आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सात
रात्री काम करणे कधीपासून सुरू झाले ?
रात्रीचा दिवस कोणी केला ?
रात्रीची कामे कशी करावी हे कोणी शिकवले ?
रात्री काम करण्यातले अडथळे कोणी दूर केले ?
रात की नींद किसने चुरा ली ?
विज्ञानाने.
कसं काय ?
विज्ञानातील नवनवीन शोधांमधील एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे विद्युतीकरण !
या विद्युतीकरणामुळे अनेक कामे चुटकीसरशी होऊ लागली. जिथे शंभर माणसे कामाला लागायची तिथे दहा पंधरा माणसांमधे काम पूर्ण होऊ लागलं. वेळ वाचला. कामामधे सुबकता आली. कमी पैशात जास्ती काम होऊ लागले. आता हे चांगलं की वाईट ?
नक्कीच चांगलं.
पण,
या यंत्रांनी किती जणांचा रोजगार कमी केला ? किती जण नोकरीतून कमी झाले ? किती जणांना व्ही आर एस घ्यावी लागली ?…….
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आरोग्य आम्ही मिळवले की घालवले ? आमची आदर्श जीवनचर्या या विज्ञानाने मुळातूनच बदलवून टाकली का ?
विज्ञानाने प्रगती नक्कीच केली, पण त्याने खरे आरोग्य मिळवले की घालवले याचा परत एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मी विज्ञान विरोधी अजिबात नाही. पण जी समीकरणे मांडत जातोय, त्यात जे समोर येतंय ते फक्त स्पष्टपणे मांडतोय.
विज्ञानाने जी देणगी दिली, त्यात मोठी देणगी विद्युतीकरण, त्यातूनच नंतर दिवाणखान्यात जन्माला आलेले दूरदर्शन, केबल, डीश, डीव्हीडी. इ.इ. स्वयंपाकघरात घुसलेल्या विज्ञानाने तर पार धुमाकूळच घातला. मिक्सर, ब्लेंडर, फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, गॅस शेगडी, इ.इ.
बाथरूममधे जागा अडवून बसलेले वाॅशिंग मशीन, गीझर, इ.इ.
बेडरूम मधील एसी, कुलर, इस्त्री, पंखे, इ.इ.
ही सर्व उपकरणे विज्ञानाची पिल्ले नव्हेत काय ? यांनी आपल्याला आरोग्य दिले की, आरोग्य हिरावून घेतले ?
या प्रत्येक यंत्राचा स्वतंत्र विचार करणे आणि लिहिणे शक्य होणार नाही, पण एक नक्कीच पारंपारिक पद्धतीने, केलेली कोणतीही गोष्ट, ही यंत्रांचा वापर करण्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम प्रतीची असते. असे लक्षात येते. रवीने केलेले ताक, ब्लेंडर किंवा मिक्सरमधून केलेले ताक, लोखंडी तव्यावर केलेली भाकरी आणि ओव्हन मधे किंवा रोटी मेकर मधली भाकरी, पाटा वरवंटा वापरून केलेले वाटप आणि मिक्सरमध्ये केलेले वाटप ही अगदी मोजकी उदाहरणे आहेत.
कामे करत असताना होणारा व्यायाम कमी होत गेला म्हणूनच जिमचा आणि योगा वर्गांचा उदय झाला. दिवसाची कामे दिवसाच होत होती. विज्ञानामुळे दिवसाची कामे रात्रीच्या वेळी करणे देखील सहज शक्य झाले.
विज्ञानाने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे, पण या विज्ञानाला घरात, विशेषतः स्वयंपाकघरात किती घुसु द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
उपभोगवादी संस्कृतीने आरोग्य हिरावूनच घेतले. विज्ञानाला माणसाने गुलाम बनवण्या ऐवजी, विज्ञानाने माणसालाच गुलाम बनवले. मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या प्रत्येक प्रयोगातून आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास नुकसान होते आहे, हे अंतिम सत्य आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.05.2017