अचूक गणित जुळवून!! वेगळ्या शब्दात, इथे "तान" या अलंकाराला वेगळे अस्तित्व नसून स्वरसमुच्चाय बांधून, त्याला अनुलक्षून तान घेतली जाते. तसेच सरगम देखील या विचाराने घेतली आहे. रागसंगीतात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारा हा गायक आहे.
    एम.एस. सुब्बलक्ष्मी हे नाव तसे भारतीयांना अपरिचित असू नये. "वातापी गणपती भजेहम" ही रचना , तशी त्यांच्या उतरत्या वयाच्या काळात गायलेली आहे पण तरीही स्वरावरील पकड तसेच लयीवरील ताबा विलक्षण म्हणायला हवा. कर्नाटकी संगीतात, बहुतांशी रचना या मध्य लयीत सुरु करतात, याउलट उत्तर भारतीय संगीतात सुरवातीला "आलापी" साठी भरपूर अवसर असतो. अर्थात या दोन्ही शैलीत आणि सादरीकरणात भरपूर फरक आहे. साधारणपणे, सामवेदातील ऋचा पठनातून या शैलीचा उगम झाला असे म्हटले जाते आणि वीणा वादनातून रचनांची निर्मिती झाल्याचे मानले जाते. याचा परिणाम असा झाला, कर्नाटकी संगीतात, रचना सादर करताना, साथीला म्हणून, "वीणा","बांसरी"."व्हायोलीन" तसेच "घटम","खंजीरा", "मृदुंगम" इत्यादी तालवाद्ये वापरली जातात. या सगळ्याचा परिपोष प्रस्तुत रचनेत आपल्याला मिळतो.
    मी मुद्दामून, "वातापी गणपती भजेहम" हीच रचना निवडली आहे कारण, याच रचनेचा आधार घेऊन, पुढे अनेक रचना तयार झालेल्या दिसून येतील. तसे बघायला गेल्यास, documentation या दृष्टीने, पंडित शारंगदेव यांच्या लेखणीतून उतरलेला "संगीत रत्नाकर" या ग्रंथात कर्नाटकी संगीताची पाळेमुळे वाचायला मिळतात. अर्थात त्या बाबत आणखी इथे लिहिणे थोडे अप्रस्तुत ठरेल.
    प्रस्तुत गाणे म्हणजे या रागाचे लक्षण गीत असे म्हणता येईल. "जा तोसे नही बोलू कन्हैय्या" ही लताबाई आणि मन्ना डे यांनी गायलेले युगुलगीत म्हणजे रागदारी संगीत, सुगम संगीतात कसे वापरावे, याचा सुंदर वस्तुपाठ आहे.
    "जा तोसे नहीं बोलू कन्हैय्या,
    राह चलत पकडे मोरी बैय्या".
    तीन तालात सुरु होणारी ही रचना, खरे तर एक नृत्यगीत आहे पण तरीही ऐकताना, नृत्याचे बोल आणि सरगम, याचा फारच बहारीने उपयोग करून घेतलेला आहे. लताबाई काय किंवा मन्ना डे काय, दोघेही गायक, शास्त्रीय संगीताची आवश्यक तितकी तालीम घेऊनच या सुगम संगीताच्या क्षेत्रात आले. सुगम संगीतात, गायकी किती दाखवायची आणि कशाप्रकारे रंजकतेने मांडायची, यासाठी हे गाणे नक्की अभ्यासपूर्ण आहे. गाण्यात, दीर्घ ताना आहेत, वक्र गतीच्या हरकती आहेत पण हे सगळे, गाण्यात अलंकार म्हणून न वावरता, त्या गाण्याला पूरक असे यांचे अस्तित्व आहे.
    युगुलगीत हे नेहमी एकमेकांच्या गायकीला "पूरक" असे असते, निदान असावे. त्यादृष्टीने बघायला गेल्यास, या गाण्यात, दोन्ही गायकांनी ज्या प्रकारे, ताना किंवा हरकती घेतल्या आहेत, त्या खास ऐकण्यासारख्या आहेत. कधीकधी तर, संपूर्ण तान न घेता, मध्येच तान खंडित करून, रचनेतील ताण वाढवीत, सुंदररीत्या मांडणी केली आहे. इथेच तुमच्या गायकीचा खरा "कस" लागतो. तान घेताना, तुम्हाला एक सांगीतिक "अवकाश" मिळालेला असतो परंतु अशा काही प्रसंगी, तो अवकाश मध्येच खंडित करून, क्षणात दुसऱ्या गायकाने नवीनच हरकतीची निर्मिती करून ऐकणाऱ्याला स्तिमित करायचे, हा खेळ फारच बहारीचा झाला आहे.
    "राम कहिये गोविंद कही,
    करम की गती न्यारी संतो।
    बडे बडे नयन दिये मिरगन को
    बन बन फिरत उधारी".
    "करम की गती न्यारी" कविता म्हणून फारच सुंदर आहे. याच्या सुरवातीला, पारंपारिक भजनी ठेक्यात, "राम कहिये, गोविंद कहिये" या ओळी ऐकायला मिळतात पण, त्या ओळी हंसध्वनी रागाशी नाते सांगत नाहीत. लगेच लताबाईंची अप्रतिम आलापी ऐकायला येते आणि पाठोपाठ ही रचना सुरु होते. सुरवात तर पारंपारिक केरवा तालात होते परंतु पहिल्या अंतरा जिथे संपतो तिथे हाच ताल "दुगणित" जातो आणि लय देखील वाढते.
    तसे बारकाईने पाहिले तर, ही रचना काही वेळा रागाची बंधने सोडून वेगळी होते, जे सुगम संगीताच्या संस्कृतीस सुसंगत आहे म्हणा. एकुणात ही रचना, हंसध्वनी रागाशी नाते सांगते असे म्हणता येईल. अर्थात, संगीतकाराच्या शैलीनुसार (संगीतकार हृदयनाथ मंगेशकर) गाण्यात नेहमी प्रमाणे अनेक, गुंतागुंतीचे सांगीतिक वाक्यांश आहेत, जेणेकरून, रचना हळूहळू अवघड बनत जाते. परंतु तालाच्या मात्रा आणि त्यानुरून येणाऱ्या हरकती, फारच विलोभनीय आहेत.
    मराठी चित्रपटातील एक अजरामर गाणे - "आली हासत पहिली रात".
    "आली हासत पहिली रात
    उधळत प्राणांची फुलवात".
    गाण्याची चाल बघायला गेल्यास, त्यात फारशा गुंतागुंतीच्या ताना नाहीत, अपवाद गाण्याच्या सुरवातीचा असामान्य आलाप. असला अवघड आलाप केवळ लताबाईच घेऊ शकतात. तो आलाप संपतो आणि गाणे अतिशय द्रुत लयीत सुरु होते आणि गाण्याची गंमत सुरु होते. सुरवातीला, मी हंसध्वनी रागाचा "स्वभाव" आनंदी, उत्फुल्ल असा केला आहे आणि हे गाणे त्या वर्णनाला पूरक असे आहे. तसे बघितले तर गाण्याची चाल फार गुंतागुंतीची नाही पण गाण्यातच अतिशय सुंदर असा गोडवा आहे जेणेकरून ऐकणारा गाण्यात गुंगून जातो.
    आशा भोसल्यांनी काही नाट्यगीते गायली आहेत आणि ती रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून बसली आहेत. "झाले युवती मन दारुण रण" ही गाणे तर अतिशय लोकप्रिय झाले आहे. आशाबाईंच्या वडिलांनी लोकप्रिय केलेली चाल ही हंसध्वनी रागाशी साद्धर्म्य दाखवते. अगदी त्याच धाटणीवर आशाबाईंनी हे गाणे गायले आहे. मुळातला अति गोड राग आणि त्यात आशाबाई गायला!! आशाबाईंचा धारदार आवाज या गाण्यात अतिशय खुलून आहे, तसेच त्यात घेतलेल्या चक्राकार ताना देखील सुंदर आहेत आणि त्यांच्या गायकीची परिक्रमा वाढवणाऱ्या आहेत.
    "शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती,
    देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती".
    कवियत्री शांताबाई शेळक्यांच्या सहज, ओघवत्या आणि प्रासादिक शैलीत लिहिले गेलेले हे गाणे परत एकदा हंसध्वनी रागाची खेळकर प्रकृती दाखवणारे आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी तशी एकुणातच फार कमी गाणी गायली आहेत आणि त्यातील हे एक लक्षणीय गीत. चाल संगीतकार आनंदघन (लता मंगेशकर) यांनी बांधली असून, चाल गीतातील आशयाशी सुसंगत आहे. अतिशय द्रुत लयीत गाणे आहे आणि त्याला घोड्याच्या टापांचा ताल दिलेला आहे जो बऱ्याच चित्रपट गीतांतून वापरलेला आपल्या आढळून येईल.
    भारतीय रागसंगीतात सर्वसाधारणपणे भक्तीभाव, समर्पण वृत्ती किंवा मुग्ध, संयत असा शृंगार अथवा विरहाची भावना, याचा भावनांचा परिपोष आढळतो परंतु अशा वेळी "हंसध्वनी" सारख्या आनंदी, उत्फुल्ल अशा रागाचे वेगळेपण लगेच वेगळे अस्तित्व जाणवते आणि हेच या रागाचे खरे वैशिष्ट्य होऊन बसते.
    - अनिल गोविलकर

  • मानवता – अभंग

    माणसाने द्यावे | प्रेम माणसाला |
    हीच वाटे मला | मानवता ||१||

    माणसाने आता | करावा आदर |
    करावी कदर | माणसाची ||२ ||

    ठेवू गड्या आता | कर्मावर श्रध्दा |
    गाडू अंधश्रद्धा | पाताळात ||३||

    जिवंत असता | करू रक्तदान |
    शरिराचे दान | मेल्यावर ||४||

    प्रत्येकाचे मन | आपण जपावे |
    प्रत्येकाने द्यावे | योगदान ||५ ||

    माणसे सगळी | एकची मानावी |
    मूठमाती द्यावी | जातीभेदां ||६ ||

    दृष्टीकोण ठेवा | व्यवहारवादी |
    मानवतावादी | होवू आता ||७ ||

    खावे ज्याचे त्याने | द्यावे भुकेल्याशी |
    कोणीही उपाशी | राहू नये ||८ ||

    निसर्गाची कृपा | लाभली अपार |
    करू नको वार | झाडावर ||९ ||

    प्राणिमात्रांवर | दया दाखवावी |
    गाय ना विकावी | कसायाला ||१० ||

    अपघाती जीव | दिसता रस्त्यात |
    करण्या मदत | धाव घ्यावी ||११||

    सांगितले काही | मानवता गुण |
    करून वंदन | निसर्गाला ||१२ ||

    © जयवंत भाऊराव वानखडे,कोरपना
    तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर
    भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५

  • दलित रंगभूमी – दलित नाट्यचळवळ वर्णनात्मक प्रवास

    दलित रंगभूमीचे पहिले नाटक तृतीय रत्न (1855) की जे महात्मा फुले यांनी लिहिले आहे. या नाटकाचा विषय ब्राह्यणांनी जे देवाच्या नावे गैरसमज व अंधश्रद्धा प्रस्थापित केल्या होत्या त्या विरुद्ध प्रहार करणारे हे नाटक होय.