मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ७

समारोप – मराठे एक सत्ता म्‍हणूनच राहिले, त्‍यांचे भारतव्‍यापी साम्राज्‍य झाले नाही, ते दिल्‍लीपती झाले नाहीत, ही गोष्‍ट खरी आहे. ते नाकारण्‍यात अर्थ नाही. परंतु त्‍याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्‍याची कारणे त्‍या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्‍कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्‍पसंतुष्‍ट होती असे अजिबात दिसून येत नाही.



भाग ७ – समारोप

अठराव्‍या शतकातील चित्र असे आहे की, अनेक बादशहा आले-गेले, अनेक वझीरही आले-गेले ( स्‍वतः निजाम-उल्‍मुल्‍कही दिल्‍लीचा काही काळ वझीर होता ) नादिरशहा व अब्‍दालीने दिल्‍ली लुअली, पण मुघलांची पातशाही नेस्‍तनाबूद करून स्‍वतः दिल्‍लीपती होणे कोणालाच आवश्‍यक वाटले नाही. त्‍या काळातील सर्वच हिंदू, मुस्लिम सत्ताधार्‍यांनी व राजकारण्‍यांनी हेच धोरण स्‍वीकारलेले होते, ही गोष्‍ट ध्‍यानात घेणे आवश्‍यक आहे. इंग्रजांनी सुद्धा शक्‍यतो स्‍थानिक राजांना व संस्‍थानिकांना नावापुरते त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या गादीवर तसेच राहू दिले व आपल्‍या हातात सत्ता घेतली. त्‍यांनाही १८५७ पर्यंत ( म्‍हणजे स्‍वतःचे भारतातील अस्तित्‍वच धोक्‍यात येईतो ) मुघल बादशलाला पदच्‍युत करण्‍याची आवश्‍यकता वाटली नाही. १७व्‍या शतकातही शहाजीने लहानग्या निजामशहाला मांडीवर घेऊन, स्‍वतः वझीर बनून राज्‍यकारभार चालवण्‍याचा असाच प्रयोग केला होता. राजकारणात अशीच व्‍यवहाराशी सांगड घालून आपले ईप्सित साध्‍य करावे लागते.

सैनिकी व राजकारणी दृष्‍टीने सत्ता काबीज करण्‍यापेक्षाही महत्त्वाची गोष्‍ट आहे सत्ता टिकवणे. हेमूनेही सत्ता काबीज केलीच होती, पण किती काळ त्‍याची सत्ता टिकली ? शहाजीचा निजामशाहीतील प्रयोग अयशस्‍वी झाला कारण त्‍याची सैनिकी शक्‍ती अपुरी पडली. पानपताच्‍या आधी दिल्‍लीश्वर म्‍हणून मराठ्यांची सत्ता टिकू शकेल अशी परिस्थिती येण्‍याची संधीच राहिली नाही ! हे इतिहासातील सत्‍य आपण समजून घेतले पाहिजे.

मराठ्यांचे दोष अथवा चुका कबूल करायलाच हव्‍या. मराठे एक सत्ता म्‍हणूनच राहिले, त्‍यांचे भारतव्‍यापी साम्राज्‍य झाले नाही, ते दिल्‍लीपती झाले नाहीत, ही गोष्‍ट खरी आहे. ते नाकारण्‍यात अर्थ नाही. परंतु त्‍याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्‍याची कारणे त्‍या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्‍कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्‍पसंतुष्‍ट होती असे अजिबात दिसून येत नाही. इतिहासाचा योग्‍य तो अन्‍वयार्थ लावल्‍यावर हाच निष्‍कर्ष निघतो.

‘मराठी’ संस्‍कृती व ‘मराठी’ मनोवृत्ती यांच्‍याबद्दल मराठी माणसाची दिशाभूल होऊ नये, मराठीपणाचा अभिमान बाळगणे म्‍हणजे अल्पसंतुष्‍टपणा नव्‍हे हे त्‍याला पटावे, म्‍हणून हा सारा प्रपंच.

– – –
(समाप्त)

— सुभाष स. नाईक

Author