वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजू, असं विधान बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत केलं. पण झालं उलटचं.
राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीत दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा येथे पराभव झाला असता तरं ती "नॅशनल न्यूज' ठरली असती. अजित पवार यांनी बारामतीचा गड राखला, अशी नेहमीचीच बातमी त्यामुळं "फ्लॅश' झाली.
नगरपालिकांचा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर आणि गेल्या अडीच वर्षांची स्थिती पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी भविष्यात एकचं चांगली बातमी येऊ शकते. ती बातमी हीच की *"बारामतीचा गड अजित पवारांनी राखला."* बारामतीच्या पुढे आणि मागे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आता हतबल होऊ लागली आहे. बारामती शेजारच्या सासवड, जेजुरी, इंदापूर, दौंड या ठिकाणी पक्षाला यश मिळालेले नाही. ज्या पुणे जिल्ह्यातून विधानसभेच्या 21 जागा निवडून दिल्या जातात. त्या बालेकिल्ल्यातच पक्षाची अशी स्थिती असेल तर इतरत्र बोलायलाच नको.
अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे अशा हाताच्या बोटांवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापले बालेकिल्ले राखले. इतरत्र भाजपने किंवा शिवसेनेने बाजी मारली. काँग्रेसला जोमाने प्रयत्न न करता चांगल्या जागा मिळाल्या.
राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची अडचण झालेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडे दुसऱ्या फळीत "स्ट्रटेजिस्ट' नाहीत. आर. आर. पाटील असताना त्यांनी जेम्स लेनच्या मुद्यावरून 2004 मध्ये रान पेटवले होते. (आता हा मुद्दा चांगला की वाईट, यावर वाद होऊ शकतात. पण पक्षाची स्ट्रटेजी म्हणून जेम्स लेनचा मुद्दा राज्यात गाजला.) त्याचे चांगले यश मिळून हा पक्ष विधानसभेत राज्यात नंबर एकवर गेला. आता मराठा मोर्चाच्या निमित्ताने भाजपविरोधात रान उठविण्यासाठी या पक्षाकडे फिल्डवरचा नेताच राहिला नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरपालिका किंवा महापालिका निवडणुकीत उतरुन आक्रमक पद्धतीने प्रचार करणे अपेक्षित नाही. आर. आर. पाटील असते तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर फिरून त्यावर भाजपला अडचणीत आणले असते. तसा गर्दी खेचणारा नेता सध्या राष्ट्रवादीकडे नाही.
राष्ट्रवादीकडे सध्या असलेले नेते हे इलेक्शन मॅनेजमेंट मधील तज्ज्ञ आहेत. कोणत्या गल्लीत कोणत्या समाजाची किती मते आहेत आणि कोणाच्या भावकीचा जोर कुठे आहे, याची माहिती त्यांना तोंडपाठ असेलही. मात्र या सूक्ष्म नियोजनासोबतच व्यापक अर्थाने पक्षाच्या मुद्यांची मांडणी करणारा, कार्यकर्त्यांना चेतविणारा नेता दुसऱ्या फळीतील नेता नाही. या नेत्यांकडे ही क्षमता नाही की जाणीवपूर्वक ते स्वतःला "एक्स्पोझ' करत नाहीत, हा देखील मुद्दा आहे. कारण भाजप सरकारच्या विरोधात ओरडले की आपला " काटा" केला जाईल, अशी धास्ती या नेत्यांच्या मनात असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधण्याची ही देखील गरज असावी. नोटांच्या मुद्यावरून ममता बॅनर्जी आक्रमक होतात. पण राष्ट्रवादीचे नेते सावधपणे बोलतात.
सध्याचे सत्ताधारीही राज्यात काहीही घडले तरी त्याचे सारे खापर अजून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्यावर फोडून मोकळे होतात. काँग्रेस थोडेफार तरी प्रत्युत्तर देते. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचे झेंगाट मागे लागल्याने राष्ट्रवादीला असे प्रत्युत्तर देणेही अवघड होऊन बसते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे दुसऱ्या फळीतील नेते आहेत, त्यातील अनेक नेते भाजपशी आतून संधान साधून आहेत. म्हणजे पक्षाचे जहाज बुडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मंडळी भाजपमध्ये केव्हाही उडी मारू शकतात. लोकसभेत पक्षाच्या सहा खासदारांपैकी चार खासदार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. उदयनराजे हे पक्षाला जुमानतच नव्हते. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका झाल्याचे सत्तेच्या वर्तुळात चर्चा आहे.
कोल्हापुरचे खासदार महाडिक हे केव्हाही पक्षातून उडी मारू शकतात. कारण त्यांचे बंधू भाजपचे आमदार आहेत. अंदमान-निकोबारच्या खासदाराने केव्हाच भाजपशी जवळीक वाढवली आहे. जयंत पाटलांना भाजपची खुली ऑफर असल्याचे सांगण्यात येते. ही सारी मंडळी योग्य संधीची वाट पाहत असल्याचे बोलले जाते. आधीच पक्षाचा पाया पश्चिम महाराष्ट्रावर आधारीत. त्यात ही अशी स्थिती. विदर्भात पक्षाला फार काही स्थान नाही. मराठवाड्यात परिस्थिती अनुकूल आहे; पण तिचा लाभ घेता येत नाही. उत्तर महाराष्ट्रात नेतृत्त्व नाही. कोकणातील नेत्यांत वाद संपत नाहीत. साठहून आमदार देणाऱ्या मुंबई-ठाणे पट्ट्यातील मतदार राष्ट्रवादीला साथ देत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात बारामतीपुरतीच मर्यादित राहणार का, अशी शंका जी येते त्याला ही सारी कारणे आहेत. राष्ट्रवादीला पाणी पाजण्यात भाजपा ब-यापैकी यशस्वी झाली आहे, ही मात्र खरे.✍?
December 16, 2016
”भारताची नारी, किर्ती तिची भारी,
प्रेरणास्त्रोत विश्वासाठी, माणूस म्हणून सुजाणती किती”..जेव्हा स्त्री-पुरुष समानता सारखा महत्वपूर्ण विषय चर्चेला आला आहे त्यावेळेस कुठेतरी तिच्यावर अन्याय हा झालाच. अगदी स्वातंत्र्यानंतरसुध्दा. पण जसजशी स्त्री शिकू लागली तसतसा तिच्यात सकारात्मक बदल घडून आला तो विचारांच्या माध्यमात….
May 9, 2013
श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो
ऐका विनवितो
श्री विष्णु अवतार घेतो
ह्या सृष्टीवर ||१||
दुष्टांचा होई अनाचार
पृथ्वीते होई पापभार
त्यांचा करण्या संहार
परमेश्र्वर अवतरती ||२||
कंस राजा दुष्ट
स्वतःस समजे श्रेष्ठ
प्रजेला देई कष्ट
स्वार्थापोटी ||३||
छळ करु लागला जनांचा
लुटमार अत्याचार छंद त्याचा
खूनही करी साधूसंतांचा
दुष्टपणे ||४||
कंसाची देवकी बहीण
चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन
सात्विक होते तिचे मन
परमेश्र्वराठायीं ||५||
देवकीचे लग्न ठरले
वसुदेवाला तिनें वरले
सर्व कार्य पार पडले
कंस राजा घरी ||६||
देवकी वसुदेवासंगे बैसली
भोयांनी डोली उचलली
वरात घरी जाण्या निघाली
कंस भावा घरुन ||७||
कंस राजा चाले संगे
वरातीच्या मागोमगे
निरोप देण्या तिजलागें
वसुदेव देवकीसी ||८||
वरात येता गांव वेशीला
एक चमत्कार घडला
आकाशवाणी झाली त्या वेळेला
चकीत होती सर्वजण ||९||
कंस राजा तूं मातला
नष्ट कराया तुजला
विष्णू अवतरती पृथ्विला
देवकीचे पोटी ||१०||
देवकी वसुदेवाचे आठवे बाळ
कंसाचा तो कर्दनकाळ
योग्य येता वेळ
ठार करील कंसाला ||११||
देवकी पुत्र शत्रु माझा
दचकून गेला कंस राजा
विस्मयचकीत झाली प्रजा
आकाशवाणी ऐकूनी ||१२||
कंसाने विचार केला
देवकीपुत्र जन्मता मारण्याला
बंदीस्त केले त्याना
ठार करण्या बाळ तयांचे ||१३||
एका मागुनी एक मारीले
सात पुत्राना ठार केले
पापाचे तेंव्हा घडे भरले
कंसाचे ||१४||
आठव्या वेळी देवकीस
गर्भ राहता नऊ मास
आगळाच होत असे भास
चमत्कार घडला ||१५||
पृथ्वी पावली समाधान
सृष्टी गेली बहरुन
प्रफूल्ल झाले वातावरण
स्वागत करण्या प्रभूचे ||१६||
पूर्वीचे सर्व बदलले
दुःखी मन पालटले
रोम रोम ते आनंदले
चिंता न उरली देवकीस ||१७||
प्रभू आगमनाची तयारी
सर्व देव मिळूनी करती
देवकीस सांभाळी
आपली शक्ती देवूनीया ||१८||
सुर्य उधळी प्रकाश
वरुण जल शिंपी सावकाश
वायु लहरी फिरती आकाशी
देवकीसाठी ||१९||
बागेत पसरला सुगंध
वातावरण होई धुंद
देवकीचा आनंद
द्विगुणीत झाला ||२०||
देवकीचे सारे चित्त
प्रभुचरणी जात
झाली ती निश्चिंत
भार ईश्वरी सोडूनी ||२१||
श्रावणमासे कृष्णपक्षे आष्टमीला
मध्यरात्रीचे सुमाराला
देवकीचे बाळ आले जन्माला
ईश्वर अवतार घेई ||२२||
सर्व वातावरण शांत
बाळ करी आकांत
परी सर्व होते निद्रिस्त
कारागृहाचे द्वारपाल ||२३||
थकून देवकी झोपली
बाळ तिचे पदराखालीं
वसुदेवासी चिंता लागली
बाळाची ||२४||
झाला एक चमत्कार
साखळदंड तुटूनी उघडले दार
विजेमुळे मार्ग दिसे सत्वर
वसुदेवाला ||२५||
त्वरीत उठूनी बाळ उचलले
तयासी टोपलीत ठेवले
डोईवर ठेवूनी चालले
वासुदेव ||२६||
वसुदेव चालला
नागराज पाठी आला
फणा काढूनी वाचवी बाळाला
पावसापासून ||२७||
वसुदेव यमुनाकाठी
दुथडी वहात होती
निश्चयी पाण्यांत शिरती
बाळ घेऊन ||२८||
पाण्यांत टाकता पाय
यमुना ही दर्शना धाव
ईश्वरचरणीं स्पर्श होय
पावण होणेसी ||२९||
पाण्याची पातळी वाढली
चरणस्पर्श होता दुभंगली
वाट करुनी दिली
वसुदेवाला ||३०||
पैलतिरी गांव गोकूळ
नंद गवळ्यातील श्रेष्ठ सकळ
पत्नी यशोदे झाले बाळ
त्याच रात्रीं ||३१||
कन्या होती आदिमाया
ईश्वर सुरक्षे जन्म घ्याया
ईच्छित त्याचे कार्य कराया
आली उदरी यशोदेच्या ||३२||
घर नंदाचे उघडे
यशेदा निद्रिस्त पडे
लक्ष्य नव्हते कन्येकडे
घरातील लोकांचे ||३३||
बाळ ठेवले यशोदेपासी
उचलून घेतले कन्येसी
पांघरुन घालूनी बाळासी
वसुदेव परतला ||३४||
मुलीस घेऊन आला
ठेवी देवकीच्या कुशीला
कोण जाणील ह्या लिला
प्रभूविणा ||३५||
बंद झाले द्वार पूर्ववत
मुलीने केला रडूनी आकांत
द्वारपाल जागविले त्वरित
ते खबर देई कंसाला ||३६||
कंस आला धाऊन
सर्व लष्कर घेऊन
बाळ मारावे म्हणून
आपल्या शत्रुते ||३७||
कन्या बघूनी चकीत झाला
कां फसवितोस मजला
शिव्या देत असे प्रभुला
मुलीचे रुप बघूनी ||३८||
मुलीस घेतले बळजवरीं
आपटण्या दगडावरी
हात नेता आपले शिरीं
कन्या हातून निसटली ||३९||
चमत्कार घडला त्या समयीं
कन्या आकाशी जाई
अचानक अकाशवाणी होई
त्यावेळी ||४०||
आठवे बाळ नंदा घरी
ईश्वर रुप अवतारी
येतां वेळ ठार करी
कंसा तुला ||४१||
आकाशवाणी ऐकोनी
घडला चमत्कार बघून
कंसा ते कापरे भरुनी
राजगृही परतला ||४२||
कंस प्रयत्न जाय निष्फळ
विधी लिखीत असे अटळ
कोण रोकती काळ
प्रभूविणा ||४३||
इकडे यशोदे देखिले
बाळ गोजिरे वाटले
आनंदमय गांव झाले
बाळाचे आगमनें ||४४||
नांव श्रीकृष्ण ठेविले
नंदाघरी वाढले
गोपाळांत खेळले
आनंदरुप ||४५||
यशोदाघरी देवकीचे बाळ
ठार केले कंसा येता वेळ
मारले नंतर दुष्ट सकळ
श्रीकृष्णाने ||४६||
श्रीकृष्णाचा अवतार
दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत भक्तीभाव
साजरा करिती सर्व
प्रेमभरे ||४८||
श्रीकृष्ण सांगे गीता
युद्धभूमीवर असता
कौरव पांडव युद्धा सज्ज होतां
अर्जूनासी ||४९||
भगवत् गीता महान
ग्रंथ म्हणून मान
जीवनाचे तत्वज्ञान
तयामध्यें ||५०||
श्रीकृष्णभक्तांनी
वाचावी ही कहाणी
भक्तिरुपें होऊनी
रोज एकदां ||५१||
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
७- १००८८३
January 6, 2018
३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित
‘लेकुरे उदंड जाली’ या म्युझिकल नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.
या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.
मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.
वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. मा.श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.
‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.
दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.
शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –
‘मी बोलले तर होते वाईट,
पण आहे का यांना त्याचे काही,
तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
यांना माणसांची पारखच नाही..’
असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता. येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता.
नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.
प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 2, 2016
त्यांनी पहिला कसोटी सामना खेळाला तो २९ मार्च १९४६ रोजी न्यूझीलंड विरुद्ध. त्यावेळी त्यांचा कप्तान होता क्वीन्सलँडचा बिली ब्राऊन . त्या कसोटीमध्ये मिलर यांनी ३० धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगला त्यांनी नवीन चेंडू टाकण्यासाठी घेतला . त्यांनी सहा षटके टाकली त्या सहा षटकांमध्ये त्यांनी ६ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या.
December 12, 2021
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानःक्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः ।
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य ॥ ६ ॥
आई भगवतीच्या साहचर्याचा अद्भुत वैभवशाली परिणाम सांगताना आचार्यश्री समुद्रमंथन प्रसंगाचा संदर्भ घेतात.
अमृताच्या प्राप्तीसाठी झालेल्या या समुद्रमंथनात त्या मेरू पर्वताच्या भोवती गुंडाळलेल्या वासुकी सर्पाने ती पीडा सहन न झाल्याने भयानक गरळ ओकले.
जोपर्यंत हे कोणी घेणार नाही तोपर्यंत दुसरे काहीही निर्माण होणार नाही अशी आकाशवाणी झाली. त्यामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर भगवान शंकरांनी ते विषप्राशन केले. वास्तविक त्याने त्यांचा विनाश झाला असता. पण !
या पण चे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात,
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानः
क्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः- पूर्वी ज्यावेळी भगवान शंकरांनी समुद्रमंथनात निर्माण झालेले हालाहल नावाचे विषप्राशन केले त्यावेळी त्या भयानक विषाचा आवेग त्यांना का मारू शकला नाही?
आरंभीच्या दोन चरणात असा प्रश्न निर्माण करून पुढील दोन चरणात आचार्यश्री त्याचे उत्तर देतात. ते म्हणतात,
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य - हे आई जगदंबे ! कायम अमृताने भरलेल्या तुझ्या शीतल शरीराच्या अर्ध्या अंगाचा आश्वासक संगच नसता .
भगवान शंकरांचे स्वरुप अर्धनारीनटेश्वर आहे. श्रीशंकर आणि आदिशक्ती अभिन्न आहेत.
भगवान शंकर त्या विषाने संपले नाही कारण त्यांच्यासोबत अमृतमय असलेला आई जगदंबेचा अर्धा देह आहे.
त्या विश्वविनाशक विषाचा परिणाम आईच्या अमृतमय स्पर्शांनी नष्ट झाला.
हे आचार्य श्रींचे कथन कमालीचे मनमोहक आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 17, 2020
जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो वर्षापासून त्या पध्दतींनी प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या जन्मतिथीशी निगडीत असते. एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय स्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते.
February 5, 2013
माझ्या लहानपणी सट्खूळ हा शब्द मी आईकडून, आज्जिकडून अनेक वेळा ऐकलाय. सट्खूळ म्हणजे शब्दशः सांगायचं तर, मुल सहा सात वर्षांचं झाल्यावर त्याला लागणारं खुळ. आता खुळ म्हणजे वेड लागणं किंवा खरोखर वेडं होणं असा अर्थ करून घेऊ नका अगदी. तर असं हे सट्खूळ, ठराविक वयात लागतं आणि निघूनही जातं. मुलं मोठी झाल्यावर त्यांना हे सांगितलं की, आपले प्रताप ऐकून ती खूप हसतात…..पण खुळावल्यासारखी नाही बरं…..
August 26, 2023
फाल्गुन कृष्ण षष्ठी रोजी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे निर्वाण झाल्याने या तिथीला एकनाथ षष्ठी असे म्हणतात.
October 1, 2023
प्रसंगी हा चित्रपट लाऊड, अंगावर येणारा वाटतो खरा, पण आयुष्यही त्यातील पात्रांच्या अंगावर पदोपदी असेच धावून येत असते आणि त्यांचे चिमुकले भावविश्व चिरडून टाकायचा प्रयत्न करीत असते.
April 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti