अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय़ लेखनाला सुरुवात केली.
सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली!
मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले. काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. मा.जयवंत दळवी नाटककार, कथा, कादंबरी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते पण 'ठणठणपाळ' या नावाने ललितमध्ये जे सदर लिहिले तसे यश आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. एकदा बॉम्बे बुक डेपोमध्ये स्वाक्षरी सप्ताहात ठणठणपाळ स्वाक्षरी देण्यासाठी येणार म्हणून वाचकांनी मोठी गर्दी केली. ठणठणपाळच्या मोठ्या कटआऊट शेजारी जयवंत दळवी बसले होते. उपस्थितांची मागणी अशी होती की आम्हाला ठणठणपाळ कोण आहे ते कळू द्या. शेवटी जयवंत दळवींना आपला मुखवटा दूर करावा लागला. असे भाग्य फार थोड्या लेखकांना मिळते.
जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणा-या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र! मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना – ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते. मा. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-प्रहार / विकिपीडिया
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा
उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)
September 16, 2017
अरुण म्हात्रे हे प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमातली आर्तता, विव्हलता, अगतिकता अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या कविता हे त्यांचं वैशिष्ट्य.
October 25, 2021
उस्ताद अमीर खाँ साहेबांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यांच्या सुगम संगीतातील लालित्य व शास्त्रीय संगीतातील बौद्धिक बाजू अप्पासाहेबांनी सांभाळली. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदनाला त्यांनी दिलेली नवी चाल विशेष उल्लेखनीय ठरली. त्यांनी निर्मिलेल्या मधुप्रिया रागातील काही रचनाही प्रसिद्ध झाल्या आहेत.
March 15, 2022
वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे झाला.
झेन फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित झालेले ख्यातकिर्त, मराठमोळे भारतीय वासुदेव गायतोंडे यांचा गोव्यातील एका खेडेगावात जन्म झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते.
म्हापसा शहराजवळील उस्कुई गावचे हे मूळ कुटुंब. गायतोंडे यांचे वडील बोल्टन प्रेसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे प्रेसशी संबंधित काम असूनही विज्ञानापासून कायद्यापर्यंत आणि ज्योतिषापासून आयुर्वेदापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास होता. घरातच ग्रंथसंग्रह असल्याने वासुदेवास वाचनाची गोडी लहानपणीच लागली. गायतोंडे कुटुंबातील कुणीतरी एक गावातील देवळाच्या भिंतींवर चित्रे काढायचा. ते बघून छोट्या वासुदेवास चित्र काढावेसे वाटू लागले. त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. वासुदेव गायतोंडे मुंबईत सुरुवातीला महापालिका शाळेत शिकले व नंतर गोखले हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांचे चित्रे काढणे चालूच होते. थोड्याच दिवसांत ते मुंबईतील कलाप्रदर्शनांना हजेरी लावू लागले. घरून ह्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळाले नाही.‘वाटेल त्या’ मुलांबरोबर मिसळायला त्यांना परवानगी नसे, त्यामुळे लहानपणापासून आपसूकच ते एकटे होत गेले.
त्यांनी १९४३ मध्ये एका खाजगी आर्ट स्कूलमध्ये नाव दाखल केले व त्या तयारीमुळे १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट तिसर्याख वर्षात प्रवेश मिळाला. जे.जे.च्या भव्य परिसराचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. जगन्नाथ अहिवासी हे त्यांना रचनाचित्र शिकवत. अडूरकर पेन्सिल ड्रॉइंग आणि भोंसुले मास्तर जलरंगचित्रण व व्यक्तिचित्र शिकवत. अहिवासी आणि भोंसुले मास्तरांचे गायतोंडे हे लाडके विद्यार्थी होते.
आर्ट स्कूलच्या काळातच गायतोंडे यांनी बौद्ध वाङ्मय, जपानी चित्रकला, मृद्पात्रे (पॉटरी), कविता यांचाही अभ्यास या काळात केला. निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, सोयरोबानाथ अंबिये, संतवाङ्मय, कला, साहित्य, तत्त्वज्ञान असे विविध विषय त्यांच्या वाचनात होते. त्या काळात जे.जे.च्या पटांगणात दरवर्षी जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ आपली प्रवचने देण्यास येत. ह्या प्रवचनांचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.
गायतोंडे यांना १९४८ मध्ये जे.जे.मधून पदविका मिळाली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे फेलोशिपही मिळाली. त्यांनी १९४९/५० या काळात जे.जे.मध्ये साहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी केलेली ही एकमेव नोकरी होती. काही मतभेद होऊन त्यांनी १९५० मध्ये ही नोकरी सोडली व पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्यास सुरुवात केली.
हुसेन, सूझा, रझा, आरा, गाडे आणि बाकरे ह्यांनी १९४८ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन केला. नंतर गायतोंडे त्यात सहभागी झाले. ह्या ग्रूपतर्फे १९४९ मध्ये भरवलेल्या समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर काही चित्रकारांनी ‘बॉम्बे ग्रूप’ स्थापन केला, त्यातही गायतोंडे होते. ह्या ग्रूपचीही काही प्रदर्शने झाली. ह्या साऱ्यांत होणाऱ्या कलाविषयक चर्चा, वादविवादांत गायतोंड्यांचा सक्रिय सहभाग असे आणि त्यांच्या मताला सहकलाकारांमध्ये मान होता.
मुंबईत १९५७/५८ मध्ये वॉर्डन रोडवर भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट सुरू झाली. संगीत, चित्रकला, नाट्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलासाधनेसाठी इथे उत्तम वातावरण होते आणि कलावंतांना तिथे अतिशय स्वस्तात स्टूडिओ मिळण्याची सोय होती. गायतोंडे यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. ह्या इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्याह कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.
१९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला.१९७२ मध्ये ते भारतात परतले आणि शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.
दिल्लीत १९७४ च्या आसपास त्यांची ओळख ममता सरन ह्या चित्रकर्तीशी झाली. त्यांची मैत्री आणि सोबत गायतोंडेंना अखेरपर्यंत लाभली. ममता यांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. ते १९९७ ते २००१ ह्या काळात ममताबरोबर गुडगाव येथे एकत्र राहिले. अॅरबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजेच अमूर्त कला त्यांनी आत्मसाद केली होती आणि त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. वर्ष २०१५ मध्ये क्रिस्टी या सुप्रसिद्ध संस्थेने मुंबईत वासुदेव गायतोंडे यांच्या ऑईल पेंटिंगचा लिलाव केला होता.मार्च २०२१ मध्ये चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांनी पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवले.१९६१ साली बनविलेले त्यांची एक निळ्या रंगाची ऑईल पेंटिंग्स ३९.९८ कोटी रुपये म्हणजेच ५५ लाख अमेरिकन डॉलर्सना विकली गेली.
हे कोणत्याही भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक ठरले आहे. वासुदेव गायतोंडे यांनी स्वत: चा विक्रम मोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये गायतोंडे यांनी १९७४ मध्ये तयार केलेली ऑईल पेंटिंग सुमारे ३६ कोटींमध्ये विकली गेली होती. जेव्हा जग कोरोना साथीच्या विरुद्ध लढा देत होते, तेव्हा ही किमया त्यांच्या चित्रानं साधली होती.
सतीश नाईक यांनी 'गायतोंडे' हा मराठीत ग्रंथ संपादित केला आहे. सतीश नाईक यांनी संपादित केलेल्या 'गायतोंडे' या ग्रंथाचे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. गायतोंडे यांच्यावरील एक इंग्लिश पुस्तक 'सोनाटा ऑफ सॉलिट्युड: वासुदेव संतू गायतोंडे या नावाने आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना दरवर्षी ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ राज्य शासन प्रदान करते. वासुदेव गायतोंडे यांचे १० ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सतीश नाईक/ नितीन दादरावाला/दीपक घारे
August 10, 2021
आज १५ सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो.
याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
जन्म.१५ सप्टेंबर १८६१
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची लागली.
गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात.या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा.स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली.
एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर.दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले.त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला.
म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मा. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले.
अभियंता दिना निमीत्त सर्व अभियंत्यांना अभिवादन व हार्दिक शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
September 15, 2016
डग इन्सोल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २० जुलै १९५० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यांनी शेवटचा कसोटी सामना ३० मे १९५७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर ते ते इंग्लंडच्या क्रिकेट सिलेक्टर्स कमिटीचे चेअरमन होते तसेच १ ऑक्टोबर २००६ मध्ये एक वर्षासाठी एम. सी .सी. चे प्रसिडेंटही होते. ते एम.सी.सी. कमिटीवर २० वर्षाहून अधिक काळ होते.
April 18, 2021
अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही. दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
मा.अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले. १९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च सन्मान होता. दिदीच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग २७ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गाऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित-जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले.
September 28, 2017
भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले. वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले. विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती. ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण. जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण. वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम. २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन. १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी. समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद. उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये. शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग. गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.
२४ जानेवारीला भीमसेन जोशी यांची माहिती समूहावर आलेली आहे, त्यामुळे आज माहिती न टाकता काही दिग्गज व्यक्तीनी सांगीतलेल्या भीमसेन जोशी यांच्या आठवणी...........
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगीतले होते.
श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?
त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून गाऊन घेतल्या. 'अभंगवाणी ' यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला. त्यांनी संगीत दिलेल्या, पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील - 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥'
आणि ,लताजींच्या आवाजातील - 'सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ '
ही अशी रचना अशी आहे कि त्यातील स्वरांची आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही.
गौतम राजाध्यक्ष यांनी भीमसेन जोशी यांची सांगितलेली आठवण
मी पुण्याला चाललो होतो. फर्स्ट क्लासच्या डब्यातही ब-यापैकी गर्दी होती. दिवसभराच्या कामाने मी थकलेला होता. डोळे मिटून पडून राहावं, असा विचार करत असतानाच त्याच्या कानावर गाण्याचे सूर पडले. वरच्या बर्थवर सगळ्यांकडे पाठ करून आडवे पडलेले एक गृहस्थ स्वत:शीच गुणगुणत होते. ते सूर इतके अद्वितीय होते की गौतम सांगायचा, ‘‘मी माझा सगळा थकवा विसरलो आणि इतकं महान कोण गातंय, हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.’’ लोणावळ्याला गाणी थांबली तसा मी डब्याच्या बाहेर लावलेली प्रवाशांची यादी पाहू लागलो. त्यावर नाव होतं- बी. जोशी. इतका वेळ आपण प्रत्यक्ष पंडीत भीमसेन जोशींचं गुणगुणणं ऐकत होतो, या विचाराने त्याला शहारा आला.तेव्हा माझी आणि पंडिंतजींची ओळख नव्हती. त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यानंतर २१ वर्ष जावी लागली. आणि ते माझ्यासाठी भीमअण्णा झाले. फोटो काढताना मी नम्रपणे त्यांना गायची विनंती केली आणि त्या दुपारी ‘‘आसवानी तोडी’’ गाऊन त्यांनी ती पूर्णही केली.
किशोरी अमोणकर यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
आम्ही एका कार्यक्रमासाठी अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला भयंकर थंडी, रात्रीच्या वेळी बाहेर मी एका साध्या खाटल्यावर झोपले होते. तेव्हा तिथून भीमसेन दादा चालला होता. त्यांचं माझ्याकडं लक्ष गेलं. तो म्हणाला, अरे रे, अशी थंडीत उघडयावर कशी झोपली आहे ही ? त्याने ताबडतोब त्याच्या अंगावरची शाल काढून माझ्या अंगावर घातली. तो भीमसेन दादा मी आजही विसरत नाही.
सुधीर गाडगीळ यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
"पंडित भीमसेन जोशी" म्हटले की, सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातले काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार. पण "ऑटोमोबाईल" म्हटले तर कसे वाटेल. गाडगीळ सांगतात, पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेज वाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत. एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले 'बसा'. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती. तासाभरात ते कोरेगावभिमाला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून 'हुश्श' केले. त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश.
पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?
भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.
पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.
भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.
पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?
पु.ल. : पुण्याला.
भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.
पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?
भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.
सचिन तेंडूलकर यांच्या आठवणीतील भीमसेन जोशी.
मी एकदा काही खाजगी कामाकरता मुंबई वरून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून मला म्हणाले,
"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"
त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'
लता मंगेशकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल आठवणी.
मला भारतरत्न मिळाल्यानंतर "या भारतरत्न' असे
नेहमी म्हणणारे... "अहो लताबाई, घरी या की एकदा. गरम थालिपीठ आणि त्यावर लोणी हा बेत करायला सांगतो' असा आग्रह करणारे पं. भीमसेन जोशी... ‘त्यांचे नाव झाले नव्हते त्या वेळेपासून मी त्यांना ओळखत होते. अनेकदा आम्ही भेटत असू. त्यांच्या घरी माझे जाणे-येणे असे. ते प्रत्येक भेटीत दिवसभर संगीत आणि संगीताविषयीच बोलत असच. चित्रपट, शास्त्रीय संगीत हे त्यांच्या चर्चेचे विषय असत. इतर विषयांचा समावेशच त्यांच्या बोलण्यात कधी नसे. त्यांना भरधाव गाडी चालविण्याची सवय होती. नव्हे तर दूरवरचा प्रवास करून थकल्यानंतरही ते दुसऱ्या दिवशी गायनास बसत होते, हे विशेष!
पं. संजीव अभ्यंकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दलची आठवण.
१९८१ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी मी पहिल्यांदा कुंदगोळ येथे भरलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायलो. पंडितजींच्या गुरू भगिनी गंगुबाई हनगल यांनी मला त्या महोत्सवासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्थातच माझा आवाज सुटलेला नव्हता. मी त्या ठिकाणी काळी पाचमध्ये गायलो. गाणं संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये पंडितजींनी पाठिवर कौतुकाची थाप मारली आणि मला आशीर्वाद दिले. त्यावेळी पंडितजींसोबत काढलेलं छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्याच वर्षी एका खासगी कार्यक्रमात मी पंडितजींबरोबर गायलो. पंडितजींनी माझं गाणं ऐकलं आणि ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा ज्ञानदेवांच्या कुळातील मुलगा आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळेच आई-वडिलांनी माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्द निश्चित केली.या क्षेत्रात मी स्थान पक्कं करू शकलो यामागे पंडितजींनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद आहे. १९९० च्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मोस्ट ब्राईट यंग आर्टिस्ट’ म्हणून माझा पंडितजींच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पंडितजींनी माझी आत्मियतेने चौकशी केली. त्यानंतर अनेकदा पंडितजींच्या भेटी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा साधेपणा मनाला भावत राहिला. इतका मोठा, जागतिक किर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनीमी लहान असताना आई-वडिलांना माझ्या बाबतीत दलेले सल्ले फार मोलाचे ठरले. एकदा ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा मुलगा छान गातोच. पण, त्याच्या तब्येतीकडेही लक्ष द्या.’ पंडितजींनी दिलेला हा सल्ला मला फार मोलाचा वाटला. केव्हाही भेटले तरी त्यांच्याशी गप्पांची मैफल सहज जमून यायची. अशा वेळी त्यांना वयाचं, ज्येष्ठतेचं बंधन आड यायचं नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 4, 2019
आज बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा वाढदिवस.
कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला.
कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. 'इंदिरा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली 'एक जे अच्छे कन्या' या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी 'मिस्टर एंड मिसेस अय्यर' या चित्रपटामुळे मिळाली. याचे दिग्दर्शन तिची आई अपर्ण सेन शर्मानेच केले होते. ती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिची आई अपर्णा सेन एक प्रसिध्द सिने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. 'मिस्टर एंड मिसेस अय्यर'साठी कोंकणाला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा २००५ साली 'पेज थ्री' चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वर्तुळात ओळख निर्माण झाली. यापूर्वी तिने अनेक भूमिका केल्या असल्या तरी ते चित्रपट कमर्शियली सक्सेस नव्हते. या दरम्यान तिने 'वेक अप सिड' चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे. २००६ साली 'ओंकारा 'आणि २००७ साली 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. सहाय्यक अभिनेत्रीचा कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोंकणा सेन ही अतिशय सिलेक्टेड चित्रपटातून आपल्याला दिसली आहे. प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी सरसकट चित्रपटातून काम करण्याचा मोह तिने टाळला. आशयघन चित्रपटातूनच ती दिसली आणि छोट्या भूमिकातूनही ती उठून दिसली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti