जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे बालगंधर्व रंगमंदिर सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. पुण्यातील रसिकांची दाद प्रत्येक कलाकारासाठी एक अलंकार असतो. त्यात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरातील दाद म्हणजे कलाकारांच्या कलेचे सार्थक झाल्यासारखे असते. पुण्यात दाद मिळाली की जगात कुठेही दाद मिळवता येते, असे अनेक कलाकार आवर्जून सांगत असतात, हीच खरी पुण्याची व पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराची खासीयत आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात जपला गेला आहे. स्वातंत्र्या नंतर स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी बालगंधर्व यांनीच केले होते. बालगंधर्व रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले होते. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार मा.पुलंनी केला आणि त्या काळी एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. मा.बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेऊन अवघ्या पंधरा लाखात बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली.
बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर मा.ना. ग. गोरे व मा.पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती.
तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.
बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पु.ल. देशपांडे यांचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले होते, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला देऊस्करांनी चितारलेला स्त्री वेशातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे; मधून जीवनाची सरिता वाहतीये. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 27, 2017
१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.
त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- "अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।"
पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलावलं. आणि म्हणाले, "साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही". असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.
मग साहीरजींनी तो शेर ऐकवला -
"एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।"
आणि साहीरजींचा शेवटचा "जी" पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.
"एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी
सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जीवालागी जळती कशाला?
अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी".
ह्यातील 'झुंझुरता' ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.
आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.
December 25, 2015
प्रा. भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.
September 23, 2017
पंडिती काव्याचे एक श्रेष्ठ प्रतिनिधी, गंभीर, बोधपर आणि प्रौढ कविता करणारे कवी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होते.
January 30, 2010
अभिजीत केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख प्राप्त झाली ती “ऊन पाऊस” या मराठी मालिकेपासून. त्याचं चित्रपटसृष्टीत पदार्पण ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ” या बहुचर्चित मराठी चित्रपटातून झालं.
October 31, 2020
आज १४ सप्टेंबर.. आज जेष्ठ निर्माते मा.जी. पी. सिप्पी यांची जयंती.
जन्म १४ सप्टेंबर १९१५
सिप्पी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथे १९१५ मध्ये झाला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरूंगातही जावे लागले होते. त्यानंतर ते वकिल झाले. सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली. शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल. मा.जी. पी. सिप्पी यांचे २५ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
September 14, 2016
ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत.
August 1, 2021
न. गो. राजूरकर यांची म्हणावी तशी ओळख झाली नाही. ते हैदराबादचे रहिवासी असल्यामुळे कदाचित हे झाले असावे किंवा त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा इंग्रजीत असल्यामुळे हे झाले असावे. डॉ. राजूरकर हे ख्यातनाम लेखक व वक्ते आहेत. त्यांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत.
June 1, 2011
सारिका यांचे पूर्ण नाव सारिका ठाकूर. अभिनेत्री सारिका यांचा जन्म ५ डिसेंबर १९६० रोजी झाला. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.
अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले. यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत.
३५ वर्षां पुर्वी फ़िल्मफ़ेअर मासिकात एक आर्टिकल आले होते” Those who speaks with their eyes” या आर्टिकल मधे तिच्या डोळ्यांचे वर्णन ” एका छोट्या मांजरी सारखे दिसतात असे केले होते आणि बिंदुचे डोळे एखाद्या बोक्या सारखे दिसतात असे केले होते. सारिका यांनी अनेक वर्षांपूर्वी पारध या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. आता अनेक वर्षांनंतर त्या मराठी चित्रपटांमध्ये परत काम केले आहे. रिस्पेक्ट या चित्रपटात सारिका यांची महत्त्वाची भूमिका आहे.
लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 15, 2019
फार्स किंवा प्रहसन या प्रकाराला मराठी रंगभूमीवर रुजवलं आणि गाजवलं नाहीतर प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता-नाटककार बबन प्रभू यांनी. त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, घोळात घोळ’ यासारखे अनेक फार्स लिहिले. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
April 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti