बाबल्याची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ १)
Category:
साहित्य - ललितअलिकडे धाकट्या बहिणीकडे कोकणात गेलो असताना, ती मला म्हणाली,”कुणास ठाऊक ! पण मला वाटते की आपल्या आईने बाबल्याला आपल्याकडे ठेऊन घेतलं असतं तर कदाचित् तो असा ठार वेडा झालाही नसता.” “माझ्या मनात हा विचार कधी आला नव्हता” असं म्हणून मी तो विषय तिथेच संपवला.पण बाबल्याचा विचार असा मनातून संपला नाही.बाबल्याचा विषय हा न संपणारा विषय आहे.न सुटणारे कोडे आहे.हे सर्व असं कां झालं? घडलं त्यापेक्षा वेगळं कांही घडणं शक्य होत कां? ठळकपणे दिसणाऱ्या, सर्वाना ठाऊक असणाऱ्या बाबल्यासंबंधीतल्या घटनांशिवाय आणि कांही घडलं होतं कां ?ते काय असू शकेल ? हे प्रश्न बाबल्याच्या संबंधात त्याला ओळखणाऱ्या सगळ्याच संवेदनशील व्यक्तीना पडले असतील.मला तरी ते अजूनही मनात येतात.