माई री, मैं कासे कहूँ पीर, अपने जिया की !

१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ !



१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ !

दरम्यान जळगावलाही माझ्या मामेभावाच्या मुंजीला उधळून टाकणारी दंगल अनुभवलेली आहे. आम्ही कार्यालयात अडकलेलो,अचानक दंगल उसळली!आई -मामी दोघीही पोलिसांच्या हातापाया पडताहेत आमच्या सुटकेसाठी, हे दृश्य अजूनही डोळ्यांसमोरून हटत नाहीए.

त्यानंतर अधून -मधून न पाहिलेलं भिवंडी, त्या गावाच्या इतिहासामुळे भिववून जायचं.

गेली काही वर्षे बिन ओरखड्यांची,व्रणांची गेली आहेत. दरम्यान जिथे जिथे शिकलो,नोकरी केली,वास्तव्य केलं त्या सर्व ठिकाणी जात-पात, धर्म न बघता माणसे जोडत गेलो ,प्रवाह वाहता राहीला. उस्मान्या, इम्रान सर,गझाला मॅडम,अब्रार अहमद, झुबैर असे कितीतरी सहकारी,विद्यार्थी जिवलग बनले.

काहीही भेदभाव (उभयपक्षी) न करता हे घनदाट ऋणानुबंध जुळले /टिकले.

तीन वर्षांपूर्वी रायपूरला किमान वास्तव्य होते तरी,इम्रान सरांना हार्ट अटॅक आल्याचे कळल्यावर मी त्यांच्या घरी भेटीसाठी थोडावेळ जाऊन आलो. त्यांच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केल्या.(आता ते ठीक आहेत.)

पण “आज सोचा तो …. ” असं झालं .

२०२० साली माझ्या मित्राला तो प्रथम ” भारतीय ” आहे असं सांगावं लागलं.

सहज “चायना गेट ” मधला अमरीश पुरी आणि नासिरुद्दीन मधला धार्मिक कलह आठवला. चित्रपटांवर आजच्या इतका विश्वास कधीच बसला नव्हता.

ही अपने जिया की पीर मैं कासे कहूँ आणि सांगू तरी कोणाला?

मध्यंतरी लॉक डाऊन मुळे प्रदूषण कमी झाल्याचे गोडवे आम्ही गायले पण मनातल्या प्रदूषणाचे काय?

हे उप -प्रवाह जोवर आतमध्ये खोलवर दडलेले आहेत, तोवर अधून -मधून विषारी शेऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर असेच येत राहणार.

अंतरंगातील गंगा मैली ठेऊन आम्हीं भारत स्वच्छ करण्याचे दावे करत राहणार आणि गावात मात्र वस्त्यांमध्ये फाळणी कशी राहील याची व्यवस्था ठेवणार!

इतिहासातून,त्याच्या नाजूक वळणातून काही शिकायचं नाही यावर आमचा भलाथोरला ठाम विश्वास !

त्यातून उन्माद जन्मतात.

१९७५ ते २०—– च्या वाटचालीतलं एकमेव फलित – भलं थोरलं शून्य!

आता तरी रस्ता दिसू दे !
स्वधर्म सापडू दे !!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

Author