मुंबईतील ट्रामगाड्या

आज महामार्ग, फ्लायओव्हर आणि रेल्वेच्या जाळ्याने एकसंघ बनलेल्या मुंबई शहराच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये तेव्हा पालखी, होड्या आणि घोडागाड्या यांचा समावेश असे. कालांतराने रस्तांचे जाळे विणले गेले. भारतातील पहिली रेल्वे मुंबईत सुरु झाली. वाहतुकीची साधने वाढली तशीच नव्या साधनांची गरजही वाढू लागली. १८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली.



१८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली. ही ट्राम लोखंडी रुळावरुन चालत असे. मोठया रस्त्यांवरच नव्हे तर गल्लीबोळांतून देखील फिरणारी ही गाडी गरीबांचे वाहन मानली जात होती. कितीही अंतर जायचे असेल तरीही अर्ध्या ते दोन आण्यांत प्रवाश्यांचे काम भागे.

ट्राम ओढण्यासाठी घोडे जुंपावे लागत. प्रथम एका घोड्याची व नंतर दोन घोड्यांच्या ट्राम अस्तित्वात आल्या. ट्राम गाडयांची वाहतूक सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत चालू असे. घोड्यांच्या ट्राम गाड्या १९०७ पर्यंत आपले काम बजावीत होत्या.

१९०७ च्या मे महिन्यात विजेच्या शक्तीने ट्रामगाड्या चालू करण्यात आल्या. घोड्यांऐवजी पेंटाग्राफ गाडीच्या छपरावर लावून तो वरील विजेच्या तारेस जोडलेला असे आणि त्याद्वारे गाडीला विजेचा पुरवठा होत असे. विजेच्या ट्रामगाड्यांसाठी ठराविक थांबे असत आणि तेथे तश्या पाट्या लावलेल्या असत. घोडयांच्या ट्रामगाडयांना अशी सोय नसल्याने प्रवासी हात दाखवून हवी तेथे ट्राम थांबवत. ट्रामगाड्या एकमजली आणि दुमजलीही असत. त्यांचा वेग मात्र फारच मर्यादित असे.

मुंबईच्या वेगात वाढ झाल्यानंतर कालांतराने मुंबईतील ही ट्रामवाहतूक बंद पडली. आता BEST ची बस वाहतूक आहे. मात्र ट्राममधून फिरण्यातला तो आनंद अजूनही विसरता येणारा नाही.

[a-link] [31520] (“मुंबईतील ट्राम गाडया व जुन्या जमान्यातील वाहने!” हा श्री जगदीश पटवर्धन यांचा लेख वाचा. ) [/a-link]

— निनाद अरविंद प्रधान

Author