जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
२०१९ मध्ये स्वरानंद प्रतिष्ठानचा माणिक वर्मा पुरस्कार गौरी पाठारे यांना मिळाला आहे. या बरोबरच गौरी पाठारे यांना अनेक पुरस्कार, मान-सन्मान, कौतुक मिळाले आहे. त्यांच्या गाण्याला लोकांनी भरभरून प्रेम व संधी दिली. गौरी पाठारे यांनी देश विदेशात अनेक मैफिली केल्या आहेत.
शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तिचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ रोजी झारखंड येथे झाला. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. मीनाक्षी यांनी १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो या चित्रपटाने त्यांना कीर्ती मिळवून दिली. दामिनी या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. मीनाक्षी एक सक्षम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. मीनाक्षीने बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केले आहे.
अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर या बड्या स्टार्सबरोबर मीनाक्षी झळकली आहे. 'जुर्म' आणि 'दामिनी' या सिनेमांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीच्या अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आता सिनेमाच्या या ग्लॅमर दुनियेपासून खूप दूर झाली आहे. सिनेमे करण्यामध्ये आता फरसा रस नसल्याचं तिने स्वत: स्पष्ट केले आहे. 'घातक' हा तिचा शेवटचा सिनेमा होता. मीनाक्षी व्यवसायाने बँकर असलेल्या हरीश मैसूरबरोबर विवाहबद्ध झाली. लग्नानंतर ती आपल्या पती आणि कुटुंबीयांबरोबर अमेरिकेतील टेक्सास शहरात स्थायिक झाली. मीनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे.
टेक्सासमध्ये स्थायिक झालेली मीनाक्षी तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
महाराष्ट्राचं हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हतं. तर यशवंतराव चव्हाण हे नेता होते, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता. यशवंतराव चव्हाण अभिजात साहित्यिक होते. मराठी भाषेचा एक नम्र व रसिक वाचक या नात्याने त्यांनी नेहमीच मराठी भाषेचा, साहित्याचा आणि साहित्यिकांचा आदर केला आहे. ललित, आत्मपरलेखन, चरित्रात्मक, व्यक्तिचित्रणपर आठवणी, प्रवासवर्णन, स्फुट, वैचारिक, समीक्षात्मक, पत्रात्मक, भाषणे इत्यादी स्वरूपातील लेखन त्यांनी केले आहे.
प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला. शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या.ते ज्ञानेश्वरांची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शाहू मोडक अद्वितीय व्यक्तिमत्व होते शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत मा.शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत मा.शांता हुबळीकर होत्या. शाहू मोडक यांची नायकाच्या भूमिकेकरिता निवड झाली तेव्हा ते पीळदार शरीरयष्टीचे नव्हते. रोजचा व्यायाम आणि खुराकाने त्यांची तब्येत मजबूत झाली तेव्हाच चित्रीकरणाला सुरवात झाली. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या मा.शाहू मोडक यांची प्रत्यक्ष जीवनातील भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच. माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वरांची मानसिक अवस्था शाहू मोडकां यांच्या मध्ये सहजगत्या होती, म्हणून तितक्याच सहजतेने या दोन्ही भूमिका ते साकारू शकले. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे मा.शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत असत. मा.शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता.
निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. मा.शाहू मोडक आणि प्रतिभाताई जैन यांची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. मा.शाहू मोडक हे ख्रिश्चन तर मा.प्रतिभा या जैन. जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला. शाहू मोडक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी लिहिलेल्या आणि सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकित केलेल्या शाहू मोडक यांच्या आठवणी म्हणजे हे पुस्तक आहे!
शाहू मोडक प्रवास ... एका देवमाणसाचा
लेखिका: प्रतिभा शाहू मोडक
अनुवाद: सुधीर गाडगीळ
शाहु मोडक यांचे चित्रपट संत ज्ञानेश्र्वर व संत तुलसीदास
लाकडासारख्या कठीण वस्तूमध्ये इतकी जिवंत जादू असावी हा एक चमत्कारच! हा चमत्कार प्रत्यक्ष उतरवणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध कलावंत म्हणजे दामोदर गणेश पुजारे. पुजारे ह्यांचा जन्म ११ जुलै १९३४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वालावलचा. पुढे त्यांनी उच्च कलाशिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९६२ साली ते आर्ट मास्टर झाले.
जयवंत दळवी हे वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील आरवली गावचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू झाले. तेथून ते ‘लोकमान्य’मध्ये गेले.
एम.ए.साठी त्यांनी ‘इमोशन अॅअन्ड इमॅजिनेशन अॅठन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात (युसिस) त्यांनी नोकरी स्वीकारली. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी १९७५ साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. श्रमदान मोहिमेत ते उत्साहाने भाग घेत. त्यांची पहिली कथा ‘दातार मास्तर’ १९४८मध्ये ‘नवा काळ’ दैनिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या लेखणीला बहर आला आणि विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. ‘गहिवर’ (१९५६), ‘एदीन’ (१९५८), ‘रुक्मिणी’ (१९६५), ‘स्पर्श’ (१९७४) आदी १५ कथासंग्रह; ‘चक्र’ (१९६३), ‘स्वगत’ (१९६८), ‘महानंदा’ (१९७०), ‘अथांग’ (१९७७), ‘अल्बम’ (१९८३) आदी २१ कादंबर्याळ; ‘संध्याछाया’ (१९७४), ‘बॅरिस्टर’ (१९७७), ‘सूर्यास्त’ (१९७८), ‘महासागर’ (१९८०), ‘पुरुष’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९१) आदी १९ नाटके दळवींनी लिहिली आणि त्यातील बहुतेक पुस्तके गाजली. ‘लोक आणि लौकिक’ हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले.
दळवींची ‘चक्र’ ही पहिलीच कादंबरी मराठी कादंबरीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी म्हणून वाखाणली गेली. मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तेथे वस्ती करणार्यां चे उघडे-नागडे आयुष्य चितारताना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव दळवींना उपयोगी ठरले. बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्याल तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध दळवी घेतात. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्रविचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण ते करतात. कादंबरीला कथानक नाही, पण त्यातील व्यक्तिचित्रे महत्त्वाची आहेत आणि ती दळवींनी प्रभावीपणे उभी केली आहेत. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून ‘चक्र’चा उल्लेख केला जातो.
दळवींच्या सर्वच लेखनात विकार-वासनांच्या आवर्तात भोवंडून जाणारी माणसे पदोपदी भेटतात. दळवींचे बालपण तीस-चाळीस माणसांच्या एकत्र कुटुंबात गेले. जुन्या परंपरा प्राणपणाने जपणारे ते कुटुंब होते. कुटुंबाचा लवाजमा मोठा होता. त्यात विकेशा विधवा होत्या, वेडगळ व्यक्ती होत्या, वेगवेगळ्या वृत्तींची-विकारांची माणसे होती. संस्कारक्षम वयात दळवींचा संपर्क अशा माणसांशी आला. मध्यरात्री माजघरातून बाहेर येणारे दबलेले उसासे आणि हुंदके त्यांनी ऐकले, वेडसर माणसांचा आयुष्यक्रम त्यांनी न्याहाळला. माणसाच्या आयुष्यातील भोगवट्याचे, अतृप्त वासनांचे, सुख-दुःखांचे दशावतार त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते.
वेडी, अर्धवट पात्रे त्यांच्या साहित्यकृतींतून डोकावतात. माणसाचे उघडे-नागडे दुःख, व्यावहारिक जीवनाच्या धबडग्यात त्याची होणारी कोंडी आणि त्यातून अपरिहार्यपणे माणसाच्या वाट्याला येणारे एकाकीपण यांचा मन सुन्न करणारा आविष्कार त्यांच्या ‘संध्याछाया’, ‘सूर्यास्त’, यांसारख्या नाटकांत झालेला दिसतो. ‘चक्र’, ‘स्वगत’, ‘धर्मानंद’, ‘अल्बम’ यांसारख्या कादंबर्यां्त आणि ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘महासागर’, ‘लग्न’ यांसारखा नाटकांत त्यांनी लैंगिक वासनेतून निर्माण होणार्याय विकृतीच्या, वासनेच्या तळाशी असलेल्या क्रूर प्रवृत्ती यांची धगधगती चित्रे रंगविलेली आहेत.
दळवींच्या सर्वच लेखनात सहजपणा आहे, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. वाट्याला आलेल्या विलक्षण, व्यामिश्र अनुभवांनी अंतर्यामी उदास असणार्याच माणसांच्या व्यथा-वेदनांचे खिन्न करणारे चित्रण करणार्या या प्रतिभावंताने एक मुखवटा धारण केला होता. त्याचे नाव ‘ठणठणपाळ’! लौकिक जगात दिसणारे दळवींचे रूप प्रसन्न, विनोदी, मिस्कील बोलणारे, चेष्टा करणारे, दुसर्यां च्या विनोदाला खळखळून हसून दाद देणारे असे होते. ‘सारे प्रवासी घडीचे’मध्ये अस्सल कोकणी माणसांची व्यक्तिचित्रे दळवींनी रंगवली. वरून भोळीभाबडी वाटणारी पण मोठी बिलंदर माणसे दळवींनी या पुस्तकात उभी केली आहेत.
‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करून ‘ललित’ मासिकात त्यांनी ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठच त्यांनी जाणत्या वाचकांसमोर ठेवला. मराठी वाङ्मयातील, वाङ्मयसमीक्षेतील आणि एकंदर वाङ्मयव्यवहारातील अनिष्ट, अर्थशून्य आणि वाङ्मयविकासाला मारक ठरणार्यात अनेकविध प्रवृत्तींचे फुगे त्यांनी हसत-हसत फोडून टाकले. ‘ठणठणपाळ’-विषयी ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे, ‘ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला व कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक विभागाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता.’
गंभीर कथालेखनाबरोबर दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र ‘विनोदी लेखक’ म्हणून आपल्यावर शिक्का पडावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे पथ्य त्यांनी नेहमीच पाळले. जयवंत दळवी माणसांत रमणारे असले, तरी वृत्तीने एकाकी होते. महाराष्ट्र शासनाचे, नाट्य परिषदेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण गर्दीपासून ते दूर राहिले. सार्वजनिक सभांत त्यांनी सक्रिय भाग घेतला नाही.
सभा संमेलने टाळली. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी नाकारले. दळवी चतुरस्र प्रतिभेचे लेखक होते. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिवंगत ज्येष्ठ जयवंत दळवी यांच्या स्मरणार्थ जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
डॉ. सुभाष भेण्डे
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा.
उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)
‘धंदा म्हटला म्हणजे तो बुडणारच! धंदा म्हणजे अळवावरचे पाणी! ज्याला नेकरी मिळत नाही तो धंद्यात पडतो!’ उद्योग व्यवसायाविषयी मराठी समाजात अशी विचित्र मनोवृत्ती असल्याचे मला आढळून आले आहे. इतर जमातीत उद्योग व्यवसाय असलेल्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. आपल्याकडे मात्र अशा कुटुंबात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. अजुन तरी या मनोवृत्तीत विषेश फरक झाल्याचे निदान मला तरी आढळून आले नाही.
मराठी माणूस हा नेहमी धंद्यात ‘पडतो’. तो कधी आपणहून धंद्यात येत नाही. जो माणुस धंद्यात ‘पडतो’ त्याचा धंदा पण शेवटी पडतोच’. पण जो माणूस आपणहून, स्वखुषीने, आत्मप्रेरणेने, जिद्धीने किंवा इर्षेने, आवडीने धंद्यात येतो त्याचा धंदा कधीच बुडत नाही तर तो तरतो, फोफावतो, मोठा होतो असे मी पाहीले आहे. मग या साठी त्याचे वय, शिक्षण, क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, फॅमिली बॅकग्राऊंड, आर्थिक परिस्थिती, स्त्री का पुरुष, जात-पात-धर्म, तो मराठी मिडियम मधून शिकला का इंग्लीश मिडियम मधून शिकला या सगळ्या गोष्टी गौण, दुय्यम किंवा कमी महत्वाच्या म्हणजेच सबस्टँडर्ड ठरतात. याचे उत्तम उदाहरण आहे पुण्याचे एक उद्योजक सदाशीव रामा बोराटे उर्फ अण्णा.
अठरा विश्वे दारीद्रय असलेल्या एका गरीब शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या एखाद्या खेडुत मुलाने लहानपणापासुनच कारखानदार, इंडस्ट्रियालीस्ट किंवा उद्योजक होण्याची स्वप्ने बघणे हा शुध्ध वेडेपणाच! त्यांतुन उत्तम नोकरी मिळविण्यासाठी लागणारी दणदणीत क्वॉलिफिकेशन्स हाताशी असताना चालुन आलेली चांगली नोकरी नाकारुन नोकरिचा दरवाजा स्वतःसाठी कायमचा बंद करण्याचे धाडस दाखवणे हा अजुन एक मुर्खपणा! त्यांतही स्वतःला कांही इन्कम नसताना हायस्कुल टीचर असलेल्या आपल्या बायकोला पण नोकरी सोडायला लावुन तिच्या येणार्याय नीयमीत उत्पन्नावर गदा आणणे हा तर मुर्खपणाचा कळसच! पण अशी मुर्ख किंवा वेडी माणसेच काहीतरी भरीव कामगिरी करुन दाखवत असतात. म्हणुनच ऍपलच्या स्टीव्ह जॉब्ज सारखे लोक ‘स्टे हंग्री, स्टे फूलीश’ ( Stay Hungry, Stay Foolish ) ‘ ऊपाशी रहा, मुर्ख बना’ असा उपदेश करत असतात ते उगीच नाही. सुप्रसिद्ध पार्श्व गायिका श्रीमती आशा भोसले एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की घरची गरिबी आणि पोटातील भुकेची आग यामुळेच त्या श्रेष्ठ गायिका बनल्या. अशी पोटातील भुकेची आग व गरिबिचे चटके त्यांना बसले नसते तर त्या आत्तासारख्या श्रेष्ठ गायिका कधीच झाल्या नसत्या. आण्णा सुद्धा याच कॅटेगरीतले आहेत.
कारखानदार होण्याचे स्वप्न जरी अण्णांनी उराशी तरी बाळगले असले तरी करखनदार व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कुठे माहित होते? अण्णासारखा ग्रामीण भागातून आलेला, बिना इस्त्रीचे साधे कपडे व चपला घालणारा, भाड्याच्या सायकलवर फिरणारा, किरकोळ शरिरयष्टी व अत्यंत सामान्य पर्सनॅलिटी असलेला, ज्याला धड इंग्रजीसुद्धा बोलता येत नाही असा, ज्याच्या खिशात गावाला जाण्यासाठी लागणार्यास एस.टी. भाड्याचे पैसे सुद्धा नसतात अशी दरिद्री अवस्था असलेला मराठी माणूस कारखानदार कसा होऊ शकेल असेच सर्वांना वाटायचे.
पण जे मोठी स्पप्न बघायचे धाडस दाखवत असतात व त्या दिशेने प्रयत्न करत असतात त्यांची स्वप्ने नेहमीच खरी ठरतात. आज अण्णांचे एक नाही, दोन नाही तर चक्क पाच कारखाने आहेत. त्यातील दोन पुण्याला, दोन सातारला व एक चाकणला आहे. प्लॅस्टिक मोल्डिंगच्या क्षेत्रात त्यांच्या कंपनीचे मोठे नाव झाले आहेत. टाटा मोटर्स, फोक्स वॅगन, जनरल मोटर्ससाख्या मोठ्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. 90 कोटीच्या वर टर्वओव्हर आहे. 200 माणसे काम करीत आहेत. त्यांना चार मुले-तीन मुली व एक मुलगा आहे. त्यातील दोन मुली व मुलगा क्वालिफाईड इंजिनिअर तर एक मुलगी एम.बी.ए. आहे. बि.कॉम. झालेला त्यांचा पुतण्या ‘उत्तम’ हा उत्तम इंजिनिअर झाला आहे. प्लॅस्टिकला लागणारे मोल्ड बनवण्यात त्याने प्राविण्य मिळवले आहे. जर इंजिनिअर व्हायचे असेल तर त्यासाठी इंजिनिअरींगची क्वालिफिकेशन्स असलीच पाहीजेत असे नाही. जर आवड असेल तर कोणालाही उत्तम इंजिनिअर बनता येते याचे ‘उत्तम’ हे उत्तम उदाहरण आहे. ज्यांची भाड्याने जागा घेण्याची ऐपत नव्हती व भाड्याच्या सायकलवरून फिरायची पाळी होती त्याच अण्णांचे आज बंगले आहेत, गाड्या आहेत. थाटात फॅरीन टुर्स करत आहेत. नोकरीत हे कधीच जमले नसते असे त्यांचे म्हणणे आहे.
अर्थात अण्णांचा हा प्रवास काही साधा, सरळ व सुखाचा झालेला नाही. पार्टनरने ऐन वेळेला दगा देणे, लोकांनी फसवणे किंवा टोप्या घालणे, अंडर एस्टिमेट करणे, थोड्याश्या मोबदल्यात त्यांच्या फॅक्टरीवर कबजा करण्याचा प्रयत्न करणे, बिझनेच्या मोठ्या मोठ्या थापा मारून त्यांना फुकटात राबवून घेणे, वेगळे घर घ्यायला पैसे नाहीत म्हणुन फॅक्टरीतच संसार थाटणे, केवळ तीन भांड्यांपासून संसाराला सुरवात करणे, हेवे दावे, लोकांच्या पोटात दुखणे अशा अनेक संकटांना तोंड द्यायची पाळी त्यांच्यावर आली. पण ते डगमगले नाहीत. याचवेळी त्यांना काही चांगली माणसे पण भेटली. असे असुनही आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटु दिली नाही. आपल्या गावी पण त्यांनी कारखाना काढला होता. त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषीक पण मिळाले होते. पण विजेच्या समस्येमूळे त्यांना हा कारखाना बंद करावा लागला.
जास्तीत जास्त मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायात यावे, कारखानदार व्हावे, लघु उद्योजक व्हावे, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी या क्षेत्रात पुढे यावे, ग्रामीण भागात कारखाने काढावेत या साठी अण्णांचे तळमळीने प्रयत्न चालू असतात. यासाठी त्यांची विनामुल्य मार्गदर्शन देण्याची तयारी असते. त्यांचे म्हणणे आहे की लघु उद्योग हा मोठ्या उद्योगाचा पाठीचा कणा आहे. त्यांच्या पासून प्रोत्साहन घेऊन त्यांच्या गावाजवळील गावातील काही तरुणांनी कारखाने काढले आहेत. त्यांच्या जीवन चरित्रावर आधरलेले माझे ‘हिम्मते मर्दा’ हे पुस्तक इ-साहित्य प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले असून ते विनामुल्य उपलब्ध आहे. यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी joshiulhas5@gmail.com या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा. अण्णांशी संपर्क साधायचा असल्यास borate.sr@elite-group.co.in या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा ही नम्र विनंती आहे.
-- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री सारिका ठाकूर माहेरचे नाव सारिका ठाकूर. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९६० रोजी झाला. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले.
यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत. लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
35 वर्षां पुर्वी फ़िल्मफ़ेअर मासिकात एक आर्टिकल आले होते" Those who speaks with their eyes" या आर्टिकल मधे तिच्या डोळ्यांचे वर्णन " एका छोट्या मांजरी सारखे दिसतात असे केले होते आणि बिंदुचे डोळे एखाद्या बोक्या सारखे दिसतात असे केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे मा. दीनानाथ, बालगंधर्व व मा. कृष्णराव यांना गुरुस्थानी मानत. दैवयोगाने, त्यांना सुरेल, बारीक परंतु धारदार आवाज प्राप्त झाल्याने त्यांच्या गाण्यात दीनानाथ मास्तरांच्या गाण्यातील तडफदारपणा व बालगंधर्वांच्या गाण्यातील लडिवाळपणा या दोन्ही गोष्टी साधता आल्या व त्यामुळे अनेक वर्षे संगीत रंगभूमीवरून व खासगी मैफलीतून ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. ‘होनाजी बाळा’ या नाटकातील त्यांची भूमिका व विशेष करून त्यातील ‘श्रीरंग कमलकांता’ हे त्यांचे पद गाजले.
एके दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रणेते प्र. के. अत्रे हजर होते. त्या दिवशी ‘श्रीरंगा कमलकांता’ हे त्यांचे पद इतके रंगले, की अत्रे मोहित होऊन अंक संपल्यावर रंगमंचावर आले व सर्व रसिकांच्या समोर पडदा उघडून त्यांनी सुरेश हळदणकरांना ‘महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुण्यातून मुंबईला आल्यावर हळदणकरांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पं. मनहर बर्वे, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. गणपतराव देवासकर आदी संगीततज्ञांकडे झाले. पुढे ते प्रसिद्धीपासून दूर गेले. तरीसुद्धा त्या अगोदर अनेक वर्षे ते त्यांच्या गाण्याचा आनंद रसिकांना देऊ शकले. त्यांनी गायलेल्या काही जुन्या रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांतील पदे उदाहरणार्थ, ‘विमल अधर निकटी’, ‘रघुराया गं माझा’, ‘श्रीरंगा कमलकांता’, ‘मानिली आपुली’, ‘सुरसुखकनी तू विमला’, ‘पद्ममनाथा नारायणा’ ही पदे त्यांना प्रसिद्धी देऊन गेली. मा.सुरेश हळदणकर यांचे १७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-thinkmaharashtara
मा. सुरेश हळदणकर यांची काही गाणी.
‘विमल अधर निकटी’
‘रघुराया गं माझा’
‘श्रीरंगा कमलकांता’
‘मानिली आपुली’
‘सुरसुखकनी तू विमला’
‘पद्ममनाथा नारायणा’
झुबिन मेहता यांचे वडील मेहिल हे उत्तम व्हायोलिन वादक होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९३६ रोजी झाला. त्यांनी मुंबईत बॉम्बे सिम्फनी ऑर्केस्ट्रा नावाची संस्थाही स्थापन केली होती. पारशी कुटुंबात जन्मलेल्या झुबिन मेहता यांना डॉक्टर व्हायचे होते, मुंबईच्या सेंट मेरी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर सेंट झेवियर्समध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पण त्या वेळचे वातावरणच असे होते, की त्यांच्या वडिलांच्या संगीताच्या क्षेत्रातील कारकीर्दीच्या पावलावर पाऊल टाकून आपणही त्याच मार्गाने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. व जगाला एका श्रेष्ठ दर्जाच्या संगीतकाराची देणगी मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी व्हिएन्नामध्ये जाऊन संगीताचे शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे १९५८ मध्ये त्यांनी आपला पहिला कार्यक्रमही सादर केला. त्याच वर्षी झालेल्या म्युझिक कंडक्टर स्पर्धेत झुबिन मेहता हे जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकाचे विजेते ठरले. जगातल्या अनेक नामवंत म्युझिक कंडक्टर्समध्ये त्यांना अतिशय मानाचे स्थान मिळाले. त्यानंतर भारताला कायमचा रामराम ठोकला, तरीही त्यांनी भारतीय नागरिकत्व मात्र सोडलेले नाही.
झुबिन मेहता यांनी या कामात जे प्रावीण्य मिळवले, ते अतुलनीय आहे. मॉन्ट्रेयल सिम्फनी ऑर्केस्ट्रा या जगप्रसिद्ध ऑर्केस्ट्राचे म्युझिक कंडक्टर होण्याची संधी मा.झुबिन मेहता यांना वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी मिळाली. त्या पदावर ते सात वर्षे कार्यरत होते. लॉसएंजेलिस फिलहार्मनिक या संस्थेत म्युझिक डायरेक्टर म्हणून त्यांनी सोळा वर्षे काम केले आहे. इस्त्रायलच्या ‘इस्त्रायल फिलहार्मोनिक ऑर्कस्ट्रा’ची सवरेतोपरी जबाबदारी १९८१ मध्ये त्यांनी स्वीकारली. मात्र, ही जबाबदारी स्वीकारली असताना अमेरिका, युरोप खंडातील जगभरातील अनेक ऑर्केस्ट्राचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले. भारतीय संगीताची, वाद्यांची त्यांना उत्तम जाण आहे. आपल्या नादमधुर सतार वादनाने जगातील प्रत्येकाला भुरळ पाडणा-या पंडित रविशंकर यांच्याबरोबरही त्यांनी एकत्रितपणे कार्यक्रम केले. इस्त्रायलची सांगीतिक संस्कृती जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी त्यांनी ‘इस्त्रायल फिलहार्मोनिक ऑर्कस्ट्रा’च्या माध्यमातून निष्ठेने प्रयत्न केले. त्याचीच पोचपावती म्हणूनच त्यांच्या योगदानाबद्दल इस्त्रायल सरकारने त्यांना १९९१ मध्ये इस्त्रायल पुरस्कार’ देऊन गौरवले. सध्या ते जर्मनीच्या बावेरियन स्टेट ऑर्केस्ट्राचे काम पाहत आहेत. त्यांचे ‘द स्कोअर ऑफ माय लाइफ’ हे आत्मचरित्र वाचण्यासारखे आहे. भारत सरकारने झुबिन मेहता यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti