लिज्जत पापड – श्री महिला उद्योग.. एक प्रवास

केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील “एकमेव गृहउद्योग



लिज्जत पापड …….‘श्री महिला उद्योग.. एक प्रवास ८० रु ते उलाढाल १२७१ कोटी

केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील “एकमेव गृहउद्योग …उलाढाल १२७१ कोटी

प्रत्येक महिला ही या उद्योगाची मालकीण

जगातील ही कंपनी एकमेव ..कामकाजाची वेळ पहाटे ४.३० वाजता सुरू होते.

प्रत्येक महिला पहाटे जवळच्या कार्यालयात जाऊन किमान पाच किलोचे मळून तयार केलेले पापडाचे पीठ घेऊन जाते अन् दुसर्‍या दिवशी सुकलेले पापड आणून जमा करते. लगेच त्याचा मेहनताना – मोबदला दिला जातो. महाराष्ट्रात, मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालविलेला उद्योग निर्माण झाला. मार्च १९५९ साली गिरगावमधील सात महिलांनी या उद्योगास जन्माला घातले. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या नावाने आज हा उद्योग जगभर पोहोचला..

जेवणात जर पापड असेल तर जेवणाची लज्जत वाढते.’ या ‘लज्जती’वरून ‘लिज्जत’ हे नाव निश्‍चित झाले. ‘लिज्जत’ या शब्दाच्या उच्चारातच मजा आहे, अवखळपणा आहे, नजाकत आहे..!! जेवणातील चवीच्या दृष्टीने कमतरता भरून काढण्याचं आणि भोजनभाऊंना जेवण मैफिलीत ‘समेवर’ आणण्याचं काम, जेवणातील पापडाचं असतं. त्यामुळे जेवणातील लज्जत वाढते. म्हणून ‘लिज्जत’ पापड.

घरातील प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीसमान असल्याने या उद्योगाला ‘श्री महिला – ’ असे नाव निश्‍चित करण्यात आले असावे. आजकालचा जेवणातील वाढलेला चोखंदळपणा हा १९५९ सालीच छगनप्पा (छगनबाप्पा) उपाख्य छगनलाल करमशी पारेख यांनी ओळखला होता. गिरगावातील लोहाणा निवास इमारतीच्या गच्चीवर केवळ चार पाकिटे आणि रुपये ८० एवढ्या भांडवलावर सात महिलांनी ‘लिज्जत’ची मुहूर्तमेढ रोवली.

पहिल्या वर्षी या उद्योगामार्फत ६११६ रुपये एवढी विक्री लिज्जत पापडांची झाली. छगनबाप्पा आणि पुरुषोत्तम दामोदर दत्ताजी ऊर्फ दत्ताजी बावळा यांनी ‘श्री महिला उद्योग-’ या व्यवसायाला सक्रिय पाठिंबा दिला. १९६६ ला ‘लिज्जत’ची रीतसर नोंदणी केली. या कंपनीत सर्वच महिला भागीदार असल्याने, सर्वज जणी मालक आहेत. उत्पादक कंपनी म्हणून काम करण्याऐवजी ही संस्था धर्मादाय विश्‍वस्त संस्थेप्रमाणे काम करते. कुणा एकाचा अधिकार या उद्योगावर नसून प्रत्येक महिला ही या उद्योगाची मालकीण आहे. मुंबईसह संपूर्ण देशात या संस्थेच्या ८१ शाखा आणि २७ विभाग कार्यालये असून मुंबई-ठाण्यात कंपनीच्या १८ शाखा आहेत.

या उद्योगाने असंख्य महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. लाखो महिला आज स्वयंपूर्ण आहेत. या उद्योगाच्या सुमारे ४५ हजार महिला सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य महिला, सहमालक असल्याने कंपनीचा नफा प्रत्येकीला समान आणि वाढीव वणाईच्या स्वरूपात दिला जातो. आज कंपनीची उलाढाल १२७१ कोटी रुपये असून ४४ कोटी रुपयांची परदेशी निर्यात आहे. हा आकडा अर्थातच वाढत जाणार आहे.

http://www.lijjat.com/

Author