१९९१ साली भारताने ” एल पी जी ” ( उदारीकरण , खाजगीकरण आणि जागतिकीकरण ) राबवायला सुरुवात केली आणि देशाचे ” चेहेरे ” बदलत गेले आणि सगळीकडे “मुबलकीकरण ” (abundance) दिसायला लागलं. दारिद्र्यरेषा साध्या डोळ्यांना दिसेनासी झाली आणि आम्ही निम्न ते अति उच्च मध्यमवर्गाकडे प्रवास करते झालो. माझ्या पिढीने ठळक अशा दोन त्रासदायक घटना अनुभवल्या- बजाज स्कुटरसाठी दहा वर्षे किमान वाट पाहणे आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाकडे डोळे लावून बसणे ! त्याव्यतिरिक्त फारसे वाईट वाटून घ्यावे असे व्यक्तिगत प्रसंग आम्ही अनुभवले नाही. योगायोगाने त्याआधी १९९० साली एक गच्च काळोखाचा डोह या देशाने आणि माझ्या पिढीने ऐकला.(त्याआधीचा “आणीबाणी ” नामक एक काळा अध्याय अर्थातच सर्वश्रुत आहे. पण तो देशव्यापी होता. मी म्हणतोय तो दूरदेशीच्या एका राज्यापुरता – heaven on earth वाला आहे.)
१९९० साली या राज्यातील निवडक जनसमुदायाला “धर्मांतर करा, निर्वासित व्हा किंवा मरा ” असा आदेश अचानक देण्यात आला. त्यांनी पहिला पर्याय निवडला की नाही, यावर हा चित्रपट काही भाष्य करीत नाही की आमच्या शाळा-महाविद्यालयातील इतिहासांच्या पुस्तकात त्याची नोंद (साधा उल्लेखही नाहीए) नाही. तिसरा मरण्याचा पर्याय त्यांच्यावर लादला गेला (नरसंहार- genocide किंवा चित्रपटातील शब्द- जनसंहार). दुसरा पर्याय काहींनी मनाविरुद्ध निवडला आणि रातोरात ती मंडळी स्वतःच्या देशात विस्थापित झाली. शेवटी जीव प्यारा आणि कधीतरी घरी-जन्नतला परतायची भोळीभाबडी आशा म्हणून. तेथून मग फोन करायचे राजकीय मंडळींना आणि काही मार्ग सापडतोय का त्याची वृथा उठाठेव करायची. वस्तीवर आलेल्या राज्याच्या गृहमंत्र्याला ३७० कलम हटवा अशी निवेदने द्यायची, एवढंच त्यांच्या हाती. या प्रतीक्षेत मरण आलं तर माझी राख काश्मीरमध्ये माझ्या पुश्तैनी घरी शिंपडा असं घरच्यांना बजावायचं-संपलं.
हेवन चं हेल झालं.
सुदूरदेशी महाराष्ट्रात हे जहाल विष कानी येण्याचे कारण आणि स्रोत दोन्ही मर्यादित ! चित्रपटात म्हटलंय तसं – ” आम्ही वृत्तपत्र वाचतो, पण ते डोळ्यांनी आणि टीव्ही बघतो,तोही डोळ्यांनी – पण आम्हांला समजत काहीच नाही.” कानावर किंकाळ्या पडू नयेत याची व्यवस्था समाजाने आजतागायत करून ठेवलीय.
२०२० साली थोडासा पडदा किलकिला झाला – “शिकारा ” या काश्मीर संदर्भातील पहिल्या भाष्यपटाने ! पण तो थोडासा प्रेम आणि पती-पत्नी पातळीवर राहिल्याने धग कमी जाणवली पण बसायचा तो चटका तेव्हाही बसलाच होता.
काल मात्र सगळं “काळं “सताड दिसलं,भिडलं आणि निःशब्द करून गेलं. इतकं की मध्यंतर नकोसा झाला आणि अनुभवातील सलगता कायम ठेवून हा चित्रपट लवकर संपला तर बरं असं आम्हांला वाटलं. किळस,घृणा,हाताच्या मुठी वळणे,अश्रू, स्वतःची लाज, तिरस्कार, भय आणि शेवटी या साऱ्या अनुभवांमधून तग धरून राहिलेल्या अनुपम खेरला प्रातिनिधिक सलाम अशा अनेकविध भावना मनभर आणि घरी परतताना रस्ताभर भोवती होत्या. “इंफोटेंमेंट ” सदरातील चित्रकृतीने त्या चौकटीबाहेर जाऊन समोर धरलेला आरसा विद्रुप आणि असह्य होता. मल्टिप्लेक्सच्या थंडगार अंधारात हे साधं बघणंही अस्वस्थ करणारं होतं आणि बजाज स्कुटर /गॅस सिलेंडर मुळे वैतागणाऱ्या मला त्या मंडळींच्या जागी स्वतःला इमॅजिन करणेही अशक्य होतं.
“Tashkent Files ” मधला पिटारा आता “The Kashmir Files” पर्यंत आलाय. एकेक भूतकाळातील गूढ उलगडतं आहे. आता प्रतीक्षा आहे या मंडळींकडून अजून एक पडदा वर करून – सुभाषबाबूंच्या मृत्यूचे गूढ सत्य स्वरूपात पडद्यावर दाखविण्याची!
तिथे ही त्रयी (trilogy) सुफळ संपूर्ण होईल.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे