डॉ. अलका कुलकर्णी या मुंबईसारख्या शहरातून डॉक्टर झालेल्या आणि शहाद्यासारखे दूरचे गाव त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून निवडले. या गोष्टीबरोबरच वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाही त्या दमदार लेखन करतात, याचे कौतुक वाटते. `ओळख’ हा डॉ. अलका कुलकर्णी यांचा कथासंग्रह वाचला. त्यांचा काहीसा आगळावेगळा विषय अर्थवाही होऊन मनात खोलवर रुतू लागला. त्यातील बहुतेक सर्व कथा आधुनिक जगातल्या स्त्रियांच्या समस्येवर आधारित आहेत, तरीही काहीशा चाकोरीबाहेरच्या आहेत.
सुरेखा शहा यांनी करुन दिलेला पुस्तक परिचय
`ओळख’ हा डॉ. अलका कुलकर्णी यांचा कथासंग्रह वाचला. त्यातील दोन कथा मी यापूर्वी वाचल्या होत्या. त्याही पुन्हा नव्याने वाचताना त्यांचा काहीसा आगळावेगळा विषय अर्थवाही होऊन मनात खोलवर रुतू लागला. त्यातील बहुतेक सर्व कथा आधुनिक जगातल्या स्त्रियांच्या समस्येवर आधारित आहेत, तरीही काहीशा चाकोरीबाहेरच्या आहेत, असे वाटते.
लेखिकेची लेखनशैली नेमक्या शब्दात खूप काही सांगून जाणारी आहे. `सहोदरा’ या कथेतील रस्त्यावरच्या उपेक्षित कोवळ्या वयाच्या आईकडे पाहताना नायिकेला वाटते, वेदनेच्या अथांग गर्भजलावर आपण दोघीही पोसलो आहोत. व उद्ध्वस्त या काश्मीरमधील हिंदू-मुस्लिमांमधील भावबंध, अत्याचार, तणाव, भय हे सारं काही व्यक्त करणाऱया कथेमधील शेवटचे वाक्य ही स्थिती दर्शविते. या आठही कथा वाचताना जाणवत होते, की लेखिकेचे भावविश्व विशाल आणि समृद्ध आहे. `ओळख’ या त्यांच्या शीर्षक कथेतून बलात्कारातून निर्माण झालेल्या भावनिक समस्या मांडल्या आहेत. मनपसंत जोडीदाराबरोबर विवाहाशिवाय सहजीवन व्यतीत करणारी रेणू आपल्याला भावते. `जन्म’ या कथेत लेखिकेने बदलत्या युगातलं हे स्पंदन टिपले आहे. `सिद्धान्त’ आणि `प्रमेय’ व `हद्दपार’ या कथातून परदेशी स्थायिक झालेल्या तरुणांचे, त्यांच्या जीवनांचे दर्शन तर घडविले आहेच; परंतु अशा जोडप्याबरोबर राहावे लागणाऱया त्यांच्या वृद्ध आई-वडिलांच्या द्विधा भांबावलेल्या मनस्थितीचे अचूक चित्रण केलंय.
सिद्धान्त आणि प्रमेयमधील नायिकेची तेरा वर्षांची पांगळी मुलगी प्राजक्ता यांच्यातले मनभेद प्रभावी आहेत. हद्दपारमधील आजोबावर त्यांचा नातू डिस्टर्ब केलं, या कारणासाठी रिवॉल्व्हर रोखतो. या घटनेने आपलाही जीव घुसमटतो. डॉ. कुलकर्णी या मुंबईसारख्या शहरातून डॉक्टर झालेल्या आणि शहाद्यासारखे दूरचे गाव त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून निवडले. या गोष्टीबरोबरच वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाही त्या दमदार लेखन करतात, याचे कौतुक वाटते. त्यांच्या व्यवसायातील अनुभवावरही त्यांनी लेखन केले तर ते प्रलयकारी होईल, अशी अपेक्षा अनुरूप मुखपृष्ठासहित एक दर्जेदार कथासंग्रह प्रकाशित केल्याबद्दल सुविद्या प्रकाशनाचे मनपूर्वक अभिनंदन!
ओळख
लेखिका : डॉ. अलका कुलकर्णी सुविद्या प्रकाशन, सोलापूर