जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते.
माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते !
"चिंचोरे गुरुजी" ह्याच नावाने ते ओळखले जायचे ! गोष्टीरूप इतिहास शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गणित विषयाची भीती, मुलांच्या मनातून कायमची काढून टाकण्यात ते वाकबगार होते. भाषेचे धडे शिकविताना ते चित्ररूपी भाषेतील वर्णन करून सांगायचे तर प्रत्येक कविता ते चालीमध्ये म्हणून दाखवित असत, आपोआपच मुलांच्या कविता तोंडपाठ होत असायच्या. स्कॉलरशिपचे वर्ग ते वर्षानुवर्षे घेत होते !
चिंचोरे गुरुजींच्या शिकवण्याच्या हातोटीचे अनेक दाखले, त्यांचे विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या वपुर्झा, गुलमोहर, रंगपंचमी, ककचीक अश्या अनेक पुस्तकाद्वारे वाचकांसमोर दिले आहेत. तसेच १७ मार्च १९८२ रोजी मुंबई दूरदर्शन वरून सादर झालेल्या, "आमची पंचविशी" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, व. पुंनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणी साध्यंत कथन केल्या होत्या !
माझ्या वडिलांच्या काही विद्यार्थ्यांची नावेच पाहा ना, ज्यांनी आपल्या यशोगाथेचे सर्व श्रेय मुक्तकंठाने आपल्या चिंचोरे गुरुजींना आदरपूर्वक दिले आहे :
भारताचे एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, ब्रिगेडिअर विजय खांडेकर, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे, कँसरतज्ज्ञ डॉ. पुष्पाताई शिरोळे, विख्यात निर्माते व्ही.शांताराम ह्यांचा पुतण्या व्हणकुद्रे. रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे ह्यांचा मुलगा सुहास केशव भोळे, अभिनेते विक्रम गोखले, मनीषा साठे, डॉ ओतूरकर, विद्युत बापट, दिलीप जोशी, जयंत दामले (मॅनेजमेंट कन्सलटंट) डॉक्टर माधव कवडे, अल्हाद धर्माधिकारी, चारू रानडे, नीता, पुष्पा पुजारी भगिनी, मेधा पंडित, सुरेखा गायधनी-पेठे, दिलीप दाणी, जयंत मालशे, जयंत झेंडे, चंद्रशेखर म्हैसकर, ही यादी फार मोठी आहे ….
विशेष म्हणजे ह्या तमाम विद्यार्थीगणांनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींना आजही लक्षात ठेवलेय, ते तसा आवर्जून उल्लेख करतात, ह्यामाध्येच चिंचोरे गुरुजींच्या पवित्र शिक्षकी पेशाचे चीज झाले, असे मी आदरपूर्वक म्हणतो, माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरु बंधू-भगिनींना माझा मनोभावे नमस्कार,
वरून कडक शिस्तीचे दिसणारे चिंचोरे गुरुजी आतून मात्र खूप हळवे होते. व. पु. काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, जेंव्हा माझ्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात भेटायला घरी आले, तेव्हां सर्वजण जुन्या आठवणीत रमले. त्यावेळी चिंचोरे गुरुजींनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी नावासह सांगितल्या, संग्रहामधील जुने फोटो दाखविले, तेव्हां तर सर्वजण भावुक झाले होते. व पु काळे जेव्हां बोलत होते, तेव्हां मी म्हणालो, "बापू, "शिक्षक" शब्दाची व्याख्या अशी करता येईल कां ? शिकविण्याच्या क्षमतेचा कलावंत म्हणजे शिक्षक", माझे वाक्य पूर्ण होताच, व पुंनी मला टाळी दिली ! एअर मार्शल बी एन गोखले सर तर अभिमानाने सांगतात, "आम्हांला चिंचोरे गुरुजींनी घडवलं" डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने तर, चिंचोरे गुरुजींना एकवीस वर्षे विनामोबदला औषधोपचार केले, मी काही बोललो, कि ते म्हणायचे, "उपेंद्र, गुरुजींची सेवा, हीच माझी गुरुदक्षिणा आहे"! ज्येष्ठ उद्योगपती श्रीमान अरुण फिरोदिया ह्यांना पद्मश्री जाहीर होताच, त्यांनी मुलाखत कर्त्यांना आपल्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि चिंचोरे गुरुजींना असल्याचे जाहीर केले. टीव्ही वर मी जेव्हां हे ऐकले, पाहिले तेव्हां माझे डोळे भरून आले. मी त्यांना लगेच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी जाऊन नमस्कार केला, तेव्हां त्यांनी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी कथन केल्या होत्या. धन्य ते शिक्षक आणि धन्य ते कृतज्ञ विद्यार्थी !
मॅनेजमेंट कन्सलटंट जयंत दामले आणि मोहन कानडे, हे त्यांचे विद्यार्थी आजही साठ वर्षांपूर्वीच्या, चिंचोरे गुरुजींच्या शालेय सहल नियोजनाच्या आठवणी सांगतात ! डॉ उषा केळकर वय वर्षे फक्त सत्याऐंशी, चिंचोरे गुरुजींनी, गीतेचा पंधरावा अध्याय कसा पाठ करून घेतला, ह्याविषयी त्यांच्या लेखात सांगतात. डॉ सुमन करमरकर (सध्याचे वय ८७) ह्या चिंचोरे गुरुजींच्या शब्दसंग्रहाचे वर्णन करतात. हो, शब्दकोडी पटापट सोडविण्यात ते तरबेज होते. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे, ह्यांनी १९३५-१९३६ मध्ये सात खंड प्रसिद्ध केले होते. पीवायसी ग्राउंड जवळ राहणारे कर्नल के जि घारपुरे साहेबांनी ते सातही खंड त्याकाळी चिंचोरे गुरुजींना भेट दिले होते. आजही ते खंड म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत ! ह्या कर्नल घारपुरे साहेबांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याकाळी शाळेच्या संमेलनाची अनेक छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली होती, जी आजही माझ्या संग्रहामध्ये आहेत, ह्या पोस्टवर टाकलेले छायाचित्र हे त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहे !
शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळूणकर सरांच्या हस्ते जेव्हां चिंचोरे गुरुजींचा "शिक्षक दिनी" सन्मान झाला, तेव्हां ते म्हणाले होते, "पंडित" हे नाव सार्थ करणारे "पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी" ! महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका डॉक्टर चित्राताई नाईक ह्यांच्या शुभहस्ते चिंचोरे गुरुजींचा "आदर्श शिक्षक" हे बिरुद अर्पण करून पुणे येथे १७ ऑगस्ट १९७३ रोजी सन्मान करण्यात आला होता !
माझी आईनं त्याकाळी गाण्याचं नियमित शिक्षण घेतलं होतं ! आमचे नातेवाईक होसिंग काकांनी त्यांची बेल्ज्यियम सुरांची पेटी माझ्या आईला भेट दिली होती. चिंचोरे गुरुजीही पेटी वाजवायचे, "तुला रं गाड्या भीती कशाची" हे गाणं ते पेटीवर वाजवायचे आणि आम्ही भावंडं ते ऐकत, त्यांच्या पुढ्यात बसायचो !
तिथीने चंपाषष्ठीला आणि तारखेनी ३ डिसेंबर रोजी चिंचोरे गुरुजींची जयंती आहे, आज सात मे रोजी त्यांची ३३ वी पुण्यतिथी आहे,
-- उपेंद्र पंडित चिंचोरे
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी-बदलापूर या मतदार संघातून कपिल मोरेश्वर पाटील खासदार म्हणुन विजयी झाले आहेत;
सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांनी १८ मार्च २०१४ या दिवशी ऐन लोकसभा प्रचाराच्यावेळी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदीं यांच्या विकासकामांच्या दुरदृष्टीचा आपल्या मतदारसंघाला फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी भा.ज.प प्रवेश केल्याचे जाहिर केले होते.
जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेचे अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक, अशीही त्यांची ओळख आहे. ग्रामविकास या संकल्पनेला मध्यभागी ठेवून आरोग्य, शिक्षण प्रसार, जलसंधारण या ग्रामविकासासाठी अत्यावश्यक असणार्या घटकांना प्राधान्य देणार्या कित्येक दुरदर्शी व सर्वस्पर्शी योजनांचे ते जनक आहेत. आजपर्यंत कपिल पाटील यांनी अनेक जिल्हा अधिकारी व नगरसेवकांना बरोबर घेवून स्वयंपुर्ण प्रभावी योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.
कौशल इनामदार यांनी मराठीच नाहीतर अनेक हिंदी शॉर्ट फिल्मनाही संगीत दिलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत “बालगंधर्व”, “अजिंठा”, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘आग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘अधांतरी’, ‘रास्ता रोको’, ‘इट्स ब्रेकींग न्युज’ आणि ‘हंगामा’ या चित्रपटांना संगीत दिलं आहे.
आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच हार्मोनियम वाजवण्याची कला सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असोत मा.जयवंत कुलकर्णी यांच्या “हिल पोरी हिला” किंवा “ही चाल तुरू तुरू” या दोन गाण्यांना हमखास “वन्स मोअर” मिळत असे. विशेष म्हणजे “सावध हरिणी सावध” या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि संगीतविश्वात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
कारण या गाण्याला उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा अनुभवायला मिळाला आणि मराठी चित्रपट व भावगीतांसाठी हा प्रयोग तसा नविनच होता. खरं पाहिलं तर मा.जयवंत कुलकर्णी यांनी त्यांचा सांगितीक कारकीर्दीत जी कोणती चित्रपट गीत गायली त्या बहुतांश गाण्यां मध्ये “गावरानबाज” पहायला मिळत असे. पण विशिष्ठ कोणत्याही एकाच ढंगातील गायन प्रकारात व अडकता मा.जयवंतजींनी “अष्टविनायका तुझा महिमा कसा”, “अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरि नाम त्याचे श्रीहरि”, “ विठुमाऊली तु माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठठ्लाची ” आणि “राम कुष्ण नारायण हरि, केशवा मुरारी पांडुरंगा” यासारखी अध्यात्मिक गीत आणि अभंग तल्लीन होऊन गायले! तसंच “अजिंक्य भारत अजिंक्य जनता” , “मंगल देशा पवित्र देशा” या दोन्ही गीतील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रगट झाला नसता तर नवलच !
“शाब्बास बिरबल शाब्बास बिरबल” हे मराठी संगीत संगभूमीवर गाजलेले नाटक आणि त्यातील “विश्वानाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा ” ही नांदी आजही ऐकल्यावर ताजी वाटावी अशीच आहे, या नांदीला जयवंत कुलकर्णींसह पंडित-राम मराठे आणि रामदास कामत या गायकाने स्वरबध्द केले होते. या नांदीमुळे मा.जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीच्या शिरपेचात नाट्यपद गाण्याचा तुरा देखील रोवला गेला. मराठी चित्रपटांतील द्वंद्व गीतांमध्ये काही गायक-गायिकांच्या जोड्या गाजल्या, त्यापैकी मा.जयवंत कुलकर्णीं सोबत उषा मंगेशकर ही गायनातील जोडी स्वरांच्या तालावर अक्षरश: ठेका धरायला लावत. या दोन्ही गायकांनी एकत्रित गायलेली सोंगाड्या चित्रपटातील “काय गं सखु”, आणि “माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी” तर “सख्या साजणा” मधील “चल चल जाऊ शिणुमाला”, किंवा गारंबीचा बापू चित्रपटातील “चांदणं टिपूर हलतो वारा” तसंच “लागे ना, लागे ना रे थांग तुझ्या ह्रदयाचा ” आजही आपल्या ओठांवर रुंजी घालताहेत. यासह नवरा माझा ब्रम्हचारी मधील “आई तुझं लेकरु येडं गच कोकरु”, पडछाया चित्रपटातील “नाच लाडके नाच, जगापासुनी दूर राहुया नको जनांचा त्रास”, तर “अनोळखी”तलं “ जीवन गगन मी पाखरू ” आणि “अंधाराची खंत तू कशाला करिसी रे”, “नाते जुळले मनाचे मनाशी” या भावगीतातून मानवी मनाचा वेध त्यांच्या स्वरातनं अगदी प्रभावीपणे उमटला.
“आमचा राजू का रुसला” , “माझ्या मामाची रंगीत गाडी हो,तिला खिल्लारी बैलांची जोडी हो” , “ गाव असा नि माणसं अशी, नातीगोती जडतंत कशी” अशी मिश्कील स्वरुपाची व बालगीते रसिकांनी उचलून धरली. “आयलय तूफ़ान बंदराला” या चित्रपटासाठी, लता मंगेशकर यांच्यासोबत, “आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज” , हे क्वचित प्रसंगी ऐकायला मिळणारे अगदी वेगळ्या प्रकारचे कोळीगीत गायले होते.मा.जयवंत कुलकर्णीं यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. यामध्ये भावगीतं, भक्तीगीतं व असंख्य चित्रपटगीतांचा देखील समावेश आहे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी मा.जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान मा.जयवंत कुलकर्णींचा आहे. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी मा.जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते. मा.जयवंत कुलकर्णी यांचे १० जुलै २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. सागर मालाडकर/ मराठी सृष्टी
अनिल मोहिलेंवर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता.संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत असत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्रजीत नाट्यसमीक्षा केल्यानंतर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संदर्भ विभागात रूजू झाले.
माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
सुहास शिरवळकर उर्फ सुशि हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४८ रोजी पुणे येथे झाला. सुहास शिरवळकर यांचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यातच झाले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या दुनियादारी या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही.
वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ' दुनियादारी ' या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचे लेखन शैली प्रसन्न, खेळकर होती. छोट्या छोट्या सुटसुटीत वाक्यरचना, बोली भाषेचा भरपूर वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्याचं लेखन कधीही कंटाळवाणं होत नसे. पण समीक्षक आपल्याला महत्त्व देत नाहीत, इतिहासात आपला उल्लेख हेटाळणीने केला जातो, असं त्यांना वाटत राहायचं. १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यथा लिहिल्या.
१९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु 'लोकांना आवडेल ते' अश्या मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंग्रहाच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथा देखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर दुनियादारी ' या कादंबरी वर चित्रपट आला व त्याला तुफान लोकप्रियता लाभली. सुहास शिरवळकर यांचे ११ जुलै, २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. उत्तरा केळकर यांचे ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ हे गाणेही लोकप्रिय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti