थोरांच्या ऐतिहासिक वास्तूंतून प्रेरणा

पुणे शहरात खासगी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेजचा परिसर म्हणजे तर ज्ञानवंतांच्या वास्तव्याने पुनित झालेला परिसर होय. गोपाळ कृष्ण गोखले, रॅंग्लर परांजपे, रॅंग्लर महाजनी यांसारख्या अनेक ज्ञानी व व्यासंगी शिक्षणतज्ञांचे वास्तव्य व वावर या परिसरात झालेला आहे. येथील प्रत्येक इमारतीला वैभवशाली इतिहास व परंपरेची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आईवडिलांच्या अशिर्वादाने मला या फर्ग्युसन कॉलेजचा आवारात तब्बल ८ वर्षे बंगला नं.१ म्हणजे, प्राचार्य आगरकरांच्या बंगल्यात राहण्याचा योग आला. त्या वास्तूतील रम्य आठवणी एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे.



पुणे शहराची महती जगाच्या कानाकोपर्‍यांत विविध कारणांमुळे पसरलेली आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी, निवृत्तांच्या निवासांचे नंदनवन, पेशवेकालापासूनचे ऐतिहासिक महत्वाचे शहर, महाराष्ट्राचे व देशाचे भूषण ठरलेल्या शिक्षणसंस्थांचे मातृशहर, पर्यटकांचे आकर्षण, देशाच्या औद्योगिक नकाशावरील कारखानदारीत महत्वाचे योगदान असणारे शहर, इत्यादी इ.

पुणे शहरात खासगी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेजचा परिसर म्हणजे तर ज्ञानवंतांच्या वास्तव्याने पुनित झालेला परिसर होय. गोपाळ कृष्ण गोखले, रॅंग्लर परांजपे, रॅंग्लर महाजनी यांसारख्या अनेक ज्ञानी व व्यासंगी शिक्षणतज्ञांचे वास्तव्य व वावर या परिसरात झालेला आहे. येथील प्रत्येक इमारतीला वैभवशाली इतिहास व परंपरेची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आईवडिलांच्या अशिर्वादाने मला या फर्ग्युसन कॉलेजचा आवारात तब्बल ८ वर्षे बंगला नं.१ म्हणजे, प्राचार्य आगरकरांच्या बंगल्यात राहण्याचा योग आला. त्या वास्तूतील रम्य आठवणी एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे.

प्राचार्य आगरकरांचे हे घर म्हणजे १८९० च्या सुमारास बांधलेली, लकडी पुलाच्या पलीकडच्या गवताच्या गंजीच्या माळरानावरील झोपडी होय. भर डेक्कन जिमखान्यावरील अत्यंत गर्दीच्या परिसरात असूनही अचंबा वाटावा असा फर्ग्युसनमधील हा शांत व अभ्यासाला पोषक परिसर पाहिला की, आपला दृष्टिकोनच बदलतो. दगडी बांधकामाचा हा कौलारू बंगला ब्रिटिश काळातील वास्तुशास्त्राची साक्ष देतो. अतिशय प्रशस्त आवार, परिसरातील हिरवी गर्द झाडी, दारातील आकाशापर्यंत भिडलेली बुचाची झाडे, डौलदार आम्रवृक्ष, रॅंग्लर परांजपे यांनी लावलेला फणस, याशिवाय चिंच, आवळा, पांगारा इ. वृक्ष तसेच घरात प्रवेश केल्यावर पुढची व मागची ओवरी, बैठकीची खोली, दोन्ही बाजूंना ऐसपैस खोल्या, मागे माजघर, धान्य साठवणीची खोली, अशी रचना म्हणजे खास खानदानी घर होय. घरातील आढ्यापर्यंतची भव्य उंची, सर्व खोल्यांचे ऐसपैस आकारमान, काचेच्या कौलामुळे येणारे प्रकाशाचे झरोके, जुन्या पद्धतीच्या जाड-जाड कड्या व कोयंडे, मातीच्या मजबूत भिंती, खिडक्यांची फूट-दीड फूट खोली, दारांवरील गोलाकार नक्षीच्या कमानी इ. गोष्टी जुन्या वास्तुशास्त्राचे पुरावे देतात. गोपाळराव आगरकरांच्या घाराच्या म्हणून काही ऐतिहासिक संदर्भाची जपणूकही अद्याप येथे केलेली आहे. स्वयंपाकघरातील दुभत्याचे कपाट, चुलीवरील धुराडे, दगडी उखळाची जागा, इ. गोष्टी वर्षानुवर्षे टिकवून ठेवलेल्या आहेत. “सुधारक” वर्तमान पत्राचे येथुनच केलेले लिखाण, टिळक-आगरकरांची झालेली शेवटची भेट, मृत्यूनंतर आपला भार इतरांवर पडू नये म्हणून आगरकारांनी जवळ ठेवलेली पैशाची पुरचुंडी इ. संदर्भ ऐकल्यावर प्रत्येकाला शहारून येईल.

या ऐतिहासिक परंपरेमध्ये भर घातलेली आहे ती घराबाहेरच्या अंगणातील फरसबंद चौकोनी चबुतर्‍यांनी ! प्राचार्य डॉ.बाचल येथे राहत असताना सकाळी उठून येथेच चित्रकलेचा सराव करायचे. त्यांच्या कलेचा नमुना दिवाणखान्यातील भिंतीवर त्यांनी चितारलेल्या ग्रामीण दृष्यातून आजही पहायला मिळतो.
ही ऐतिहासिक व प्रशांत वास्तू पहायला गावोगावचे लोक न येतील तरच नवल ! आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती ग्यानी झेलसिंगजी यांच्यापासून इतिहासाचे अनेक अभ्यासक, संशोधक, वास्तुशास्त्राचे विद्यार्थी, पर्यटक, फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी यांच्याशिवाय जनसामान्यही भेट देण्यासाठी येत असतात. आज या वास्तूत काळानुरूप बदल झालेले आहेत, परंतु त्यातील ऐतिहासिक संदर्भाच्या काही खुणा अद्यापही ताज्या आहेत. त्यामुळे सर्वांच्या माहितीसाठी या वास्तुसंदर्भातील आठवणी समग्रपणे वाचायला मिळाव्यात म्हणून प्राचार्य आगरकरांच्या शतकस्मृती वर्षाच्या निमित्ताने १९९२ मध्ये एका फळ्यावर काही मजकूर एकत्रितपणे रंगवून ठेवलेला आहे. अनेक पाहुणे हा नमजकूर तर वाचतातच परंतु मला विशेष वाटले ते एका अंध पर्यटक अभ्यासकांचे ! त्यांनी “हे घर मला पहायचे आहे” असे सांगितल्यावर मी हादरलोच, परंतु मोठ्या कुतूहलाने त्यांनी संपूर्ण घर फिरुन येथील संदर्भाची माहिती घेतली त्यावेळी मी थक्कच झालो. मध्यंतरी टिळक – आगरकरांवरील “मर्मबंध” या मालिकेच्या निमित्ताने त्यामधील अनेक कलाकार येथे आले होते व त्यामध्ये या वास्तूशी संबसधित काही भाग येथेच चित्रित केला गेला आहे.
या वास्तूत आजवर अनेक कुटुंबांचे वास्तव्य झालेले आहे. त्या सर्वांचीच या वास्तुबद्दलची भावना उदात्त असणार हे उघड आहे. ह्या वास्तूत एक प्रकारची प्रसन्नता व उमद्या मनोवृत्तीचा प्रत्यय येतो. ऐसपैस आकाराच्या व उंचीच्या खोल्यांमुळे आमचे पूर्वज किती मोठ्या मनाचे, प्रगल्भ विचारांचे होते ह्याची साक्ष पटते. येथे भेट देण्यास येणार्‍या प्रत्येकालाच निश्चित अशी प्रेरणा मिळते तर आम्हां निवासी कुटुंबीयांना त्याचा केवढा मोठा प्रत्यय आला असेल, याची कल्पनाच केलेली बरी. व्यक्तिश: मला तर लेखनासाठी खुप काही प्रेरणा या वास्तूतील वातावरणातून मिळते. माझ्या व्यक्तिगत आयुष्याची जडणघडण करण्यात, चांगले काम करण्याची ऊर्मी जागवण्यात येथील वास्तुपुरुषाचे आधिष्ठान आहे असे मी मानतो. प्राचार्य डॉ. वैद्यसरांसारख्या अनुभवी व दूरदर्शी गुरूंनी मला हा बंगला निवासासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी शिफारस केली व इतर सहकार्‍यांनी ती मानली, म्हणूनच मला ही संधी मिळाली. आजवर गेल्या ८ वर्षांत विविध प्रकारचे लेखन मला करता आले यामागे काही तरी वास्तुसंकेत निश्चित आहे असे मी मानतो. म्हणतात ना – “वास्तू म्हणे तथास्तू.”

येथील वास्तव्यात पहाटेपासून रात्रीपर्यंतचे एक वेगळेच निसर्गचक्र मी अनुभवलेले आहे. पहाटेच्या वातावरणातील पक्ष्यांचे कूजन, अधूनमधून शेजारच्या लेडिज हॉस्टेलमधून ऐकू येणारे नाट्यमधुर गायनाचे रियाझाचे स्वर, सतारीचे आलाप, इ. मुळे वातावरण उल्हसित होते. दुपारच्या उन्हात हिरव्यागर्द झाडांच्या छायेमुळे तर सायंकाळी व रात्रीच्या शांत गंभीर वातावरणामुळे अभ्यासला, चिंतनाला पोषक वातावरण आपोआपच लाभते. दारातील बुचाची झाडे ताठ मानेने जगायला व आयुष्यात प्रचंड उंची गाठायला सुचवतात, तर बांबूच्या वनातील वाजणारे कोवळे बांबू गुढीपाडव्याच्या स्वागताला आम्ही सज्ज आहोत, हे सुचवितात. पावसाळ्यातील गर्द हिरवी झाडी व बुचाच्या व गुलमोहराच्या फुलांचा पडणारा गालिचा तर, पानगळीच्या मोसमात भिरभिरत जमिनीवर पडून आपली कारकीर्द गतिमानतेत संपविणारी पाने बरेच काही शिकवून जातात. परिसरातल्या आंबा, फणस, चिंच आणि आवळ्यांची मेजवानी आमच्याकडे येणार्‍या कित्येक पाहुण्यांनी अनुभवलेली आहे. या सार्‍या रम्य वातावरणात माझी पी.एच.डी. पूर्ण न होती तरच आश्चर्य ! आता आम्ही कुटुंबीय ही वास्तू सोडून बी.एम.सी.सी.च्या परिसरात रहायला जाणार. ही वस्तुस्थिती काही वेळा अस्वस्थ करते, परंतु आमचे येथील वास्तव्य खूप आनंदाचे व प्रेरणादायी झाले, हे निश्चित. १९ व्या शतकात बांधलेल्या या वास्तूत २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकात राहण्याचा तर, यानंतर २० व्या शतकात बांधलेल्या वास्तूमध्ये २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून राहण्याचा योग आहे, याचे आम्हांला मनापासून समाधान वाटते.

— डॉ. संजय कंदलगावकर

Author