ती अन् मी

आज हे गाणं ऐकलं आणि तुमच्यासमोर थोडसं व्यक्त व्हावसं वाटलं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी बरंच काही गमावलं आहे. पुन्हा माणसाला माणसाची किंमत कळली आहे. पैसा, भौतिक सुखांच्यापेक्षाही कितीतरी पट अधिक माणसांना माणूसच हवा याची जाणीव झाली आहे.



हर पल यहा जी भर जियो
जो है समा कल हो ना होऽऽ

आज हे गाणं ऐकलं आणि तुमच्यासमोर थोडसं व्यक्त व्हावसं वाटलं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी बरंच काही गमावलं आहे. पुन्हा माणसाला माणसाची किंमत कळली आहे. पैसा, भौतिक सुखांच्यापेक्षाही कितीतरी पट अधिक माणसांना माणूसच हवा याची जाणीव झाली आहे.

आतापर्यंत सगळं सुरळीत सुरू होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. पुन्हा सगळे आपापल्या कामांसाठी, उद्योगांसाठी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. शाळा, बँका, कार्यालये पूर्ववत चालू झाली आहेत. पुन्हा स्त्रिया कार्यालयात जाण्यासाठी घाईघाईने सोसायटीतून बाहेर पडताना दिसू लागल्या. घरातील सगळं आवरून मग कार्यालयात जाण्यासाठी बस, रिक्षा जे मिळेल ते पकडून वेळेवर पोहचण्याची घाई. मास्क लावलेल्या त्या चेहऱ्यावरही ती काळजी, तळमळ दिसून येते. तेव्हा समोरच्याने जर म्हटलं ‘सुप्रभात! दिवस छान जावो!’ तर नकळत त्या चेहऱ्यावर हसू आणि एक वेगळेच समाधान दिसून येते. तसेच घरातील वडील मंडळी आजी-आजोबा असोत त्यांना वाटतं उगाचच मधे-मधे नको म्हणून ते आपले एका बाजूला समजून रहातात. अशावेळी त्यांनाही जाणीव करून द्यावी की तुम्हीही आमचाच एक महत्त्वाचा भाग आहात. तुमच्या मार्गदर्शनाची, विचारपूस करण्याची, आशीर्वादाची आम्हालाही तितकीच गरज आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर फिरायला जाणे, कार्यक्रमांना जाणे, त्यांना आवडणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या सहभागाने करणे, त्यांना आनंद व समाधान देण्याचे मोठे काम करते.

लहान मुलाचे विश्व तर वेगळेच असते. त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचे होऊन जर सामावलो, तर त्यांच्या इतके निर्मळ मित्र/मैत्रीण कोणीही नाही. मग आपले सगळे दुःख, चिंता, काळज्या घटकाभर विसरून आपल्या मनाला वेगळीच शांतता समाधान मिळते.

खरं तर माणूस हा मुळात समाजप्रिय प्राणी आहे. निसर्गात रमणारा. पण आजच्या जीवनशैलीत सगळं विसरून पैशाच्या मागे धावणे सुरू आहे. पण कोरोनासारख्या आजाराने पुन्हा माणसाला विचार करण्यास भाग पाडले आहे. आपल्याला काय हवंय? का ही धावाधाव, काही हरवत नाही ना आपण?

मग चला पुन्हा छान नवी सुरुवात करूया, मला व माझ्या सारख्या माझ्या अनेक मैत्रिणींना, सख्यांना एक ठिकाण, जागा, मंच मिळाला आहे. ज्याचे नाव म्हणजे ‘राज्ञी’ आज मी अगदी रुळलेली नसली तरी राज्ञीचीच एक सभासद आहे. इथे आम्हाला आमच्या कलागुणांना वाव मिळतोय. स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन मिळते आहे. आपल्या भावना, मते व्यक्त करण्यासाठी, आपल्यासाठी आपले आपुलकीचे असे एक व्यासपीठ मिळाले आहे. असे आवडते ठिकाण, जिथे काही क्षण सगळं विसरून फक्त आपल्यातल्या आपल्यासाठी काही करण्याची संधी मिळते. त्यासाठी ‘व्यास क्रिएशन्स्’ व ‘राज्ञी’चे मनापासून खूप आभार !

मागे वळून बघताना,
मनाचे पडदे उघडताना,
साठून आले आठवणींचे ढग,
वाहून गेले मन कोस अन् कोस
आठवणींच्या पावसाची गंमतच न्यारी
पुन्हा आठवली शाळेतली दोस्ती-यारी
त्या दिवसांची मनावर छाप भारी
अजूनही नाही अडवता येत
डोळ्यांतल्या आनंदाच्या सरी

– नीलाक्षी मंत्री

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Author