वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ,
मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।।
असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक,
हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।।
प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ,
श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।।
ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा,
समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।।
खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा,
खेळाचे चक्र फिरे सर्वदा, अवितरपणे ।।५।।
प्रत्येकाचे आयुष्यमान, कमी जास्त असून,
जीवन मर्यादा पडून, काल क्रमणा होई ।।६।।
कुणी राही क्षणभर, कुणाचे आयुष्य शंभर,
कांहीं जगती वर्षे सहस्त्र, हीच निसर्गाची विविधता ।।७।।
लाखो वर्षे राही तारे, इंद्रादी देवही जाती सारे,
सर्वांच्या मर्यादा ठरे, प्रभू शक्तिमुळे ।।८।।
उदाहरण अपवादात्मक, अढळ पदाचे प्रतिक
ध्रुव तारा एक, होई या ब्रह्मांडी ।।९।।
ध्रुव कथा मनोहर, भक्ति तपसिद्धी आधार,
इंद्र शक्तिची माघार, होई ध्रुवभक्तिपुढे ।।१०।।
उत्तानपाद राजा आसूर, दोन राण्यांचा संसार,
राज्य करी प्रजेवर, प्रेमळपणे ।।११।।
सुरुचि राणी आवडती, उत्तम तिचा मुलगा होता,
सुनीती ठरे नावडती, ध्रुव बाळाची आई ।।१२।।
ध्रुव एके दिनी दरबारी, चढूनी सिंहासनावरी,
राज्याच्या मांडीवरी, आनंदाने बसला ।।१३।।
हे न पटले सुरुचीला, खेचले खालती ध्रुवाला,
आहे तो मान उत्तमाला, असूनी तिचा मुलगा मोठा ।।१४।।
ध्रुव जाई रडत, आईसी दु:ख सांगत,
कुणी न मजसी खेळत, राग करी सारे ।।१५।।
नावडता म्हणून, न देई कुणी स्थान
हकलून देती सारेजण, प्रत्येक स्थानाहुनी ।।१६।।
माता सुनिती, हतबल होती,
न देखे दु:ख ती, ध्रुवाच्या ।।१७।।
आई करी ध्रुवाचे सांत्वन, प्रभूची महीमा महान,
त्यास प्राप्त करून, जीवन होई सुखी ।।१८।।
न सांगता कुणाला, ध्रुव जाई वनाला
शोधी परमेश्वराला, सर्व ठीकाणी ।। १९।।
भयाण जंगलात, प्रभू नामे टाहो फोडीत,
भाव भक्तिचे मनात, ठेवून बोलावती प्रभूला ।।२०।।
नारद भेटले ध्रुवासी, बघूनी भाव भक्तीसी
आशीर्वाद देई त्यासी, यश मिळण्याबाळा ।।२१।।
उपदेश नारद करी, श्रद्धा ठेवावी प्रभूवरी,
तोच सर्वांचा तारण हरी, त्यास करावे पावन ।।२२।।
प्रसन्न करावे प्रभूला, अर्पूनी भक्ती त्याला
त्याच्या इच्छे जाई फळाला, जीवनातील सर्व गोष्टी ।।२३।।
ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत राहाय
तोच तुझा आधार होय,प्रभू मिळे पर्यंत ।।२४।।
प्रभू मिळणे नाही सोपे, प्रयत्न करावे बहूत तपे
श्रद्धेने त्याचे नाम जपे तेव्हाची पान होई ।।२५।।
ऐकूनी नारदाचा उपदेश, मनी बिंबला ईश,
पावन करण्याची आस, ध्रुवास लागली ।।२६।।
नारदाचा आशिर्वाद घेवूनी, ध्रुव जाई वनी,
आसन झाडाखाली मांडूनी, तप करण्या बसला ।। २७।।
बालक ते लहान, मनी विश्वास महान
विसरोनी भूक तहान, मंत्राचा जप करी ।।२८।।
असे जेथे श्रद्धा प्रभू सदा,
मिळेल त्याच्या आशिर्वादा जीवनातील समाधान ।।२९।।
मंत्रोपचारास लागली वाणी, तरंगे त्याची बनूनी
चक्रगती त्यास मिळूनी, फिरू लागली देहा भवती ।।३०।।
मंत्र ऊर्जा मिळून, चेतना जागृत ठेवून
देह जिवंत राहून तप करी बहूत काळ ।।३१।।
मंत्र चक्र गती, ऊर्जा निर्माण करती
त्याचे तेजोलय बनती, देहा प्रकाशी ।।३२।।
मंत्र लहरी तेजोवलय, दिव्यती वाढत जाय
जैसे तप महान होय, बाळ ध्रुवाचे ।।३३।।
तपसिद्धीची शक्ती, प्रभूसी जागृत करती
चित्त त्याचे ओढती ध्रुव बाळाकडे ।।३४।।
इंद्र सर्व देवा संगे, ध्रुवचे तपसामर्थ्य बघे
निरनिराळ्या शक्ति सोडून अंगे, ध्रुव बाळाच्या ।।३५।।
अग्रीच्या ज्वाळा, वायूच्या वादळा
वरूणाचा पावसाळा, निष्प्रभ ठरली ध्रुवापुढे ।।३६।।
इंद्र शक्तीचा मारा, न तोडी तेजोलय चक्रा
रक्षण कवचाची धुरा मजबूत असे ध्रुवा भोवती ।।३७।।
संपता इंद्र शक्ती प्रदर्शन, प्रभू देई दर्शन
बाळ ध्रुवासी उठवूनी जवळ घेई त्याला ।।३८।।
प्रभू विचारी ध्रुवाला ,का शीनविसी बाल देहाला
सांग तपाचे कारण मला, देईन तुज मी ते ।।३९।।
निश्चीत नाही मज स्थान, सारेजण करी अपमान
उठविती सर्व पदाहून, ध्रुव सांगे प्रभूला ।। ४०।।
दूर घ्यावा निवारा, गगनातील एक तारा
मिळोनी प्रभूचा सहारा, कुणी न हलवावे मला ।। ४१।।
'वर'दिला प्रभूनी, अस्थिरता जाई निघूनी
पद ध्रुवाचे अढळ होवूनी कुणी न घेई त्यासी ।। ४२।।
कुणी न राही एके जागी, फिरत असे सदा मार्गी
स्थिरता फक्त ध्रुवतारा अंगी या विश्वमंडळामध्ये ।। ४३ ।।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१५- २७११८३
श्री दामाजी पंत, महान विठ्ठल भक्त
होवून गेला एक संत, मंगळवेढे गावी ।। १।।
जेथे असे प्रभूभक्ति, तेथे वसे दया, क्षमा, शांति
दुरितांसाठी मन कळवळती, त्यांचे हृदयीं ।। २।।
विचार गरीबांचे मनी, सेवा दीनांची करूनी
भाव विठ्ठला चरणी, अर्पिले असे ।। ३।।
नाम घेतां विठ्ठलाचे, काम करीता जनांचे
आनंदी भाव तयांचे, मनीं येई ।। ४।।
दामाजीची कथा ऐकूनी, भान जाई हरपूनी
प्रभू येई सेवक बनूनी, भक्तासाठीं ।।५।।
दामाजीपंत मामलेदार, मोठा त्यांचा अधिकार
म्हणून ते जिम्मेदार सरकारात ।।६।।
धान्याची भरती कोठारे, ठेवूनी त्यावरी पहारे
अधिकार दामाजीस सारे, धान्याच्या वाटपाचे ।।७।।
राज्यात परिस्थिती दुष्काळीं, पडूं लागले भूकबळीं
दु:खी जनता सगळी, हा: हा कार माजला ।।८।।
समोर धान्यांच्या राशी, बाहेर लोक मरती उपाशी
सहन न होई दामाजीसी, बघूनी हे सारे ।।९।।
राजानें हुकूम देऊन, धान्य ठेवले सांठवून
न वापरावे सामान्य जन, त्या धान्यासी ।। १०।।
धान्याचे साठे बहूत, करूनी लोकांसी वंचित
दु:खी त्यासी बघत, हर्ष होई राजासी ।।११।।
लोकांसी बघूनी भूके, दामाजीस होई दु:खे
कसे हे संत देखे, शांत राहूनी ।।१२।।
विठ्ठल नाम मनीं, कोठारे दिली उघडूनी
भूकेल्यास दाना-पाणी, देई दामाजीपंत ।।१३।।
लोकांस आनंदी बघूनी भान जाय हरपूनी
नाचू लागला तल्लीन होऊन, विठ्ठलाचे भजन करीं ।।१४।।
सारे कोठार लुटविले, प्रत्येक जीवा प्रभू संबोधले
त्यांच्या आनंदी एकरूप झाले, दामाजीपंत ।।१५।।
दुसऱ्याच्या आनंदाचे भाव, स्वत:चे मनी घेई ठाव
तेथेची जाणावा देव, हेच असती सत्य ।।१६।।
भुकलेले व्याकूळ जीव, मिळता धान्यराशी ठेव
उचंबळून येती आनंदी भाव, नाचू लागली सारी ।।१७।।
दामाजीस न राही भान, तल्लीन होती नाच नाचून
विठ्ठल नामाचा गजर करून, तादात्म्य झाले प्रभूशी ।।१८।।
बातमी कळली राजाला, क्रोध मनी आला
अटक करण्या हुकूम दिला, दामाजी पंतासी ।।१९।।
प्रभूची लीला न्यारी, ज्याचे तो तारण करी
कुणी न त्यासी मारी, सांभाळ करी भक्ताचा ।।२०।।
काटा रूते भक्तचरणी, येई पाणी प्रभू नयनीं
नाते घ्यावे समजोनी, प्रभू भक्ताचे ।।२१।।
भक्त असता संकटी, धावून येती पाठी
सुटका करती जगत्जेठी, पाठीराखा बनून ।।२२।।
विश्वाचा अधिनायक, भक्तासाठी बने सेवक
हेच भक्तीचे गूढ एक, समजोनी घ्यावे ।।२३।।
समजण्या हे सारे, उघडावी मनाची द्वारे
वाहू द्या भक्तीचे वारे, अंतर्मनी तुमच्या ।।२४।।
सेवक होवूनी जगत्जेठीं, घेवूनी घोंगडी पाठी
हातीं घेती काठी, राज दरबारी आला ।। २५।।
मज म्हणती विठू सेवक, दामाजीचा मी हस्तक
धान्यराशी विकूनी ठीक, आणली असे ती रक्कम ।।२६।।
उलटी करूनी घोंगडी, मोहरांची रास पाडी
थक्क करूनी सोडी, राजाला ।।२७।।
चकीत झाला राजा, विस्मयीत होई प्रजा
कसा देवू मी सजा, दामाजी पंतासी ।।२८।।
दामाजीचा आदर करी, जाणूनी विठ्ठल त्याचे उरी
लोळण घेतले चरणा वरी, दामाजी पंताच्या ।।२९।।
करमणूकीची आहे कथा, समजण्या वाटते कठीणता
पाहीजे मनोभावाची उच्चता, कळण्यास हे तत्त्वज्ञान ।।३०।।
दामाजीची कहाणी, दान धर्माचे प्रतीक म्हणोनी
दुरीतांचे दु:ख, जाणोनी ग्रहण करावी सर्वांनी ।।३१।।
डॉ. भगवान नागापूरकर
१६-१५११८३
माझे नमन बौद्धाला सत्य अहिंसेच्या देवाला
कोहिनुर हिरा चमकला ह्या विश्वामध्यें ।।१।।
गौतमाचे जीवन बौद्धाचे तत्वज्ञान
दोन्ही असती महान उद्धरुनी नेई जगातें ।।२।।
दाखवोनी जीवनाचे द्वार सांगोनी आयुष्याचे सार
भटकलेल्या व्यक्तींचा आधार बौद्ध होई ।।३।।
बौद्धाचे तत्वज्ञान असे ते महान
नेई उद्धरुन सर्व जनांना ।।४।।
उद्धरुन जाती जे बौद्धास जाणती
शिकवणीची महती बौद्धाने सांगितलेल्या ।।५।।
प्रथम सांगतो जीवन नंतर ऐकवी शिकवण
मात्र करावे आचरण हीच सार्थकता तुमची ।।६।।
गौतमाचा इतिहास काव्यमय कथा त्याची भावमय
ऐकतां मन भरुन जाय कठीण आहे समजण्या ।।७।।
ज्याच्यासाठीं झगडे व्यक्ति तीच जन्मतां त्याचे हातीं
धन सत्ता नि संपत्ति त्याग केला सर्वस्वाचा ।।८।।
सामान्य माणूस सर्वस्व समजे देहास
चिंता त्याची ऐहिक सुखास रात्रंदिनीं ।।९।।
धनाच्या कुणी पाठीं झगडतो कुणी सत्तेसाठीं
घालवी जीवन सुखापोटी ऐश्वर्यास ध्येय समजोनी ।।१०।।
गौतम मोठे नशिबवान राजघराणीं जन्म घेऊन
लोळण घेती सत्ता नि धन गौतमाचे जवळी ।।११।।
कपिलवस्तु नगरी शुद्धोधन राजा राज्य करी
प्रेम होते प्रजावरी पुत्राप्रमाणें ।।१२।।
केली प्रभुवर भक्ति त्याचे आशिर्वाद मिळती
प्राप्त झाली संतती राजा शुद्धोधनास ।।१३।।
बाळाचे तेज दिव्य जन्मता भासले भव्य
अपुर्व चमके भाव त्याचे मुखावरी ।।१४।।
कुणी संबोधती भगवान अवतार विष्णूचा म्हणून
परी निसर्गाचे ते एक देणं ह्यात शंका नाहीं ।।१५।।
मानव रुप घेती ईश्वरी शक्ती असती
ऐसे क्वचित होती ह्या संसारी ।।१६।।
साधू संत जमती कांही भविष्य जाणती
आशिर्वाद बाळा देती सर्व मिळूनी ।।१७।।
हस्त रेखा बघूनी बाळा जन्मकुंडली जागोनी
विस्मित होऊनी जाई ज्योतिषी ।।१८।।
बाळाचे भविष्य निराळे सामान्यांस न कळे
पंचभूताचे जाळे असती त्याचे भवती ।।१९।।
बाळासी मिळे अप्रतीम शक्ति परंतु राजा न बनती
संसाराची येऊन विरक्ति रमुन जाईल वनांत ।।२०।।
न होई राजा नगरीचा राजा बनेल निसर्गाचा
महाराजा तो विश्वाचा अंतरात्म्यावर राज्य करी ।।२१।।
जाणवेस निसर्ग सृष्टी बाळाची असेल व्यापक द्दष्टी
न व्हावे राजा कष्टी संकुचित् भाव सोडावा ।।२२।।
सोडूनी स्वतःचा संसार शिरी घेईल विश्वभार
विश्वाचा करील उद्धार तोच एकला ।।२३।।
राजास न पटे हे तत्व न आवडे त्यास हे कवित्व
बाळ त्याचे जीवनसत्व मायेपोटीं खिन्न झाला ।।२४।।
नांव सिद्धार्थ ठेवले उपाय मनीं योजिले
बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी ।।२५।।
राजाचा भव्य महाल ऐश्वर्याची रेलचेल
सर्वत्र सुख दिसेल ह्याची घेई काळजी ।।२६।।
दुःखाची छटा नको विरक्तीचा भाव नको
एकांतवास नको ह्याची चिंता राजाला ।।२७।।
सुंदर बागेमधील कोमेजलेले फुल
न पाही सिद्धार्थ मुल ही सुचना सर्वांना ।।२८।।
सिद्धार्थ वाढला विलासांत जीवन ऐश्वर्य कंठीत
लग्न होऊनी पिता बनत संसारांत रमला ।।२९।।
उत्सव राजधानीतील बघण्या सोहळा नगरीतील
प्रथम ठेवले पाऊल सिद्धार्थाने प्रासादाबाहेर ।।३०।।
आयुष्याचा तो क्षण टाकी जीवन पलटून
विधी लिखीत अटळ असोन कुणी न बदले त्यासी ।।३१।।
उत्सवातील जनसागरांत पाही एक म्हातारा नि प्रेत
दुःख दिसे जीवनांत प्रथमच सिद्धार्थाला ।।३२।।
माहीत नव्हते त्यासी दुःखे असती जीवनासी
जर्जर करुनी देहासी मृत्यु येई शेवटीं ।।३३।।
जन्म स्थिति व लय जीवनाचे चक्र होय
निसर्ग चालत राहाय प्रथमची जाणले सिद्धार्थानें ।।३४।।
सरळ मार्गी जीवनांत विस्फोट होऊनी जात
लुप्त असलेल्या ज्ञानांत चेतना जागृत झाली ।।३५।।
रात्रीच्या काळोखांत विज चमकावी आकाशांत
उजेड होई वातावरणांत एका क्षणामध्यें ।।३६।।
तशी ती दुःखद घटना पेटवी सिद्धार्थाची चेतना
लहरी उठती मना जीवनाबद्दलच्या ।।३७।।
नविन प्रकाश पडला मनीं राजपुत्र गेला भांबावूनी
सत्य शोधण्याची आंस ध्यानी संकल्प त्याने केला ।।३८।।
उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती ऐहिक सुख त्यागती
सोडूनी राज्य आणि संपत्ति जाई निघोनी वनांत ।।३९।।
त्याग केला पत्नीचा सोडला मोह बाळाचा
मार्ग पत्कारी एकांताचा जाई निघूनी अज्ञातस्थळी ।।४०।।
हे सारे अघटित आपण म्हणूं दैवलिखीत
परंतु हे अपूर्व होत सामान्याचे काम नव्हे ।।४१।।
सर्व साधारण धडपडतो ज्याचे साठी जगतो
तेचि सिद्धार्थ लाथाडतो ह्यासी म्हणावे असामान्य ।।४२।।
म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष परमेश्वरी अंश
दाखवोनी खरे आयुष्य सुखाचा मार्ग दिला ।।४३।।
सर्वची सोडोनी गेला तो वनीं
एकची विचार मनी जीवनांचे सत्य शोधणे ।।४४।।
निसर्ग रम्य स्थळी बौधीवृक्षाखालीं
तपः साधना केली सिद्धार्थाने ।।४५।।
एकाग्र करुनी मन लावले ध्यान
केले चिंतन अंतरात्म्याचे ।।४६।।
अंन्तर्मुख झाला बाह्य जगा विसरला
सत्यास शोधूं लागला सिद्धार्थ ।।४७।।
अंतर्मनातील सुप्त शक्ति बिंदूप्रमाणें असती
रुप प्रचंड घेती जागृत झाल्याने ।।४८।।
शक्ति असे आत्मबिंदु त्याचा होई परमात्मा सिंधु
भाव बने आनंदु चेतना उद्दीप्त होता ।।४९।।
राग लोभ अहंकार मद मत्सर विकार
षडरिपूंचे रुप भयंकर आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे ।।५०।।
संसारातील मायाजाळ त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ
सुप्त राही ते कमळ चिखलाच्या वेष्ठनामुळें ।।५१।।
फुटावा लागतो अंकुर यावे लागते पाण्यावर
तेंव्हा कमळ दिसणार आनंदमय ।।५२।।
नारळा बाहेरील करवंटी आंत मधुर खोबरेवाटी
तैसी मोहमायाची जळमटी व्यापूनी टाकी आत्मबिंदू ।।५३।।
मोहाचे असतां वेष्ठन आत्म्यासी येई असुद्धपण
मोह आणि आत्मज्ञान दोन्ही नसती एके ठिकाणी ।।५४।।
अग्नि आणि पाणी जाई विरुद्ध दिशेनी
तत्वे वेगवेगळी असोनी निर्गाची ।।५५।।
तैसेची संसारातूनी मायाजाळ दूर करुनी
आत्मतत्वास जाणूनी आत्मशुद्धी करावी ।।५६।।
सिद्धार्थाचे ध्यान काढूनी मायाजाळाचे वेष्ठन
आत्मबिंदूसी होई विलीन ज्ञानाग्नी पेटला चित्ती ।।५७।।
बौद्धी वृक्षाखालीं ज्ञनगंगा मिळाली
अंतर्चेतना जागृत झाली सिद्धार्थाची ।।५८।।
गौतमबुद्ध संबोधले महात्मापद मिळविले
महान तत्व शिकविले बौद्धधर्म स्थापुनी ।।५९।।
बौद्धाचा पाया महान सत्य अहिंसा हे तत्वज्ञान
जाणण्याते करावे ध्यान सार्थक करण्या जीवनाचे ।।६०।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१७- १०११-८३
गजानन तो संत महात्मा ह्या भूतली आला असे
मानव म्हणूनी जन्म घेतला सर्वासाठीं ईश्वर भासे ।।१।।
आला होता गरिबांसाठीं कैवारी बनूनी त्यांचा
आजही त्याचे स्मरण होतां नाश होई दुःखाचा ।।२।।
कोठूनी आला, कसा आला कळले नाहीं कुणां
जात पात धर्म बंधने त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा ।।३।।
तो तर आला सर्वासाठीं मानवातील देव बनुन
धन्य केले कित्येकांना संकटे दूर करुन ।।४।।
संदेश घेवूनी आला होता प्रभूचा पृथ्वीवरी
धर्म रक्षण्या सांगुन गेला महान कार्य तो करी ।।५।।
नास्तिकतेची चढली होती धूळ विचारावरती
झटकून देतां तिजला नविन ज्योत पेटविती ।।६।।
जागृत केला भाव प्रभूचा प्रत्येक व्यक्तीचे मनीं
आस्तित्व ईश्वर शक्तीचे दाखविले गजाननांनी ।।७।।
कलियुगीचा असे हा काळ धर्म चालला विसरुन
गजाननाच्या रुपामध्यें दिसले सर्वा देवपण ।।८।।
प्रफुल्लित करिंता ज्ञानानी फुंकार मारुनी राखेवर
भक्तीभावानें पुजितां तुम्हीं पावन होतो ईश्वर ।।९।।
लेखक नव्हता, कवि नव्हता शिकविले नाहीं ज्ञान
सामान्य अशा घटनानीं दाखवूनी दिले प्रभूपण ।।१०।।
लोकांस वाटले चमत्कार गजाननाच्या जीवनाचे
हे तर सहजची घडले आस्तित्व होते त्यांत प्रभूचे ।।११।।
आजही त्याच्या नावामध्यें आहे शक्ति प्रभूची
संसारातील दुःखे हरपती कृपा होतां गजाननाची ।।१२।।
मानव म्हणून होता साधा उघडून देई मंदीरद्वार
देई घालवूनी दुःखें सारी हलका केला पाप भार ।।१३।।
बऱ्याच घडल्या घटना दिसले ज्यामध्ये चमत्कार
प्रभूविषयीं श्रद्धा निर्मूनी केली ईशवृत्ती साकार ।।१४।।
प्रभूसी पावन करण्या पाहिजे महान तपशक्ति
कित्येक जन्माची त्याला लागत असते भक्ति ।।१५।।
कठीण असते सारे पावन करण्या प्रभूला
मोठ मोठ्या विभूती हार जाती त्याला ।।१६।।
तुरळक कांही व्यक्ति प्रभूमय जे झाले
शेगांवचे गजानन त्यांतलेच एक ठरले ।।१७।।
त्यांच्याकडे असते दिव्य शक्तीचे बळ
सहजतेनें ते जे करिती चमत्कार समजे सकळ ।।१८।।
गण गण गणांत बोते मुखी घेत होते सतत
तन्मय होऊन शब्दामध्यें ध्यान मग्न ते होऊन जात ।।१९।।
आंता कांही प्रसंग सांगतो चमत्कार भासला त्यामध्यें
ईश्वर चैतन्याची झलक दिसून आली आनंदे ।।२०।।
प्रथम येतां शेगांवी कपडे नव्हते अंगावरी
वेडा पिसा वाटूनी समजले त्यास भिकारी ।।२१।।
एका घरा पुढतीं पडल्या उष्ट्या पत्रावळी
गजानन बसून तेथें जमवी शिते सगळी ।।२२।।
तुच्छ लेखले सर्वानीं प्रथम बघतां त्याला
अन्नातील ब्रह्म जाणतां पाणी आले नयनाला ।।२३।।
वृत्ती असते लोकांची बघण्या बाह्याकडे
अंतरीच्या दिव्यत्वाची उमज त्यांना न पडे ।।२४।।
नाल्यामधले थोडे पाणी मलीनतेने साचलेले
हात लागतां गजाननाचा निर्मळ बनूनी वाहूं लागले ।।२५।।
कित्येक रोगी त्रासून गेले दुर्धर अशा व्याधींनी
आशिर्वाद मिळतां गजाननाचा सुद्दढ झाले शरिरांनी ।।२६।।
शुष्क झालेल्या विहीरींमध्यें उचंबळूनी आले पाणी
आनंदी झाले गांवकरी तहानलेल्यांची तहान भागूनी ।।२७।।
अहंकारानी पेटलेले आले होते गोसाविजन
अग्नीज्वालांत बघूनी त्यांना नतमस्तक झाले सारेजण ।।२८।।
वांझोट्या एका गाईने उच्छाद फार मांडला
क्षीर देण्यास लावूनी शांत केले तिजला ।।२९।।
अंतःकरण जाणून भक्ताचे देई त्यांना तसेच दर्शन
आनंदी केले कांहीना विठोबाच्या रुपांत येवून ।।३०।।
नावेमध्यें जात असतां गजाननाच्या सहवासे
संकट समयीं प्रत्यक्ष नर्मदा धावूनी आली असे ।।३१।।
टिळकासम थोरांना आशिर्वाद मिळती गजाननाचे
गीतारहस्य लिहूनी ज्यानी पांग फेडले भूमातेचे ।।३२।।
येथे नव्हता जादूटोणा नव्हते कांहीं गंडे दोरे
विश्वास ज्याचा प्रभूवर त्यांनाच मिळते सारे ।।३३।।
जीवनाचे असून चक्र त्यांच्या असतात मर्यादा
दिव्य शक्तीनें ओलांडतां चमत्कार भासतो सदा ।।३४।।
असेंच बघूनी चमत्कार विश्वास ठेवतो प्रभूवरी
श्रद्धा होण्या निर्माण चमत्कारच काम करी ।।३५।।
एकदा बसतां श्रद्धा प्रभूस समर्पण होई
प्रभूस पावन करितां चमत्कार विसरुनी जाई ।।३६।।
गजाननाच्या जीवनांतील बघू नका चमत्कार
श्रद्धा ठेवूनी त्यांचेवरी पावन करा ईश्वर ।।३७।।
आजही येता भक्तमंडळी दूर दूर गांवाहूनी
समाधान पावती सारे दर्शन त्यांचे घेवूनी ।।३८।।
पावन होई नवसाला हीच त्याची महती
आदर ठेवूनी भक्तजन प्रेमभावना अर्पण करती ।।३९।।
गुरु त्यांना समजोनी पूजा करा त्यांची
पारायण करा सतत गजाननाच्या पोथीची ।।४०।।
सतत करितां पारायण गजाननमय तुम्ही व्हाल
लय लागूनी ईश्वराची उद्धरुन तुम्ही जाल ।।४१।।
अवतार कार्य करुनी देहयात्रा संपविली
ईश्वर श्रद्धा मिळवून धार्मिक चेतना पेटविली ।।४२।।
संवाद करुनी विठ्ठलाशी समाधीची घेतली अनुमती
शेगांवी मुक्कामीं येवून सर्वासमोर समाधिस्त होती ।।४३।।
अठराशे बत्तिस शके भाद्रपद शुद्ध पंचमीला
समाधी घेऊनी गजाननांनी जीवन यात्रेस निरोप दिला ।।४४।।
भव्य असे मंदीर उभारले गेले शेगांवी
लाखो भक्त मंडळी त्यांचे दर्शन घेई ।।४५।।
डॉ. भगवान नागापूरकर
१८- २२०१८४
महाभारतातील कर्णाचे स्थान अद्विती असून
मान जाई उंचावुनी त्यास समजोनी घेता ।।१।।
सुर्यपुत्र कर्ण घनुर्धारी महान
दानशूर तो असून इतिहास घडविला ।।२।।
सुर्य आशिर्वादे जन्मला कवच कुंडले लाभती त्याला
रक्षण वलय शरिराला मिळती कर्णाच्या ।।३।।
अंगातील कर्तृत्व शक्ति माणसाला उंचावती
शक्तीस वाट फुटती शोधूनी त्याची योग्यता ।।४।।
जन्मुनी प्रथम पांडव सहवासांत सारे कौरव
हेच त्याचे खरे दुर्दैव नियतीचा होई खेळ ।।५।।
महाभारत युद्ध प्रसंगी कौरवामध्ये कर्ण अग्रभागीं
होता तो विजयाच्या मार्गी हादरुन सोडले पांडवाना ।।६।।
इंद्रासह सर्व देव आकाशी बघती अर्जुन-कर्ण युद्धासी
परी चित्त त्यांचे कृष्णासी बघती त्याची लिला ।।७।।
थोपवून धरिला अर्जून रथ असूनी सारथी भगवंत
बाण शक्तिनें नेला रेटीत कृष्ण परमात्म्यासह ।।८।।
शक्तीचे हे दिव्य दर्शन बघू लागले आकाशांतून
इंद्रादी देव विस्मयित होऊन न्याहळूं लागले कर्णाला ।।९।।
चकीत झाले देवगण यश अर्जुना यावे म्हणून
कवच कुंडले मागावी दान इंद्र करी मनीं विचार ।।१०।।
प्रातः काळची सुर्य किरणे सुचवी कर्णा सावध राहणे
रुप घेतले इंद्राने दान मागण्यासाठीं ।।११।।
कर्ण होता दानशूर मन त्याचे उदार
न घेई तो माघार संकल्प करिता एकदां ।।१२।।
इंद्र देवाचा राजा ठोठती कर्ण दरवाजा
ठेवूनी मनी भाव दुजा रुप घेतले याचकाचे ।।१३।।
देवांचा नृपती दान मागण्या येती
हे माझे भाग्य असती सत्व परिक्षा देण्याचे ।।१४।।
ओळखले याचकाला इंद्राच्या सत्य रुपाला
अभिवादन केले तयाला कवच कुंडले देई दान ।।१५।।
कवच कुंडलाचे दान स्वहत्याचे ठरले कारण
असूनी कर्णा हे ज्ञान इंद्रसी दानधर्म केला ।।१६।।
इंद्रापरी याचक कोण जो मागेल मजसी दान
त्याचा कर्णा अभिमान हीच त्याची श्रेष्ठता ।।१७।।
कर्णाचे हे दान ठरले त्याचे समर्पण
करी त्यासी महान अजरामर करुनी ।।१८।।
डॉ. भगवान नागापूरकर
२०-२१११८३
धन्य तो एकलव्य, जीवन ज्याचे दिव्य
इतिहास घडवी भव्य, कौरव पांडवा संगे ।।१।।
साधा होता भिल्ल, शरीर संपदा मल्ल
धनुर्विदेचे शल्य, त्याच्या अंगी होते ।।२।।
जन्मता धनुर्धारी, बनोनी शिकारी
हिंस्र जनावरे मारी, अचूक नेम मारूनी ।।३।।
पाहोनी भक्ष्य, होवूनी दक्ष
देवूनी लक्ष, शिकार करी ।।४।।
गुरूच्या होता शोधात, तीच त्याची खंत
पूर्णता नसे ज्ञानात, गुरूविना ।।५।।
शोधता आला आश्रमी, कौरव पांडवाचे मुक्कामी
प्रसन्न झाला चित्ती ।।६।।
गुरू द्रोणाचार्य, महान ते आचार्य
अद्वितीय त्यांचे कार्य, महाभारतामध्ये ।।७।।
कौरव पांडवाचे गुरू, धनुर्विद्येत तरबेज करू
कुणी न त्यांचे हात धरू, ही इच्छा द्रोणाची ।।८।।
कौरव पांडव मेळाव्यांत, बसता द्रोण मध्यभागांत
एकलव्य येई तेथ, अभिवादन करी गुरुला ।।९।।
इच्छा प्रदर्शिली विद्येची, धनुर्धारी बनण्याची
द्रोणास गुरू करण्याची, एकलव्याने ।।१०।।
बघूनी एकलव्याची स्फूर्ती, द्रोणास हर्ष होती
कौतुके आशिर्वाद देती, गुरू द्रोणाचार्य ।।११।।
विद्या माझी क्षत्रियासी, परी तू भिल्ल असशी
कसे शिकवू मी तुजसी, द्रोण विचारी ।।१२।।
गुरुचरणा खालची माती, एकलव्य घेई हाती
हाच माझा गुरू असती, आशिर्वाद मागी द्रोणासी ।।१३।।
मानूनी गुरू द्रोणा, घेवूनी त्यांची प्रेरणा
जाई निघोनी वना, एकलव्य ।।१४।।
घेवूनी चरणाखालील माती, बनवी तयाची द्रोण मूर्ती
गुरू त्या प्रतीमे समजती, शिष्य होई एकलव्य ।।१५।।
नमन करूनी द्रोण प्रतिमेला, धनुर्विद्येचा सराव केला
मेहनत तो घेवू लागला, रात्रंदिनी ।।१६।।
करूनी गुरूचे चिंतन, एकाग्र करूनी मन
धनुर्विद्येचे ज्ञान, घेवू लागला ।।१७।।
गुरू समजोनी मूर्तीचे ठायी, धनूर्विद्येचे ज्ञान घेई
शिष्याचे प्रतीक होई, ह्या जगामध्ये ।।१८।।
नसता गुरू समोरी, ज्ञान संपादन करी
हीच असामान्यता खरी, एकलव्याची ।।१९।।
एकाग्र चित्तेचे फळ, हेच यशाचे बळ
समजोनी घ्यावे सकळ, विद्यार्थी जन हो ।।२०।।
कौरवा पांडवा संगे, द्रोण जाता त्याच मार्गे
अघटीत घटना होई गे, एकलव्याच्या वनांत ।।२१।।
गुरू मूर्ती समोरील चिंतनात, एकलव्याच्या एकाग्रतेत
अडथळा उत्पन्न होत, श्वानाच्या भूंकण्याने ।।२२।।
कौरव पांडवांची शिकारी कुत्री, भूंकू लागली एकलव्या वरती
थांबविण्या त्यांच्या भुंकण्याती, बाण सोडला त्यांचे वर ।।२३।।
अचूक वेध साधला, इजा न करी श्वानाला
बंद करी भूंकण्याला, मुखी बाण रोवूनी ।।२४।।
विस्मयीत झाले द्रोण, बघूनी त्याचे अचूक बाण
गुरू असावा ह्यांचा कोण, प्रश्न मनी पडला ।।२५।।
वंदन केले द्रोण चरणी, तुम्हीच माझे गुरू असूनी
विद्या शिकवली तव मूर्तीनी, चिंतन करिता तुमचे ।।२६।।
एकलव्याची वेध शक्ती, अर्जुनाहून सरस ठरती
मात करील त्याचे वरती, एकाग्रता शक्तीमुळे ।।२७।।
एकाग्रता हीच शक्ती, एकलव्याने जाणली युक्ती
करूनी गुरू मूर्तीवर भक्ती, साध्य केली धनुर्विद्या ।।२८।।
जर वाढेल हे तपसाधन, एकलव्य बनेल महान
धनुर्विद्येतील अजिंक्यपद, प्राप्त होईल त्यासी ।।२९।।
जाणता हे मर्म, विचार करी अधर्म
‘विद्येस बाधा’ हे कर्म, शोधू लागले द्रोण ।।३०।।
प्रसन्न आहे तूज विद्येवरी, माझे आशिर्वाद तुझेवरी,
परी तू गुरूदक्षिणा घ्यावी, खरी इच्छा करीती द्रोण ।।३१।।
उजवा अंगठा छाटूनी, गुरू दक्षिणा समजोनी
करावी तो मज अर्पूनी, द्रोण बोले ।।३२।।
निकामी झाला हात जाणून, अर्पण करी धनुष्य बाण
वंदन करुन गुरुद्रोण, एकलव्य गेला निघूनी ।।३३।।
एकलव्याची एकाग्रता महान, नियतीसी नव्हते मान्य
कर्ण अर्जूनासी मात करून, महाभारत बदलले असते ।।३४।।
एकलव्याचे जीवन, चमकती विज नभातून
एकाग्र चित्तेचे उदाहरण, देई करूनी जगाते ।।३५।।
शुभ भवतू
डॉ. भगवान नागापूरकर
५५८ – १६११८३
एखादी मूर्ती भंगली तर ते अशुभ मानून अशा मूर्तीचे तात्काळ विसर्जन केले जाते. परंतु येथे मात्र या अर्ध्याच मूर्तीची रोज वर्षानुवर्षे यथासांग पूजा केली जाते.
श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.
मारुतिस्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे. त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली आणि करावी अशी शिकवण दिली. या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत.
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
Copyright © 2025 | Marathisrushti