पावसाच्या पहिल्या सरीत,
हातातली छत्री अलगद उघडली…
आणि नकळत तुझी आठवण
मनाच्या उंबरठ्यावर येऊन थांबली.
छत्री अजूनही पावसापासून जपते,
पण तू नसल्यापासून
मनाला भिजण्यापासून
कोणीच वाचवू शकलं नाही.
एक दिवस वाऱ्याच्या झोताने
छत्री उलटी झाली…
काड्या मोडल्या, कापड फाटलं,
आणि तेव्हाच समजलं
जगात काहीच कायमचं नसतं.
आजही पाऊस तसाच बरसतो,
हातात छत्रीही तशीच असते.
फरक एवढाच…
आता अंग भिजत नाही,
पण मन मात्र प्रत्येक सरीसोबत
चिंब भिजून जातं.
छत्रीची सावली अजूनही मिळते,
पण तुझ्या प्रेमाची ऊब
कुठेच सापडत नाही.
पावसाचा प्रत्येक थेंब
तुझ्या आठवणींचं नाव घेऊन
डोळ्यांत अलगद दाटून येतो.
आयुष्याच्या या अखंड पावसात
एकच इच्छा अजूनही जिवंत आहे,
एकदा तरी पुन्हा
तुझ्यासोबत एका छत्रीतून चालावं…
शब्द नकोत, स्पष्टीकरण नको.
फक्त तुझा हात हातात असावा,
आणि पाऊस मनमोकळा बरसत राहावा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212