नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।
कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।
जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।
परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।
होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चला बंधूहो एक होऊ या शपथ तुम्हाला शिवरायाची
आज देऊ या, खंबीर शाश्वती, समर्थ भावी भारताची ॥ धृ ॥
प्रणाम असू द्या त्या शिवबाला प्रणाम हा लोकमान्यांना
प्रणाम असू द्या वीरांना माझा, निष्ठांना नि मूल्यांना ॥
हिमालयासम पावित्र्याला नि शांतिच्या येथील पूजेला
प्राणांहूनही प्रिय अशा या विशाल माझ्या देशाला ॥ १ ॥
हा हिंदूचा देश मुलांनो आहे भूमी गौतम बुद्धाची
इस्लाम-ईसाई सर्वांस शाश्वती बात कशास हो युद्धाची ॥
दुभंगलेली मने सांधूनि विभागलेले हात जोडूया
एकदिलाने एकमनाने भूमीचे या पांग फेडूया ॥ २ ॥
भारत माझी जात आणिक धर्मही माझा भारत आहे
एक धर्म नि एक कुळीचे आपण एकच आपला मांडव आहे
एक ईश्वर एकच अक्षर, एक सदा काळीज अपुले आहे
एकतेचा मंत्र जपोनी, शांतीचा आपला जयघोष आहे ॥ ३ ॥
एकोप्याने जवळ येऊ या, एक होऊ या प्रवाहाने
एकजूटीने उत्कर्ष साधू या मिळून होऊ या एक मने
खांद्यास मग भिडवून खांदा एक घेऊ या शपथ साथीहो
एकमुखाने, एक लयीने गर्जत राहू जयजय हिंदुस्थान हो ॥ ४ ॥
रामायणाचे करुनी पारायण आदर्शाचे करुया मंथन
विषमतेला बूजवून; अस्मानी झेपाऊ या उदंड उन्मन
संकोचित तणांना खुडूनी फुलवू प्रेमाच्या विश्वकळ्यांना
समर्थतेची रुजवून स्वप्ने जोपासूया निरोगी मनांना ॥ ५ ॥
बंधुभावाशी नाते अतूट होवो अडसर जातीचा नको
सर्वांप्रती असू द्या समान आदर आनंदाला मग पार नको
हातात गुंफूनी हात करुया मोहक मोत्यांच्या माळा
समर्थतेच्या कळसास नेऊया गोवर्धन होऊन सारे गोळा ॥ ६॥
-- यतीन सामंत
प्रश्न अनुत्तरीत सदा या जीवनी..
लाभली कां ? जीवा सत्यप्रीती..
मनप्रीता अंतरीची ही निश्ब्दुली..
मी कधीच शब्दात मांडली नाही..।।..१
असलीस जरी तू , दूर कितीही..
तुज मी , कधीच विसरलो नाही..
पाळलीही सुचिता , संस्कारांची..
विरहाची वाच्यताही केली नाही..।।..२
नाते मनहृदयी , सोज्वळ प्रीतीचे..
न उच्छृंखली भोगवादी भावनांचे..
प्रीतीस ! मानुनीया दान संचिताचे..
सत्यता , मी कधी विसरलो नाही..।।..३
वाहती समांतर सरीतेचे किनारे..
असुनीया संगती , वंचित मिलना..
मधुनी वाहते , निरंतर प्रीतीगंगा..
सुख हे सात्विक , मना खंत नाही..।।..४
अंती मिलन , अथांग महासागरी..
हे अव्यक्त सत्य शुचिर्भूत जीवनी..
मानीता दान कृपाळू दयाघनाचे..
हृदयी आज याचना उरली नाही..।।..५
©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
766544908
रचना क्र. ५८ / २७ - ४ - २०२१
एका बेसावध वळणावर
तू मला भेटलीस ......
मला तुझ्यात गुंतवून, तू
माझ्यात विरघळलीस ....!
माझ्या सोनेरी क्षणांची
महिरप तू झालीस....
गुलाब,चाफा,अन् केशर कस्तुरी
सुगंधाची बरसात तू केलीस ...!
चार फुलांची आस माझी
तृप्त तू अशी केलीस...
चांदण भरली तुझी मुठ
माझ्या ओंजळीत रिती केलीस !
तप्त ग्रीष्मात सावली झालीस
शीतल संध्येला सखी,
चाहूल लागता मज संकटाची
प्रार्थना येई तुझिया मुखी !
नाते आपले मैत्रीचे ...
स्नेहाळ - मधाळ केलेस तू
तुझ्या प्रेमळ जिव्हाळ्याने
नवे बंध निर्मिलेस तू !!
भावना लाभावी सखी
प्रत्येक जन्माची आस माझी...!
तुझ्या माझ्या मैत्री पुढे
फिकी गोडी, गुळ साखरेची !!
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आंस राहते सतत मनीं
मिळत नसते त्याचे साठी
प्रयत्न सारे होत असती
हाती नाही ते मिळविण्यापोटीं
प्रयत्न्यांत तो आनंद होता
धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें
जिद्द मनाची आणिक हेका
यश मिळते जेव्हां पदरीं
धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशिले
त्यातील उर्मी निघून जाते
यशांत नाहीं आनंद तेवढा
मिळविण्यांत जो दिसून येई
कांहीं तरी ते मिळवावयाचे
ह्याच विचारी रमून जाई
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।१।।
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।२।।
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।३।।
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।४।।
अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।५।।
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भिंत ओलेती मनाची
तुझ्या आठवणी झिरपलेल्या,
धुळीत थेंब टपोरे , देती आठव
ओल्या बटा तुझ्या झटकलेल्या,
तुझ्या हास्याची जाळी काढी
नक्षी त्या छताला,
प्रतिबिंब तुझे झळकते
जेव्हा पाहतो स्वतःला,
किती भकास उदास
तुझ्याविना घर मनाचे गं
जन्म देण्यास आतूर
जडावलेले गर्भ घनाचे गं,
झाली जीर्ण वास्तू मनाची
तुझे येणे होत नाही,
अवकळा येते त्या घरास
जिथे स्त्रीचे पाऊल फिरत नाही,
किती किती वाटते तुला लेखणीत बांधावेसे
पुन्हा नव्याने तुला जुने काही सांगावेसे
कित्तीदा भास झाला तू येऊन गेल्याचा
मनाचा उघडा दरवाजा पुरावा होता तू गेल्याचा,
आत्मा कधीचा पाण्यात ठेऊन बसलेला ,
उंबरठ्यावर एक तांब्या उपडा हीं घातलेला
कधी वळत नाहीत तुझी पावले इथवर
प्रतिक्षा हीं किती काळाची न कुठंवर
वास्तू कोसळण्याआधी जमेल का ग तुला येणे
बांधू नव्याने घर , रचू पुन्हा नवे गाणे
साद देतो हि अंतिम अन प्रतिक्षाहीं थकलेली,
अक्षरे बोलावती तूज , विरहात माखलेली..
-- अँडव्होकेट ऐश्वर्या वैजापूरकर
(नावासहित share करावी)
लीन दीन ती होऊन पुढती,
झुकली होती त्यावेळी ।
हात पुढे आणि नजर खालती,
ज्यांत दिसे करूणा सगळी ।।१।।
लाचार बनूनी पोटासाठी,
हिंडे वणवण उन्हांत सारी ।
वादळ वारा आणिक पाऊस,
संगत घेवून फिरे बिचारी ।।२।।
मदतीचा हात दिसे,
जागृत होता भूतदया ।
जनसामान्यात असती
मानवतेतील ही माया ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
१० वर्ष आईची.. पुढली
१० बाबांची.
१० दिली नवऱ्याला..
१० दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.
आता मात्र मुक्त हो...
ही १० स्व:तःची...
वाच, नाच, मौज कर...
हवे ते ते स्वैर कर.
पुढील १० आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची...
त्या पुढील १० वानप्रस्थ...
संसारातून निवृतिची.
म्हणून म्हणते...
हीच १० वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही
नाक न खुपसण्यायची
आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरुन घे
देव करो तुला मिळावी
१० वर्षे स्वैर सुखाची.
देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची....
स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ
आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।।
रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं
येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।।
आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची
ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ?
धर्माच्या कुर्हाडीनं आईचं तुकडं कां ?
सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ?
जातपात अन् जमात, वाढतात अंतरं ऽ
आरक्षन हें कारन, लहान-मोठं तंडलं ऽ ।।
कोन जाइल खड्ड्यात, अन् वरती राहील कोन ?
आपनऽच पडूं , जिथं आपनऽच खांदलं ऽ ।।
देश किती जाइल पुढं, करा इचार, खरा इचार
जर समदं याच्यापुढं एकोप्यानं नांदलं ऽ ।।
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti