धायरी, पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळा आहे. इव्हान आलीच यांनी युरोपमध्ये डी-स्कुलिंग ही चळवळ सुरू केली होती. स्कूलमध्ये जे आपण कप्पे केलेत, विषयांचे असो, वर्गांचे असो, वयांचे असो, स्कूल ड्रेसचे असो, यांच्यापलीकडचं जे आहे ते सर्व डी.स्कुलिंग मध्ये येतं. स्कुलिंग पुसून त्याच्या पलीकडचं, जे जे आहे, पुस्तकांच्या पलीकडचं तसेच व्यवहारातलं जीवन जगण्यासाठी जे जे लागतं ते, थोडक्यात जीवनशिक्षणच.
२०११ पासून ही शाळा सुरू झाली. २०२३ मध्ये दहावीची पहिली बॅच या शाळेच्याबाहेर पडली. शाळेच्या पलीकडे मुलांना काय येतं व काय करायचंय, काय शिकायचंय हा या शाळेत देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा गाभा आहे. वेगळ्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक शाळा आज आकाराला येत आहेत. पूर्वी खरोखर ज्यांना शिक्षणाच्या कार्यात व प्रसारात तळमळ होती त्यांनी समर्पित होऊन शैक्षणिक संस्था काढल्या ज्या पुढे नावाजल्या गेल्या.
अनेकांनी पूर्वीच्या जिल्हा परिषद शाळेमधून आपलं करिअर घडवलं. पूर्वी ठराविक शाळेत शिक्षण घेण्याला पर्याय नव्हता व होम स्कुलिंगही न रुजल्यामुळे ठराविक शाळेतच शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
आता शिक्षणक्षेत्रात अनेक पर्याय निर्माण होत असून, अनेकांनी शैक्षणिक प्रक्रिया नावीन्यपूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना प्रत्येक स्तरावर राबविण्यात, स्वतःचीही कौशल्यं सिद्ध केली आहेत. या शाळेत शिकविणाऱ्याला केवळ शिकवणे अपेक्षित नाही, तर त्याच्या उपस्थितीत मूल कसे शिकेल, त्याला कोणकोणते पर्याय देता येतील, त्यातूनच तो शिकेल याचे ज्ञान हवे. आधी पालकांना त्यातील मर्म समजायला हवे. पालक तयार झाले तरच ते आपल्या पाल्याला शाळेत घालण्यास तयार होतील.
मुलांच्या संबोध स्पष्टीकरणाचे शिक्षणप्रक्रियेशी नातं आहे. शिक्षण आज साचेबंद प्रक्रियेत अडकलं आहे. मुलाला काय येतं त्यापेक्षा मूल आम्हाला काय देतं हाच विचार पालक करताना दिसतात. मुलांच्या शाळा निवडताना आज पालकांसमोर अनेक संभ्रम आहेत. चांगल्या शाळेचे निकष कोणते?
शाळेसंबंधीच्या संकल्पना व शैक्षणिक संबोध स्पष्ट करण्यासाठी पालकांची सभा आधी घेतली जाते. त्यांना अशा प्रकारच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते व मगच पालक आपल्या पाल्याला शाळेत घालतात, त्यामुळे सुरुवातीला संख्या कमी असते.
पालक सभेच्या माध्यमातून पालक येथे शाळेच्या विद्यार्थ्यांशी संपर्कात असतात, त्यामुळे आपल्या पाल्याची प्रगती नेमकी कशी व किती झाली, हे त्यांना समजते. पाल्यांची प्रगती पाहून पालक इतर पालकांना सांगतात, अशा रीतीने मौखिक प्रचार आपोआप होतो. या शाळेला प्रवेशासाठी जाहिरात द्यावी लागत नाही.
पारंपरिक शाळेत गुण मिळवण्याची चळवळ आणि स्पर्धा व त्या अनुषंगाने बनवण्यात आलेला अभ्यासक्रम यातच संपूर्ण शालेय व्यवस्था गुरफटलेली असते, त्यामुळे मूल शिकणार कसे, त्याचे पुढे कसे होणार? नोकरी मिळणार का? नोकरी मिळवण्यासाठीच शिक्षण घेण्याचा दृष्टिकोन अनेकांचा असतो. या सर्व पार्श्वभूमीवर मुलांच्या भविष्याचा विचार करणारा पर्याय मिळाला तर, सरकारने आखून दिलेल्या धोरणाप्रमाणे काम करणारा, मूलकेंद्रीत शिक्षण असणारा, मुलांच्या शिक्षणाचा विचार असणारा, त्यांच्यामध्ये तार्किक विचारांची रुजुवात करणारा पर्याय अर्थात मुलांच्या क्षमता आणि कौशल्य वृद्धिंगत करणारा पर्याय मिळाला तर अनेकांना असं शिक्षण शिकावंसच वाटेल.
शिक्षणाला असा पर्याय मुलांच्या परिस्थितीनुरूप जीवनकौशल्य आणि शालेय प्रगतीची भक्कम पायाभरणी होण्यासाठी मिळणारं हे अवकाश पर्याय परिसंस्थानिर्मित पर्याय डी. स्कूलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
पर्याय परिसंस्था आणि डी. स्कूल व प्रागतिक पर्यायी प्रयोगांची स्थापना प्रेरणा गुप्ता व योगेश कोडोलीकर यांनी केली. पर्यावरणपूरक पर्याय देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जातो.
गेल्या पंचवीस वर्षांपासून शिक्षण शिकणे, लर्निंग, जीवनशिक्षण, पर्यावरण, सामाजिक वास्तव, विशारद आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान, प्रकाशन आणि कला यातील अनुभव याशिवाय इकॉलॉजिकसारख्या संस्थात्मक आणि प्रागतिक पर्यायी प्रयोगांच्या निर्मितीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
पर्याय डी. स्कूल आहे तरी काय? इथे वर्गाच्या व इयत्ता यांच्या आणि लिंगभेदाच्या भिंती नाहीत. इथे घोकमपट्टी नाही, रट्टाबाजी नाही आणि सातत्याने परीक्षा नाहीत. सारख्या सुट्ट्या नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवाद्वारे स्वयंअध्ययनाची गोडी लावण्याचे प्रयत्न इथे केले जातात व त्याचे परिणामकारक व दृश्य स्वरूपातील बदल, विद्यार्थ्यांचे वर्तन बदल आपल्याला दिसतातच व अपेक्षित प्रगतीही दिसून येते.
इतर शालेय वायफळ खर्च इथे नाहीत. कामात मोकळीक असल्याने सुट्ट्यांची गरज भासत नाही. इथे स्व-ची ओळख व पुस्तक विचार प्रत्यक्षात आणण्यामध्ये व संविधानाने नागरिकत्वाची तत्त्वे, जाणिवा, जाणत्या वयात जाणवून कृतीत आणण्यासाठी, अनुभवी सहाय्यकाद्वारे मुलांना शिकवणारे शिक्षक नव्हे तर फॅसिलिटेटर व मेंटोर यांचे मुलांच्या जडणघडणीमध्ये योगदान असते.
शिक्षक इथे जाहिरात देऊन घेतले जात नाहीत, तर मुलांमध्ये क्षमता व मूल्यांची रुजवणूक करणारे असेच नेमले जातात.
दोन ते सोळा या गटातील मुले येथे शिक्षण घेतात. प्रत्येक दिवशी मुलाने डायरी लिहायची, रोजच्या कामाची प्रत्यक्ष नोंद प्रत्येक विद्यार्थ्यांची या शाळेत पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांचे अनेक प्रोजेक्ट वर्क्स तयार आहेत, हे वेगळे वैशिष्ट्य इथे जाणवते.
आठवड्यातून एक दिवस वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवले जातात व प्रत्येकाने त्या चित्रपटाबद्दल त्याला काय वाटले ते लिहायचे असते.
अभ्यासक्रमाचे सर्व विषय पुस्तकातूनच न शिकता, व्यवहारातून, अभ्यासक्रमाचे जे जे आहे ते तर मुले शिकतातच व अभ्यासक्रमापेक्षा जास्त ते शिकतात व त्यांचे संबोधही स्पष्ट होतात, हे अशा शाळांचे यश आहे.
आपल्याला जे आवडतं, आपल्याला ज्यामध्ये रस आहे त्याच्यामार्फत विद्यार्थी अनेक संकल्पना समजून घेतात.
वेळीच सुप्त गुणांची ओळख झाल्यामुळे कौशल्य दाखवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.
विद्यार्थीकेंद्री व आनंददायी शिक्षण म्हणजे काय हे इथे विद्यार्थ्यांचे कार्य पाहूनच समजते.
प्रत्यक्ष फिल्डवर जाऊनही मुले काम करतात. विद्यार्थ्यांच्या फीससाठी तेरा निकष आहेत व त्यानुसार वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फी आकारली जाते.
मुलांचे आयुष्य मुलेच घडवतात. त्यांना केवळ त्यासाठी अवकाश (स्पेस) इथे प्राप्त करून दिले जाते. हे अवकाश वापरायचे कसे हेही काम येथे तितकेच प्रयत्नपूर्वक केले जाते. इथे मर्यादित मुलांची संख्या आणि मेंटोर यांचे प्रमाण १:८ – १० असते, त्यामुळे प्रत्येक मुलावर वैयक्तिक काम इथे केले जाते.
या शाळेत होम सेशन्स असतात व ते सिझनल असतात. त्या त्या सीझनमध्ये मुलांना आई-वडिलांबरोबर राहाता यावं म्हणून छोट्या छोट्या सुट्ट्या असतात. मोठ्या सुट्ट्या नसतात. पावसाळ्यात कोकणात जाणार, उन्हाळ्यात आई-वडिलांबरोबर राहाणार. प्रत्येक ऋतूमध्ये, सणांमध्ये आई-वडिलांबरोबर त्यांना राहाण्यासाठी छोट्या छोट्या सुट्ट्या असतात, त्याला होम सेशन म्हणतात.
भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलद्वारे थेट दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते. बारावीपर्यंत शाळा आहे. त्यानंतरही पर्याय संस्थेचे कोर्सेस व इन्स्टिट्यूट आहेत. ओपन स्कूलच्या माध्यमातून त्यांना परीक्षा देऊन पुढील शिक्षण घेता येतं.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले महाराष्ट्र स्टेट बोर्ड ओपन स्कूलमध्ये पाचवी आणि दहावीमध्ये परीक्षेचा पर्याय असतो. परीक्षा देण्याच्या क्षमतेवर सातत्याने काम करून परीक्षांची तयारी केली जाते. ज्या या बोर्डाला विद्यार्थ्यांना बसायचं त्याचा अभ्यासक्रम विद्यार्थी परीक्षेला जाताना शिकतात, पण मुळात या शाळेत क्षमतावर काम केलं जातं. एन.सी.ई.आर.टी. आणि नवीन शैक्षणिक धोरणात क्षमता मुलांच्या वाढीला लागल्या पाहिजेत, यावर भर आहे.
दर आठवड्याला एका ठिकाणी भेट असते. मग आठवडी बाजार असेल तर तिथे मुलं जातात, नुसती माहिती नाही घेत तर त्या त्या जागेवर जाऊन त्याची माहिती घेतात. भाजी शेतात पिकत असेल तर शेतावर जाऊन काही दिवस तिकडेही राहातात.
शाळेत दहाची लर्निंग टीम व आठ लोक इतर कामासाठी आहेत. मुलांकडून काम करून घेता येणं, मुलांशी बोलता येणं, संयम ठेवणं हे शिकवण्यासाठी आवश्यक आहे.
मुलांच्या प्रगतीचा आढावा येथे घेतला जातो. मुलंसुद्धा क्षमता पूर्ण पद्धतीने आपले विषय समजून अभ्यास करीत असल्यामुळे उत्तम मार्क मिळवतात. हा अनेक पालकांचा अनुभव आहे. मुलांच्या क्षमता निर्मितीवर प्रत्येक महिन्यात काय काम झाले, यावर मंथन करण्यासाठी पालकांची मते जाणून घेण्यासाठी दर महिन्याला बैठक असते.
येथील अनुभव घेतल्यानंतर पारंपरिक शाळांची आठवण येणारच नाही. मात्र आठवण आली तरी आणि त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा झाला तर सरकारच्या नियमानुसार, वयोगटानुसार कोणत्याही शाळेत जागा उपलब्धतेनुसार प्रवेश घेता येतो. पारंपरिक शाळांच्या इयत्तेनुसार मुलांची संबंधित वयोगटांमध्ये किंबहुना त्याच्या वयोगटातील इतर मुलांच्या तुलनेत अधिकच क्षमतांचे दृढीकरण होते. त्यामुळे पारंपरिक शाळेत मूल कसे पुन्हा रूळेल हा प्रश्न पालकांना येत नाही. या प्रयत्नात अनेकांशी संबंध आल्यामुळे सामाजिकीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. अपारंपरिक आणि अनुभवातून आलेल्या शिक्षणाचा हा पर्याय रुजायला वेळ लागतो.
आज अशा अनेक शाळा शासनाची मदत व परवानगी न घेता कार्यरत आहेत. ते केवळ स्वबळांवर व पालकांना व विद्यार्थ्यांना रुचत आहेत, रुजत आहेत.
शासनाने ही अशा वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण शाळा प्रायोगिक तत्त्वावर इतर ठिकाणीही सुरू कराव्यात, म्हणजे शिक्षण ही लादलेली गोष्ट राहाणार नाही तर चळवळ होईल.