पुस्तकांच्या दुनियेत सगळय़ात महत्त्व मिळते ते लेखकाला! त्याच्या प्रतिभेतून एखादी कलाकृती निर्माण होते तेव्हा त्याचे सारे श्रेय त्या निर्मिती करणाऱ्या लेखकालाच मिळते. त्या लेखकाने लिहिलेले शब्द पूर्वी लोखंडी खिळय़ांत आणि आता संगणकावर जुळवणाऱ्या ‘कंपोझिटर’चे किंवा जुळवलेले शब्द तपासणाऱ्या मुद्रितशोधकाचे किंवा पुस्तकाची छपाई करणाऱ्या आणि त्याचे बाइंडिंग करणाऱ्या कुणाचे नावही सहसा कधी प्रकाशात येत नाही.
(कायद्याने मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे आवश्यक असते, त्यामुळे ते छापले जाते, एवढेच!) एवढे सगळे झाल्यानंतर त्या पुस्तकाचे वाचकांपर्यंत जाणे ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट! त्यासाठी असणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांना तर कुणी ओळखतही नाही. पुस्तकांची भव्य दालने उभारणाऱ्यांची ही गत, तर रस्त्यावर बसून अल्प दरात ज्ञानदान करणाऱ्याला कोण कशाला पुसतो? पुण्यात भरलेल्या ८३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाने मात्र रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या पुण्यातल्या एका ज्ञानभक्ताच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करून एक औचित्यपूर्ण पायंडा पाडला असेच म्हणावे लागेल. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिराच्या बाहेरच्या कट्टय़ावर गेली ४० वर्षे जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे वसंत आठवले यांच्या मनात उद्घाटन करत असताना कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील? त्यांच्या दृष्टीने साहित्याच्या पंढरीत आपण वारकरी म्हणून सहभागी झाल्याचा कृतार्थ भाव असणे स्वाभाविक असले, तरी पुस्तकांच्या दुनियेतील सर्वात शेवटच्या पायरीवरचा हा पालखीचा भोई किती महत्त्वाचा आहे, याचे भान यानिमित्ताने साहित्य व्यवहारातल्या सगळय़ांनाच आले, हे फार चांगले झाले. आपले वडील यशवंत नारायण आठवले यांनाश्रेय देताना वसंत आठवले यांना त्यांचा जुनी पुस्तके जमविण्याचा छंद आठवतो. वडील रंगभूमीवर छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत होते आणि त्यांचा गंधर्व संगीत नाटक मंडळींशी जवळचा संबंध होता. (‘एकच प्याला’च्या शेवटच्या प्रयोगात त्यांनी बालगंधर्वाबरोबर ‘सुधाकर’ची भूमिका केली होती!) चित्रपटांच्या आगमनानंतर मराठी रंगभूमीची जवळजवळ वाताहत झाली आणि यशवंतरावांना त्यांचा छंद उपयोगी पडला. तेव्हा वसंतराव तारुण्यात पदार्पण करत होते. बालगंधर्व हे वसंतरावांचेही दैवतच! बालगंधर्वावरील पुस्तकाच्या किमान पंधराशे प्रती विकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. किलरेस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयातल्या नोकरीतून त्यांनी १९८५मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यापूर्वीपासूनच म्हणजे ७१पासून त्यांनी जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांचे सोबती म्हणून आठवले यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. जुनी पुस्तके ही केवळ त्यातील साहित्यमूल्यांमुळेच विक्रीयोग्य होतात, याचे उत्तम भान वसंतरावांकडे आहे. त्यामुळे उत्तम पुस्तके मिळवणे आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे यातील जो अपूर्व आनंदाचा भाग आहे, तो वसंतरावांना अनेक वेळा मिळाला आहे. जरी त्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा पैसा यथातथाच असला, तरी त्यांना पुस्तकाचे मूल्य फार उत्तम रीतीने जाणवते, असा निर्वाळा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आणि संशोधकांनी दिला आहे. अनेक साहित्यिकांशी जवळची ओळख किंवा मैत्री असली, तरी वसंतरावांच्या चेहऱ्यावर त्याचे जराही प्रदर्शन कधी होत नाही. त्यांच्या दृष्टीने पुस्तकांचे प्रेम हेच खरे आणि टिकाऊ! गेली अनेक वर्षे सरस्वती मंदिराच्या कट्टय़ावर पुस्तके विकणाऱ्या या पुस्तक विक्रेत्याला रद्दीवाला म्हणून संबोधण्याची कुणाची हिंमतही होणार नाही, असे कार्य या व्यक्तीने केले आहे. शनिवारवाडय़ाचा १८१८ (म्हणजे ज्या वर्षी ब्रिटिशांनी याच वाडय़ावर युनियन जॅक फडकवला.) आणि १८२८ मधील नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला, तो केवळ वसंतराव आठवले यांच्यामुळेच! जुन्या पुस्तकांमधील ज्ञानाचे अचूक निदान करता येण्यासाठी आवश्यक अभ्यास असणारा हा ज्ञानसाधक साहित्य संमेलनामुळे रस्त्यावरून साहित्याच्या व्यासपीठावर विराजमान झाला, हीच महत्त्वाची गोष्ट!
पुस्तकांच्या दुनियेत सगळय़ात महत्त्व मिळते ते लेखकाला! त्याच्या प्रतिभेतून एखादी कलाकृती निर्माण होते तेव्हा त्याचे सारे श्रेय त्या निर्मिती करणाऱ्या लेखकालाच मिळते. त्या लेखकाने लिहिलेले शब्द पूर्वी लोखंडी खिळय़ांत आणि आता संगणकावर जुळवणाऱ्या ‘कंपोझिटर’चे किंवा जुळवलेले शब्द तपासणाऱ्या मुद्रितशोधकाचे किंवा पुस्तकाची छपाई करणाऱ्या आणि त्याचे बाइंडिंग करणाऱ्या कुणाचे नावही सहसा कधी प्रकाशात येत नाही.
(कायद्याने मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे आवश्यक असते, त्यामुळे ते छापले जाते, एवढेच!) एवढे सगळे झाल्यानंतर त्या पुस्तकाचे वाचकांपर्यंत जाणे ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट! त्यासाठी असणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांना तर कुणी ओळखतही नाही. पुस्तकांची भव्य दालने उभारणाऱ्यांची ही गत, तर रस्त्यावर बसून अल्प दरात ज्ञानदान करणाऱ्याला कोण कशाला पुसतो? पुण्यात भरलेल्या ८३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाने मात्र रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या पुण्यातल्या एका ज्ञानभक्ताच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करून एक औचित्यपूर्ण पायंडा पाडला असेच म्हणावे लागेल. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिराच्या बाहेरच्या कट्टय़ावर गेली ४० वर्षे जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे वसंत आठवले यांच्या मनात उद्घाटन करत असताना कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील? त्यांच्या दृष्टीने साहित्याच्या पंढरीत आपण वारकरी म्हणून सहभागी झाल्याचा कृतार्थ भाव असणे स्वाभाविक असले, तरी पुस्तकांच्या दुनियेतील सर्वात शेवटच्या पायरीवरचा हा पालखीचा भोई किती महत्त्वाचा आहे, याचे भान यानिमित्ताने साहित्य व्यवहारातल्या सगळय़ांनाच आले, हे फार चांगले झाले. आपले वडील यशवंत नारायण आठवले यांनाश्रेय देताना वसंत आठवले यांना त्यांचा जुनी पुस्तके जमविण्याचा छंद आठवतो. वडील रंगभूमीवर छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत होते आणि त्यांचा गंधर्व संगीत नाटक मंडळींशी जवळचा संबंध होता. (‘एकच प्याला’च्या शेवटच्या प्रयोगात त्यांनी बालगंधर्वाबरोबर ‘सुधाकर’ची भूमिका केली होती!) चित्रपटांच्या आगमनानंतर मराठी रंगभूमीची जवळजवळ वाताहत झाली आणि यशवंतरावांना त्यांचा छंद उपयोगी पडला. तेव्हा वसंतराव तारुण्यात पदार्पण करत होते. बालगंधर्व हे वसंतरावांचेही दैवतच! बालगंधर्वावरील पुस्तकाच्या किमान पंधराशे प्रती विकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. किलरेस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयातल्या नोकरीतून त्यांनी १९८५मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यापूर्वीपासूनच म्हणजे ७१पासून त्यांनी जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांचे सोबती म्हणून आठवले यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. जुनी पुस्तके ही केवळ त्यातील साहित्यमूल्यांमुळेच विक्रीयोग्य होतात, याचे उत्तम भान वसंतरावांकडे आहे. त्यामुळे उत्तम पुस्तके मिळवणे आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे यातील जो अपूर्व आनंदाचा भाग आहे, तो वसंतरावांना अनेक वेळा मिळाला आहे. जरी त्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा पैसा यथातथाच असला, तरी त्यांना पुस्तकाचे मूल्य फार उत्तम रीतीने जाणवते, असा निर्वाळा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आणि संशोधकांनी दिला आहे. अनेक साहित्यिकांशी जवळची ओळख किंवा मैत्री असली, तरी वसंतरावांच्या चेहऱ्यावर त्याचे जराही प्रदर्शन कधी होत नाही. त्यांच्या दृष्टीने पुस्तकांचे प्रेम हेच खरे आणि टिकाऊ! गेली अनेक वर्षे सरस्वती मंदिराच्या कट्टय़ावर पुस्तके विकणाऱ्या या पुस्तक विक्रेत्याला रद्दीवाला म्हणून संबोधण्याची कुणाची हिंमतही होणार नाही, असे कार्य या व्यक्तीने केले आहे. शनिवारवाडय़ाचा १८१८ (म्हणजे ज्या वर्षी ब्रिटिशांनी याच वाडय़ावर युनियन जॅक फडकवला.) आणि १८२८ मधील नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला, तो केवळ वसंतराव आठवले यांच्यामुळेच! जुन्या पुस्तकांमधील ज्ञानाचे अचूक निदान करता येण्यासाठी आवश्यक अभ्यास असणारा हा ज्ञानसाधक साहित्य संमेलनामुळे रस्त्यावरून साहित्याच्या व्यासपीठावर विराजमान झाला, हीच महत्त्वाची गोष्ट!