जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
टाइमपास’ चित्रपटातील ‘नया है यह’ हा डायलॉग म्हटला की डोळ्यांसमोर चेहरा येतो वैभव मांगले यांचा. टीव्ही मालिका, रंगभूमी आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये सध्या सर्वाधिक व्यग्र असलेले अभिनेता म्हणजे वैभव मांगले.
अर्थशास्त्र आणि जर्नालिझम मध्ये एम.ए केलेले व पाटण्यात करीत असलेली प्राध्यापकी सोडुन मुंबईला संगीताला वाहून घेण्यासाठी चित्रगुप्त यांचे पुर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.
काही काळ एस. एन. त्रिपाठी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. चित्रगुप्त यांनी आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. एव्हीएम ह्य़ा साऊथच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत देऊन लता, रफी, आशा, तलत, मुकेश व मन्नाडे इ. गायकांकडून सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमा मिळाले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट त्यांना मिळाला नाही. अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत लोकप्रिय झालं खरं, पण ते ‘ए’ ग्रेडचे संगीतकार बाकी कधीच होऊ शकले नाहीत. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या गाण्यावर अतिशय खूश होते. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत. अगदी भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर नायिका कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी ह्य़ा होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. ८२८ गाणी दिली. त्यातील लता मंगेशकर (२४८), महंमद रफी (२६०), आशा भोसले (२३२) यांच्याकडून गाऊन घेतली. त्यांनी एकूण ६९ चित्रपटाना संगीत दिले. मा.चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून अतिशय सुंदर गाणी लिहून घेतली. चित्रपटांना संगीत देताना शास्त्रीय संगीतापासुन पाश्चीमात्य संगीता पर्यन्त सगळ्याचा वापर केला. भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येत असे. ठेक्याची गाणी हे संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य. रोमँटीक युगलगीते ही खासीयत होती. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व ह्य़ा कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली. तलत मेहमुदसारख्या गायकाकडुन आशाजींच्या बरोबर गायलेले "दो दिल धडक रहे है और आवाज एक है" असो वा मुकेश आणि लतादिदींनी गायलेले "देखो मौसम क्या बहार है" अथवा "तुमने हसी ही हसी में क्यू दिल चुराया जवाब दो" हे लतादिदीनी महेंद्र कपुर सोबत गायले गीत असो या युगलगीतात रोमँटीझम दिसतो. मालकंस रागातल्या ‘अखियन संग अखियां लागे आज’ या रचनेत चित्रगुप्त संगीतकार म्हणून जान ओतली होती. ‘पतंग’ मधलं ‘रंग दिल की धडकन भी लाती तो होगी’ असंच मजा आणून गेले. ‘एक रात’ मधलं मारुबिहाग रागावर आधारित ‘पायलवाली देखना’ मा.चित्रगुप्त यांच्या अशा एका पेक्षा एक रचनांनी रसिकांना वेडे केले होते. हिंदीत काम करीत असतानाच त्यांनी भोजपुरी सिनेमांनासुद्धा संगीत दिले. तीथे त्यांचा रूबाब राजासारखा होता. त्याच प्रमाणे काही पंजाबी आणि गुजराथी सिनेमांबरोबर A.V.M.ने तमीळमधे डब केलेल्या चित्रपटांनासुध्दा संगीत दिले. चित्रगुप्त यांची मुले आनंद-मिलिंद हे सुद्धा नावाजलेले संगीतकार आहेत. चित्रगुप्त यांचे १४ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
देशभक्त,अध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन व काव्यलेखन यांसाठी त्यांची ओळख होती. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. कुसुमाग्रज स्वतःच्या वाढदिवसाला दरवर्षी एक नवी कविता लिहून मॄणालिनीताईंना पाठवत असत.तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या अनुग्रहित शिष्या होत्या.
हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते.
सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे. प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. "तेरी दुनिया मे दिल लगता नही", "कहा हो तुम" ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या "मै दिल हुं एक अरमान भरा" या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते.
मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. "बार बार तोहे क्या समझाये" किंवा "झीलामील तारे करे इशारा" ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. "सलामे आली हसरत कबूल कर लो" आणि "मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है" ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. "बहारो ने मेरा चमन लूटकर" या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही.
"मैने शायद तुम्हे" या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण "सम" म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम "निराघात" आहे. "शायद" या शब्दातील, "य" अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते.
एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत."कही तो मिलेगी", "सखी रे मोरा मन", "वो चले आये रे" ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.
रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. "हम इंतजार करेंगे","छा गये बादल","पाव छु लेने दो" ,"छुपा लो युं दिल मे प्यार" इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात.
आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. "मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), "बता दो कौन गली (तिलंग), "मदभरी अंखीयां" (जौनपुरी) किंवा "गरजत बरसत" (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, "सलामे हसरत","गमे हस्तीसे बस बेगाना","वळला क्या बात","युं अगर मुझको ना चाहो तो" ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो.
"कव्वाली" हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. "अगर ये दिल" (घर घर मे दिवाली),"ना तो कारवां की तलाश" (बरसात की रात), "निगाहें मिलाने को" (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. "निगाहें मिलाने को" या कव्वालीत, यमन नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या "रे" वरून एकदम अचूक वरचा "रे" घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"
अनिल गोविलकर
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म १२ मार्च १९११ रोजी गोव्यातील पेडणे (पणजी) येथे झाला.
गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मानणारे नेते होते. त्यामुळेच त्यांनी अजूनही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. ते गोव्यातील उद्योगपती होते (मँगेनिझ खान मालक) अत्यंत दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती.
भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म गोव्यातील पेडणे (पणजी) येथे सामान्य घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच आई-वडील वारले. प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही शालेय जीवनातच त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केल्या. जुजबी शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे खाणमालक म्हणून नावलौकिक व विपुल धन मिळविले. त्यांचा विवाह सुशिलाबाई लक्ष्मण पेडणेकर या एका व्यापाऱ्या च्या मुलीशी झाला. त्यांचे सासरचे नाव सुनंदा. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाने बांदोडकरांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. त्यातूनच तरूणवर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला; ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्यात म्हणून मदत केली. त्यामुळे त्यांना १९५६ साली तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला.
११ डिसेंबर १९६२ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केले. तेव्हा बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा महाष्ट्रात विलीन करावा, या माताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव करून १९६३ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३० पैकी १४ जागा मिळविल्या. तीन अपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमत सिद्ध करून मंत्रिमंडळाची मागणी केली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. बांदोडकरांनी निवडणूक लढविली नव्हती; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन व समाजकल्याण ही खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, हे होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाजकल्याण हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्याच्या बाबतीत जनमताचा कौल घेण्याचे ठरविले.
कौल निःपक्षपाती वातावरणात पार पाडावा, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोव्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून खोड्यापाड्यांतून दौरे काढून प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा, की महाराष्ट्रात विलीन करावा, या प्रश्नांवर ३ जानेवारी १९६७ रोजी सार्वमत घेण्यात आले. सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. गोव्याचे महाराष्ट्राशी मीलन व्हावे हे त्यांचे स्वप्न सार्वमतातील पराभवामुळे भंगले असले तरी त्यांनी हार न मानता निवडणूक जिंकून महाराष्ट्राशी गोव्याचे सांस्कृतिक संबंध वाढवून बळकट तर केलेच पण मराठी ही गोव्याची राजभाषा करणारा ठराव असेंब्लीत संमत करून घेतला.
त्यानंतरच्या एप्रिल १९६७ च्या निवडणुकीत बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे बहुमताने निवडून आले व गोव्याचे दुसऱ्यांभदा मुख्यमंत्री झाले. बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले; शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले; गोव्यातील उद्योजकांना चालना दिली; ग्रामिण शिक्षणाबरोबर त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले; तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला; साहित्य-कला आदींना उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली; अनेक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.
गोवा प्रवाशांचे आकर्षण ठरावे म्हणून अनेक योजना त्यांनी कार्यवाहीत आणल्या. कोणत्याही विधायक सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करण्यात ते अग्रेसर होते. थोर दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. गोरगरिबांचे प्रश्न ते जातीने लक्ष घालून सोडवीत. क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांना शशिकला, उषा, क्रांती व ज्योती ह्या चार मुली असून सिद्धार्थ बांदोडकर हा मुलगा होता. सिद्धार्थचे तरुणवयात निधन झाले. लीना चंदावरकरचा पहिला नवरा सिद्धार्थ बांदोडकर होता. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी शशिकला काकोडकर ह्या गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या आधी बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्या एक सदस्य होत्या.
गोव्याची कला अकादमी ही पु. ल. देशपांडे आणि दामू केंकरे यांच्या संकल्पनेतून व त्या काळातील मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुढाकारामुळे उभी राहिली. आधी ती नाट्य अकादमी होती व नंतर ती कला अकादमी झाली.
भाऊसाहेब बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट १९७३ निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते हे एक भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक आहेत.
आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले.
‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संगीत हे केवळ कर्णसंपुटांना समाधान देणारे साधन नाही, तर संगीताचा प्रत्येक स्वर आणि त्यापासून निर्माण होणारी ध्वनिकंपने शारीरिक समाधान आणि प्रफुल्लित चित्तवृत्तींचे उगमस्थान असतात, ही आता केवळ समजूत राहिलेली नाही. भारतीय संस्कृतीने शतकांच्या सखोल साधनेतून सिद्ध केलेल्या या वास्तविकतेला पुन्हा जनमानसात रुजविण्याची गरज ओळखून स्वार्थनिरपेक्ष काम करणारे
पं. डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या निधनाने संगीतसाधनेच्या परंपरेतला एक अलौकिक दुवा निखळला आणि शरीर, मन व संगीत यांच्या नात्याची वैज्ञानिक उकल करण्याचे एक ‘संशोधनव्रत’ खंडित झाले. केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट सतारवादक, एवढीच पं. सरदेशमुखांची ओळख नाही, तर संगीतविश्व हा मानवाच्या असंख्य भावविश्वांना सांधणारा प्रभावी दुवा आहे, हे ओळखून संगीतप्रसाराचा ध्यास घेतलेला एक आधुनिक मनस्वी माणूस अशी त्यांची खरी ओळख आहे. भारतीय संस्कृतीत संस्कृत मंत्रोच्चारांचे स्थान अढळ आहे, पण मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हा ‘पठडीबाज परंपरावाद’ असल्याचे अर्धज्ञान आजही उजळले जाते.
संस्कृत श्लोकांचे संगीतशास्त्रीय पठण मानवी आयुष्याला परमोच्च समाधानाचे क्षण प्राप्त करून देते, मानसिक जाणिवा पराकोटीच्या प्रगल्भ करते आणि जीवन समृद्ध करते. संस्कृत श्लोकपठणातील ध्वनिलहरींच्या कंपनांतून शारीरिक व्याधींचे समूळ उच्चाटन होते, दुष्प्रवृत्ती दूर होतात आणि मनाला आपोआपच माणुसकीचा स्पर्श होतो. अशा तऱ्हेने, मंत्रपठण ही समृद्ध आयुष्यासाठीची एक तप:साधना बनते, हे पं. सरदेशमुखांच्या संशोधनाचे सार! वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच्या कठोर संगीत साधनेतून साधलेला हा साक्षात्कार समाजास अर्पण करण्याच्या भावनेतून पुढे, संगीत हे आरोग्य आणि मानसिक समाधानप्राप्तीचे साधन ठरावे, यासाठी पं. सरदेशमुख यांचे संशोधन सुरू झाले. वसंत बहरला, की कोकिळेच्या कंठातील अलौकिक सूर माणसाला मोहवून टाकतात. त्या सुरांच्या स्वर्गीयतेची जाणीव त्या कोकिळेला असेलच असे नाही, पण संगीताचा ‘स्वर’ ओळखणारा आणि जोखणारा जाणकार कान प्रकृतीने माणसालाच बहाल केला आहे. हाच ‘जाणता कान’ जोपासावा, यासाठी पं. सरदेशमुख सतत तळमळले.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठातही संगीत साधना सुरू झाली, हे त्या तळमळीचेच फलित होय. याच तळमळीतून त्यांनी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कर्मभूमी जपानमध्ये भारतीय संगीताचे स्वर अजरामर केले. संगीत क्षेत्रातील नव्या दिशांचा शोध आणि वेध घेत नव्या पिढीसाठी संगीतात संशोधन करणाऱ्या पं. सरदेशमुख यांना त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा आयुर्वेदाचा वारसा मिळाला होता, पण तो केवळ व्यावसायिकतेसाठी न वापरता, मानवी आरोग्य आणि मनाच्या संपन्नतेसाठी आयुर्वेद आणि संगीतोपचारांची सुरेख सांगड घालणारे संशोधन पं. सरदेशमुखांनी सुरू केले. म्हणूनच, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची खरी ओळख झालेल्या या ज्ञानवंताने आपल्या अध्र्यामुध्र्या आयुष्यात केलेल्या कामाचे महत्त्व मोठे आहे.
राजकुमार यांचे नाव सिंगानाल्लुरु पुत्तस्वमय्या मुथुराज असे होते. परंतू त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अनेक नावे दिली. अभिनयाचे शहंशाह, सोन्याचा माणूस, ब्रदर राज अशा अनेक नावांनी त्यांची ओळख होती. ते चांगले अभिनेता होतेच परंतू त्यासोबत ते चांगले गायकही होते.
राजकुमार यांना भारतीय सिनेमाचा महानायक म्हणून ओळखले जातात. कारण ऍक्टींगग करताना त्यांनी कधीच मद्य आणि धूम्रपानाचे सेवन नाही केले. तसेच त्यांनी कुठल्याच चित्रपटात ‘कसम खाता हू’ सारखे डायलॉगही नाही वापरले. राजकुमार यांचे वैयक्तिक जीवनही चित्रपटांसारखेच रोमांचक होते.
१९५४ साली त्यांचा ‘बेडरा कन्नपा’ हा पहिला चित्रपट आला होता, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २०० हून अधिक चित्रपट काढले. तसेच त्यांनी ४०० गाणीही गायली आहेत. त्यांना १९८३ साली त्यांना पद्मविभूषणने गौरवण्यात आले. तसेच त्यांना तीन नॅशनल अवॉर्डही मिळाले होते. त्यामधील एक त्यांच्या गाण्यासाठी होता. तसेच दादासाहेब फाळके, फिल्मफेअर अवॉड, कर्नाटक स्टेट फिल्म अवॉड्सनेही त्यांना गौरवण्यात आले होते.
२००० साली चंदन तस्कर वीरप्पनने त्यांचे अपहरण केले होते. १०८ दिवस ते त्याच्या तावडीत होते. २००० साली त्यांचा ‘शब्दवेधी’ हा शेवटचा चित्रपट प्रकाशित झाला. आज भारतीय सिनेमाचे जेम्स बॉंड राजकुमार यांचे गुगलने डूडल बनवून यांना सलाम केला आहे. मा.राजकुमार यांचे १२ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ज्या काळात केवळ फिरकी गोलंदाजी हेच भारतीय क्रिकेटच्या यशाचे मुख्य शस्त्र मानले जात होते, त्या काळात आपल्या मध्यम द्रुतगती गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पध्र्याचा थरकाप उडविणारे गोलंदाज म्हणून वसंत रांजणे यांची ख्याती होती. त्या काळात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंड आदी संघांकडून कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे अनेक द्रुतगती गोलंदाज क्रिकेट क्षेत्र गाजवीत होते.
भारतीय क्रिकेट संघटकांनी मात्र रांजणे यांचे कौशल्य अपेक्षेइतके ओळखलेच नाही. त्या काळी जर आपल्या संघटकांनी फिरकीबरोबरच द्रुतगती गोलंदाजीस महत्त्व दिले असते तर विंडीजच्या तोफखान्यासारखीच कामगिरी रांजणे यांच्याद्वारे भारताला करता आली असती. कोणत्याही खेळाडूला पदार्पणाचा सामना उत्साहजनक असला तरी काहीसे दडपणही त्याच्यावर असते, मात्र रांजणे हे मुलखावेगळेच गोलंदाज होते. त्यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजीमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅट्ट्रिकसह नऊ बळी घेतले. रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले. या कामगिरीमुळे त्यांना कसोटीचीही दारे खुली झाली. १९५८ मध्ये कानपूर येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यांनी सात कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटीमध्ये फलंदाजीत त्यांना कौशल्य दाखविण्याची फारशी संधी मिळाली नाही, मात्र गोलंदाजीत त्यांनी १७ बळी घेत कौतुकास्पद कामगिरी केली. १९६१-६२ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत त्यांनी कॉनरॉड हंट, रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स, फ्रँक वॉरेल या दिग्गज फलंदाजांना बाद करीत विंडीजला चकित केले होते. या डावात ७२ धावांमध्ये चार बळी ही त्यांची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यांनी प्रथम दर्जाच्या ६४ सामन्यांमध्ये १७५ बळी मिळविले. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया त्यांनी सहा वेळा केली, तर एकाच सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा पराक्रम त्यांनी दोन वेळा केला. अचूक टप्पा व दिशा ठेवीत गोलंदाजी करणे ही त्यांची हुकमत होती. इंग्लिश वातावरणात चमक दाखविण्याची शैली त्यांच्याकडे होती. वेस्ट इंडिज, इंग्लंडच्या फलंदाजांवर प्रभुत्व त्यांनी गाजविले होते. त्यांची भेदक शैली पाहून फलंदाजीच्या वेळी त्यांना जखमी करीत त्यांना गोलंदाजीस येऊच द्यायचे नाही हे तंत्र विंडीजने यशस्वी केले होते. तरीही रांजणे यांनी मिळेल त्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत शानदार कामगिरी केली. फलंदाजीत त्यांनी ७०१ धावा केल्या. त्यामध्ये नाबाद ५६ ही त्यांची सर्वाधिक कामगिरी होती. अतिशय गरिबीतून व प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत क्रिकेट कारकीर्द करणाऱ्या रांजणे यांना तत्कालीन अन्य क्रिकेटपटूंइतकी लोकप्रियता लाभली नसेल, पण प्रसिद्धिपराङ्मुख असलेल्या या खेळाडूने सतत आपल्या संघाच्याच हिताचा विचार करीत कारकीर्द केली. त्यामुळेच ‘अजातशत्रू क्रिकेटपटू’ म्हणूनच त्यांची ख्याती होती. रांजणे यांचा क्रिकेटचा वारसा त्यांचा मुलगा सुभाष यांनी पुढे ठेवताना महाराष्ट्राकडून प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. आता सुभाष यांचा मुलगा शुभम हा १९ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून चमक दाखवीत आहे. आपल्या आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करीत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti