नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावर मनापासून प्रेम केल तिच्याकडे माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त न केल्याबद्दलची खंत मला आजही अस्वस्थ करते. कदाचित त्यावेळी मी जो विचार केला तो बरोबर नव्हता हे मला आज वाटते आहे कारण आज मी विचारवंत झाल्याचा मला साक्षात्कार झालेला आहे पण त्या वेळची माझी जगाकडे पाहणारी दृष्टी आणि माझी आजची जगाकडे पाहण्याची दृष्टी यांच्यात बरेच अंतर निर्माण झालेले आहे. हे खरं होत की माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिचे चालणे, बोलणे, हसणे, नावणे, गाणे, रूसणे आणि रडणे ही मला आवडत होते. पण सर्वात महत्वाचे म्ह्णजे तिच्या अचाट बुध्दीमत्तेवर माझे खरे प्रेम होते. तिला ही माझ्यातील कला गुणांबद्दल आदर होता. त्यावेळच्या माझ्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि माझ्या खाद्यावर मी स्वतःहून घेतलेल्या माझ्या कौटूंबिक जबादार्यांमुळे मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही. मला ती नाही म्ह्णण्याची भिती वाटत नव्ह्ती पण जर ती हो म्ह्णाली तर तिला माझ्यासाठी थांबायला मी कोणत्या तोंडाने सांगणार होतो ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्ह्ते कारण काही तरी जगावेगळे मिळविण्याच्या दिशेने केव्हांच माझा प्रवास सुरू झाला होता.
या प्रवासात मला अनेक जणी भेटल्या पण त्यापैकी एकही तिची बरोबरी करू शकत नव्हती. अजून काही वर्षे ती थांबली असती तर कदाचित मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलच असत. पण कदाचित ते नियतीलाच मान्य नसावे बहूदा. तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला मी तिच्या या निर्णयाच समर्थनच केल कारण तेंव्हा मला माझं ध्येय खुणावत होत. पण तिला गमावल्यावर थोड्याच वर्षात मी काय चूक केली हे माझ्या लक्षात येऊ लागले. आज मी मिळविलेल्या यशावर फक्त तिचा आणि तिचाच अधिकार आहे. माझे यश हे मला फक्त तिच्यासोबत साजरं करायला आवडलं असतं म्ह्णूनच मी माझ्या यशाचा आनंद आजही कोणासोबत कधीच साजरा करीत नाही. मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही याची मला सर्वात जास्त खंत जाणवते कारण मी जर तस केल असत तर कदाचित माझ्या जीवनाला एक वेगळच वळ्ण मिळाल असत आणि मी तिच्या ही जगण्यालाही एक अर्थ प्राप्त करून देऊ शकलो असतो. आज तिच्या वाट्याला आलेले एका सर्वसामान्य गृहीणीचे जीवन माझ्या मनात खर्या अर्थाने खंत निर्माण करून जाते. माझं प्रेम अबोल न ठेवता बोलून व्यक्त केल असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील ही एकमेव खंत ही दूर झाली असती.
-- निलेश बामणे
December 23, 2015
माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला..
June 15, 2022
“अभिनंदन सुरुची तुझं प्रेझेन्टेशन फारच मस्त झालंय. तू ज्या गोष्टी आज मांडल्यास त्या ऐकून आपले डायरेक्टर तर फारच खूष झाले. आपल्या कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी तू जमवलेली माहिती आणि संशोधन अतिशय कौतुकास्पद आहे. नवीन प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होणार आणि त्यात तुझा महत्त्वाचा वाटा असणार’.
August 12, 2023
शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.
February 4, 2026
यंदाच्या वर्षी पाऊस पाणी दरसालापेक्षा चांगलं आलेलं. सावित्री आणि तिचा नवरा सुखदेव दोघे आनंदाच्या भरात नेहमीपेक्षा जास्त जोमाने शेतात राबत होते. एक वेगळाच उत्साह तिच्या हालचालीत जाणवत होता कारण सावित्रीच्या घरी यंदा बाळकृष्णाचं आगमन झालेलं. तिच्या दीड च वर्षाच्या कान्होबाला घेऊन ती शेतात जायची. दिवसभर शेतात झाडाला झुला बांधून त्यात त्याला झोपवायची. त्याचवेळी घरची उरलेली कामं देखील तिच्या डोक्यात पिंगा घालत असायची. सुखदेव तर बिचारा भरून पावला होता.
February 28, 2024
बुलेट ट्रेनचे जपानी भाषेतले नाव शिनकानसेन. जपानला एकत्र बांधून ठेवणार्या प्रमुख धाग्यांमधील एक.. एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा प्रवास काही तासात घडवून आणणारी जगातली सर्वात वेगवान रेल्वे – शिनकानसेन.
“खरोखरच…जमिनीवर धावणारी विमाने आहेत!” असं म्हंटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही अशा डौलाने ह्या शिनकानसेन धावतात.
३०० किमी प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने! म्हणजे कल्पना करा किती स्पीड असेल (मुंबई-पुणे प्रवास ६० मिनिटांच्या आत पूर्ण करतील इतका).
May 23, 2021
आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते.
July 13, 2019
कोण कुणा पेक्षा श्रेष्ठ? कोण किती प्रमाणात श्रेष्ठ? कोण कमी पडतंय? कोण कमकुवत आहे? या प्रकारची तुलना जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी जग बघतो तेव्हा होऊ लागते.
October 21, 2021
नेहमी शेवटचा पेपर गणिताचा असतो. रैना, प्रिया, अर्णव आणि राधा या चौघांनी ठरवलं की यावेळी आपण गणिताचा सॉलीड अभ्यास करायचा आणि भरपूर मार्क मिळवायचे.
September 3, 2015
एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता.
या डोंगरावर वेगवेगळ्या फळांच्या फळबागा होत्या.
सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या.
भाज्यांचे तरारलेले मळे होते.
मलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती.
बागेत थुईथुई उडणारं कारंजं होतं.
या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते.
डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं.
या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते.
तुडुंब भरलेल्या विहिरी होत्या.
एक छोटसं पण काठोकाट भरलेलं तळं होतं. तळ्यात सुळसुळणारे मासे होते.
आणि फक्त पावसाळ्यातच कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा होता.
सगळ्या गावाचं या डोंगरावर फार प्रेम होतं.
गावात आलेले पाहुणे मुद्दामहून हा डोंगर पाहायला जायचे.
पाहुणे जंगलात फिरायचे.
रानमेवा खायचे. विहिरीत पोहायचे.
फळबागेत फळं खाऊन झाडांखाली निवांत झोपायचे.
झऱ्यातलं गोड गार पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे.
डोंगर उतरताना सोबत फळं फुलं घेऊन यायचे.
मुलं बागेत खेळायची.
कारंज्यात भिजायची.
मजा करायची.
सगळे म्हणत हा, तर अजबच डोंगर आहे!
पण. . .
हा डोंगर मात्र मनातून नाराजच होता. बेचैन होता.
डोंगराला वाटे :
छोटी छोटी झाडं मोठी झाली की त्यांचं जंगल होतं. त्यांच्या फळबागा होतात.
लहान लहान झरे मोठे झाले, एकत्र आले की त्यांची नदी होते.
पाणी ऊंच उडू लागलं तर त्याचं कारंजं होतं.
पायवाट मोठी झाली की त्याचा मोठा रस्ता होतो.
पण . . .
आपण कधीच मोठं होत नाही!
आपली कधीच वाढ होत नाही.
आपण सगळ्यांना मदत करायची. सगळ्यांना ऊर्जा पुरवायची.
सगळ्या-सगळ्यांना आनंदी करायचं.
पण तरीही . . .
आपली होते झीज आणि फक्त झीजच!
मी अशाने हळू हळू खचूनच जाईन.
. . . माझी कुणालाच काळजी नाही.
हे असं का? . . .
डोंगर आपल्याच विचारात गढून गेला.
डोंगरावरच्या झाडांना..
डोंगरावरच्या झऱ्यांना..
डोंगरावरच्या रस्त्यांना
डोंगराच्या मनातलं कळलं.
डोंगरावरची झाडं हसली.
झाडं सळसळली.
झाडं म्हणाली,
“अरे डोंगरा, असं काय करतोस? तुझ्यामुळे तर आम्ही आहोत.
आम्ही आमच्या मुळांनी तुला असं घट्ट धरुन ठेवलंय की तुझी होणारच नाही झीज!
आणि हे डोंगरा...
आम्हाला आहे रे तुझी काळजी.
कडक उन्हाळ्यात जेव्हा ऊन तापू लागतं, तेव्हा आम्ही आमची सारी पानं तुझ्यावर अंथरतो आणि आम्ही मात्र . . .
निष्पर्ण होऊन उन्हात तापत राहातो . . अतिशय आनंदाने!
तुझ्या पोटातलं थोडसं पाणी पितो आम्ही, पण तशीच सावली ही देतो तुला.”
हे ऐकून डोंगराचं मन भरुन आलं.
डोंगरावरचा झरा जरा खळाळला.
दगडाजवळ बुडबुडला.
झरा डोंगराला म्हणाला,
“अरे डोंगरा, तुझ्याच अंगाखांद्यावरुन आम्ही वाहतो, बागडतो.
आम्हाला आहेच की तुझी काळजी.
र डोंगरा...
आम्ही म्हणजे, तू पाणी पिऊन तृप्त झाल्यावर टाकलेल्या चुळा.
भर उन्हाळ्यात तुला गारवा वाटावा, म्हणून तर त्यावेळी आम्ही तुझ्या पोटात असतो.
आणि पावसाळ्यात, तुझ्यावरचा सगळा कचरा,गाळ वाहून नेतो.
तुला चांगलं स्वच्छं करतो.
आणि पुढच्या उन्हाळ्यासाठी...
तुझ्यावरच्या विहिरी भरुन ठेवतो. तळं भरुन ठेवतो.”
हे ऐकून डोंगराचे डोळे पाणावले.
डोंगरावरचा रस्ता उधळला.
डोंगराला बिलगला.
रस्ता डोंगराला म्हणाला,
अरे डोंगरा, असं काय करतोस?
अरे आम्ही,तुझ्यावरच चालतो, तुझ्यातुनच वळतो, त्यातुनच वाट काढतो . .
आणि वाटसरुंना वाट दाखवितो.
मग ते फळं खाऊन, पाणी पिऊन समाधानी होतात.
फुलांचा वास घेऊन ताजेतवाने होतात. तव्हा . . .
ते सारे तुझंच कौतुक करतात ना?
तुलाच आशीर्वाद देतात ना?
आम्हीच काय...
पण हा सारा गाव सुध्दा तुझ्यावरच प्रेम करतो ना,रे डोंगरा?
हे ऐकून डोंगराला थोडासाच आनंद झाला!
भल्यामोठ्या डोंगराचा इवलासा आनंद
डोंगरावरच्या झाडांना..
डोंगरावरच्या झऱ्यांना..
डोंगरावरच्या रस्त्यांना समजला.
कसं कुणास ठाऊक..पण
गावातल्या मुलांना पण कळला!
मुले नाचत नाचत डोंगरावर गेली.
बागेत खेळली. मातीत लोळली.
विहिरीत पोहोली.
आणि मग...
फुलबागेतली फुलं घेऊन मुलांनी तो अख्खा डोंगर फुलांनी सजवला!
हे पाहायला सारा गाव जमा झाला.
तेव्हाच डोंगराला मनापासून..
अगदी मनातल्या मातीपासून त्याला खूप आनंद झाला!
सगळे म्हणाले,अजबच आहे हा फूल डोंगर!
-- राजीव तांबे.
October 7, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti