(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना

    सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘...बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं... हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता... हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ मा.राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.

    बॉलीवूडचा ‘सुपरस्टार’ अशी ओळख असलेला मा.राजेश खन्ना यांनी चित्रपटात येताना आपले खरे नाव बदलले. त्यांचे मूळचे नाव जतीन खन्ना. गिरगावातच राहणारे अभिनेते रवी कपूर अर्थात जीतेंद्र यांच्यासोबत मा.राजेश खन्ना यांनी केसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना ‘जतीन’ खन्ना हे वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामध्ये भाग घेत असे. प्रत्येक स्पर्धेत बक्षीस जतीन घेऊनच जाणार हे ठरलेले असायचे. एकदा युनायटेड प्रोडय़ुसर्स आणि एका चित्रपटविषयक मासिकाने ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतही मा. जतीन खन्ना यांनी चांगली कामगिरी केली. त्याच वेळी काही निर्मात्यांनी जतीन खन्ना याला आपल्या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मा.राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. त्या वेळी एका प्रसिद्ध न्युमरॉलॉजिस्टने जतीन खन्ना यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. तू तुझे नाव बदललेस तर बॉलीवूड तुझ्यासाठी लाल गालिचा अंथरेल, तू प्रसिद्ध होशील, असा सल्ला दिला तो जतीन यांनी मानला आणि जतीनचा ‘राजेश खन्ना’ झाले. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले. शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते रातोरात सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. त्यानंतर राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणार्याक फॅन्सची संख्याही मोठी असायची. भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वैगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. आपल्या चाहत्यांमध्ये 'काका' नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात 'आराधना' आणि 'अमर प्रेम' याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते. रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर, मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. डिंपलपासून त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. १९८४ मध्ये डिंपल आणि मा.राजेश खन्ना विभक्त झाले. परंतु त्यांनी घटस्फोट घेतला नाही. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. मा.राजेश खन्ना यांचे निधन १८ जुलै २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 29, 2016


  • संजय बेलोसे

    बेलोसे, संजय

    एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात यशाची पहाट फुलत असावी आणि त्याच वेळी त्याचे आयुष्य संपावे, हा दैवदुर्विलास शनिवारी रात्री घडला. यावेळी काळाचा घाला पडला तो संजय बेलोसे या कल्पक लेखकावर! यांच्या प्रतिभेने नुकती कुठे भरारीला सुरुवात केली असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

    कोकणातल्या दापोली तालुक्यात, ‘सानेगुरुजींचे गाव’ अशी ख्याती असलेल्या पालगड या गावी संजय यांचे बालपण गेले. दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. मुंबईत आल्यानंतर संजय बेलोसे यांनी अभिनयाचे विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली काही नाटकांत कामे केली. त्यांनी अभिनय केलेले ‘नागमंडल’ हे नाटक विशेष गाजले. या काळात त्यांच्यावर बाईंच्या दिग्दर्शनाचा प्रभाव पडला नसता तरच नवल! संजय बेलोसे यांनी या कालावधीत प्रचंड निरीक्षण केले. ‘पगला घोडा’ हे नाटकही त्याच काळातले. त्यानंतर ‘लफडं सोळातलं’ आणि ‘खरंच, माझ्यासाठी?’ या दोन नाटकांसाठी तर त्यांना अभिनयासाठीचा नाटय़दर्पण पुरस्कारही मिळाला. संजय बेलोसे यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी केवळ अभिनय एके अभिनय न करता आपल्या प्रतिभेला इतर मार्गानीही वाव दिला. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेली अनेक नाटके गाजली. ‘घर आईचं’, ‘लढ बापू लढ’, ‘मोस्ट वॉण्टेड’ ही काही नाटके वानगीदाखल सांगता येतील. ही नाटके प्रेक्षकांच्या पसंतीला तर उतरलीच, पण त्यातील गुणात्मक मूल्यामुळे त्यांनी समीक्षकांचीही पसंती मिळवली. ‘भैरू पहेलवान..’ या चित्रपटाच्या संवादलेखनात त्यांचा सहभाग होता. त्यात त्यांनी छोटी भूमिकाही केली होती. याच दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीही त्यांचा दरवाजा ठोठावत होती. नीरज व्होरा यांच्यासाठी त्यांनी ‘फिर हेराफेरी’ आणि ‘खट्टामिठा’ हे दोन चित्रपटही केले. नुकताच त्यांचा ‘काय करू नि कसं करू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका मोठय़ा संघर्षांनंतर आयुष्यात स्थैर्य येत असतानाच अपघाताने गाठले आणि या कलाकाराची अनपेक्षित एग्झिट झाली.

      August 5, 2017


  • पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत

    पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत यांचा जन्म २७ डिसेंबर १९२३ रोजी झाला. मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक.१९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही संस्था कार्यरत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या. मौज प्रकाशनच्या मौज (साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक अशी त्यांची ख्याती झाली.

    प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती अश्या माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी पार पडलेल्या तिसर्याा मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष पद भागवत यांनी भुषविले होते.. श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. श्री.पु.भागवत यांचे २१ ऑगस्ट २००७ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 27, 2018


  • बॉलिवूडची सुपरहिट आई – निरूपा रॉय

    आज १३ ऑक्टोबर.. आज बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला.

    बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते.

    निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. १९५१ मध्ये त्यांचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी 'वीर भीमसेन' सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

    निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं. निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे.

    निरुपा रॉय यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

    निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 13, 2016


  • वासुदेव बळवंत फडके

    रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले होते. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्यात वास्तव्यास आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.

      May 15, 2014


  • चितळे उद्योगसमुहाचे युवा मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रनील चितळे

    चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली.

      April 28, 2022


  • वीर खुदिराम बोस

    भारतातील पहिल्या बॉंबचा यशस्वी रित्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस.खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला.त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती तिचे नाव अपरूपा. खुदिराम 10 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या बहिणीने केला.पुढील शिक्षणासाठी खुदिराम हे मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते तसे तसे क्रांतिकार्याची ओढ खुदिराम याना लागत गेली.

    मिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्र नाथ बोस यांनी त्यांना क्रांतिकार्यत येण्यास सांगितले. 1905 साली ब्रिटिश व्हाइसरॉय लोर्स कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.

    यानंतर मिदनापूर येथे 1906 साली स्वदेशीच्या आंदोलना वेळी एक शेतकी प्रदर्शन भरले होते यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्या कडे युगांतर मिदनापूर चे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये कसे बसे प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला,त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार ओडावे लागले आणि ते एका विणकामच्या शाळेच्या वस्तीगृहवर जाऊन राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवशी अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली.1906 एप्रिल मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टसमोर चालला. यातून 16 मे 1906 रोजी खुदिराम बोस निर्दोश सुटले.

    बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकार्यना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्या मध्ये कलकत्त्याच्या चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेट ने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या,वसुमती, यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुझफ्फरपूर ला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता बैठकीत किंग्जफोर्ड ला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कलक्त्यास येऊ लागले तिथे त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ⅘ स्ट्रीट येथे उतरत असत. याचदरम्यान युगांतरच्या कलक्त्यामधील कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना किंग्जफोर्ड बद्दल चा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.

    पुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड ला मारण्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठया टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकीं आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी ने हे काम करण्यास नकार दिला.त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. 23 एप्रिल 1908 रोजी दोघेही जण मुजफ्फरपूर ला येण्यासाठी निघाले.

    किंग्जफोर्ड ला मारण्यासाठी बॉम्ब चा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले.सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने मिळवलेली भाषांतर करून हि केउती मिळवली होती आणि या मागची प्रेरणा होती स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.

    24 एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहचले.यानंतर किंग्जफोर्ड च्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. 30 एप्रिल रोजी दोघेही जण कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्ड च्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले.रात्री साडेआठच्या वेळेस खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्ड च्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार हि निघाले.त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे हे खुदिराम याना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूर मध्ये झाला होता.पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड हा नव्हताच. यात स्त्रिया आणि दोन युरोपिअन जीव मारले गेले.

    यानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्या अंतर्गत 11 ऑगस्ट 1908 या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सकाळी 6 वाजता या दिवशी खुदिराम यांना फाशी देण्यात आली. आणि या भारतमातेसाठी एक 19 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला.

    संदर्भ - मृत्युंजयाचा आत्मयज्ञ - वि श्री जोशी

      August 11, 2016


  • अष्टपैलू अभिनेते निळू फुले

    आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांनी नाट्य-चित्रसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे गंभीर प्रवृतीचे अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.

    निलकांत कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.

    १९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

    राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.

    पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल.

    बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला.

    वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.

    सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...

    एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती.

    त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही.

    जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो.

    निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.

    निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे.

    निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.

    निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    निळू फुले यांची कारकीर्द

    गाजलेली लोकनाट्ये

    कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.

    गाजलेले मराठी चित्रपट

    अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.

    गाजलेले हिंदी चित्रपट

    कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
    गाजलेली नाटकं, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      July 13, 2017


  • संत गुलाबराव महाराज

    विदर्भातील एक सत्पुरूष. बालपणापासून ज्ञानेश्वरीचा व्यासंग. भरतातील नानाविध धार्मिक संप्रदाय; हिंदू, बौध्द, जैनाधी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मूसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत, असे समन्वयात्मक विचार त्यांनी प्रतिपादन केले.

      March 27, 2015


  • राम थत्ते

    विख्यात शिल्पकार व अजिंठा लेण्यांचा इतिहास शब्दबध्द करणारे लेखक राम अनंत थत्ते यांचा जन्म २७ जानेवारी १९३४ सालचा. राम थत्ते यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून “जी.डी.आर्ट”ची पदवी संपादन केली होती. थत्ते यांनी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सातत्याने सहा वर्षे पारितोषिके मिळविली.तसंच, मुंबई राज्यकला प्रदर्शनाचे सहा वेळा परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे पुतळा समितीवर त्यांची निरीक्षक म्हणून निवड झाली होती. विविध संस्था, चित्रकला महाविद्यालयांमध्ये अधिव्याख्याता म्हणून देखील थत्ते कार्यरत होते. कलाविषयावर विपूल प्रमाणावर लेखन करण्याचं काम राम थत्ते यांनी केले असून त्यांच्या "अजंठा"या २००४ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाला वाचकांसह समीक्षकांकडून कौतुकाची दाद मिळाली होती.

    आयुष्याच्या उत्तरार्धात पोटाच्या विकारामुळे राम थत्ते त्रस्त होते. मृत्यूच्या आठ दिवस आधी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचार सुरू असतानाच २९ सप्टेंबर २०१४ या दिवशी राम थत्ते यांचे वयाच्या ८०व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015