मे महिन्याचे दिवस होते . चार दीपावली अंकांना लघुकथा पाठवून झाल्या होत्या . एका दीपावली अंकासाठी दीर्घकथा लेखन चालू होते .
आणि अचानक मेनका च्या संपादकांचा – राजाभाऊ बेहरे – यांचा फोन आला . ” मेनकासाठी भुईचाफा कथा मिळाली . आता जत्रा दीपावली अंकासाठी विनोदी कथा हवी आहे . सांगायला उशीर झाला आहे , पण कितीही उशीर झाला तरी कथा पाठवा . ”
बेहरे यांना नकार देणं शक्यच नव्हतं .
मी म्हटलं , ” मी विनोदी लेखन कधी केलं नाही , पण प्रयत्न करतो . आवडली नाही कथा तर साभार परतीचा पर्याय मला आवडेल . ”
पलीकडून हसण्याचा आवाज आला .
आणि नेहमीप्रमाणे मी डोक्याला हात लावून बसलो .
भिडस्त स्वभावामुळे कुणाला नकार देता येत नव्हता . आणि इथे राजाभाऊंचा शब्द होता .
त्यांना नकार देणं म्हणजे कृतघ्नपणा ठरला असता .
कारण माझी पहिली कादंबरी मेनका प्रकाशनामार्फत त्यांनीच प्रकाशित केली होती . त्यासाठी पुन्हा पुन्हा लेखन करायला लावून माझ्यातल्या लेखकाला आकार देण्याचे काम केले होते . ती कादंबरी मी तीन वेळा लिहिली होती . विषय आवडल्यामुळे त्यांनी लेखनाचा आग्रह धरला होता . त्यांची माझी साधी ओळखही नव्हती . कादंबरीचे पहिले हस्तलिखित तयार झाल्यावर कुणाला पाठवावे म्हणून विचारात असताना , रत्नागिरीच्या स्टँडवर एका बुकस्टॉल वर मेनकाचा अंक दृष्टीस पडला . त्यावरचा पत्ता लिहून घेतला आणि घरी हरचिरीला आल्यावर ते हस्तलिखित त्यांना पोस्टाने पाठवून दिले . पंधरा दिवसांनी ते साभार परत आले . सोबत चुका दाखवणारे आणि पुन्हा लेखन करा असा आग्रह धरणारे पत्र होते . मी ते बाड फाडून नव्याने लेखन केले . तेही पंधरा दिवसात परत आले . मी निराश झालो . पण बेहेरेंचं एका महिन्याने पत्र आलं , कादंबरीचं लेखन कुठपर्यंत आलं याची विचारणा करणारं .
मग मात्र मी सगळ्या चुका लक्षात घेत , नवीन शैलीत लेखन केले , आणि कादंबरी पाठवून दिली . मनाशी पक्का निश्चय केला , की आता हस्तलिखित परत आले तर कधीही लेखन करायचे नाही .
पण अहो आश्चर्यम !
कादंबरी स्वीकारल्याचे , ती मेनका मासिकात क्रमशः प्रसिद्ध करण्याचे , त्यानंतर पुस्तक काढण्याचे , मानधनाचे करारपत्रच त्यांनी पाठवून दिले होते .
तेव्हा मी हरचिरी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत होतो .
आई अण्णांना खूप आनंद झाला होता . अर्थात मलाही गगन ठेंगणे वाटत होते .
त्या एका पत्राने माझे सगळे आयुष्यच बदलून गेले .
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध केल्या . मेनका , रविवारची जत्रा यासारख्या अंकातून त्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी दिली . महाराष्ट्रात जिथे जिथे एस टी स्टँड होते त्या त्या ठिकाणी त्यांची मासिके आणि साप्ताहिके खूप विकली जात होती . त्यामुळेच मला खूप मोठा वाचकवर्ग लाभला . फॅन मेल च्या पत्रांनी माझ्याकडच्या फाईल्स भरून जाऊ लागल्या .
हरचिरीला आमच्याकडे अगदी क्वचित पत्र घेऊन येणारा पोस्टमन आता आठवड्यातून तीन तीनदा येत होता .
आई अण्णांना त्याचेही खूप अप्रूप वाटत होते . त्यांचाही वेळ चांगला जाऊ लागला होता . किंबहूना माझ्यापेक्षा अण्णांच आता पोस्टमन ची वाट बघू लागले होते .
या प्रसिद्धीचा आणखी एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे अन्य दिवाळी अंकांसाठी लेखन पाठवण्याची विनंती करणारी पत्रे येऊ लागली होती .
महाराष्ट्र टाइम्स , कालनिर्णय , लोकसत्ता , अंतर्नाद , किस्रीम अशा अनेक अंकांसाठी मी लेखन करू लागलो . ( त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीनच . )
— पण जत्रा साठी विनोदी कथा लिहिणे , आव्हानच होते .
त्याचवेळी मुंबईला नातेवाईकांकडे लग्न होते आणि जाणे गरजेचे होते . एसटी ने जाण्यापेक्षा मी रेल्वेने जायचे ठरवले .
त्याकाळात दादर पॅसेंजर ही माझी अतिशय आवडती ट्रेन होती .
मी अनेक वेळेला त्यातून प्रवास केलेला आहे .
रत्नागिरीहून जाताना किंवा दादरहून येताना प्रचंड गर्दी असायची . पण बसायला जागा मिळत असे . अर्थात थोडी घुसखोरी करायला लागायची . पण मजा यायची .
त्या गाडीत एकदा चढायला मिळाले की वेगवेगळ्या चवींचा चहा , खाण्याचे विविध पदार्थ , विविध वस्तू विकणारे विक्रेते , पाणी , कोल्ड्रिंक्स असं काही काही मिळायचं . तेही स्वस्तात .
गाडीत खाण्यासाठी घरून काही नेलेलं मला आठवत नाही . एक मात्र आठवतंय , रत्नागिरीहून जाताना चिपळूण किंवा खेड स्टेशनवर एक म्हातारे गृहस्थ , गरमागरम उपमा विकायला यायचे . तो मात्र मी आवडीने घेत असे . स्टीलच्या स्वच्छ डब्यात ते उपमा घेऊन यायचे आणि गोड हसत विकायचे . अनेकांना त्यांच्या उपम्याने वेड लावले होते . डबा रिकामा झाला की पुढच्या स्टेशनला ते उतरून जायचे . त्यांच्या उपम्याची चव अजून आठवते .
पण खरी मजा यायची ती प्रवाशांच्या गप्पा ऐकण्यात .
अगदी घरात असल्यासारखे प्रवासी मोठमोठ्यांदा बोलायचे , गप्पा मारायचे . बायकासुद्धा बडबडत असायच्या . सासरच्या व्यथा , माहेरच्या आठवणी , मुलांची प्रगती असं सगळं त्या एकमेकींना सांगायच्या .
मला त्या सगळ्यांच्या गप्पांचा हेवा वाटायचा . कोण काय म्हणेल , मॅनर्स याचा विचारही लोक करत नसत . सगळी बोगी म्हणजे गप्पांचा पार वाटायचा .
खरं सांगायचं तर दादर पॅसेंजर मधून प्रवास करण्याचा माझा हेतू स्वच्छ होता . एक म्हणजे आपल्याकडे कोण बघतंय की काय याचा विचार न करता आवडेल तो पदार्थ विकत घेऊन हादडता येत होता आणि गप्पा ऐकता येत होत्या .
आणि खोटं कशाला बोलू , मला कथांसाठी त्या गप्पांतून कथाबीजं सुद्धा मिळत होती . व्यक्तिरेखा सापडत होत्या . मानवी भावभावनांचा कल्लोळ अनुभवायला मिळत होता . ( त्याविषयी पुन्हा केव्हातरी )
तर त्या ट्रेन ने प्रवास करताना कोकणी बाण्याचे काही प्रवासी इलेक्शनवर जोरजोरात वाद घालत होते . नेहमीच्या सवयीनं शिव्या , कुळाचा उध्दार, उमेदवारांचा भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे रंगत होते .
त्या गप्पा ऐकताना अचानक कुणी तरी म्हणाला , ‘ आजच्या काळात निवडून यायचे असेल तर साध्या सरळ माणसाला मुश्किल होऊन जाईल , त्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला सुद्धा इतर भ्रष्ट उमेदवारांसारखे वागावे लागेल .’
अर्थात हे म्हणताना तो ज्या शिव्या वापरत होता त्या इथे लिहिण्यासारख्या नाहीत .
पण मला ते वाक्य खूप काही देऊन गेले .
आणि जत्रा दीपावली अंकासाठी , शीर्षकासह कथा मनात आकार घेऊ लागली .
त्यावर्षी चिमणरावांची निवडणूक ही विनोदी कथा मी लिहिली आणि राजाभाऊंना पाठवली . त्यांनाही ती कथा खूप आवडली आणि नंतर वाचकांनाही .
आज दादर पॅसेंजर ही ट्रेन आठवली त्या ट्रेनने सुद्धा मला लेखक होण्यात किती मोलाची कामगिरी बजावली आहे . याचे स्मरण झाले .
आणि कोकण रेल्वेला सलाम करावासा वाटला !
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
दिनांक : २५ जुलै २०२५
८९५१९०६७०१
—————
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही