(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके

    प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके (Shridhar Phadke) यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला.

    मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी गाण्याशी त्यांचा संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून फिजिक्स व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेतच. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व 'देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी....' या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मा.श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर तो अभंग गायला. 'तो आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण' असं श्रीधर फडके म्हणतात.

    लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं. सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधी तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे. ‘मन मनास उमगत नाही ’ ही ग्रेस यांची कविता. त्यांनी पहिल्या चार ओळींना चाल लावली. पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढ दामटलं नाही तर त्यांच्या आवडत्या कवीपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि 'तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा' असं सुचवलं. मा.सुधीर मोघे सिध्दहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या.

    स्वप्नातील पदर धुक्याचा
    हातास कसा लागावा
    आधार कसा शोधावा
    मन मनास उमगत नाही.

    श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला. कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया मा.श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडके यांना फार भावल्या त्या अशा...

    कुठे जातात भेटून
    कशा होतात ओळखी
    आणि आपली माणसे
    कशी होतात पारखी

    या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार मोघें यांनी पुढील ओळी रचल्या....

    कुण्या देशाचे पाखरू
    माझ्या अंगणात आले
    त्याचे पंख परदेशी
    परी ओळखीचे डोळे

    श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी),ऋतू हिरवा(चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे(मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी(पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस).

    एखादं गाणं आवडलं की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात.‘ मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद ’ या एकनाथांच्या अभंगाला चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, दिवसभरात काही सुचलं नाही. पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये , सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत राहिले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “ अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफण आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोटया तुकड्या तुकड्यांत गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”

    श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक , ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना प्लॅटिनम डिस्क प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्य संगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. त्यांना ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटासाठी ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी, ‘लेकरू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. श्रीधर फडके यांनी आत्ता पर्यंत अठरा मराठी चित्रपटांचे व एका हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन, ३ मराठी व ११ गुजराथी नाटकांचे व पाच दूरदर्शन मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. अशोक जैन / थिंक महाराष्ट्र

    श्रीधर फडके यांनी गायलेली, संगीत दिलेली काही गाणी

    https://www.youtube.com/watch?v=GKOEi9p_VaM
    https://www.youtube.com/watch?v=BMNQF1OfHWQ
    https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
    https://www.youtube.com/watch?v=7T8PqtOGsLI&t=1096s
    https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE&t=287s

  • दिनकर पाटील

    मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.

  • किशोर लिंबाणी

    किशोर लिंबाणी अनेक वर्षांपासून ठाणे शहर विभागाचे युवक मंडळ उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. सामाजिक कार्यासोबतच धार्मिक कार्यातही ते सहभाग नोंदवत आहेत.

    हरिद्वारच्या कच्छी लालाराम आश्रमात नऊ महिने साधुसंतांच्या सेवेसाठी ते भेट देत असतात. समाजातील गरीबांवर मोफत औषधोपचार करणे हे या आश्रमाचे प्रमुख कार्य असून, या कार्याला पुर्णत्वास नेण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत तसंच महिलांना सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा कटाक्ष आहे.

    क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक वह्या वाटप, प्रभागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, वृक्षलागवड त्याचप्रमाणे ठाणे निर्धार अभियानात उत्साही सहभाग, तसंच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वेटलिफ्टींग चा खेळ सुरू करावा यासाठी पत्रव्यवहार आणि प्रयत्न, जनलोकपाल विधेयकाबाबत जनजागृतीप्रती विद्यार्थ्यांसाठी अर्धा डझन वह्या अशी अनेक कल्याणकारी कामे किशोर लिंबाणी यांच्याकडून करण्यात आली आहेत.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • आनंद मोडक

    आपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक यांनी आपल्या गावालाच शाळेत शिक्षण घेतले. तेथेच त्यांनी संगीताचे धडे गिरवले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट निवडली. पीडीएच्या घाशिराम कोतवालमधून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सतीश आळेकरांच्या “महानिर्वाण” या नाटकाने त्यांना संगीतकार चख्याती मिळवन दिली.

  • प्रा. वि. म. कुलकर्णी

    वृत्ते व अलंकार, साहित्यदर्शन, झुपुर्झा, पेशवेबखर, साहित्यशोभा, वाचनमाला आदी ग्रंथांचे संपादनही केले. कवितेप्रमाणेच कथा, कादंबरी, टीकात्मक आणि संपादित ग्रंथ अशी त्यांची ग्रंथसंपदाही आहे.

  • ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार

    बॉलीवूड मधील जेष्ठ अभिनेते दादामुनी उर्फ अशोक कुमार यांचा जन्म. १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला.

    १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैया, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणाऱ्या या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हिरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.

    दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे.

    शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती.

    सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.

    अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.

    अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.

    https://www.youtube.com/watch?v=FvXTWi2YED8

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन

    १९९६ साली निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेषन यांनी मनी आणि मसल पॉवरवर कडक निर्बंध लादण्याचे काम केले. जागोजागी रंगवल्या जाणाऱ्या भिंती, पोस्टर, हँडबिल, वर्तमानपत्रतील जाहिराती आणि बातम्यांचा खर्च उमेदवारांच्या खात्यावर टाकण्याचा निर्णय घेतला.

  • वरुण भालेराव

    खगोल आॉलम्पियाडमध्ये भारताला सलग दोन वर्षे सुवर्णपदक त्याने मिळवून दिली. ज्या आयुकात त्याला प्रश्नमंजुषा स्पर्धेत ग्रहतार्‍यांनी खुणावले. त्याच आयुका संस्थेत आज तो संशोधक आहे. अमेरिकेतील कॅलटेक विद्यापीठात पीएचडी करुन भारतात परतलेला वरुण भालेराव अॅस्ट्रोसॅट उपग्रहनिर्मितीवर काम करत आहे.

    वरुण भालेराव यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आयुका' तला लखलखता तारा हा लेख पुढील पानावर वाचा.

    वरुण भालेराव यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आयुका' तला लखलखता तारा हा लेख वाचा.

    bhalerao-varun-modified

  • एक आठवण ..स्वरभास्कराची…

    पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग… मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी…

  • जेष्ठ गायिका माणिक वर्मा

    अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा, क्षणभर उघड नयन देवा, तुझा नि माझा एक पणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. त्यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी झाला.माणिक वर्मा यांचा जन्म पुण्याचा. सेवासदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीतं, भजनं नेहमीच कानांवर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सुंदर गाणं झालं.

    सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई. पण माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर ''यांनी त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून सुगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले.

    पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला जगन्नाथबुवा पुरोहित, नंतर इनायत खाँसाहेब, ‘भारत गायन समाज’चे अप्पासाहेब भोंपे यांसारख्या दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंचा किराणा घराण्याशी परिचय करून दिला.

    दरम्यान पुण्यासारख्या चोखंदळ रसिकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे तर सुरतलाही त्यांनी आपली कला पेश केली. यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रम, मैफिली यांची मालिकाच सुरू झाली. लांबलांबचे दौरे आखले जाऊ लागले आणि माणिक वर्मा हे नाव संगीतविश्वात गाजू लागले. गाण्यांच्या मैफिलींसाठी हिराबाई बडोदेकर तर चित्रपट संगीतासाठी सुधीर फडके त्यांचे आदर्श होते. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली.

    किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. ग. दि. मांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या 'गीत रामायण'चे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले, तेव्हा त्यात माणिक वर्मांनी अनेक गीते गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंद स्मित असे आकर्षक व घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मांनी अनेक कठीण चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका ती गाऊ लागल्या.

    'घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा', हे 'ळ'चा प्रास असलेले तशाच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले व फडकेंनी स्वरबद्ध केले. ते तितक्याच लडिवाळ आवाजात माणिक वर्मा यांनी गायलेलुद्धा. भक्ति व भावगीतांमध्ये रमलेल्या मा.माणिक वर्मा यांनी एकच लावणी गायली. गदिमांची 'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी 'पुढचं पाऊल' या चित्रपटात हंसा वाडकर यांच्या अदाकारीसह चित्रित झाली. मा.बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकातील त्यांनी गायलेले 'आली दिवाळी दिवाळी' हे ह्रदयस्पर्शी गीत खूपच गाजले होत. माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील मा.अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.च्या एका वाक्याने फुलांची चादर पसरली.

    ‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल. पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की..’ आणि मग माणिक दादरकर-अमर वर्मा यांच्या लग्नाच्या पत्रिका निघाल्या. त्या पत्रिकांवर त्या काळाला अनुसरून त्या काळातील समाजाची दैवते असलेले महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचे फोटो होते. मा.माणिक वर्मा यांची चार रत्न म्हणजे राणी वर्मा, भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश...राणी वर्मा यांनी आईचा म्हणजे मा.माणिक वर्मा यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला तर वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवताना दिसल्या. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.

    १९७४ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आला. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहील. दर वर्षी रंगशारदा महोत्सव योजने अंतर्गत १९९८ सालापासून मे महिन्यात तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे ‘किती रंगला खेळ’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकेच आनंद देते. माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    माणिक वर्मा यांची वेबसाईट
    http://www.manikvarma.com
    माणिक वर्मा यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=EfM1M0SW-DA
    'जाळीमंदी पिकली करवंद' ही लावणी
    https://www.youtube.com/watch?v=C4x27eCejpQ
    हसले मनी चांदणे
    https://www.youtube.com/watch?v=0cRSC3AAdHU

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट