सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक. संगीतातील २२ श्रुतींवर आधारित जागतिक दर्जाचे संशोधन.
श्याम फडके यांचे मुळ नाव दिगंबर त्र्यंबक फडके. त्यांचा जन्म ठाण्यामध्ये २६ सप्टेंबर १९३१ रोजी झाला. बी. एस्सी. व एम. एड. चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते डॉ. बेडेकर विद्यामंदिराचे काही वर्षे मुख्याध्यापक व ज्ञानसाधना विद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.
८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भुषविणार्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या कार्यकारिणीवर काही काळ त्यांनी अध्यक्ष म्हणून सुध्दा काम पाहिले. नाटक हा त्यांचा आवडीचा विषय असल्यामुळे सुरूवातीला त्यांनी नाटकांमधून कामे केली. त्यामुळे नाट्यलेखनाची आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी एकांकिका तसंच लहान मुलांसाठी विनोदी व समाजातील सर्वच स्तरावरील प्रेक्षकांसाठी नाटके लिहिली.
“एक होतं भांडणपुर”,“राजकन्या निलमपरी”,“हिमगौरी आणि सात बुटके”, यांसारखी त्यांनी लिहिलेली बाल नाटके लोकप्रिय ठरली. “आठ तासांचा जीव” हे एक सामाजिक नाटक, त्याव्यतिरीक्त “का असंच का?”, “अर्ध्याच्या शोधात दोन” या गंभीर नाटकांचे लेखन सुध्दा दिगंबरजींनी केले होते.
“काका किशाचा” हे विनोदप्रधान नाटक सुप्रसिध्द फार्स म्हणून खुप गाजले. तसंच “खोटे बाई, आता जा” हे त्यांचे नाटक नाटयप्रेमींच्या सदैव स्मरणात राहिल. काही काळ ठाण्यातील नाटयचळवळीशी शाम फडके यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. हौशी नाटयचळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी संग्रहालयाच्या सभागृहाचा उपयोग त्यांनी लघु नाटय थिएटरसारखा करून घेतला होता. चांदणे संमेलनासारखे रात्रभर साहित्यिक कार्यक्रम घडविणारे संमेलन काही वर्षे त्यांच्याच अध्यक्षतेखाली संग्रहालयाने साजरे केले आहेत.
लेखन: सागर मालाडकर
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
पाप्युलर या मराठी साहित्यविश्वामधील अग्रणी समजल्या जाणार्या पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवी, चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एल.एल.बी त्यानंतर मुंबई विद्यापीठून राज्यशास्त्र विषयातून एम.ए.पूर्ण केले.
१९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोच्या मराठी प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी कामाला सुरूवात केली. तर १९५८ पासून इंग्रजी प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या “इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस”मध्ये तीन महिन्याची नोकरी करुन प्रकाशन कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथव्यवहाराचा अभ्यास देखील. १९६५ रोजी यु.एस.स्टेट डिपार्टमेन्टच्या निमंत्रणावरुन अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला.
“बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन” व “कॅपेक्सिल” या निर्यातदारांच्या संस्थेच्या “बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल”चे अध्यक्षपद रामदास भटकळ यांनी भुषविले आहे.
“द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया”, “जिगसॉ”, “मोहनमाया”, “जगदंबा”, “रिंगणाबाहेर” या पुस्तकांचे रामदास भटकळ यांनी लेखन केले आहे. “फ्रँकफुर्ट” येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा सहभाग देखील नोंदवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे भटकळ मानकरी आहेत.
आनंदीबाईंनी ‘सांजवात’या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.
लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक. पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु.
महाराष्ट्राच्या सन्त परंपरेला महाराष्ट्रेतर प्रदेशचं वावडं नव्हतं, हे आपल्याला संत नामदेवांच्या काळापासून माहित आहे. विश्वात्मकता हे सन्तांच्या विचारसरणीचं अधिष्ठान होतं व त्यांच्या तत्त्वज्ञानानून व साहित्यातून तीच प्रतिबिम्बित झाली आहे.
महाराष्ट्रातील नागेश सम्प्रदायाची सन्त परंपरा केवळ महाराष्ट्रात आढळत नाही तर ती कर्नाटकातही आढळते. बेळगावच्या वाटेवरील हत्तरगी हे गाव कर्नाटकात आहे. तेथील आधुनिक संत हरिकाका गोसावी ह्यांची परंपरा संत एकनाथांपासून आहे. रामदास स्वामींच्या संप्रदायाची व शिष्यांची परंपरा केवळ महाराष्ट्रा आढळत नाही तर मध्य भारतात व दक्षिण भारतातही आढळते. संतांना नि त्यांच्या परंपरेला भूगोलाच्या सीमा रेषांचं कसं असेल ?
गोंदवलेकरांच्या शिष्यपरंपरेचा फारसा विचार महाराष्ट्राच्या वाड्मयेतिहासात झाला नाही. तो करुन देणं अगत्याचं असल्यानं त्यांच्या शिष्यपरंपरेचा साहित्याचं स्वरुप दर्शन या लेखात हेतुत: घडवून दिलं आहे.
ब्रम्हानंद महाराजांचा जन्म भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आगेमागे झाला त्याचा मास व तिथी माघ वद्य दशमी अशी नोंदविली असून इसवी सनानुसार त्यांचं जन्मवर्ष १८५९ हे आहे.
त्याचं घराणं कर्नाटकातील जालीहाळ गावाचं. भक्तीची परंपरा त्यांच्या घराण्यात असून हे गाडगोळी घराणं त्या भागात वेदविद्या पारंगत म्हणून प्रसिद्ध होतं. त्यांचे वडील वाळंभट्ट हे वेदशास्त्र संपन्न पंडित होते. असं असलं तरी त्यांचे पुत्र अनंत (हे ब्रम्हानंदमहाराजांचं सन्यासग्रहणापूर्वीचं नाव) मात्र तसे नव्हते त्यांचे बालपण वेदोध्ययानात न जाता खेळण्याबागडण्यात उनाडकीत जाऊ लागलं. तु कुलर्दपक नसून कुळाला काळिमा फासणारा आहेस, असं बाळंभट्टांनी कंटाळून नि अत्यंत त्रस्त होऊन म्हटल्या वर अनंताला पश्चाताप झाला व परतीही झाली. मुळगुंदच्या पंडित रघुनाथ शास्त्रींकडे त्यांनी वेदाध्ययन केलं. शास्त्री बुवांच्या सत्संगाचा योग्य तो परिणाम झाला व अनंतानं वेदाध्ययन पूर्ण केलं एवढंच नव्हे तर ते भागवत ही सांगू लागले अनंताच्या जीवनातील हा कायापालटच होता. ब्रम्हचैतन्य हेच आपले गुरु आहेत असा दृष्टान्त झाल्यावर ते गोंदवल्यास आले नि त्यांनी ब्रम्हचैतन्यांचा अनुग्रह घेतला.
ब्रम्हानंदमहाराजांनी आपल्या गुरुचा महिमा आपल्या अनेक अभंगातून अत्यंत श्रद्धेने व्यक्त केला आहे.गुरुर्ब्रह्मा या सूत्राची प्रचीती त्यांच्या या अभंगातून येते, त्यातील गुरुराव माझे ब्रम्हची साकार या मध्यवर्ती संकल्पनेवरुन त्यांच्या गुरुभक्तीची सहज कल्पना येईल.
साष्टांग वंदूनी सदगुरुरायासी । चिंतावी मानसीं गुरुमूर्ति ।।
गुरुराव माझे ब्रम्हचि साकार । केला उपकार धरुनी देह ।।
नाहीं निराकार नाही हो साकार । ऐसा गुरुवर माझा आहे ।।
निर्वाच्य ब्रम्ह चैनत्यसि आलें । दुष्टहि तरले दर्शनयोगें ।।४।।
सकल निगमागम नेणती महिमा । नाहीं दुजी उपमा सदगुरुसी ।।५।।
दीन ब्रम्हानंद प्रार्थीतसे भावें । मन लय व्हावें रामरुपीं ।।६।।
कधी ते आपल्या गुरुला रामस्वरुप मानतात तर कधी तो मारुतीचा अवतार आहे, असंही मानतात.
गुरुच्या वात्सल्याची ते मातेच्या वात्सल्याची तुलना करतात म्हणूनच ते आपल्या गुरुला 'सद्गुरुआई' असंही म्हणतात. या संदर्भातील त्यांचा अभंग असा आहे.
ऐसे करीं सद्गुरुआई । आपुलें स्मरण वसो ह्दयी ।।१।।
नावडो हे विषयध्यान । रामनामी लागो मन ।।२।।
देहबुद्धि उकरुन । लावीं रोप समाधान ।।३।।
पळवी माझी दुजी भ्रांति । वासना जाळुनि देई शांति ।।४।।
बहु बळकट चिज्जडग्रंथी । सोडुनि दावा दाशरथि ।।५।।
ब्रम्हानंदी अशा फार । करीं दीनाचा उद्धार ।।६।।
आपण परमार्थमार्गाला लागन शक्यच नव्हतं कारण ते आपल्या प्रारब्धात नव्हतं तरीही गुरुकृपेमुळं आपल भाग्य उजळलं आणि आपण परमार्थमार्गाला लागलो यामूळं आपला गुरु हेच आपलं वैकुंठ आहे आणि तोच आपला कैलास आहे. तेच आपलं ब्रम्हज्ञान आहे. आणि तोच आपला मोक्ष आहे, असं ब्रम्हानंदमहाराज म्हणतात. अशा गुरुची अखंड सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभो अशा विनवणीही ते परमेश्वराजवळ करतात.
परमार्थाची रेषा नाही कपाळांत । करवी सदगुरुनाथ अपुले सत्ते ।।१।।
आपले सत्तेने तोडी कर्मफांसा । माझा सदगुरु ऐसा कृपानिधी ।।२।।
कृपानिधी एक धरिला असे भावें । काय तें करावें वैकुंठासी ।।३।।
वैकुंठ कैलास आम्हां सदगुरुप्राय । चुकती अपाय तेणें सर्व ।।४।।
हाचि माझा मोक्ष, हेंचि ब्रम्हज्ञान । नाम मुखीं चरणसेवा करुं ।।५।।
सेवा अखंडित राहो माझे चित्ती । हरीची विनंती पायापाशीं ।।६।।
आणि केवळ असं सांगूनच ब्रम्हानंदमहाराज थांबत नाहीत तर ते आयुष्यभर आपल्या गुरुची अत्यंत निष्ठेनं सेवाही करतात.
संदर्भ - डॉ.यू.म.पठाण यांचा 'महान्यूज'मधील लेख.
(१८९२-१९७३)
ठाणे जिल्हातील निसर्गरम्य आदिवासी परिसरात ग्रामिण बालशिक्षणाचे यशस्वी प्रयोग करणार्या शिक्षणसंशोधक. राज्य विधानसभेच्या सदस्य. त्यांचे कार्य असंख्य कार्यकर्त्यांना व सेवाभावी संस्थाना प्रेरणादायी ठरले. अनेक बालपुस्तकांचे, नियतकालिकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. बालशिक्षिकांचे प्रबोधन. शिक्षिकांचे प्रशिक्षण, संशोधन हे त्यांच्या कामाचे इतर पैलू होते. अंगणवाडी, कुरणशाळा, विकारवाडी अशा नवनवीन कल्पना त्यांनी रूजवल्या.
“हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले.
गोखले, (प्रा.) ल. ना.
लक्ष्मण नारायण गोखले हे नाव पत्रकार ही त्यांची ओळख दिली जाईल. ते पत्रकार होते, पण पत्रकारांचे ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक मित्र होते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते दीपस्तंभ होते. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते पहिले उत्तम संयोजक होते. ‘ल.ना.’ अशी आद्याक्षरे उच्चारली तर त्यापुढे केवळ गोखले हेच नाव येते ते यामुळेच. ही आद्याक्षरे त्यांच्या त्या आडनावाशी एकरूप झाली होती आणि ती त्यांचा व्यासंग सांगायला पुरेशी होती. ल.ना. सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे झाली, पण तरीही त्यांना सर्व घडामोडी इत्यंभूत माहित असायच्या. पत्रकारितेतही रोजच काही ना काही घडत असते.
कुणी त्याकडे लक्ष देते, कुणी देत नाही. ‘लनां’ना आपल्याकडून ती सांगितली जाईपर्यंत ती त्यांना मिळालेली असे. ल.ना. हे त्याही अर्थाने ज्ञानकोशच होते. कोणत्या वृत्तपत्रात काय आले आहे आणि काय हवे होते ते ल.ना. अचूकपणे सांगू शकायचे! वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे, अशी तक्रार अनेकजण करतात, पण कोणी त्यावर उपाय सांगत नाही. ल.ना. म्हणायचे, ‘तुम्हाला वाटले तर मला सांगा, मी एखादा तास घेऊन काय चुकते ते सांगू शकेन.’ अर्थात, यामागे चुका दाखवून देण्यापेक्षा त्या पुन्हा केल्या जाऊ नयेत, हा दृष्टिकोन होता. ‘पत्रकारांसाठी मराठी’ या पुस्तकाचा जन्मही त्यांच्या अशाच आग्रहातून झाला. या पुस्तकातही लिहिताना त्यांनी संपूर्ण वर्षभराचे अंक समोर ठेवून कोणत्या वृत्तपत्राने कोणता शब्दप्रयोग केला आहे, तेही तपासून पाहिले होते. काही वेळा तर अनर्थ होईल, असेही शब्दप्रयोग केले गेल्याचे त्यांना आढळले. या चुका दाखवताना एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी सोपी मांडणी केली आहे. पत्रकारांना भाषा शिकवायचा उद्देश त्यामागे नक्कीच नव्हता, तर पत्रकारांनी सुबोध मराठीचा वापर करून वाचकांना चुकीच्या मराठीपासून वाचवावे, ही त्यामागे असणारी दृष्टी होती. त्यांचा त्यासाठी आग्रह होता, पण तो अनाठायी नक्कीच नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कोठे काय आले आहे आणि त्यामागे काय भूमिका असू शकते, याचे नेमके ज्ञान त्यांना होते. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रे मराठीचा वापर करतात का, तर नाही. मग आपण त्यांच्या त्या शब्दांची उसनेगिरी का करायची, असा त्यांचा साधा सवाल असे. फलटणच्या मुधोजी प्रशालेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली तरी पत्रकारितेची उपजत वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. ते पुण्यात आले आणि ‘काळ’, ‘त्रिकाळ’ या वृत्तपत्रांनंतर ‘केसरी’मध्ये दाखल झाले. ‘केसरी’त त्यांनी काही काळ ‘वाट्टेल ते’ या नावाचे सदर लेखनही केले, ज्याचे पुढे पुस्तकही झाले. त्या काळात पत्रकारांचे आर्थिक जीवनमान फार चांगले नसले तरी जे होते त्यात समाधान मानणारे ते होते. पुणे विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करायचे ठरवल्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख बनले. अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणूनही ते ओळखले गेले. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात ‘संदेश’कार कोल्हटकर शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती, पण पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई पाहून त्यांनी साऱ्या विद्यापीठाला हलवून सोडले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकींमध्ये कधी वादावादी झालीच तर तिथे एकच व्यक्ती अशी असे, की जी त्या सर्व वादावर पडदा टाकून पुढे जाणे श्रेयस्कर मानत असे. ते अर्थातच ल.ना. होते. जयंतराव टिळक, भा. गो. बापट, प्र. ल. गावडे, द. मा. मिरासदार, दा. सी. देसाई, मा. वि. साने आदींबरोबर त्यांनी काम केले. बाहेरच्या अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. पत्रकारितेबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करतानाही त्यांनी पत्रकारांबरोबरचा संवाद तोडला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिवर्गाचे पत्ते आणि त्यांचे काम करण्याचे ठिकाण यांचीही हमखास माहिती त्यांच्याकडेच मिळत असे. संगणकयुग अवतरायचे होते, त्या काळात त्यांच्याकडे जमा होणारी ही माहितीही थक्क करून सोडणारी असे. त्याचा अनाठायी अभिमान बाळगणे हेही त्यांच्या गावी नव्हते. अलीकडे ते एका पुस्तकाच्या लेखनात गुंतले होते, त्याचे काम चालू होते, तोपर्यंत त्यांच्या तब्येतीने उमेद बाळगली होती. पुस्तकाचे काम संपत आले तेव्हा त्यांनी पडद्याआड जायचे ठरवले होते की काय, हे न कळे, पण झाले तरी तसेच! त्यांच्या निधनाने मात्र एका अतिशय चिकित्सक वृत्तीच्या सुसंस्कृत पत्रकारास आपण मुकलो आहोत.
Copyright © 2025 | Marathisrushti