(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

  • दिल अपना और प्रीत पराई

    या चित्रपटाचे दिग्दर्शक होते किशोर साहू. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या गीतकारांनी लिहिलेल्या सदाबहार गीतांना ज्येष्ठ संगीतकार शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं.

  • ३ मे १९६५ – दादरमधील शिवाजी मंदिरचा शुभारंभ

    मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या दादरमधील शिवाजी मंदिरचा शुभारंभ ३ मे १९६५ रोजी झाला. मराठी रंगभूमी ही आज देशातील अत्यंत प्रगत रंगभूमी मानली जाते, याचे कारण तिचा पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास एवढेच नसून ती सतत प्रवाही, पुरोगामी आणि कालसुसंगत राहिली, हेही आहे. चित्रपटाच्या उदयानंतर संगीत रंगभूमी अस्ताकडे निघाली असता तिने कात टाकली, काळानुरूप आपले रूप बदलले आणि ती पुनश्च बहरली. त्यानंतरही अनेक चढउतार तिने अनुभवले. या सर्व घटना-घडामोडींची जिवंत साक्षीदार असलेली मुंबईतली दादरच्या शिवाजी मंदिरची वास्तू आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीशी तिचे अविचल नाते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता.

    पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यनाटय़, बालनाटय़ अशा सर्व प्रकारांतली नाटके इथे सादर होऊ लागली. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांच्या अनेक पिढय़ा शिवाजी मंदिरच्या मांडवाखालून गेल्या, मोठय़ा झाल्या. ८०-९० च्या दशकापर्यंत शिवाजी मंदिरचा कट्टा हा हौशी, होतकरू रंगकर्मीचा अड्डा होता. शिवाजी मंदिरमध्ये आपला हुन्नर दाखवायची संधी एक ना एक दिवस आपल्याला मिळेल आणि आपण मोठे होऊ, नावारूपास येऊ, हे स्वप्न उराशी बाळगत कटिंग चहावर दिवसचे दिवस ढकलत या अड्डय़ावर नित्य हजेरी लावणाऱ्या अनेकांचे हे स्वप्न पुढे साकारतही असे. यातले कित्येक जण शिवाजी मंदिरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छबिलदास रंगमंचावरून आलेले असत. छबिलदासच्या प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नाटके करणारे रंगकर्मी आणि शिवाजी मंदिरचे नाटकवाले यांच्यात एके काळी विस्तवही जात नसे. परस्परांना ते कमी लेखत. कारण त्यांच्यातला एक असे आपल्याला रंगभूमीवर जे ‘प्रयोग’ करायचे आहेत, त्याकरता म्हणून नाटक करणारा; तर दुसरा- रसिकांचे रंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करण्याचा वसा घेऊन नाटके करणारा. खरे तर दोघांचीही भूमिका मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीच्या उत्थानाकरता तितकीच महत्त्वाची होती. यथावकाश दोघांनाही आपले हे आग्रह दुराग्रह असल्याचे ध्यानी आले आणि त्यांच्यातला दुरावा संपला. म्हणूनच एके काळी छबिलदासवर सक्रिय असलेली मंडळी आज शिवाजी मंदिरमध्ये आपली ‘प्रयोगसिद्ध’ नाटके सादर करताना दिसतात. शिवाजी मंदिर ज्याने जिंकले, तो जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगमंचावर हार खाणार नाही असे म्हटले जाते. ते खरेच आहे. याचे कारण शिवाजी मंदिरचा प्रेक्षक सुशिक्षित, सुजाण, दर्जेदार अभिरुची बाळगणारा आहे. त्याला उडदामाजी काळे-गोरे चोखपणे पारखता येते.

    शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि पहात आहेत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. आशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. शिवाजी मंदिरमध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, मा. दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे यांच्यापासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यापर्यंत सर्वांचेच शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. शिवाजी मंदिराच्या रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली. शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे.

    १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेआधी शिवाजी मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, हे एका कोकणी मुस्लीम प्रेक्षकाने शिवाजी मंदिरच्या ट्रस्टींना पत्र लिहून सावध केले होते. त्या पत्राधारे आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळेच शिवाजी मंदिर या हल्ल्यातून वाचले. या वास्तूच्या धर्मनिरपेक्ष पुण्याईमुळेच हे शक्य झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ लोकसत्ता

  • लसूण सोलायचं उपकरण

    परवा बाजारात एका दुकानात लसूण सोलायचं उपकरण पाहून, मला धक्काच बसला! कारण ते उपकरण म्हणजे, लसणाच्या पाकळ्या आत सरकवता येतील एवढ्या व्यासाची फक्त एक रबरी ट्यूब होती.

  • घटक तेच, माळा अनेक

    सर्व पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे अणू. सर्व सजीवांचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. तसाच सर्व शर्करामय पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे मोनोसॅकराईड. हे दोन प्रकारचे असतात. पहिला ग्लुकोज.

  • दिव्यांची अमावस्या

    दिव्यांच्या या अस्सल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. राजकारणी आणि व्यावसायिक प्रायोजक यांच्या प्रभावाखाली आपण आपल्या सणांचे खूपच विकृतीकरण केले आहे. आपला जुना धर्म आणि त्यामागील नवीन विज्ञान लक्षात घेऊन आपण आपल्याच सणांची विकृत थट्टा टाळायला हवी.

  • स्लाइस्ड ब्रेडची बाजारात प्रथम विक्री

    भारतात सुफी संगीतकार आणि कवी आमिर खुसरो यांच्या लेखनात पहिल्यांदा ब्रेडचा उल्लेख आढळला. मुघलांच्या राज्य काळात ब्रेडचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पण हा ब्रेड मिडल ईस्ट म्हणजे इजिप्तवरुन आला होता. त्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज आल्यावर पुन्हा ब्रेडमधे फरक पडला. यासाठी आपण गोव्यातल्या ब्रेडची तुलना मुंबईतल्या ब्रेडशी केली पाहिजे. कारण गोव्यातल्या ब्रेडवर पोर्तुगीज पद्धतीच्या ब्रेडचा प्रभाव आहे तर मुंबईच्या ब्रेडवर ब्रिटीश ब्रेडचा.

  • जागतिक पर्यटन दिन

    आज दिनांक २७ सप्टेंबर आहे. आजच्याच दिवशी १९७० रोजी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO) स्थापना झाली होती. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली.

  • फर्ग्युसन कॉलेज

    शिक्षणाचे माहेरघर ही पुण्याची ओळख सार्थ करणारे व पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजचा वाढदिवस.
    २ जानेवारी १८८५ रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज ची सुरवात झाली.

    शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८२ ला आलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना वामन शिवराम आपटे यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन करून नव्या खाजगी आर्टस् कॉलेजची निकड विशद केली होती. न्यू इंग्लिश स्कूलचे, त्यासाठी संस्थापकांनी केलेल्या धडपडीचे कौतुक हंटर आयोगाने केले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘जेम्स फर्ग्युसन’ या तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरने या प्रस्तावाला अनुमोदन दिले व बक्षीसासाठी रु. एक हजार दोनशे पन्नासची मदत देण्यापासून शक्य ते इतर सहकार्यही केले. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. २४ ऑक्टोबर १८८४ रोजी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना झाली.

    संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न,महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले व २ जानेवारी १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले.

    फर्ग्युसन कॉलेज त्या वेळी पुणे शहरात शनिवार पेठेतील गद्रे ह्यांच्या विस्तीर्ण जुन्या वाड्यात होते. नंतर आत्ताच्या जागेत आले.

    फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्चिमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. टिळकांनी येथे गणित व संस्कृतचे अध्यापन केले. वामन शिवराज आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते.

    पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.

    फर्ग्युसनचे माजी प्राचार्य डॉ. वि. मा. बाचल यांनी फर्ग्युसनवर जवळपास दीड हजार हस्तलिखित पाने लिहिली होती. त्यावर फर्ग्युसन कॉलेजचा हा १२५ वर्षांचा समग्र इतिहास ग्रंथरूपात 'फर्ग्युसनची वाटचाल' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
    फर्ग्युसनची स्थापनेपासून ते २०१० पर्यंतचा इतिहास या पुस्तकातून समोर आला आहे. या ग्रंथामुळे पुण्याच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे संदर्भ उपलब्ध झाले आहेत. . विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. फर्ग्युसनची इमारत वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, पी.व्ही नरसिंह राव असे अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले. फर्ग्युसन कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे. सैन्य, प्रशासन, मंत्री, खेळाडू, अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले, त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथात आला आहे.

    महात्मा गांधी यांनी १९१९ मध्ये ज्या सभागृहातून देशाला स्वदेशीची हाक दिली, त्या ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेज मधील एन.एम. वाडिया अॅ म्फी थिएटरला इतिहास आहे.

    लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आदींनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटरला २०१२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. १९१२ मध्ये सर जिजीभॉय यांनी दिलेल्या पंचवीस हजार व प्रिन्स आगाखान यांच्या पाच हजारांच्या देणगीतून थिएटरची उभारणी झाली होती. पुण्यातील धनिकांनीही आर्थिक मदत दिली होती. या निमित्ताने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार ठरलेल्या या वास्तूला सरकारने ‘हेरिटेज ए’चा दर्जा दिला आहे. रवींद्रनाथ टागोर, पं. नेहरू, सी.व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस, मदनमोहन मालवीय यांनी येथे विचार मांडले होते.

    फर्ग्युसन कॉलेजच्या अॅेम्फी थिएटर मध्ये १९२७ मध्ये देशातली पहिली भारतीय महिला परिषद झाली. सरोजिनी नायडू, यशवंतराव चव्हाणांची भाषणे येथे झाली. केरळचे तेव्हाचे मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांचे ‘स्वातंत्र्य’वर व्याख्यान येथे झाले. कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, भालबा केळकर, भास्कर चंदावरकर, रोहिणी भाटे, वसंतराव देशपांडे यांचे कार्यक्रम येथे झाले. पुण्यातील प्रसिध्द पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची सुरुवात फर्ग्युसन कॉलेजच्या अॅयम्फी थिएटर येथुनच झाली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वन्यजीव सप्ताह

    माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माणूस निसर्गात केवळ एक ग्राहक आहे, उत्पादक नाही. अन्नासाठी, प्राणवायूसाठी तो निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय यांनी युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित केले

    राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.