श्रीहरी स्तुति – २६

भगवंताच्या प्राप्तीचा भगवंताने स्वतः दाखवलेला मार्ग म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. त्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाच्या आधारे परमतत्वाला प्राप्त करता येते, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,



दृष्ट्वा गीतास्वक्षरतत्त्वं विधिनाजं
भक्त्या गुर्व्या लभ्य हृदिस्थं दृशिमात्रम्।
ध्यात्वा तस्मिन्नस्म्यहमित्यत्र विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२६।।

भगवंताच्या प्राप्तीचा भगवंताने स्वतः दाखवलेला मार्ग म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. त्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाच्या आधारे परमतत्वाला प्राप्त करता येते, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,

दृष्ट्वा गीतास्वक्षरतत्त्वं विधिना – गीतेत सांगितलेल्या विधीने त्या अक्षर तत्वाला पाहून.
इथे त्या परमात्म्याला अक्षर असे म्हटले आहे. अक्षर ओमकार ब्रह्माला म्हणतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्या तत्त्वाच्या दर्शनाचा मार्ग दाखविला आहे.
सामान्य जगातील गोष्टी सामान्य दृष्टीने दिसतात. भगवत् तत्त्वाचे दर्शन म्हणताना तसे दर्शन अपेक्षित नाही.
भगवंताला आपले विराट रूप दाखविण्या पूर्वी भगवान स्पष्ट स्वरुपात म्हणाले,
दिव्यं ददामि ते चक्षु: पश्य मे योगमैश्वरम् ! मी तुला दिव्य चक्षू अर्थात दृष्टी प्रदान करतो.
त्यानंतर अर्जुनाने भगवंताचे स्वरूप पाहिले. श्रीमद्भगवद्गीतेचे हेच सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे की त्यात केवळ चर्चा नाही तर प्रत्यक्ष दर्शन आहे.
अजं – कधी जन्माला न आलेले. सनातन , चिरंतन तत्व. त्याचे दर्शन घ्यावे.
ते केवळ विश्वदर्शन स्वरूपात नव्हे तर,
भक्त्या गुर्व्या लभ्य हृदिस्थं दृशिमात्रम् – गुरु अर्थात प्रखर भक्तीने प्राप्त होणाऱ्या त्या तत्त्वाला हृदयात पहावे.
ध्यात्वा तस्मिन्नस्म्यहमित्यत्र विदुर्यं – त्याला जाणल्यानंतर त्याच्यात मी आहे असे जो जाणतो. अर्थात सर्व विश्वात व्याप्त असणारे तेच चैतन्य आहे. मी ज्या विश्वात असल्याने, मी त्यातच सामावलेलो आहे. अशा स्वरूपात ज्यांना जाणल्या जाते
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

Author