(पंचतंत्रातील कथा)
मध्य भारतातल्या एका प्रचंड मोठ्या जंगलात एक दांडगा सिंह राहात होता. त्याचं नाव होतं भासुरक. त्याला स्वतःच्या शक्तीची घमंड होती. नि ह्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो खुशाल दुबळ्या जनावरांना ठार मारीत असे. एकदा काय झालं, त्या जंगलातली सगळी जनावरं एकत्र जमली आणि
सगळी सिंहाकडे गेली. सर्वानी सिंहाला प्रणाम केला. आणि त्यांचा नेता म्हणाला, “महाराज, उगीच गंमत म्हणून तुम्ही आम्हाला ठार मारता. तुम्ही ते कृपया थांबवा अशी विनंती करायला आम्ही आलो आहोत. तुम्हाला आमच्यापैकी एकच जनावर भुकेला पुरं असतं. मग तुम्ही इतक्या प्राण्यांची
हत्या का करता? तुम्ही आमचे राजे आहात. तुम्ही विचारानं वागायला हवं, तुम्हाला जेवढं पाहिजे असेल आणि आम्ही जेवढं देऊ शकू, तेवढेच तुम्ही आमच्याकडून घेणं योग्य. आपल्या प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं मुख्य कर्तव्य
असतं. राजा दुष्ट असला तर त्याचाच शेवटी नाश होतो. तरी आमची, तुमच्या नग्न प्रजेची ही विनंती आपण मान्य करा आणि तुमच्या जेवणासाठी रोज एका जनावराचा स्वीकार करा. दररोज दुपारी एक जनावर तुमच्या गुहेत हजर होईल
अशी व्यवस्था आम्ही करू.” भासुरकानं थोडा वेळ विचार केला. नि मग तो बोलला, “तुमचं सांगणं योग्य आहे. दररोज एक जनावर स्वीकारायला मी तयार आहे. मात्र जर एखाद्या
दिवशी ठरल्यावेळी जनावर हजर झालं नाही, तर मी तुम्हा सर्वांना ठार मारीन हे लक्षात ठेवा.’
त्या दिवसापासून जनावरं जंगलात मोकळेपणानं हिंडू लागली. दर दिवशी सकाळी नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातली एक उचलली जाई. म्हणजे असं की जर उचललेल्या चिठ्ठीत हरिण हे नाव आलं तर सगळी हरिणं एकत्र जमत.