जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
"मालगुडी डेज'सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी झाला.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला.
दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज.जोशी यांनी केले आहे. आर.के.नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्या पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्याल नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली.
वयाची ऐंशी गाठलेले ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गानगुरू पंडित शरद साठे यांच्यासाठी शनिवारी, २४ रोजी मुंबईत होणारा सोहळा केवळ सहस्रचंद्रदर्शनाचा वा त्यानिमित्त होणाऱ्या सत्काराचा नाही.. त्यांच्या तीन सीडींचे प्रकाशन आणि मग सतारनवाज्म अब्दुल हलीम ज्माफर खान आणि सारंगीसम्राट रामनारायण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार,
त्यानिमित्ताने साठे यांना गुरू मानण्याचा ‘टप्पा’ गाठलेल्या अनेक गायक-शिष्यांचीही उपस्थिती, असे हे स्वरमय वातावरण असेल. ग्लॅमरची मातबरी- ज्यापुढे आजचे अनेक गायक शरण जातात- तशी साठे यांना कधी वाटली नव्हती आणि याही सोहळय़ात, प्रसिद्धीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची मानणाऱ्यांची मांदियाळी असेल. ही गुणवत्तेची बैठक साठेंना वयाच्या १७व्या वर्षी मिळाली, ती थेट पं. द. वि. ऊर्फ बापूराव पलुस्कारांकडून!
अगदी १९५५ पर्यंत, पलुस्करांच्या अकाली निधनापर्यंत ही तालीम सुरू होती. त्यानंतर साठे मुंबईत, बी. आर. देवधरांच्या विद्यालयात शास्त्रशुद्ध बैठक पक्की करत गेले.. पण फर्गसनमध्ये असताना ऐकलेले काही काहीशा नकलेचा दोष पत्करून गळय़ात घटवलेले फय्याजखाँ, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर अशांच्या गायकीत अंगभूत असलेले मोकळेपणही त्यांना भावत होते. त्याची स्वत:शी गाठभेट करून घेण्याचा क्षण साठेंना बहुधा, पं. शरश्चंद्र आरोलकरांच्या मठीत गवसला असावा.
ग्वाल्हेर गायकीतील ‘टप्पा’ हा गानप्रकार शिकायला आरोलकरांकडे साठे गेले आणि तिथे रमले. पुढे विद्यापीठीय स्तरावर टप्पा गायकीचे प्राध्यापक परीक्षक म्हणून काम करणारे पं. साठे यांची ‘यमनकल्याणा’सारख्या रागांवरही इतकी घरंदाज हुकमत आहे की, या गायनाचे जतन अव्वल देशी संस्थांखेरीज वॉशिंग्टन विद्यापीठानेही केले. आयटीसी- संगीत संशोधन संस्थेचा पुरस्कार (२००६), काशी संगीत समितीतर्फे ‘संगीतरत्न’ (२००७) हे सत्तरीनंतर मिळालेले सन्मान वगळता, ‘आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट’ ही साठे यांची ओळख होती, पण त्याबद्दल खंतखेद बाळगणाऱ्यांपैकी साठे नव्हेत. ‘डीव्ही पलुस्करांवरील लघुपटासाठी आवाज वापरला गेला’ या समाधानाचे मोल मात्र साठेंकडून जाणावे!
स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखकनी तू विमला’, ‘पद्ममनाथा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली. सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-thinkmaharashtara
सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराया गं माझा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखकनी तू विमला’
‘पद्ममनाथा नारायणा’
मूळच्या शोभा राजाध्यक्ष. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट जज होते. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी झाला. शोभा डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरूण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरु केली. त्यांचे पती दिलीप डे.
पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.
स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते.
अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे. डे यांच्या कादंब-या वाचकप्रिय असल्या तरी समीक्षकांनी कधीच त्यांना नावाजले नाही. शोभा डे यांनी 'दोन वेळा' लग्न केलंय आणि गेली अनेक वर्षं त्या आपले दुसरे पती दिलीप डे यांच्यासोबत सुखाने नांदताहेत. त्यांच्या म्हणजे डे कुटुंबातल्या सहा मुलांत शोभा डे व किलाचंद यांची दोन मुलं, डे यांना त्यांच्या आधीच्या विवाहसंबंधातनं झालेली दोन मुलं आणि शोभा डे व दिलीप डे यांना त्यांच्या या दुस-या विवाहातनं झालेल्या दोन मुली असा सहा मुलांचा हा परिवार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जात असत. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे – पु. ल. देशपांडे, रा.वा.अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष!
विजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली.
महात्मा गांधींची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सर बेन किंग्जले यांचा जन्म ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाला.
बेन किंग्जले हे मूळत: भारतीय वंशाचेच आहेत आणि त्याचं मूळ नाव कृष्णा भानजी. ते मूळचे गुजरातीच. त्याचे वडील गुजराती होते. किंग्जले यांच्या वडीलाचां जन्म केनियात झाला.त्यांचे आजोबा व्यापारी म्हणून जांजीबार स्थायिक झाले. किंग्सले यांचा जन्म जांजीबारचा ते वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडीलाच्या बरोबर इंग्लण्डला गेले. बेन किंग्जले हे गांधी चित्रपटात इतके गांधींच्या भूमिकेत फिट्ट बसले, की आजही हॉलिवुडमध्ये आणि भारतात ‘गांधी’मधील त्या भूमिकेसाठीच ते ओळखले जातात. बेन किंग्जले यांना आपल्या सुरुवातीच्या काळात ‘गांधी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या मुळे त्यांनी अभिनयाचे शिखर लवकरच सर केलं.
बेन किंग्जले यांनी साकारलेल्या गांधी या भूमिकेत सर्वाधिक लक्षात राहिले ते डोळे. त्यांनी निर्धार, करुणा, संताप, दु:ख आणि बरीचशी मिश्किली अशा विविध मुद्रा बेननं सहजपणे दाखवल्या. दांडी यात्रेत तरातरा चालणारे ‘सुपरफिट’ गांधीजी, उपोषणांमुळे थकलेले तरीही न खचलेले गांधीजी, त्यांचे भक्तगण बनलेल्या अनेक गोऱ्या मंडळींच्या फिरक्या घेणारे गांधीजी, कस्तुरबांच्या निधनामुळे प्रचंड व्यथित झालेले गांधीजी, फाळणीच्या अपरिहार्यतेपुढे अगतिक झालेले गांधीजी अशा कितीतरी छटा. अॅटमबरो आणि किंग्जले यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणावी तर त्यांनी भारताचे राष्ट्रपिता नवीन पिढीसमोर पुन्हा जिवंत केले. बेन किंग्जले यांनी शटर आयलंड, आयर्न मॅन, प्रिंस ऑफ पर्शिया अश्या हॉलीवूड मधील चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच जंगलबुक मध्ये मोगलीचा मित्र बगिराला याचा आवाज त्यांनी दिला आहे, त्यांनी बॉलीवूड मधील 'तीन पत्ती' 'ताज' या चित्रपटात काम केले आहे.
बेन किंग्जले यांना अकादमी पुरस्कार, बाफ्टा, गोल्डन ग्लोब पुरस्कार व स्क्रीन एक्टर्स गिल्ड अवार्ड्स असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गांधी चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=XyWRx_2MFbk
मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०९ मिरज येथे झाला. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले. मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किर्लोस्कर संगीत मंडळीतील दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किर्लोस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती.
शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले,‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’
टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.
पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.
१९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या. शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा.अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,
‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
‘मरताही भय नाही शिवले कचाला’
या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
मरताही भय नाही शिवले दिनाला’
असा निरोप गणूसाठी ठेवला.
संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत. शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ डॉ. रवींद्र घांगुर्डे
थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळ्खले जातात.
केशवसुतांनंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठीत नवटीकेचा प्रांरभ त्यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात.
बा.सी.मर्ढेकर यांची ग्रंथसंपदा: रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबर्याि आणि ‘सौंदर्य आणि साहित्य’ ‘वाड्मीयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत. बा.सी.मर्ढेकर यांचे २० मार्च १९५६ साली निधन झाले.
बा.सी. मर्ढेकर
दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!
दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti