अजूनी दिसेना पंढरीचा राणा
मला विठ्ठलाचा विरह सोसवेना ।।
बुवा-साधु-स्वामी यांचे पाय वंदिले मी
पुराजी नि पंडित यांचे पंथ धुंडले मी
परी विठ्ठलाच्या दारीं कुणी पोंचवेना ।।
पांडुरंगभेटीपुढती खुजे सप्तस्वर्ग
दुबल मी, दुर्गम दुष्कर नरजीवनमार्ग
पदोपदीं सहा रिपूंची रोखतसे सेना ।।
अंधच मी, पाहिन कैसे सुंदर तें ध्यान ?
मूढ पुरा , गूढ सारें परब्रह्मज्ञान
ध्यास असुनीही विषयपाश तोडवेना ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
आला ! आला रे पाऊस !
धरणीला मीलनाची आंस //धृ//
गेली होती तापूनी रखरखली सारी,
अंग जाता वाळूनी भेगा पडती शरीरी ।।
थकली ती सोसूनी उकाड्याचे चार मास
आला ! आला रे पाऊस !
धरणीला असे मीलनाची आंस ।।१।।
पाणी गेले आटूनी नदी नाले कोरडे,
पहाटेच्या दवातूनी झाडे जगती थोडे ।।
गेली हरळी जळूनी बीजे टाकूनी आसपास
आला ! आला रे पाऊस !
धरणीला मीलनाची आंस ।।२।।
आता येईल वनीं चैतन्य लपलेले,
तरुवेली जाती फुलूनी पडणाऱ्या जलामुळे ।।
जाती सारे आनंदुनी दरवळत मातीचा सुवास,
आला ! आला रे पाऊस !
धरणीला असे मीलनाची आंस ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दिसभर उकाडा हा
कुणासही सोसवेना
त्यावर फुंखर म्हणून का
केशरी चंद्राच्या दुधाळ चांदण्यांची शितलता...
आश्विन पोर्णिमेसी वाढली निरभ्रता,सवे पिठूर चांदण्यांची मोहीनी मनाला....
अंबाबाईचा उत्सव जोडीला भुलाबाईचा जागर
शिव-पार्वतिचा संगम...
झाला दिवस लहान,आता होई रात्र महान
त्या रात्रीला ओवाळण्यास
दिपावली आली सत्वर...
शरदाचे हे दिवस सुगीचे
शेतकरी राजा
सुखी शय्येवरी आरामात निजे....
सौ.माणिक
(रुबी)
राधा…
ती शब्द नाही, ती शब्दांच्या आधीची शांतता आहे,
ती प्रेम नाही, ती प्रेमाला जन्म देणारी वेदना आहे…
ती हसते… पण आतून विरघळत राहते,
ती जिवंत असते… पण स्वतःलाच हरवत राहते.
तिचं अस्तित्व म्हणजे एक न संपणारं मौन,
जिथे प्रत्येक भावना स्वतःलाच ऐकत राहते…
मन तिचं रणांगण,
आठवणी तिचे बाण,
आणि स्वतःच स्वतःवर चालवलेलं युद्ध,
ज्यात जिंकणंही हारच ठरतं…
कृष्ण तिच्या आयुष्यात नव्हता,
तो तिच्या आत होता…
म्हणूनच तो प्रत्यक्ष जवळ नसला तरी,
तो कधी तिच्यापासून दूर गेला नाही…
ती कुणालाही धरून ठेवत नाही,
कारण तिला माहिती आहे,
हातात धरलेलं सगळं सुटतं,
पण मनात साठवलेलं कधीच हरवत नाही…
राधा म्हणजे…
एक न बोललेलं गूढ,
ज्याचं उत्तरही तिलाच माहीत नसतं…
पण तरीही ती विचारत नाही,
कारण काही प्रश्न जिवंत ठेवले कीच प्रेम जिवंत राहतं…
ती तुटते…
पण आवाज करत नाही,
ती रडते…
पण अश्रूही तिच्याशी दगा देतात…
तिच्या शांततेत एक आक्रोश असतो,
जो कुणालाच ऐकू येत नाही…
आणि कदाचित,
तो ऐकण्यासाठी कुणी असावं अशी अपेक्षाही नसते…
ती प्रेम करत नाही,
ती प्रेम जगते…
जसं आकाश ढगांना अलगद सामावून घेतं,
आणि पावसानंतरही त्यांची आठवण जपत राहतं…
राधा म्हणजे एक अधूरं गीत,
ज्याला शेवट नाही…
आणि कदाचित म्हणूनच,
ते कधी संपतही नाही…
ती शिकवते,
स्वतःला हरवणं हीच खरी सापडणं आहे,
आणि ज्याच्यावर प्रेम करतो
त्याला मिळणं गरजेचं नसतं…
कृष्ण तिचा नव्हता,
हे तिला माहीत होतं…
पण “तो माझ्यात आहे”
ही जाणीव तिचं संपूर्ण जग होतं…
ती कुणाची वाट पाहत नाही,
कारण ती थांबलेलीच असते.
काळाच्या एका क्षणात,
जिथे सगळं संपतं… आणि सगळं सुरूही होतं…
राधा म्हणजे…
स्वतःच्या राखेतून रोज पुन्हा उभी राहणारी ज्वाला,
जी जळते,
पण कधी विझत नाही…
ती शेवट नाही,
ती एक अनंत सुरुवात आहे…
जिथे प्रेम जिंकत नाही,
पण कधी मरतही नाही…
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
दिन दुबळे रोगी जर्जर, कितीक पसरले या संसारी
काटे काढूनी जीवनावरचे, सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी....१
शून्यामधले कितीकजण ते, शून्यची सारे अवतीभवती
परिस्थितीच्या वणव्यामध्ये, धगधगणारे जीवन कंठती....२
आज हवे ते त्यांना कुणीतरी, फुंकार घालील दु:खावरती
सहानुभूतीचा शब्द एक तो, निर्माण करील सहनशक्ति....३
क्षीण होता तव दृष्टी, दिसेल कां तयाची धडपड
श्रवणदोष तो येण्यापूर्वी, ऐकून घे तू दु:खी ओरड...४
चपळ सारे अवयव असता, धावपळीचे जीवन बघ तू
संगे जावून जाण तयांचा, जगण्यामधला खडतर हेतू...५
जेव्हां असशील विंवचनात तू, लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती
कोण जगतो कसा काय ते, जाणून घेण्या सवड कुणा ती...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
अगणित तारे जीव जीवाणूं ।
अथांग विश्व अणू रेणू ।।
रंगरूप हे नेत्री दिसती ।
भिन्न भिन्न राहूनी जगती ।।
रस गंध दरवळे चोहीकडे ।
जगण्याचा तो मार्ग सापडे ।।
हे जर आहे रूप ईश्वरी ।
बघती त्याला आमुच्या नजरी ।।
सुख दु:ख ही त्याची निर्मिती ।
फिरे सदा आमचे भोवती ।।
निराकार निर्गुण, म्हणती त्याला ।
म्हणूनच तो साऱ्यात सामावला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
असतिल तेथे जिकडे तिकडे
विखरुनि पडली फुले
असतिल पक्षी झाडावरती
गोड गात बेसले
असेल तेथे वहात सुंदर
दुधासारखी नदी
असतिल डोलत हिरवी पिवळी
कमळे पाण्यामधी
घरे तेथली सुरेख असतिल
चमकत सोन्यापरी
आत लाविल्या असतिल
रंगी बेरंगी तसबिरी
झगमग झगमग करीत असतिल
तिथले सुंदर दिवे
विझतहि नसतिल ते वाऱ्याने,
जणु दुसरे काजवे
रोजच जत्रा भरत असावी
तिथे नदीच्या तटी
असतिल खाऊ देत घेऊनि
पैसे दाटुमुटी
पंख लावुनि हिंडत असतिल
वरती तिथली मुले
असतिल चालत ढगावरुनहि
टाकित हळु पावले
असतिल भारी रंगित कपडे
बाळांचे तेथल्या
शिवले असतिल शेवंतीच्या
गुंफुनिया पाकळ्या
खूप दागिने असतिल त्यांनी
अंगावर घातले
पुन्हा काढुनि नसतिल कधीही
पेटीमधि ठेवले
मनास माने तितुके भटकत
असतिल मेघांवर
स्वर्ग असा हा बघावयाला
मिळेल का लोकर
आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा
रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला II १II
विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी
कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला II२ II
प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस
विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला II३ II
प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा
भावनेस व्यक्त करी कविता, ती अर्पितो मी तुजला II४ II
II शुभं भवतू II
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एके दिनीं निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा
प्रवास माझा अनंतात कसा असेल त्या वेळेचा
आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन
'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन
बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी
सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी
पूनर्जन्म घेण्याकरितां गर्भाची निवड करीन
गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय जीवन जगेन
शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची
नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा
निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा
आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा
सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा
भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा
परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा
इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप
लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत
असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला - भागला
नि निघतो घड्याळ्याच्या ठोक्याबरोबर लगबगीने गलबला
जीव गुदमरवणाऱ्या गर्दीत मिसळून बेकाबू कोलाहलात
जीर्ण शरीरे सरकू लागतात, विटक्या मनाचं ओझं पेलत
थिजत्या आकांक्षांना सोबत घेऊन विझत्या आशेला
आणि कदाचित राखेआडला निखारा उरी जपलेला
घरट्याच्या ओढीनं निघून, प्रवासाच्या शक्तीपाताने शिणून
परततात आयुष्याची चिपाडं, निष्प्राण कलेवर बनून
पूर्ण पिट्ट्या पाडून घेऊन, काळं करुन दिवस पळताना
रात्र सामावे त्यांच्या गुपितांना, पापांना नि दिवसाच्या तापांना
आपापल्या बंदिस्त तुकड्यात, मग निवांत होऊन
अतृप्त आत्मे निजतात गाढ, खूपशी स्वप्ने उशाशी घेऊन
रात्रीच्या कुशीच्या उबेत, क्लांत जीव आश्वस्त निजे
भाळी लावूनी चंद्राचा टिळा, रात्र मग जागे, जोजवे
प्रेमाने थोपटे कपाळी अंकांना देता मंद मंद झोके
रात्र प्रहर - प्रहरांनी पिके, होत जाती रंग फिके
दिवस अस्पष्ट कुजबुजू लागे, झुंजुमुंजु होऊ लागे
काळोखाच्या दाट दडपणाला निर्धाराने सारुन मागे
धास्तावून जीव मग होतो जागा, विखुरली गात्रं गोळा करीत
पुन्हा प्रवासास दिशाहीनतेच्या टोकापासून, टोकापर्यंत
निघतो वेठबिगार पाठी थैली मारुन उत्साहाचा उसना आभास लेऊन
झापडांना ओढून डोळ्यांवर नि नीट जोखडात मान देऊन
पुन्हा होतं चक्र सुरु जगाच्या प्रचंड चरकाचे
पिळायला थेंब शेवटचे, शुष्क जीवनातल्या आशेचे
आणि नेलं जातं वाहून जू इमाने इतबारे जगाच्या अंतापर्यंत
गुलामांच्या असहाय पिढीपासून पुन्हा पुढल्या पिढीपर्यंत
-- यतीन सामंत
Copyright © 2025 | Marathisrushti