१९ जानेवारी १९५६ मध्ये भारतातील आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयकरणाच्यावेळी भारतामध्ये जवळ जवळ १५४ भारतीय विमा कंपन्या, १६ अभारतीय कंपन्या आणि ७५ दूरदर्शी कार्यरत होत्या. राष्ट्रीयकरण दोन टप्प्यांमध्ये साध्य करण्यात आले, सुरवातीला कंपन्यांचे व्यवस्थापन अध्यादेशाच्या साधनाने ताब्यात घेण्यात आले, आणि नंतर सर्वसमावेशक विधेयकाच्या साधनाने मालकी सुद्धा.
भारतीय संसदेने १९ जुन १९५६ रोजी आयुर्विमा महामंडळ अधिनियम पारित केला, आणी भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेषकरून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले एल.आय.सी.ची १९५६ मध्ये तीच्या कार्पोरेट कार्यालयां व्यतिरिक्त ५ प्रादेशिक कार्यालये, ३३ विभागीय कार्यालये आणि २१२ शाखा कार्यालये होती. पॉलिसी चालू असण्याच्या काळात आयुर्विमा करार दीर्घकालीन करार असल्याने तीच्या विविध सेवांच्या गरजा पुढील वर्षांमध्ये कार्यविस्तार करण्यसाठी आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालयामध्ये एक शाखा कार्यालय ठेवण्यासाठी भासू लागल्या. एल.आय.सी.ची पुनर्रचना करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर नविन शाखा कार्यालये उघडण्यात आली. पुनर्रचनेचा एक परिणाम म्हणून सेवा देण्याची कार्ये शाखा कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि शाखा या लेखा युनिटस करण्यात आल्या.
महामंडळाच्या कामगिरीने हे अद्भुत कार्य केले. हे फक्त सन १९५७ मध्ये २०० कोटी रूपयांपासून महामंडळाने वर्ष १९६९-७० मध्ये ओलांडलेल्या १००० कोटींच्या नविन व्यवसायावरून लक्षात येते आणि एल.आय.सी.ला नविन व्यवसायाचे २००० कोटींचे उद्दिष्ट पार करावयाला पुढील १० वर्ष लागली. परंतू ऐंशीच्या सुरवातीला घडत असलेल्या पुनर्रचनेमुळे, वर्ष १९८५-८६ पर्यंत एल.आय.सी.ने आधीच नविन पॉलिसींवरील ७०००सम एशुअर्ड चा आकडा पार केला होता.
आज एल.आय.सी.ची २०४८ संपूर्ण संगणकीकरण केलेली शाखा कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, ८ प्रादेशिक कार्यालये, १३८१ उपग्रह कार्यालये आणि कार्पोरेट कार्यालयांसहीत कार्यरत आहे.
एल.आय.सी.च्या वाईड एरीआ नेटवर्कने ११३ विभागीय कार्यालये व्यापली आहेत आणि मेट्रो एरीआ नेटवर्कच्या मार्फत सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत. काही निवडक शहरांमध्ये ऑनलाईन विम्याचे हप्ते गोळाकरण्याची सोय देऊ करण्यासाठी एल.आय.सी.ने काही बॅंका आणि सेवापुरवठादारांशी संधान साधलेले आहे. ग्राहकांच्या सोईसाठी एल.आय.सी.ची इसीएस आणि एटीएम मार्फत विमाहप्ता भरणा सोय ही अतिरिक्त आहे.
ऑनलाईन किऑस्क आणि आयव्हीआरएसच्या खेरीज मुंबई, अहमदाबाद, बंगळूरू, दिल्ली, पुणे आणि इतर अनेक शहरांमध्ये माहिती केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. पॉलिसीधारकांना त्यांच्या सहज प्रवेश पुरवण्याच्या हेतूने एल.आय.सी.ने उपग्रह संपर्क कार्यालये सुरू केलेली आहेत. उपग्रह कार्यालये छोटीशी, आटोपशीर आणि ग्राहकाला अधिक जवळची असतात. भारतीय विम्याच्या उदारीकरणाच्या परिस्थीतीत सुद्धा एल.आय.सी. नविन वाढीच्या दिशेने वेगाने स्वत:चीच मागील सर्व रेकॉर्ड मोडत कार्यक्रमण करताना आघाडीवर आहे.
एल.आय.सी.ने ब्रिटन, फिजी, नेपाळ, श्रीलंका आदी देशांमध्ये कारभार सुरू केला. तसेच विमा क्षेत्राबरोबरच पेन्शन, गृहकर्जे, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, वित्त उत्पादनांचे वितरण आदी क्षेत्रात एल.आय.सी. काम करीत आहे. आत्तापर्यंत एल.आय.सी.ने अनेक मैलाचे टप्पे ओलांडले आहेत आणि आयुर्विमा उद्योगाच्या दृष्टीकोनातून अभूतपूर्व कामगिरीचे अनेक मानबिंदू प्रस्थापीत केलेले आहेत. हा तोच हेतू ज्याने आमच्या पूर्वजांना विमा या देशात प्रत्यक्षात आणण्यासाठी, आम्हाला एल.आय.सी.मध्ये हा संरक्षणाचा निरोप घेऊन सुरक्षेचा दिवा शक्यतितक्या घरांमध्ये लावण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या कुटुंबांसाठी सुरक्षा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी प्रेरणा दिली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
या आठवडय़ापासून वेलेंटाईन डे पर्यंत विविध मार्गांनी आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रेमळ भावना व्यक्त करण्यात येतात. जस जसा वेलेंटाइन डे जवळ येतो तसा तरूणाच्या उत्साहाला उधाण येते. विशेषतः रोझ डे पासून तरूणाईकडून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी विविध भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली आढळून येते.
‘आराधना’ या चित्रपटाला १९६९ सालचे फ़िल्मफेअर पुरस्कार सर्वोतम चित्रपट, सर्वोत्कृठ अभिनेत्री शर्मिला टागोर,सर्वोतम पार्श्वगायक: किशोर कुमार मिळाले होते. शक्ति सामंता यांच्या शक्ती फिल्म्स हा चित्रपट होता.
“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे.
या नाटकात बाळ धुरी, प्रभाकर पणशीकर या नावाजलेल्या नटांनी कामे केली होती. नंतरच्या काळात यशवंत दत्त व मोहन जोशी यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी ‘थँक यू मिस्टर ग्लाड ‘ हे नाटक गाजले.
सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ०४ ते ०६ या ब्रम्हमुहूर्तात उठून स्नान करून देवाची पूजाअर्चा, आराधना, भजन अशी आपापल्या परीने भक्ती करतात. या मासात विशेषकरून भगवान विष्णूची व श्रीकृष्णाची आराधना करतात. तसेच वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी प्रत्यक्ष देवता सूर्याची आराधना केली जाते. या आरतीला काकड आरती असे म्हणतात.
पर्यटकांप्रमाणे इतिहासप्रेमींना, अभ्यासकांना, संशोधकांना, जिज्ञासूना, कोकण प्रेमीचना आणि सौंदर्याच्या उपासकांना विनालंब आणि बिनाअडथळा आनंद लुटत असतात. विजयदुर्ग-देवगड ही विजयी देशभूमी आहे. परशुरामाने वसविलेली ही पावन भूमी आहे.विजयदुर्ग-देवगड नावातच सर्व काही आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला येथील सौंदर्य स्थळांचा, निसर्ग स्थळांचा ऐतिहासिक स्थळांचा, परिचय करून देऊन पर्यटक इकडे मोठया संख्येने आकृष्ट करण्यासाठी २०१७ मधील विजयदुर्ग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
२९,३० व ३१ डिसेंबर २०१७ रोजी विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आणि विजयदुर्ग ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे... या महोत्सवला अवश्य भेट दया..
देवगड तालुक्याला आध्यात्मिक, साहित्यीक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक वारसा आहे. याचे येथे पदोपदी प्रत्यंतर येते. या तालुक्यातील प्रत्येक गाव हे पर्यटन स्थळच आहे. येथील अनेक स्थळे अजूनही प्रसिध्दीपासून दूर आहेत. मात्र त्यांचे सौंदर्य, वैशिष्टये इतकी आगळी-वेगळी आहेत की, एकदा आलेला पर्यटक पुन्हा-पुन्हा येण्याचा निश्चय करूनच परतात.
या महोत्सवला येण्याऱ्या पर्यटकांना विजयदुर्ग व आजुबाजूच्या पर्यटनाच्या ठिकाणांची माहिती.
विजयदुर्ग बंदर
विजयदुर्ग हे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील एक महत्वपूर्ण आणि सुरक्षित बंदर आहे. विजयदुर्ग किल्ल्यानजीक हे बेदर आहे. ब्रिटीशांच्या आणि मराठयाच्या काध्हात या बंदरात फार मोठी वर्दळ होती. सुरक्षित आणि खोल वाघोटन खाडीमुळे गिर्ये गोदी आणि वाघोटण गोदी यांचा मालवाहतुकीचा उपयोग करून घेतला जात होता. पूर्वी या बंदरातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असे. पणजी-मुंबई प्रवासी देवगड प्रमाणेच विजयदुर्ग बंदरातही जाता येता थांबत असे. परंतु मागील २०, २५ वर्षापासून या बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक बंद आहे. मालवाहतुकीची इतर साधने उपलब्ध झाल्याने पूर्वीच्या मानाने मालवाहतूक बरीच कमी झाली आहे. सध्या या बंदरातून कोल्हापूर भागातील साखर कारखान्यातील लाखो टन ऊसाची मळी निर्यात होत आहे. शासनाच्या नवीन बंदर विकास धोरणानूसार हे बंदर आंरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने हिंदुस्थान इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अन्ड इंजिनियरिंग्ज प्र.लि. या कंपनीशी करार केला आहे. या बंदरासाठी हजारो कोटी हजारांची गुंतवणूक होणार असून हे बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर प्रतिवर्षी 75 मिलियन कार्गो हाताळला जाणार आहे.
गिर्ये गोदी
विजयदुर्ग-तळेरे मार्गावर विजयदुर्ग पासून 3 कि.मी. अंतरावर आणि देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून 27 कि.मी. अंतरावर गिर्ये गाव आहे देवगड तालुक्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणा-या वाडातर, मुंबरी खाडीप्रमाणेच वाघोटण खाडी आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर असून ही खाडी खोल पण सुरक्षित आहे. त्यामुळे येथे खडक खोदून आरमारी गोदी उभारण्यात आली आहे. ही गोदी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे. तेथे जहाज बांधणीचा मोठा कारखाना उभारला होता. त्याच ठिकाणी आरमारी जहाजे पावसाळयात सुरक्षित ठेवली जात होती. साधारणपणे मराठ्यांची जहाजे २० ते १५० टनी असत. मात्र ह्या गोदीची क्षमता ५०० टनी जहाजांची होती. सुमारे १०६ मी. लांब आणि ७० मी. रूंदीची ही गोदी उत्तराभिमुख आहे. ही गोदी म्हणजे मराठ्यांच्या विशेषत: छत्रपती शिवाजी महारांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच होय. वाघोटण खाडीतील हे नाविक केंद्र म्हणजे मराठ्यांच्या नौकानयनाच्या इतिहासातील अपूर्व कामगिरी होय. कित्येक इतिहासकार, संशोधक येथे भेट देत असतात. पर्यटकांनीही मनमुराद आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे.
ब्रिटीशकालीन (मराठ्यांचा) बंगला, वाघोटन
तळेरे विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून २४ कि.मी. अंतरावर वाघोटन गाव आहे. विजयदुर्ग-वाघोटन खाडी, वाघोटन गोदी, हिरव्यागार वनराईरने सजलेल्या आंब्यांच्या बाबा, कोकणातील सर्वात मोठया आणि दणकट चि-यांचा खाण व्यवसास या बरोबरच या गावाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे येथील ब्रिटीश कालीन (मराठ्यांचा बंगला) होय.
सुमारे १६५ वर्षापूर्वी बांधलेल्या आणि स्थापत्य शास्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बंगल्याची निर्मिती ब्रिटीशांनी अटक केलेल्या थिबा राजाला सन्मानाने ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी केले होती. एकूण १३ गोल आणि चौकोनी आकाराचे अजस्र खांब, भव्य कमान्या यातून साकारलेल्या या बंगल्याला उत्कृष्ट सागवानी लाकूड वापरेलेले आहे. ब्रिटीशकालीन आठ हापूस आंब्यांची झाडे अद्यापही आहेत. येथे त्याकाळीतील विहीर, पडझड झालेला कैदखाना, घोडयांच्या पागा आहेत. हा ऐतिहासिक बंगला १९३२ साली होमोओपॅथिक डॉ. माधव कृष्णा मराठे यांनी लिलावात घेतला. या बंगल्यात आजही त्यांच्या औषधे बनविण्याच्या आणि साठवणीच्या वस्तू तसेच औषधोपचार व धार्मिक पुस्तकांचा संग्रह देखरेख करणा-यांनी सांभाळला आहे. याच बागेत माधव मराठे, कमलाबाई मराठे, अक्का मराठे, कृष्णा मराठे यांच्या समाधी आहेत.
वाघोटन गोदी
देवगड पासून सुमारे २९ कि.मी. अंतरावर तळेरे-विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून २४ कि.मी. अंतरावर ब्रिटिश कालीन सुप्रसिध्द वाघोटन गोदी आहे. गिर्ये गोदी प्रमाणे येथील रचना असून ही गोदी ब्रिटीश काळात फार उपयुक्त होती. ब्रिटिशनौदलाच्या यशस्वीतेत वाघोटन गोदीने भर घातली आहे. ही कोकणच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब आहे. डोंगरमाथ्यावरून वाघोटन गोदी, वाघोटन खाडी, हिरवेगार डोंगर पहाण्यासारखे आहेत.
मणचे धबधबा
देवगड समुद्राची भूमी जांभ्या दगडाची आणि लहान लहान डोंगर उताराची असली तरी येथे अतिशय विलोभनीय असे मणचे आणि सैतवडे असे दोन धबधबे आहेत.
विजयदुर्ग-तळेर मार्गावर तरळयापासून २० कि.मी अंतरावर मणचे फाटा आहे. तेथून ५ कि.मी. अंतरावर मणचे धबधबा आहे. देवगड पासून ३५ कि.मी. अंतर आहे. हा एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणायला हरकत नाही.सुमारे ३०० फूट उंचीवरून बारमाही कोसळणारा हा धबधबा सौंदर्याने अतिशय नटलेला आहे. इतक्या उंचीवरून फेसाळत कोसळणा-या धबधब्याच्या प्रवाहाखाली स्नानाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो. काळ्या कातळातून पाणी सतत वहात असल्याने नैसर्गिकरीत्याच येथे लहानमोठी जलकुंडे तयार झाली आहेत. या ठिकाणी पोहोण्याचा आनंद लुटता येतो. धबधब्यापर्यंत बरेचसे अंतर पायी-पायीच जावे लागते. ही पायवाटही म्हणावी तशी चांगली नाही, मात्र बाकीचा रस्ता ब-यापैकी आहे. या धबधब्याशेजारी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे. हे येथील भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे पाहिले जाजे. हा परिसर हिरव्यागार सृष्टीने नटलेला आहे.
विजयदुर्ग किल्ला
विजयदुर्ग किल्ल्यातील मराठय़ांच्या पराक्रमात अनेक गोष्टींबरोबर येथील दुर्गरचना, आरमारी गोदी आदींबरोबरच समुद्रांतर्गत तटबंदीचाही समावेश करता येईल. येथील बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. त्यासाठी काळोख्या रात्री अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर या युद्धनौका बुडाल्या. या भागात ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली उभारलेली आहे. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि बुडाल्या. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी यासंदर्भात काही वर्षापूर्वी अभ्यास केला असता हे बांधकाम १७व्या शतकातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्या काळात शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती.
मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान! इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते. असा हा नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…
११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावर कालांतराने देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.
छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा! या दोन्हीही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. या किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.
दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता. इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा दरवाजा लागतो.
१७व्या शतकात या परिसरास जिभी म्हणत. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशव्यांविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या ४ पौंडी १६ तोफा या जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी दरवाजा!
दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की, किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने केलेल्या तोफांच्या मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे आहेत.
या दिंडी दरवाजावरील भाग म्हणजे नगारा! शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी नगारे वाजविले जात असत. वर जाण्यासाठी नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे. दरम्यान, ध्वजस्तंभाजवळ जाणा-या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे. हा खलबतखाना!…
शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागली किंवा महत्त्वाची बोलणी करायची असल्यास ती इथल्या खलबतखान्यात व्हायची. वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आली आहे. या वास्तूला पूर्वी दरवाजा होता. आता तो अस्तित्वात नाही. आत चाललेली गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकायला येत नसत. अचंबित करणा-या अशा अनेक वास्तू या किल्ल्यात पाहायला मिळतात.
ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे, त्याला ‘सदर’ असं नाव आहे. आयताकृती असणा-या या हॉलमध्ये अगदी शेवटच्या सैनिकालाही स्पष्ट आवाज ऐकू यायचा. याबरोबरच भुयारातून जाणारा ‘खूब लढा तोफा बारा’ बुरूज, पेशवेकालीन वाडय़ाकडे जाणारे भुयार, भवानी मातेचं मंदिर, सैनिकांची निवासस्थाने आदी अनेक वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या ऐतिहासिक आठवणी सांगत उभा आहे.
या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठय़ांनी जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८पासून झालेल्या पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत म्हणजे १७५६पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या पराक्रमाने, किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर कान्होजी आंग्रे यांनी कोकणात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे आंग्रेंशी कधीच जुळले नाही. आंग्रेंच्या मराठा आरमारामध्ये रामेश्वर भागात असलेल्या गोदीवाडी येथील आरमारी गोदी कधीही दुर्लक्षित करता येणार नाही.
साधारण ६० वर्षापूर्वी म्हणजेच १९५२ सालात आरमारी गोदीमध्ये चिखलात रुतलेला नांगर सापडला होता. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेल्या या नांगरावरून त्या वेळच्या जहाजांची कल्पना येते. याच आरमारी गोदीमध्ये शत्रूंच्या जहाजांच्या दुरुस्तीबरोबरच नवीन जहाजेही बनवली जात. गिर्ये गावाजवळ वाघोटन खाडीच्या काठावर खडक खोदून या गोदीची निर्मिती आंग्रेंनी केली. या गोदीची लांबी ३५५ फूट व रुंदी २२७ फूट इतकी होती. या गोदीमध्ये ५०० टनी जहाज सहज ये-जा करत.
भरतीच्या वेळेमध्ये जहाजे गोदीत नेण्यात येत असत. ओहोटीला गोदीतील पाणी बाहेर गेल्यावर पूर्वेकडील ३७ फूट रुंदीचा दरवाजा बंद करून भरतीच्या पाण्यास अडविले जाई. त्या वेळी तीनशेहून अधिक कामगारांनी प्रचंड परिश्रम करून ही गोदी निर्माण केली. प्रसिद्ध फत्तेजंग पाल आणि समशेरजंग पाल या लढाऊ जहाजांची बांधणी याच गोदीमध्ये करण्यात आली. गोदीचं महत्त्व एवढं मोठं होतं की, या गोदीमध्ये बांधलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या जहाजांनी मराठय़ांच्या वीरश्री गाजवलेल्या आरमारात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे शत्रूपासून गोदीच्या संरक्षणासाठी मटाटिया बुरुजाची खास बांधणी करण्यात आली होती. त्यावर तोफाही ठेवण्यात आल्या होत्या.
अर्थात, या बुरुजावर आणि गोदीजवळ सैनिकांचा जागता पहारा असे. या गोदीची पाहणी करत असताना १९५२ सालात कॅप्टन डेव्हिस यांना चिखलात रुतलेला नांगर सापडला. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेला हा नांगर १८व्या शतकातील पालवी गुराबाचा होता. मुंबईच्या नॉटिकल म्युझियममध्ये तो नांगर आजही जतन केलेला आहे. विजयदुर्गच्या शामराव परुळेकर यांनी हा नांगर संग्रहालयाकडे पाठविला अशी नोंद आढळते.
विजयदुर्गचे बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळय़ात सतत खुपत असे. त्यासाठी काळोखी रात्र धरून अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन मजबूत युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर असताना त्या युद्धनौका बुडाल्या. याचा शोध घेताना त्या भागात समुद्राच्या ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली बांधलेली आढळली. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी या संदर्भात काही वर्षापूर्वी अभ्यास केला असता हे बांधकाम १७ व्या शतकात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि त्या बुडाल्या असा निष्कर्ष काढता येतो. या संदर्भात काही तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. विजयदुर्गजवळच्या या भिंतीबाबत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेच्या डॉ. त्रिपाठी यांनी या बांधकामाचा अभ्यास केला होता. त्या वेळी त्या भागात जहाजांचे अवशेष व तोफगोळे मिळाले. याबाबत १९९८ मध्ये डॉ. त्रिपाठी यांनी ‘जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी’ मध्ये शोधप्रबंध सादर केला होता.
त्यानंतर या संस्थेतील या प्रबंधाला समोर ठेवून मुंबईमध्ये भरलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजमध्ये संशोधक सहायक असलेल्या इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांनी ‘मिथ्स अँड रिअॅयलिटी-दी सबमज्र्ड स्टोन स्ट्रक्चर अॅ ट फोर्ट विजयदुर्ग’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात की, विजयदुर्ग किल्ल्याजवळची प्रसिद्ध असलेली समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे.
कोकण किनारपट्टीवर आणखी काही ठिकाणे आढळणा-या ‘डाइक’ या प्रकारच्या रचनेचाच हा एक भाग असल्याचे ते म्हणतात. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणतात की, हे बांधकाम प्लॅटफॉर्मसारखे असल्याचे दिसते. यामध्ये वापरण्यात आलेल्या दगडांपैकी सर्वात मोठा दगड ३.५ बाय २.५ बाय २.५ मीटर इतक्या मोठय़ा आकाराचा आहे. एवढा मोठा दगड त्या जागी नेणे हे त्या काळी शक्य नव्हते. या भिंतीवर चार मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी आहे. त्यामुळे तेव्हा आरमारासाठी वापरात असलेल्या बोटींना या भिंतीवरून ये-जा करणे शक्य होते.
साधारण ८० ते ९० वर्षाच्या या इतिहासात किरकोळ घटना वगळता या भिंतीवर बोटी आदळून फुटल्याच्या नोंदी ब्रिटिश, पोर्तुगीज किंवा डचांच्या लिखाणात आढळत नाहीत. काही असलं तरी मराठय़ांच्या आरमारात पाण्याखालील ही भिंत आरमाराच्या विजयी गाथेची भागीदार आहे. कारण पूर्ण तयारीनिशी आणि गुप्तपणे उतरलेल्या इंग्रजांच्या ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ वेळी ही भिंत कामी आली नसती तर कदाचित विजयदुर्गला एका पराभवाचा ठपका बसला असता. पाण्याखालील भिंतीसोबत ‘आंग्रे बँक’ ही समुद्रातील जागाही मराठय़ांच्या पराक्रमात कामी आली आहे. हा भाग नैसर्गिक आहे. पण ही जागा आंग्रेंच्या नौदलाने शोधून काढली आणि त्याचा उपयोग शत्रूंचे हल्ले यशस्वीपणे परतविण्यासाठी अनेक वेळा केला.
जमिनीवर जशा द-या-खो-या, उंचवटे, टेकडय़ा असतात, त्याचप्रमाणे समुद्रतळाशीही असा भाग असतो. समुद्रातील टेकडी म्हणजेच ‘आंग्रे बँक’! किनारपट्टीपासून आपण आत आत गेल्यावर पाण्याची खोली वाढत जाते. विजयदुर्ग समुद्रामध्ये मात्र निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो.
विजयदुर्गपासून साधारण १०० किलोमीटरच्या अंतरात पाण्याची खोली ८० ते ९० मीटर वाढत जाते. पुढच्या ३ ते ४ किमीच्या अंतरात ही खोली तब्बल पावणेदोनशे मीटर एवढी जाते. पण त्यानंतरच्या काही अंतरामध्ये ही खोली अचानक कमी होऊन २० ते २५ मीटर एवढी होते. हीच ती आंग्रे बँक म्हणून ओळखली जाणारी समुद्रातील टेकडी! ही टेकडी तब्बल ३५ ते ४० किमी लांब व १५ ते २० किलोमीटर रुंद आहे. विजयदुर्गवर हल्ला करणा-या शत्रूंच्या जहाजांवरील तोफांची तोंडं विजयदुर्गकडेच असत. या तोफांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर त्वरित पश्चिमेकडे वळणे अवघड होत असत. या गोष्टीचा फायदा मराठा आरमार घेत असे.
आंग्रे बँक या ठिकाणी मराठा आरमार नांगर टाकून आरामात असे. शत्रू विजयदुर्गच्या दिशेने येताना दिसला की, मराठय़ांची जहाजं पश्चिमेकडून येऊन त्यांना अटकाव करत. बेसावध असलेल्या शत्रूचा फायदा घेऊन मराठा आरमार त्या जहाजांवरील माल ताब्यात घेत. पराक्रमी मराठा सरदार, त्यांचे मावळे यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला बांधलेली तिहेरी तटबंदी मराठय़ांच्या पराक्रमात महत्त्वपूर्ण ठरली. आणि याचबरोबर आरमारी गोदी, समुद्रातील छुपी तटबंदी, आंग्रे बँक या गोष्टीही विजयदुर्गवरील मराठय़ांच्या विजयगाथेत अतिशय मौल्यवान कामगिरी करणा-या ठरल्या.
गाव: विजयदुर्ग
ग्रामपंचायत: विजयदुर्ग
अंतर. ८ किमी
जवळचे बस स्थानक: विजयदुर्ग
जवळचे रेल्वे स्टेशन: कणकवली
जवळचे विमानतळ: गोवा
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट / बाळा कदम.
दि. १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर व ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या आणि गेली सहा दशके मराठी मनावर रुंजी घालणाऱ्या ‘गीतरामायणा’चे ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ हे पहिले गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारित झाले होते. त्याला आज ६२ वर्षे पूर्ण होत झाली. मा.सीताकांत लाड ५४ च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर म्हणून कामावर होते. मा.सीताकांत लाड यांची ही संकल्पना. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करायचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गदिमा यांना लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. त्याकाळी संगीतकार सुधीर फडके यांचा संगीत क्षेत्रात गवगवा होता. बाबुजी गदिमांचेही जवळचे मित्र.
त्यामुळे गदिमा, सीताकांत लाड आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके या त्रिमूर्तींनी एकत्र येऊन गीतरामायण जनमानसांपर्यंत पोहोचविले. ठरल्याप्रमाणे वर्षभर ही मालिका चालणार होती. त्यानुसार ५२ भाग प्रसारित करण्याचे ठरविले होेते. ५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन ५६ सालच्या रामनवमीपर्यंत गीतरामायण प्रसारित करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीवरून लोक गीतरामायण ऐकायचे. हाच भाग शनिवारी व रविवारी पुन्हा त्याचवेळी ऐकविला जायचा. योगायोग असा की, यंदाच्या वर्षाप्रमाणे ५५ सालीही अधिक मास होता. त्यामुळेच ५२ भागांवरून ५६ भाग झाले. अर्थात ५६ गाण्यांची निर्मिती झाली.
पहिल्या गीताच्या स्मृती
‘आकाशाशी जडले नाते’ या विद्याताई माडगुडकर (गदिमांच्या पत्नी) यांच्या आत्मचरित्रात विद्याताईंनी पहिल्या गीताच्या स्मृती जाग्या केल्या आहेत. विद्याताईंच्या म्हणण्याप्रमाणे गदिमांनी एक दिवस आधी पहिले गीत बाबुजींना दिले होते. बाबुजींचे म्हणणे की, गदिमांनी त्यांना ते गीत दिलेच नव्हते. गीतरामायणातील पहिले गीत प्रसारित करण्यासाठी आकाशवाणीवर सारे एकत्रित आले तर गीताची प्रतच नाही. गदिमा म्हणाले, आपण दिले आहे पण बाबुजी नाहीच म्हणतात. गदिमा भडकले व जायला निघाले. परंतु लाडांनी त्यांना अडविले व एका खोलीत नेऊन पुन्हा गीत लिहायला लावले व बाहेरून खोलीची कडी लावली. गदिमांनी अवघ्या पाच-दहा मिनिटांत गीत लिहिले आणि ते बरोबर १ एप्रिल १९५५ रोजी सकाळी ८.४५ वा. अवघ्या जनतेला ऐकविले गेले. ते गीत म्हणजे ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती!’
गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत
गदिमांच्या शब्दांना स्वरसाज चढवून बाबुजींनी गीतरामायणातून अजरामर बनविले. रामायणातील सप्तकांडे अर्थात बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किशकिंदाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड या सातही कांडांच्या आधारे गदिमांनी ५६ गीतांची निर्मिती केली. संपूर्ण रामायणाची कथा रसिक श्रोत्यांसमोर मांडून गदिमांनी आधुनिक वाल्मिकी म्हणून नाव मिळविले. गीतरामायण प्रत्येकाच्या ओठावर येऊ लागले. त्याकाळातील कित्येकजण आपल्या आठवणी सांगतात. पुढे वर्षभर गीतरामायण चालले आणि घराघरांत नवचैतन्य उसळले. गीतरामायणाच्या पुस्तिकांचे प्रकाशन झाले. लोक नव्या उमेदीने या पुस्तिका खरेदी करू लागले. ३ ऑक्टोबर १९५७ साली आकाशवाणीने या पुस्तिकाचे प्रकाशन करून आणखीन एक क्रांती घडविली.
भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारलेली गीते
बाबुजी त्याकाळी बहुचर्चेत होते. भावगीत निर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा होता. भारतीय शास्त्रीय रागांच्या आधारे ते गीतांना स्वरसाज चढवायचे. गीतरामायणातही त्यांनी भारतीय रागांचा समावेश करून गाण्यांना स्वरसाज चढविला. गीतरामायणातील गीते गायीली डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक यांनी. लता मंगेशकर संगीत क्षेत्रात नवीनच होत्या. त्यांनीही गीतरामायणातील काही गीते गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत. मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा करणारे शब्दसामर्थ्य, जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते. बालमनावर योग्य संस्कार होऊ लागले. घरातील बायका-पुरुष आवर्जून गीतरामायण ऐकू लागले. एकप्रकारे संस्कार करणार्या गीतरामायणाने तो काळ जिंकला होता. रसिकमनांवर अधिराज्य गाजवून नवीन पिढीला सुसंस्कृत बनविण्याचे सामर्थ्य गीतरामायणात होते, आहे, आणि पुढेही राहील.
आकाशवाणीनंतर पहिला कार्यक्रम पंचवटीत
आकाशवाणीनंतर काही निवडक गीतांचा कार्यक्रम बाबूजी करू लागले आणि पहिला कार्यक्रम झाला तो गदिमांच्या पुणे येथील पंचवटीत, २८ मे १९५८ साली. आकाशवाणीवर गीतरामायणातला उदंड प्रतिसाद लाभला आणि पुन्हा एकदा गीतरामायणाचे प्रसारण करण्यात आले. १९६५ साली एचएमव्हीने ग्रामोफोन रीकॉर्डस् काढल्या. यालाही लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पूर्वीच्या काळी रेडिओ सगळ्यांकडेच नसत. परंतु शेजारच्या घरात एकत्र होऊन गीतरामायण ऐकले जायचे.
गीतरामायणातील अजरामर गीते
स्वये श्री रामप्रभू, शरयू तीरावरी, उगां कां काळीज माझे उले, उदास कां तू?, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला गं सखे, सावळा गं रामचंद्र, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मार ही त्राटीका रामचंद्रा, चला राघवा चला, आज मी शापमुक्त झाले, स्वयंवर झाले सीतेचे, व्हायचे राम अयोध्यापती, मोडू नका वचनास, नको रे जाऊ रामराया, रामाविण राज्यपदी कोण बैसतो?, जेथे राघव तेथे सीता, थांब सुमंता थांबवी रे रथ, नकोस नौके परत फिरू, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, बोलले इतुके मज श्रीराम, दाटला चोहीकडे अंधार, माता तू न वैरीणी, चापबाण घ्या की, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तात गेले माय गेली, कोण तू कुठला राजकुमार, सूड घे त्याचा लंकापती, मज आणून द्या तो, याचका थांबू नको दारात, कोठे सीता जनक नंदिनी, ही तिच्या वेणीतील फुले, पळविली रावणे सीता, धन्य मी शबरी श्रीरामा, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला, वाली वध ना खल निद्रालन, असा हा एकच श्रीहनुमान, हीच ती रामाची स्वामीनी, नकोस करू वल्गना, मज सांग अवस्था दूता, पेटवी लंका हनुमंत, सेतू बांधा रे सागरी, रघुवरा बोलत कां नाही?, सुग्रीव हे साहस असले, रावणास सांग अंगदा, नभ भेदूनी नाद चालले, लंकेवर काळ कठिण, आज कां निष्फळ होती बाण, भुंवरी रावणवध झाला, लिनते चारुते सीते, लोकसाक्ष शुद्धी झाली, त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार, प्रभो मज एकच वर द्यावा, डोहाळे पूरवा रघुकुलतिलक, मज सांग लक्ष्मणा, गा बाळांनो श्रीरामायण अशी अजरामर गीते आजही प्रत्येकाच्या ओठांवर स्फुरतात आणि अलौकिक अशा अनुभूतींचा साक्षात्कार होतो.
असे हे अजरामर गीतरामायण!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे. यावर फक्त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्तातील दीर्घकालीन वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात.
सॅन्डविच हा तर अगदी सहजपणे सर्वत्र उपलब्ध होणारा खाद्यप्रकार आहे. हे सॅन्डविच काकडी,कांदा तसेच अनेक फळभाज्या वापरून तयार केले जाते. यामुळे जी मुले भाज्या खात नाहीत, त्यांच्या पोटात आपोआप सॅन्डविचच्या माध्यमातून हे पौष्टिक पदार्थ जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti