हे देवा,
परीक्षा अशी नसावी
की घामाच्या थेंबातच स्वप्न विरघळावे,
प्रश्नपत्रिकेच्या कडेला
आशेची अक्षरे फिकी पडावी.
तू दे संकटे,
पण ती दीपासारखी असू दे,
अंधार दाखवणारी,
दिशा हरवणारी नव्हे.
मेहनतीचे हात थकले
तरी मन मोडू नये,
फळ येईपर्यंत
विश्वास गळून जाऊ नये.
बीज पेरले आहे, देवा,
मातीवर आमचा हक्क नाही,
पण आकाश इतके दूर नको
की पावसावरच शंका येईल.
देवा…अपयश दे,
पण ते माणूस मोठं करणारं असू दे,
स्वतःकडे पाहण्याची हिंमत
हिरावून घेणारं नसू दे.
परीक्षेच्या या रस्त्यावर
एक तरी वळण असू दे
जिथे थांबून
आपण स्वतःला मिठी मारू शकू,
आणि म्हणू शकू “थांब…
तू पुरेसा आहेस.”
परीक्षा येऊ दे,
तिला अर्थ असू दे,
वेदनेतून वाट काढताना
मात्र उद्याच्या आशेची
आस जिवंत राहू दे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे