शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.
वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना "पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा" ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्या अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे.
दहावीच्या सुट्टीमध्ये महेशने अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले.
लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत.
कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला.
भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कट्यार काळजात घुसली"ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज 'सदाशिव'च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट (पुरुष) पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2018
दीनबंधू मित्र हे प्रसिद्ध बंगाली नाटककार व प्रहसनकार म्हणून विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या काही काव्यरचनाही लोकप्रिय आहे.
November 10, 2019
मौलाना ... हसरत मोहानी!
संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!
त्यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या.
कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती. हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली. १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची.
दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!
अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला. अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला.
मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.
हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक
पैगामे वफा बादे सहर लेके गयी है
(हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से
सिधारे आज तिलक
बलवंत तिलक, महाराज तिलक,
आझादी के सरताज तिलक
मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
मनमोहन श्याम से नैन लाग
निसदिन सुलग रही तन आग
मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है
व
खूब-रुयोंसे यारियाँ न गई
या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर
खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g
हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
=========================================
उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
=====================================
कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
=====================================
जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
======================================
तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
देखता था मै तुने भी इशारा कर दिया
इश्कने उसको सीखा दी शायरी
अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई
January 1, 2018
संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे.
September 2, 2021
विजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली.
October 18, 2021
‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते.
December 16, 2021
कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो.
June 30, 2017
आशा पोतदार यांना आत्माराम भेंडे यांच्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग त्यांना अनेकानेक नाटके मिळण्यासाठी झाला. पुढे त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या व्यावसायिक नाटकांतही कामे केली. नंतर १९७१ साली रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘विसर्जन’ या नाटकाचा अनुवाद असलेल्या ‘माते तुला काय हवंय’ या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकात नानासाहेब फाटक यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हे नाटक लोकप्रिय झाले आणि या नाटकातील त्यांची भूमिका पाहूनच दिग्दर्शक ना.बा. कामत यांनी ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) या चित्रपटाची नायिका म्हणून त्यांची निवड केली.
April 6, 2022
हेमलता हे नाव ऐकले की ७० व ८० च्या दशकातील गाणी आठवतात. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातल्याच एक हेमलता. त्याचे लग्नाआधीचे नाव विवाह लता भट होते. त्यांनी अभिनेता योगेश बाली यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी संगीताचे आणि गझल चे शिक्षण उस्ताद रईस खान यांच्याकडे घेतले होते. वय १४ व्या वर्षी हेमलता यांना खय्याम याच्या कडून गाण्याची संधी मिळाली.
चित्रपट, मैफिल, टेलिव्हिजन आणि संगीत त्याच्या गायन भिन्न प्रकारांमध्ये अल्बम गीते त्यांनी गायली. ३८ प्रादेशिक भाषांमध्ये सुमारे ५००० गाणी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गायली आहेत. मा.हेमलता यांना १९७७ ते १९८१ च्या दरम्यान पाच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता त्यांनी जवळपास सगळी गाणी फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावीत. त्यांची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली उदा.जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 16, 2017
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात एस डी बर्मन, नौशाद, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, रोशन, रवी, सी रामचंद्र,खय्याम आदि अनेक मातब्बर संगीतकार आपल्या एका पेक्षा एक सुंदर आणि श्रवणीय रचनांनी रसिकांना तृप्त करीत होते. अशा स्पर्धेच्या काळात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या संगीताचा ठसा उमटवणे सोपे नव्हते. अशा स्पर्धेच्या युगात मदन मोहन यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या अनोख्या अशा संगीत रचनांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एक प्रथितयश संगीतकार म्हणून अल्पावधीत त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं…..
June 22, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti