निरंजन – भाग ९ – गुरु भक्ती

निरंजन – भाग ९ – गुरु भक्ती

हरि ॐ ब्रह्मांनी जेव्हा ब्रह्मांड निर्माण केले तेव्हा त्या ब्रह्मांडाला संस्कुतीची रित देण्यासाठी आणि संस्कारांचा लेप देण्यासाठी स्वतःचे अस्तित्व साकारले ते अस्तित्व म्हणजे गुरु…



हरि ॐ ब्रह्मांनी जेव्हा ब्रह्मांड निर्माण केले तेव्हा त्या ब्रह्मांडाला संस्कुतीची रित देण्यासाठी आणि संस्कारांचा लेप देण्यासाठी स्वतःचे अस्तित्व साकारले ते अस्तित्व म्हणजे गुरु…

ध्यानाच्या आरशात ज्ञानाचे प्रतिबिंब दर्शवणारे अस्तित्व म्हणजे गुरु….

हरवलेल्या मार्गामध्ये ध्येय प्रबळ करणारी दिशा दर्शवणारे अस्तित्व म्हणजे गुरु…

गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. मेंदुसाठी लाभलेले गुरु हे आपल्याला आपल्या ठराविक जन्मापुरतेच असतात पण मनासाठी लाभलेले गुरु हे परमेश्वरासारखे असतात. गुरु हे तीन स्वरुपात आहेत. एक म्हणजे देवांचे गुरु, सोमबॄहस्पती, दुसरे म्हणजे ॠषींचे गुरु, ज्यांनी माता अनुसयेच्या उदरी दत्त रुपाने जन्म घेतला आणि तिसरे म्हणजे मानवी गुरु, ते म्हणजे ॠषीमुनी व्यास…. ज्यांचा जन्म दिवस म्हणुन आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. मानवीगुरुलीलेमध्ये सुद्धा परमेश्वराची लीला ही असतेच. जीवनामध्ये मनाला गुरु लाभण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे आणि तितकेच महत्त्वाचे आहे ते म्हणजे ध्यान देणारे गुरु.

पाहुया कथा गुरुलीलेची…. कथा देवांच्या गुरुंची….. कथा गुरु सोमबॄहस्पतींची……

परमेश्वराने देवांसाठी गुरु सोमबॄहस्पती कसे घडवले. आपल्या या ब्रह्मरचनेमध्ये हरि ॐ ब्रह्म या त्रिदेवांपासुनच तेहेतीस कोटी देव- देव्या आहेत. एक दिवस देवतांच्या या सभेमध्ये गुरुंचा विषय चर्चेला येतो. आणि आपल्या देवांचेही गुरु असलेच पाहिजे असा विषय जास्तच ठळक होत जातो. इतक्यातच देव हरि खुप सुंदर हास्य देतात आणि म्हणतात की “गुरु असणं हे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं”. यावर ब्रह्मदेव म्हणतात कि “गुरुलीला प्रचलीत आणणं हे खुप महत्वाचे आहे. कारण गुरुंपासुनच ज्ञानग्रहण करता येते, जीवन जगण्याची सुंदर अशी रित शिकता येते, योग्य-अयोग्य यामधले अंतर कळते. म्हणुन गुरुलीला प्रचलीत आणणं हे खुपच महत्त्वाचे आहे. शिष्याने त्या मार्गावर चालणे – न चालणे ही जबाबदारी देखील माझीच राहील. असे आश्वासन ब्रह्मदेव सभेमध्ये मांडतात. आणि सॄष्टिच्या या निर्मीतीकारांकडुनच सप्तर्षींची रचना घडते. या सप्तॠषींकडुनच गुरंची रचना निर्माण होते. या सप्तॠषींमधले एक ॠषी …..ॠषी अंगिरा…… तेजस्वी रुप… रेखीव कांती……आणि ध्यानशक्तीने निर्माण झालेला शारिरीक बांधा, साक्षात ब्रह्मादेवांच्या, ज्ञानदेवांच्या मानसपुजेतुन ॠषी अंगिरा यांची निर्मीती होते. म्हणुनच ते ब्रह्मदेवांचे मानसपुत्र म्हणुन ओळखले जातात.

ॠषी अंगिरा यांचा जन्म हा जगाला ज्ञान देण्याच्या कार्यासाठी असतो. कारण ध्यानाशिवाय ज्ञान नाही. भुतलावरच्या सर्वांना आपण ध्यान – ज्ञान दयायचे हाच त्यांनी आपल्या संपुर्ण जीवनासाठी मार्ग निवडला होता. संसार रचण्याचा त्यांचा जराही विचार मनात नव्हता. पण आपले पिता, आपले गुरु ब्रह्मदेव यांच्या विधीलिखाणाप्रमाणे त्यांचा संसार हा रचणे हे महत्वाचेच होते. पण ॠषी अंगिरा यांचा हा विचार नव्हता कारण एक्दा का संसार थाटला कि त्या संसारतच त्यांना रमावे लागेल हे त्यांना समजत होते आणि रमल्यानंतर मी जगाला ध्यान देऊ शकणार नाही अशीही त्यांची समज होती. पण साक्षात ब्रह्मदेवांनी त्यांना दॄष्टांत दिला की ध्यान आणि ज्ञान देण्याची क्रिया ही संसार करुनदेखील साधता येते.

साक्षात ब्रह्मदेवांनी दिलेल्या या दॄष्टांता प्रमाणे ॠषी अंगिरा यांना विधीलिखाण मान्य होते. त्यांची होणारी पत्नी ही एका राजाची कन्या राजकुमारी स्मॄती ही असते. पण संसार सुरु करण्यापुर्वी आपल्या होणार्‍या अर्धांगिणीला आधीच ते आपल्या विचांराची कल्पना देतात. ते तिच्याशी विवाहाआधीच संवाद साधतात, ते म्हणतात की “ध्यानापासुन दुर राहुन मी फक्त संसारामध्ये कधीच रमु शकत नाही, ध्यान आणि त्यातुन मिळालेले ज्ञान हे या विश्वाला देणे हे माझे कर्तव्य आहे आणि यासाठीच माझा जन्म आहे. राजकन्या स्मॄतीला ॠशी अंगिरा यांची कल्पना मान्य होते. त्यांचे विचार त्यांना मनोमन मान्य होतात. आणि ॠषी अंगिरासोबत त्यांचा विवाह पार पडतो. दोघांचाही संसार सुखाने सुरु होतो. आपल्या विवाहापुर्वी दिलेल्या वचनाप्रमाणे राणी स्मॄती ॠषीपत्नी प्रमाणेच आपले जीवन साधनेसाठी अर्पण करतात. ध्यान ज्ञान देण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची ते परिपुर्ण काळजी घेतात. काही कालावधीतच त्यांना एक बाळ होते. ऋशी अंगिरा आणि देवी स्मॄती त्या बालकाचे “जीव” असे नामकरण करतात.

साक्षात त्यांचे आजोबा ब्रह्मदेव, पिता ध्यान-ज्ञान मार्गात आणि दुसरे म्हणजे आईच्या उदरी असताना देखील ज्ञान ग्रहण केल्यामुळे अफाट ज्ञान या बालकाला आत्मसात झालेले असते. हळुहळु वर्षांमागुन वर्षे उलटतात. बाळ लहानाचे मोठे होते. ॠषींच्या ध्यान आणि ज्ञान देण्याच्या कार्यामध्ये सुध्दा बाळ जीव परिपुर्ण एकाग्रतेने ॠषींच्या सहवासातच असते. पुढे काही कालावधीतच पिता ॠषी अंगिरा आणि बाळ जीव दोघेही जगाला ज्ञान देण्याचे कार्य सुर करतात. एके दिवशी अचानक पुत्र जीव च्या मनात महादेवांची पिंडी स्थापन करण्याची इच्छा प्रगट होते. बाळ जीव आपली इच्छा आपले वडिल ॠषी अंगिरा यांच्यापुढे ठेवते. ॠषी अंगिरा आनंदाने आपल्या मुलाला यामध्ये मदत करतात. आता बाळ जीव नेहमी महादेवांचे मनोभावे पुजन करी. दररोज नित्यनियमाने पहाटे स्नान करुन प्रथम त्यांचे पुजन करी मग त्यांच्या या पिंडिवर ध्यान लावे. नेहमी ध्यान करता करता एके दिवशी बाळ जीव च्या मनात एक आशा निर्माण होते. साक्षात महादेवांना पाहण्याची त्याची इच्छा निर्माण होते. बाळ जीव आपली इच्छा आपल्या वडिलांजवळ मांडतो. ॠषी अंगिरा बाळ जीव चे संपुर्ण ऐकतात आणि म्हणतात कि “महादेवांना पाहण्याची इच्छा म्हणजे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे बाळ, अघोरी रुप पाहण्यासाठी तुला ध्यानही अघोरीच करावे लागेल, तुला महाध्यान करावे लागेल”, हे ऐकुन बाळ जीव खुपच आनंदित होतो आणि तो महादेवांना प्रसन्न करण्याच्या आणि त्यांना पाहण्याच्या विचाराने आपले ध्यान सुरु करतो. बाळ जीवचे निस्वार्थ ध्यान सुरु होते. वेळ सरत राहते आणि इथे जीव चे ध्यान सुरुच असते, खुप मोठा कालवधी ओसरतो. पण महादेव मात्र दर्शन देण्यासाठी वेळही तितकाच घेतात. परंतु बाळ जीव च्या मनात थोडाही वाईट विचार त्याबद्दल येत नाही. त्याचे अखंड-असीमीत ध्यान सुरुच राहते. इतके सुंदर ध्यान पाहुन शेवटी महादेव फारच प्रसन्न होतात. ते बाळ जीवच्या समोर येऊन उभे राहतात आणि त्याला आपल्या आवाजाने जागॄत करतात. जीव आपले डोळे उघडतो आणि साक्षात महादेवांना पाहुन मनोमन सुखावतो. एकटक त्याची नजर महादेवांवर स्थिरावते. काही क्षणानंतर महादेव म्हणतात, “बाळ जीव, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला जे हवे ते वरदान तु माग. तुझी इच्छा पुर्ण होईल.” हे ऐकुन जीव त्यावर म्हणतो कि, “तुम्हाला पाहणं हिच माझी इच्छा होती. ती पुर्ण झाली, मला बाकी काहीही नको”. यावर महादेव खुप प्रसन्न होतात आणि म्हणतात, “बाळ जीव, तुझ्या अखंड, निस्वार्थ ध्यानावर मी खुपच प्रसन्न आहे. आजपासुन तुझे स्थान या ब्रह्माडांत अखंड राहील. तु देवीदेवतांचे गुरू बॄहस्पती म्हणुन ओळखला जाशील. तु माझे ध्यान करुन मला प्रसन्न केले आहेस, म्हणुनच तुला सोमबॄहस्पती या नावाने संबोधले जाईल…..तथास्तु”.

अश्या प्रकारे सप्तर्षींकडुन गुरुलीला सुरु झाली. जी आजही अखंड अस्तित्वात आहे. जीवनात ध्यानगुरु असणेच फार महत्त्वाचे आहे. ध्यानगुरुच आपल्याला योग्य तो मार्ग दर्शवतात.

— स्वाती पवार

Author