पहाटेच्या दवात भिजलेली एक वाट,
क्षितिजापर्यंत पसरलेली नामाची प्रभात.
खांद्यावर भगवी पताका, ओठी विठ्ठलनाम,
पाऊलोपाऊली उमलत जाते जीवनाचे गूढ धाम.
ही वाट केवळ पंढरीकडे वळत नाही,
ती माणसाला माणसाशी जोडत राहते.
हातात हात, नजरेत विश्वास,
मनामनांतील अंतर हळू हळू कमी होतं जाते.
टाळांच्या नादात केवळ लय नसते,
ती काळजाच्या ठोक्यांची भाषा असते.
मृदंगाच्या प्रत्येक स्पंदनातून
संतविचारांचा नवा सूर जन्म घेतो.
इथे पुस्तकांची पाने उघडत नाहीत,
उघडतात अंतःकरणाची कवाडे.
इथे अक्षरांपेक्षा माणसे वाचावी लागतात,
आणि शब्दांपेक्षा अश्रू समजून घ्यावे लागतात.
पायांवरील फोड सांगतात कष्टाचे सौंदर्य,
घामाचे थेंब शिकवतात संयमाचे ऐश्वर्य.
दुःखाच्या वाटेवर चालतानाच
सुखाचा अर्थ उलगडत जातो.
दिंडीत चालताना जातपात नाहीशी होते,
अहंकार धुळीत मिसळतो.
उरते फक्त एकच ओळख
“मी वारकरी… विठ्ठल माझा.”
चंद्रभागेच्या वाळूत
काळही क्षणभर नतमस्तक होतो.
विटेवरच्या सावळ्या मूर्तीकडे पाहताना
डोळे भरून येतात,
आणि अंतर्मनात प्रकाश उगवतो.
वारी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ
अनुभव हा गुरु,
जीवन हे पाठ्यपुस्तक,
भक्ती ही परीक्षा,
आणि पदवी मिळते माणूस झाल्याची.
जो ही वाट एकदा मनापासून चालतो,
तो पंढरीहून कधीच पूर्वीसारखा परतत नाही.
त्याच्या पावलांनी अंतर जिंकलेले नसते,
त्याच्या अंतःकरणाने विश्व कवटाळलेले असते.
विठ्ठल भेटतो विटेवर नव्हे,
तर माणसाच्या माणूसपणात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212