स्त्री जातीचा मुकुटमणीं
महासती मान मिळोनी
धन्य झाली जीवनीं
पतीव्रता सावित्री ।।१।।
ब्रह्मा लिखित अटळ
ह्या सूत्रीं केला बदल
हे तिच्या तपाचे फळ
सावित्रीने मिळविले ।।२।।
जरी येतां काळ
चुकवावी वेळ
बदलेल फळ
हेच दाखविले तीने ।।३।।
समजण्या धर्म पतिव्रता
ऐकावी सावित्री कथा
मनीं भाव भरुनी येतां
आदर वाटे तिच्या परीं ।।४।।
मद्रदेशाचा नृपति
नांव तयाचे अश्वपति
कन्या त्याची सावित्री
प्रेम करी तिजवर ।।५।।
कन्या होती उपवर
धाडीले शोधण्या वर
राजा करी कदर
कन्येच्या इच्छेची ।।६।।
फिरुनी सर्व देशी
न मिळे कुणीही तीजशी
आली एका आश्रमापाशी
दृष्टीस पडला एक युवक ।।७।।
नजर त्यावरी पडूनी
स्तंभित राजकन्या होऊनी
रुप लागली न्याहाळूनी
सत्यवान युवकाचे ।।८।।
तेजोमय युवक पाहूनी
भान जाय हरपूनी
राजकन्येने वरिले मनोमनी
संकल्प लग्नाचा करी ।।९।।
राजपूत्र होता सत्यवान
पिता जाई राज्य गमावून
अंधत्व पित्याचे त्यास कारण
वनवासी झाले सारे ।।१०।।
सावित्री परतूनी घरीं
सर्व हकीकत कथन करी
आवड तिची सत्यवानापरी
मनीं त्यास वरिले ।।११।।
चर्चा करीत समयीं
नारदाचे आगमन होई
आनंदी भाव भरुनी येई
पुता पुत्रीचे ।।१२।।
वंदन करुनी देवर्षीला
कन्येचा संकल्प सांगितला
आशिर्वाद मागती लग्नाला
सावित्री सत्यवानाच्या ।।१३।।
नारद वदले खिन्न होऊनी
लग्न संकल्प द्यावा सोडूनी
विचार काढावा मनातूनी
सत्यवानाविषयी ।।१४।।
दुर्दैवी आहे सत्यवान
त्याची आयुष्यरेषा लहान
एक वर्षांत जाईल मिटून
जीवन त्याचे ।।१५।।
हे आहे विधी लिखीत
म्हणून होत निश्चीत
कोण करील बदल
त्यांत प्रभूविना ।।१६।।
ब्रह्मा लिखीत अटळ
झडप घालीतो काळ
न चुके कधी ही वेळ
हीच निसर्ग शक्ती ।।१७।।
थर्रर्र कापला नृपति
चकीत झाली सावित्री
ऐकून भयंकर भविष्याती
सत्यवानाच्या ।।१८।।
सावरोनी स्वतःशी
विचार करी मनासी
वदू लागली नारदासी
निश्चयीं स्वरानें ।।१९।।
प्रथम दर्शनी वरिले
मनोंमनीं पती मानिले
सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले
कशी त्यागू मी त्याना ।।२०।।
काया वाचा मन
सत्यवाना अर्पून
पति ठायी त्याना वरुन
ह्रदयीं बसविले ।।२१।।
निवड करता पतीची
मनीं बसवुनी प्रतिमा त्याची
कल्पना न यावी दुजाची
हाच स्त्रीधर्म ।।२२।।
सप्त-पावली हा उपचार
होण्या सर्व जगजाहीर
धार्मिक विधी एक प्रकार
राहिला असे ।।२३।।
स्त्रीचा असता हा धर्म
कां सुचविता अधर्म
सांगा यातूनीच मार्ग
सावित्री विनवी नारदासी ।।२४।।
पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति
करोनी पति भक्ति
ईश्वर मिळविण्याची युक्ती
सांगू लागले नारद ।।२५।।
पतिभक्ति करुन
तपसामर्थ्य येईल महान
तेच नेईल उद्धरुन
पावन होता प्रभू ।।२६।।
बघूनी सावित्रीचा निश्चय
नारद आनंदी होय
आशिर्वाद देऊनी जाय
नारायण नाम घेत ।।२७।।
दृढ निश्चयाची शक्ति
सावित्रीस चेतना देती
माहित असून भविष्याती
उडी घेई जीवनयज्ञांत ।।२८।।
राजकन्या सावित्री
सत्यवानासंगे वनाती
लग्न करोनी राहती
संसार करण्या ।।२९।।
पतीसी समजूनी देव
त्याचे ठायीं आदर भाव
मनीं बसवी त्यांचे नांव
अवरित ।।३०।।
नामात असते लय
लयांत एकाग्रता होय
एकाग्र मनी ईश्वरी भाव
परमेश्वर सान्नीध्याचा ।।३१।।
पति हाच परमेश्वर
न पूजे दुजा ईश्वर
सावित्री त्याचे चरणावर
अर्पण करी सेवा ।।३२।।
सेवेत असते तप
शक्तीचा तो दीप
प्रज्वलीत होईल आपोआप
तपः सामर्थ्य वाढता ।।३३।।
सोडूनी काळी काळाची
पर्वा नव्हती वेळेची
अंतरीक इच्छा समर्पणाची
पतीच्या अल्प अयुष्यी ।।३४।।
वर्षा अखेरचा दिवस भयाण
घेत विश्रांति सत्यवान
वटवृक्षाखाली होता झोपून
सावित्री देत मांडीचा आसरा ।।३५।।
आयुष्याची रेखा संपता
जीवन दोर जाई तुटतां
प्राणज्योत नेई यमदुता
त्याक्षणीं ।।३६।।
फांस घेऊन यमदूत
नेण्या सत्यवान प्राणज्योत
टाकले फांस गळ्यांत
सत्यवानाच्या ।।३७।।
सावित्रीची तपशक्ति देई
तिज दिव्य दृष्ठी
सोडून फास गळ्याभोवती
देई दूर फेकून ।।३८।।
यमदूत जाई घाबरुन
हतबल झाले ते बघून
सावित्रीची शक्ति जाणून
रिक्त हस्तें गेले यमपूरीं ।।३९।।
यमराज मृत्युदंडाधिपती
संतापून ते येती
नेण्या प्राणज्योती
सत्यवानाची ।।४०।।
यमराज प्रभूचे दिक् पाळ
मृत्युरुपी ते महाकाळ
अपूर्व त्यांचे बळ
राज्यकरीं यमपूरी ।।४१।।
नेवून मानव प्राणज्योत
कर्माप्रमाणे शिक्षा देत
पाठवूनी नविन देही परत
जीवन गाडा चालवी ।।४२।।
रेड्यावर बैसूनी
यमराज आले धाऊनी
हातीं फांस घेऊनी
प्राण नेण्या सत्यवानाचे ।।४३।।
बसूनी सत्यवाना शेजारीं
पतीधर्माचे ध्यान धरीं
रक्षण कवच उत्पन्न करी
पती पत्नी भोवती ।।४४।।
तपाची दिव्य शक्ति
यमराजासी येण्या रोकती
फांस त्याचे न पोहोंचती
सत्यवाना पर्यंत ।।४५।।
बघूनी ते तेजोवलय
यमराज चकीत होय
शोधूं लागला उपाय
सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत ।।४६।।
पतीकडून पाणी मागवून
सावित्रीस दूर सारुन
प्राण ज्योती घेई काढून
सत्यवानाची ।।४७।।
यमराज निघाला स्वर्गी
सावित्री त्याच्या मागे मार्गी
पतिव्रता शक्ति तिचे अंगीं
चेतना देई मार्गक्रमण्यास ।।४८।।
मनीं तिच्या पतिभृती
बघून अपूर्व शक्ति
यमराज प्रसन्न होती
सांगतले वर मागण्या ।।४९।।
श्वशुराचे अंधत्व गेले
राज्य तया परत मिळाले
वडीलांस पुत्र प्राप्त झाले
सावित्री मिळवी तीन वर ।।५०।।
न पावली समाधान
पाठलाग चालूं ठेवून
यमासी ठेवीत झुलवून
चर्चुनी विषय निराळे ।।५१।।
शेवटचा मी वर देईन
परी तू जावे परतून
मानव देहा स्वर्ग कठीण
कसे राहशील तूं तेथें ? ।।५२।।
जीवन आतां माझें व्यर्थ
न उरे जगण्या अर्थ
एकटेपणा ठरेल अनर्थ
माझ्या आयुष्यीं ।।५३।।
इच्छा माझी व्हावे माता
सानिध्य मुलाचे मिळतां
एकटेपणाचा भाव न राहता
उर्वरीत जीवनामध्यें ।।५४।।
पाठलाग घेण्या सोडूनी
तथास्तू म्हटले यमानी
मान्य तिची विनंती करुनी
वर देई तिला ।।५५।।
तथास्तू म्हणतां क्षणी
धरती गेली हादरुनी
भयंकर विजा चमकोनी
निसर्ग उत्पात माजला ।।५६।।
मान्य केले मातृत्व
नसता जीवित पितृत्व
शक्य कसे हे अस्तित्व
चुक उमगली यमराजा ।।५७।।
निसर्गाच्या नियमाला
तथास्तूने धक्का दिला
नियतीचा डाव उलटला
सावित्रीच्या शक्तिनें ।।५८।।
जसा सुटावा बाण
तसा शब्द जाऊन
यमराज पेचांत पडून
हारला सावित्रीपूढे ।।५९।।
सोडून देई प्राणज्योत
सत्यवान जीवदान मिळत
अखंड सौभ्याग्यवती वरदान
मिळाले सावित्रीला ।।६०।।
वटवृक्षाखालती
पाऊनी सतीशक्ति
जीवदान मिळती
सत्यवाना ।।६१।।
ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला
स्त्रीया पूजती वटवृक्षाला
अखंड मिळण्या सौभाग्याला
सावित्रीप्रमाणे ।।६२।।
पतिपत्नीतील प्रेमभाव
समजोनी मनाचा ठाव
एकमेका आदरभाव
हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली ।।६३।।
।। शुभंभवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर