विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…

प्रामाणिकपणा आणि त्या कष्टाचं बाळकडू या वारीत तूझ्या समस्त भक्तांना पाज…. त्यांना आशिर्वाद दे कुठल्याही विध्नाला सामोरं जाण्याची.. तू विध्न देतोस त माणूस घडण्यासाठीच मग त्यातून माणूस घडू दे देवा.. राक्षस या लढाईत हरू दे.. तूझ्या या भक्ताचं हेच साकडं आहे तूझ्याकडे..







वारकरी तल्लीन होऊन पंढरीच्या वाटेवरून चाललेत.. जय हरी विठ्ठलाच्या नाम गजरात एकरूप होऊन .. अपार श्रध्दा आणि त्या सावळ्याची ओढ त्यांच्या पावालांमध्ये उर्जा भरते की वारीतला प्रत्येक माणूस अक्षरश: आपलं वय आपलं देहभान विसरून टाळ-मृदृंगाच्या तालावर ऊन.. पाऊस..वारा.. झेलत… त्याच्या साथीनं नाचत गात आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी

पंढरपूरीची वाट तुडवत चाललयं.. हे सगळ फक्त आणि फक्त त्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी… हे सगळं इतकं अद्भुत आहे की हे आश्चर्य अनुभवण्यासाठी परदेशी लोकंही हातात टाळ मृद्दंग घेऊन भक्तीरंगात रंगून जातातयेत…

या पालखीच्या मॅनेजमेंट विषयी तर सर्वानांच कुतूहल आहे.. खरं बघायला गेलं तर ही पालखी मॅनेज कारणारा तो सावळाच आहे .. त्याच्या निस्सिम भक्तीमुळे हे हजारो भक्त निसर्गाशी सामना करत आणि प्रत्येक माणसात त्या विठ्ठल माऊलीला बघत ही वारी जगतात… पण हीच शक्ती हा पांडूरंग आपणा सर्वांना जगताना का नाही देत? का असे भष्ट्राचारी राजकारणी जन्माला घालतो? प्रत्येक माणसात माऊली पाहणारा हा भोळा भक्त नंतर वर्षभर त्या राक्षसवृत्तीच्या माणसांसमोर आपला माथा टेकवतो.. कधी पिक करपलं, तर कधी पिक वाहून गेलं म्हणून अनुदानासाठी आपली झोळी पसरवतं.. कर्ज माफीचा तर कित्येक वर्ष या शेतकर्‍यांनी टाहो फोडला…. मग का? का या राक्षसवृत्तीचा संहार करायाला ती माऊली त्याच्या लेकरांना जाग देत नाही?
ही वारी मी लहानपणापासून अनुभवतेयं… मला वारीकडे पाहिलं की जाणवते ती फक्त माणूसकीची ताकद… पुण्य कमविण्या करिता का होईना पण वारीच्या रस्त्यावर गरिब-श्रीमंत सारेच आपापल्या ऐपतीप्रमाणे वारकर्‍यांना अन्न पाणी किंवा शिधा देतात… वारीत एकमेकांना नव्याने भेटलेले वारकारी माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात… तेव्हा लहान-थोर अशा
वयाच्या सीमा ओलांडून ते नमस्कार करतात ते प्रत्येका मधल्या माणूसकीलाचं.. कारण आजकाल माणसाला माणूस म्हणून वागता आलं तरी ते देवपण साध्य केल्यासारखचं

आहे.

वारी दरम्यान हा माझा सावळा विठ्ठल जी अद्भुत उर्जा त्याच्या लेकरांमध्ये भरतो.. तीच उर्जा आणि सद्-बुध्दी या राक्षसी वृत्तीचा नाश करण्याकरिता देऊ दे! प्रामाणिकपणा आणि त्या कष्टाचं बाळकडू या वारीत तूझ्या समस्त भक्तांना पाज…. त्यांना आशिर्वाद दे कुठल्याही विध्नाला सामोरं जाण्याची.. तू विध्न देतोस त माणूस घडण्यासाठीच मग त्यातून माणूस घडू दे देवा.. राक्षस या लढाईत हरू दे.. तूझ्या या भक्ताचं हेच साकडं आहे तूझ्याकडे.. तू निर्मिलेलं विश्व जपण्यासाठीचं…. माऊली सगळ्यांना ताकद दे माणूसकीचा झेंडा हाती घेऊन फडकवण्यासाठी…
पांडुरंग पांडुरंग…..

— स्नेहा जैन

Author