जन्म: ५ मे १९१६
मृत्यू: २५ डिसेंबर १९९४
झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली.
कार्यकाळ: २५ जुलै १९८२ ते २५ जुलै १९८७

भारताचे सातवे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात फरीदकोट (पंजाब) जिल्ह्यातील सांधवान या गावी झाला. वडील किशन सिंग हे शेतीबरोबरच पिढीजात हस्त व्यवसाय करीत असत. ग्यानी झैल सिंग लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
ग्यानी झैल सिंग प्राथमिक शिक्षण घेत असतानाच कुटुंबीयांना शेतावर मदत करीत असत. शिवाय अन्य कष्टाची कामेही त्यांनी केली. त्यामुळे त्यांचे औपचारिक शिक्षण बेताचेच झाले होते; तथापि त्यांनी आपला वाचनाचा व्यासंग वाढविला. पंजाबी भाषेबरोबरच हिंदी आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व मिळंविले आणि शहीद शीख मिशनरी कॉलेजमध्ये (अमृतसर) ग्रंथसाहिब या धर्मग्रंथाचे सुक्ष्म पठण व अध्ययन केले. त्यांच्या या क्षेत्रातील प्राविण्यामुळे त्यांना ग्यानी म्हणजेच ज्ञानी अशी पदवी लाभली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांना कारावासही झाला. ते छोडो भारत आंदोलनात सहभागी झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्य पुनर्रचनेत पतियाळा ॲण्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन (पेप्सू ) राज्याच्या त्यांनी विविध मंत्रिपदे भूषिवली. ते काही काळ पंजाबचे मुख्यमंत्रीही होते. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ग्यानी झैल सिंग यांच्याकडे गृहखाते सोपविण्यात आले. या काळात पंजाबात, विशेषतः अमृतसरमध्ये भिंद्रानवाले आणि आसाममध्ये आसाम गणतंत्र परिषद या गटांनी राज्यशासनाने हादरून सोडली होती. झैल सिंग यांनी नेहमीच शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.