वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ
वाहन : गो माता
दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.
सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.
पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.
-- निखिल आघाडे
October 2, 2016
गेल्याच महिन्यात, १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा झाला. त्या दिवशी फेसबुकवर कृपा देशपांडे यांचा ‘टिम टिम करते तारे’ हा लेख वाचनात आला. त्या लेखात त्यांनी डेजी इराणी, हनी इराणी, सचिन, मास्टर महेश, बेबी तबस्सुम, बेबी फरिदा, बेबी नाझ, मास्टर राजू व ज्युनियर मेहमूद अशा हिंदी चित्रपटातील बाल कलाकारांबद्दल लिहिलेलं आहे.
December 6, 2023
‘गुरुबिन मोरा कौन अधारो’ असे एक वचन आहे. गुरू हाच जीवनाचा आधार असतो हे यातून प्रतित होते. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या कल्याणाप्रती आयुष्य वेचणार्या, त्याला खर्या अर्थाने घडवणार्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणं कठीण. पण किमान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. त्यासाठी उत्तम मुहूर्त असतो गुरूपोर्णिमेचा. ही पोर्णिमा नवी दिशा, नवे संकेत, कृतज्ञता देऊन जाते.
July 25, 2010
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक.
September 8, 2010
आमीलिताक्षमधिगम्य मुदामुकुन्द-मानन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम्।
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयनाङ्गनाया:।।४।।
आनंदकंद म्हणजे आनंदाचा जणू भरगच्च संग्रह. मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे, भगवान श्रीहरी. त्यांना मुदा म्हणजे आपल्याच आनंदात, आमीलिताक्षमधिगम्य डोळे मिटून शांत पहुडलेले पाहून,
अनिमेषमनङ्गतन्त्रम्- अनिमिष अर्थात पापणी देखील न ललवता. अनंग म्हणजे भगवान मदन. त्यांचे तंत्र म्हणजे प्रेम.
सगळ्याचा एकत्रित विचार करता आनंदकंद भगवान श्रीहरी आपल्याच आनंदात नेत्र मिटून बसलेले आहे असे पाहून, आता ते पहात नसल्याने त्यांच्याकडे अनिमिष नेत्राने जी पाहत आहे आणि तसे पाहिल्याने जिच्यामध्ये प्रेमभाव ओतप्रोत भरला आहे. अशी आईची दिव्यदृष्टी आहे.
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं- आकेकर म्हणजे डोळ्याचा किनारा. कनीनिक म्हणजे डोळ्यातील पुतळी तर पक्ष म्हणजे पापण्या.
भगवान श्रीविष्णु आपल्याकडे पहात नाही असे म्हटल्यावर आई महालक्ष्मीची लज्जा थोडी दूर झाली आहे. त्यामुळे आता ती टक लावून भगवंताकडे पहात आहे. इतर वेळा जेव्हा ती भगवंताकडे पाहते त्यावेळी प्रेमभाव तर जागृत होतो पण श्रीहरींनी तिच्याकडे पाहिल्यावर त्याची जागा लज्जा घेते. त्या स्त्रीसुलभ लज्जेने आईचे नेत्र खाली वळतात.मात्र आता ते पाहत नसल्याने ती त्यांच्याकडे टक लावून पहात आहे. आता फक्त प्रेमभाव आहे.
अशा वेळी तिच्या पापण्या अविचल आहेत आणि डोळ्यातील बुबुळे नेत्रांच्या कडांशी स्थिर झाली आहेत.
भुजङ्गशयनाङ्गनाया:- भुजंग अर्थात महासर्प. शेषनाग. त्याच्यावर जे शयन करतात त्यांची अंगणा म्हणजे पत्नी असणाऱ्या देवी लक्ष्मीचे ते नेत्र कटाक्ष,
भूत्यै भवेन्मम- माझ्या कल्याणाला कारणीभूत होवोत.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 13, 2020
एग अल्युमिनियम, गम डीप एच, वॉटर डीप एच, पीएस फ्लेटस,सीटीपी इत्यादी पद्धतींनी फ्लेटस तयार करता येते. ह्यापैकी काही ठिकाणी वॉटर डीप एच ही पद्धत लहान फ्लेट्स बनविण्यासाठी वापरतात. बाकी पद्धतींपैकी फक्त पीएस फ्लेट्स व सीटीपी आता वर्तमानपत्रात वापरल्या जातात.
May 26, 2023
जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची.
November 25, 2024
ह्याचे चारपाच हात उंच झाड असते व त्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात.हि भाजी चवीला आंबट असते काही लोक ह्याच्या झाडाच्या साली सुकवून त्याचा वापर आमसुलाचा पर्याय म्हणून करतात.
हि भाजी शरीरातील वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
हिचा उपयोग जसा पालेभाजी म्हणून जेवणात केला जातो तसाच घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो.
चलातर मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)डोक्यात खवडे झाल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस डोक्यावर लावून २ तास ठेवावा व मग केस धुवावे.
२)हातापायांना आग होऊन जळजळ होत असेल तर अंबाडीच्या पाल्यात मीठ टाकून त्या पाण्याने वाफ द्यावी व गरम पाला हातापायांना बांधावे.
३)तेलकट पदार्थाचे अजीर्ण झाले असल्यास अंबाडीची भाजी व तांदूळ एकत्र शिजवून केलेला भात खावा.
४)मार लागून सूज आल्यास अंबाडीच्या पानांचा पोटास रूईच्या पानात गुंडाळून बांधावे.
५)वारंवार उल्ट्या होत असल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस ४ चमचे +खडीसाखर १ चमचा+१/४ चमचा वेलचीपूड हे मिश्रण दर १/२ तासाने चाटायला द्यावे.
अंबाडीची भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास एॅसीडीटी होते व पित्ताचे विकार होतात.
(कृपया हा फोटो चुकिचा असल्यास कळवावे व ख-या भाजीचा फोटो माझ्या पर्सनल अकाऊंट वर पाठवावा हि वाचकांना नम्र विनंती आहे )
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 25, 2016
रंगवल्ली या संस्कृत शब्दापासून झालेले रुपांतर म्हणजे रांगोळी होय. भारतीयांचा कोणताही सण अथवा धार्मिक कार्य असो, दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रघात पूर्वी पासून चालत आलेला आहे. रांगोळी काढल्यानंतर धार्मिक विधीला आरंभ होतो.
दक्षिण भारतात अगदी रोज, तर बर्याच ठिकाणी सणासुदीला अंगणात अथवा दरवाज्यासमोर स्त्रिया रांगोळी काढतात. रांगोळी ही एक कला असून त्यासाठी निरनिराळ्या रंगांचा उपयोग केला जातो. फुलांची व धान्यांचीही रांगोळी काढली जाते.
चैत्र महिन्यात अंगणात एक कोपरा शेणाने सारवून त्यावर विविध प्रकारच्या चिंन्हांनी रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू व फुले वाहतात. रांगोळी काढल्यामुळे आपल्या वास्तूत सतत लक्ष्मीचा प्रवेश होतो ही त्यामागील भावना असते.
February 12, 2016
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणेल!
वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.
सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.
म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!
गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.....
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
September 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti