प्रदीर्घ प्रवासानंतर आणि दमवणाऱ्या कष्टांनी थकलेले आपण
उभे राहतो खोलीच्या मध्यावर किंवा घर- अर्धा एकर , मैलभर, बेट ,देश
तेथे कसे पोहोचलो हे ठाऊक असते
तरीही म्हणतो- ” हे माझं आहे ”
हा तोच क्षण-
जेव्हा आसपासची झाडे
काढून घेतात त्यांच्या दयाळू फांद्या
पक्षी माघारी नेतात त्यांचे मधुर गुंजन
विदीर्ण सुळके ध्वस्त होतात
झुळूक हवेची ओहोटीला लागते
आणि आपण कासावीस होतो
खरं तर ते सगळे कुजबुजत असतात-
तुझे काही नाही ,नव्हते
तू फक्त प्रवासी- वारंवार येणारा
पहाड चढून झेंडा रोवणारा, आरोळी ठोकणारा
आम्ही तुझे नव्हतोच
तुला आम्ही सापडलो नाही
प्रत्यक्षात हे सगळं अगदी उलटं आहे !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे