पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-अ /११

आधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें,



मराठी काव्य :

भाग ८-अ

मराठीत अनेक जुन्यानव्या कवींनी त्यांच्या काव्यात मृत्यूचा उल्लेख केलेला आहे. पाहूं या कांहीं उदाहरणें.

आधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें, झाशीच्या राणीवर स्फूर्तीप्रद काव्य लिहिलें, ‘रुद्रास आवाहन’ हें जोशपूर्ण काव्य लिहिलें, ‘नववधू प्रिया मी बावरते’, ‘कुस्करूं नका ही सुमनें’ अशा कोमल भाव असलेल्या कविता लिहिल्या, हे खरें ; पण त्यांच्या काव्यातील प्रमुख ‘मूड्’ हा फिलॉसॉफिकलच होता. बघा त्यांच्या मरणोल्लेख असलेल्या कांहीं कविता –

मरणांत खरोखर जग ज़गतें

अधि मरण, अमरपण ये मग तें ।

त्यांची ‘मधु मागसी माझ्या सख्या ज़री । मधुघटचि रिकामे पडति घरीं ।’ ही कविताही मृत्यूच्या संदर्भात आहे, आणि तें, ‘संध्याछाया भिवविति हृदया’ , ‘लागले नेत्र हे पैलतिरी’ अशा शब्दांमधून स्पष्ट होतें. पहा तें शेवटचें कडवें –

ढळला रे दिन ढळला सखया

संध्याछाया भिवविति हृदया

अतां मधूचें नांव कासया ?

लागले नेत्र रे पैलतिरीं ।

मरणाविषयींचें त्यांचें अति-उत्कृष्ट काव्य आहे, ‘जन पळभर म्हणतिल हाय हाय !’

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय !’

मी जातां राहिल कार्य काय ?

…..

सखे-सोयरे डोळे पुसतिल

पुन्हां आपुल्या कामिं लागतिल

उठतिल, बसतिल, हंसुनि खिदळतिल

मी जातां त्यांचें काय जाय ?

तांबे यांची ‘कुस्करूं नका ही सुमनें’ , महा-प्रस्थान’, ‘गेली ज्योति विझोनिया’, ‘मावळत्या दिनकरा’ असा कवितांमध्ये प्रत्यक्षाप्रत्यक्षपणें मरणाचा, अंताचा संबंध आहे. झाशीच्या राणीवरील ‘झाशीवाली’ या स्फूर्तिप्रद कवितेतही तांबे तिच्या मरणाचा उल्लेख करतात – ‘ती पराक्रमाची ज्योत मावळे इथें झाशीवाली’.

मरणाच्या संदर्भात, भा. रा. तांबे यांचा विचार केल्याशिवाय पुढे जातांच येत नाहीं.

आतां अन्य कवींच्या काव्यातील उदाहरणें पाहूं या .

दिसे क्षणिक सर्व हें, भरंवसा घडीचा नसे ।

  • मोरोपंत

कृतांतकटकामलध्ज जरा दिसों लागली ।

  • मोरोपंत

इथें ‘जरा’ ( ज़रा’ नव्हे) म्हणजे वृद्धपणाचा उल्लेख आहे, आणि त्या संदर्भात, जीवनान्त वगैरेंचा उल्लेख आहे.

जुनें जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनि किंवा पुरुनी टाका

  • केशवसुत

आला सास, गेला सास । जीवा तुझं रे तंतर ।

अरे जगनं-मरनं । एका सासाचं अंतर ।

( सास : श्वास )

  • बहिणाबाई चौधरी

गणपत वाणी ‘बिडी बापडा’

पिता पितांना मरून गेला .

  • बा. सी. मर्ढेकर

मढ्यांत काजळ धरे भावना

  • बा. सी. मर्ढेकर

जयाला ठार मारूनी जगत् गाडूनिही टाकी,

पहा संजीवनी कानीं तयाच्या फुंकतो आम्ही.

  • माधव ज्यूलियन

अलौकिकाचें आयुष्य हें

सरणावरती जळतें आहे

गगन-धरेच्या नेत्रांमध्ये

जळ ज्वाळांवर गळतें आहे.

  • कुसुमाग्रज

तूंच माझा जीवघेणा बाण हो रे शेवटी ।

  • बा. भ. बोरकर

यज्ञीं ज्यांनी अर्पुन निजशिर

घडिलें मानवतेचें मंदिर

परी जयांच्या दहनभूमीवर

नाहिं चिता नाहीं पणती

तेथें कर माझे जुळती .

  • बा. भ. बोरकर

ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती

  • लोककवी मनमोहन नातू

हलक्या आवाजात मला तो गंभीरपणें म्हणतो

गांधी म्येलो म्हणतत् ..

  • विंदा करंदीकर

जाणतो अंतीं अम्हांला मातीच आहे व्हायचें

नाहींतरी दुनियेत दुसरें काय असतें व्हायचें ?

  • वा. वा. (उपाख्य ‘भाऊसाहेब’) पाटणकर

देवें दिलेल्या जमिनीत आम्ही

सरणार्थ आलो, शरिरेंहि त्याची ..

  • आरती प्रभू

जन्म आहे अंध अगदी

मृत्यूला आहेत डोळे

डोळसाचा हात धरुनी

वाट चालें आंधळें .

  • ग. दि. माडगूळकर

एका गझलधील हा शेर :

हांसतांना प्राण गेला , कां तुला आलें रडें ?

हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे ।

*

(पुढे चालू) …..

  • सुभाष स. नाईक Subhash S. Naik

Author