जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सुरेश खरे हे महाराष्ट्राला नाटककार म्हणून परिचित असले तरी ते एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट लेखक, समीक्षक, संवादक, सूत्रसंचालक, संस्थाचालक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. परफॉर्मिग आर्ट्सशी संबंधित जवळजवळ सगळे प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
सुरेश खरे यांचा जन्म २५ जानेवारी १९३८ रोजी झाला. १९६० साली सुरेश खरे यांनी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या द्वारे त्यांनी रंगमंचावर अनेक नाटके सादर केली. जेव्हा नाटके मिळेनाशी झाली तेव्हा स्वत:च ’सागर माझा प्राण’ हे नाटक लिहिले आणि त्यांच्यातल्या नाटककाराचा जन्म झाला.
सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला.
दूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
सुरेश खरे यांना १९९९ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी यांच्या नावाचा गडकरी पुरस्कार मिळाला आहे. सुरेश खरे हे २००५ साली भरलेल्या ८५व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मा.सुरेश खरे यांची वेबसाईट.
http://www.sureshkhare.com/biography_m.php
संगीतरंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर हे त्यांचे वडील तर विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे काका. चित्तरंजन कोल्हटकर यांनी कोल्हापूर येथे १९४४ साली ललित कला कुंजच्या भावबंधन याच नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला. मात्र पदार्पणातील त्यांची भूमिका घनःश्यामची नसून मोरेश्वरची होती. घनःश्यामची भूमिका त्यांनी प्रथम १९४९ मध्ये केली. आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी भावबंधन नाटकातील घनःश्यामची भूमिका अजरामर केली. मात्र याच भूमिकेने त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का बसला आणि खलनायकाच्या भूमिकेलाही त्यांनी नवीन उंचीवर नेऊन ठेवले. तत्पुर्वी १९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली. त्यानंतर त्यांनी पेडगावचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजूळा, हिरवा चूडा, थांब लक्ष्मी कुंकु लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. भावबंधन प्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरीतांचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. ‘गारंबीचा बापू’मधील मा.चित्तरंजन कोल्हटकर यांच्या एन्ट्रीला तर टाळ्या पडत असत. काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले. इंदुर येथे १९८७ मध्ये झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचेही ते अध्यक्ष होते. तर संस्कार भारतीचे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्यांना सिने आणि नाट्य अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छ. शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांनी रंगात रंगलो मी हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन २५ ऑक्टोबर २००९ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.चित्तरंजन कोल्हटकर यांना आदरांजली
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आधुनिक मुलांच्या गोष्टींव्यतिरिक्त ताम्हनकरांनी अंकुश, अविक्षित, नारो महादेव, नीलांगी अशा ऐतिहासिक धाटणीच्या कथाही लिहिल्या होत्या.
बासरी म्हटले की प्रथम पं. हरिप्रसाद चौरासिया हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. बांबूपासून बनविलेली बासरी हे वाद्य साधे वाटत असले तरी ते पंडित चौरसियांच्या हाती आल्यावर ते रसिकांना खिळवून ठेवणारे वाद्य बनते. या साधनेमुळे पंडित चौरसिया यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे.
लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे हे राज कपूर यांचे स्वप्न होते. राज कपूर यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कलाब’ चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. अभिनेता होण्यासाठी त्यांनी क्लॅपरबॉय म्हणूनही काम केले आणि केदार शर्मा यांची थप्पडही खाल्ली. दहावीत राज कपूर एका विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी वडिलांना, ‘मला आता पुढे शिकायचे नाही, मला चित्रपटात काम करायचे आहे’असे सांगितले होते. राज कपूर यांचे वडील मा.पृथ्वीराज कपूर यांनी राज कपूर यांना निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या युनिटमध्ये क्लॅपर बॉय म्हणून काम करण्यास सुचविले होते. शर्मा यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर एकसारखे आरशाजवळ जायचे आणि केसातून कंगवा फिरवायचे. तसेच क्लॅप देताना आपला चेहरा कॅमेरात दिसेल, याचीही ते काळजी घेत असत. ‘विषकन्या’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राज कपूर यांचा चेहरा कॅमेऱ्याच्या समोर आला आणि चरित्र अभिनेत्याची दाढी क्लॅपच्या बोर्डावर अडकून निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूर यांचा गाल रंगविला. आपल्या केलेल्या कृत्याचा शर्मा यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या ‘नीलकमल’ या चित्रपटासाठी राज कपूर यांना साईन केले.
अभिनेता म्हणून १९४७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नीलकमल’हा त्यांचा पहिला चित्रपट. १९४८ मध्ये त्यांनी ‘आर. के. फिल्म’ची स्थापना केली आणि ‘आग’हा चित्रपट तयार केला. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’या चित्रपटाने राज कपूर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील ‘आवारा हू’ हे गाणे परदेशातही खूप लोकप्रिय झाले. बॉलीवूडचा रुपेरी पडदा पुढे ज्या अनेक अभिनेत्रींनी ‘नायिका’म्हणून गाजविला त्यांना राज कपूर यांनी ‘आर.के’तर्फे रुपेरी पडद्यावर येण्याची पहिली संधी दिली होती. ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटाची निर्मिती केली ज्यात ऋषी कपूर बरोबर नायिका म्हणून डिम्पलला संधी दिली. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये ‘कोवळ्या वया’तील (टीन एजर) प्रेमकथांच्या चित्रपटाचा पाया घातला. राज कपूर यांनी आपला मुलगा राजीव कपूर याला घेऊन ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनीला संधी दिली. तर ‘हिना’ चित्रपटात पाकिस्तानी कलाकार झेबा बख्तीयार व मराठी अभिनेत्री अश्विनी भावे हिला संधी दिली. अभिनेत्री निम्मी हिला ‘बरसात’मध्ये भूमिका दिली. बॉलीवूडची ‘स्वप्नसुंदरी’ हेमामालिनी हिला ‘सपनों का सौदागर’ मधून संधी मिळाली.
दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी हिला ‘जिस देश में गंगा बहेती है’ या चित्रपटात राज कपूर यांनी पहिली संधी दिली. या चित्रपटाने पद्मिनीला हिंदी चित्रपटात ओळख मिळाली. राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’मध्येही तिची भूमिका होती. बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर राज कपूर आणि नर्गिस ही जोडी लोकप्रिय ठरली. १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटानंतर पुढे ‘अंदाज’, ‘जान पहचान’, ‘आवारा’, ‘अनहोनी’, ‘आशियाना’, ‘अंबर’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ असे चित्रपट एकत्र केले. यातील अनेक चित्रपट व त्यातील गाणी गाजली. ‘श्री ४२०’ चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. राज कपूर आणि पाश्र्वगायक मुकेश यांचे अतूट नाते तयार झाले होते. राज कपूर यांचा ‘आवाज’ अशीच मुकेश यांची ओळख होती. राज कपूर यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात पडद्यावर गाणे म्हणतानाचा राज कपूर यांचा आवाज मुकेश यांचाच होता. मुकेश यांच्या निधनानंतर राज कपूर यांनी व्यक्त केलेली ‘लगता है मेरी आवाज ही चली गई’ ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर राज कपूर यांनी ‘हिना’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. पण हा चित्रपट त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. भारत सरकारने १९८८ साली राज कपूर यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन गौरवले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, फिल्म फेअर या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.
राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बी.कॉम., एल.एल.बी. गोल्ड मेडलिस्ट असलेल्या, गेली वीस वर्षं नाटक, सिनेमा आणि मालिकेत झळकणारा एक सोज्ज्वळ, सालस तरीही गंभीर असा चेहरा म्हणजे सागर तळाशीकर.
महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. पठडीबाहेरील भूमिका करण्यासाठी उपेंद्र लिमये अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांनी “मुक्ता” या मराठी चित्रपटातून आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सुरु केली.
तारक मेहता यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. ‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखन शैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.
जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी कनगिरी, आंध्र प्रदेश येथे झाला. आंध्रप्रदेशातील एका तेलगु ख्रिश्चन कुटुंबात जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्नच करीत. फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले.
देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. १८ व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. काम मिळाले ते स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले.
एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने अनेक नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदर मध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.
कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला. जॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अॅधक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४०० हून खूप अधिक आहे.
जॉनी लिव्हर स्टँडिंग कॉमेडी सुद्धा करतात. विनोदी भुमिकेत गाजलेले सिनेमे इश्क, साजन चले ससुराल, जुदाई.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti