पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीने पद्माकरकाकांचं पार्थिव आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या दरवाज्यासमोर डोळे मिटून हात जोडताच माझ्या मनाच्या पाखराने नागपुरातील धरमपेठेत झेप घेतली. खूप वर्षांपूर्वी आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांच्या नॉनस्टॉप बोलण्याच्या सवयीमुळे मला प्रश्न पडला ‘हा शब्दांचा नायगारा फॉल्स, की तोटी चोरीला गेल्यामुळे पाण्याचा अखंड वर्षाव करणारा नगरपालिकेचा सार्वजनिक नळ?’ त्या भेटीत काकांच्या संवादाच्या वन वे ट्रॅफिकमुळे बोलण्यासाठी तोंड उघडण्याची माझ्यावर वेळच आली नाही. पण त्यानंतरच्या भेटींमध्ये मात्र बोलण्याची टू वे ट्रॅफिक सुरु झाली आणि त्यांनी मला असंख्य प्रश्न विचारून पोहनकर फाउंडेशनच्या कार्याची माहिती करून घेतली व चक्क तोंड भरून कौतुक करून मला प्रचंड संकोचून टाकलं. आजच्या काळात इतरांबद्दल काही चांगलं ऐकायला मिळेल या भीतीमुळे लोक चौकशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि चुकून काही कळलंच तर कौतुक करण्याचा ‘गुन्हा’ तर अजिबात करत नाहीत. पण काका मात्र या मानवीय प्रवृत्तीला अपवाद ठरले होते !
मी नागपुरातच असल्यामुळे वेगवेगळ्या निमित्ताने आमच्या भेटी होऊ लागल्या. शोभामावशीच्या (डॉ. विजया दीक्षित) ट्युशन क्लासमधील मुलांमध्ये फडणवीसांचा गुटगुटीत देवड्या त्याच्या व्रात्यपणामुळे लक्ष वेधून घेत असे. भविष्यात तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असं भाकीत कोणी केलं असतं तर त्याला धरमपेठवासियांनी चक्क वेड्यात काढलं असतं !
वाढत्या वयामुळे काकांची प्रकृती ढासळू लागल्यामुळे त्या दोघांनाही नागपूर सोडून पुण्याला यावं लागलं. आम्हीही पुण्यात स्थायिक झाल्यामुळे पुन्हा आमच्या भेटी होऊ लागल्या पण माझ्या व्यस्ततेमुळे त्या भेटींची संख्या बरीच रोडावली. माझं पुस्तक प्रसिध्द झालं की त्याची एक प्रत त्यांना अगदी आवर्जून दिली जायची. ‘मिठातून समृध्दीकडे’ या माझ्या नव्या पुस्तकाबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी त्यांना भेटणार होतो. पण आमच्या भेटीच्या अवघ्या तीन तास आधी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आता त्या मनसोक्त गप्पा कधीही होणार नाहीत. आता ते कौतुकाने ओथंबलेले शब्द कानी पडणार नाहीत आणि पाठीवर शाबासकीची थाप देणारा हात या जगातून निघून गेल्याची खंत मात्र शेवटपर्यंत बोचत राहील.
पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीने पद्माकरकाकांचं पार्थिव आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या दरवाज्यासमोर डोळे मिटून हात जोडताच माझ्या मनाच्या पाखराने नागपुरातील धरमपेठेत झेप घेतली. खूप वर्षांपूर्वी आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांच्या नॉनस्टॉप बोलण्याच्या सवयीमुळे मला प्रश्न पडला ‘हा शब्दांचा नायगारा फॉल्स, की तोटी चोरीला गेल्यामुळे पाण्याचा अखंड वर्षाव करणारा नगरपालिकेचा सार्वजनिक नळ?’ त्या भेटीत काकांच्या संवादाच्या वन वे ट्रॅफिकमुळे बोलण्यासाठी तोंड उघडण्याची माझ्यावर वेळच आली नाही. पण त्यानंतरच्या भेटींमध्ये मात्र बोलण्याची टू वे ट्रॅफिक सुरु झाली आणि त्यांनी मला असंख्य प्रश्न विचारून पोहनकर फाउंडेशनच्या कार्याची माहिती करून घेतली व चक्क तोंड भरून कौतुक करून मला प्रचंड संकोचून टाकलं. आजच्या काळात इतरांबद्दल काही चांगलं ऐकायला मिळेल या भीतीमुळे लोक चौकशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि चुकून काही कळलंच तर कौतुक करण्याचा ‘गुन्हा’ तर अजिबात करत नाहीत. पण काका मात्र या मानवीय प्रवृत्तीला अपवाद ठरले होते !
मी नागपुरातच असल्यामुळे वेगवेगळ्या निमित्ताने आमच्या भेटी होऊ लागल्या. शोभामावशीच्या (डॉ. विजया दीक्षित) ट्युशन क्लासमधील मुलांमध्ये फडणवीसांचा गुटगुटीत देवड्या त्याच्या व्रात्यपणामुळे लक्ष वेधून घेत असे. भविष्यात तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असं भाकीत कोणी केलं असतं तर त्याला धरमपेठवासियांनी चक्क वेड्यात काढलं असतं !
वाढत्या वयामुळे काकांची प्रकृती ढासळू लागल्यामुळे त्या दोघांनाही नागपूर सोडून पुण्याला यावं लागलं. आम्हीही पुण्यात स्थायिक झाल्यामुळे पुन्हा आमच्या भेटी होऊ लागल्या पण माझ्या व्यस्ततेमुळे त्या भेटींची संख्या बरीच रोडावली. माझं पुस्तक प्रसिध्द झालं की त्याची एक प्रत त्यांना अगदी आवर्जून दिली जायची. ‘मिठातून समृध्दीकडे’ या माझ्या नव्या पुस्तकाबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी त्यांना भेटणार होतो. पण आमच्या भेटीच्या अवघ्या तीन तास आधी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आता त्या मनसोक्त गप्पा कधीही होणार नाहीत. आता ते कौतुकाने ओथंबलेले शब्द कानी पडणार नाहीत आणि पाठीवर शाबासकीची थाप देणारा हात या जगातून निघून गेल्याची खंत मात्र शेवटपर्यंत बोचत राहील.