साठा करावा योग्यरितीने (सुमंत उवाच – १००)

सुमंत जयंत परचुरे. 

स्वकष्टाने केलेले कर्म, स्वकष्टाने सुचलेले शब्द, आतून आलेले लिखाण हे जगास उपयुक्त ठरते. हे श्री समर्थांच्या कडे पाहून मनोमन पटते.



साठा करावा योग्यरितीने
न ठेवावा हात मारोनी
हात लावावा जरूर वाढण्या
स्वकष्टाने!!

अर्थ

श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या कोणत्याही लेखनाला स्पर्श केला तरी त्यातलं मर्म काही अंशी का होईना आपल्यात येतेच येते. पण ते मर्म साधण्यासाठी कर्माला काही प्रमाणात तरी आपलेसे करावे लागते.

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला हवे असते आईचे दूध, बाकी त्याला काही पडलेली नसते की जगात सर्वत्र काय सुरू आहे, कोण कोणाच्या जीवावर उठलं आहे किंवा कोण कोणासाठी मरमर मरत आहे. उत्तम आरोग्यासाठी त्याला आईच्या दुधाशिवाय दुसरा पर्याय नसतो. हे ठरवते कोण? जन्मलेलं बाळ की त्याचे पालक? बाळास काय बुद्धी जन्मल्या, त्यास काय हो कळते, तो तर जगण्यासाठी येतो, मातृत्वातूनी बाहेर!

पण तेच बाळ जेव्हा मोठं होतं तेव्हा मात्र केवळ साठवणूक करताना त्याच्या पालकांशी वैर घडले तर? ऐकून चटका लावून जाते हे वाक्य मनाला, पण आज कित्येक घरात ही सद्यपरिस्थिती आहे.

साठा करावा योग्य रीतीने यासाठीच की त्याची पोचपावती ही मिळाली पाहिजे. केवळ देणाऱ्याने देत जावे अन घेणाऱ्याने घेत जावे हे आता भयंकर वाटते.

हात मारोनी घेतले की त्यात हव्यास, लोभ, बळकावण्याची भावना जागृत झाली समजावे आणि अशा लोकांपासून दहा हात दूर रहावे. पण हात मारून घेण्यापेक्षा हात लाऊन वाढायला मदत झाली तर आनंद तर मिळतोच पण सुख, स्थेर्य, समृद्धी, आपलेपण ही टिकून रहाते. आणि स्वकष्टाने केलेले कर्म, स्वकष्टाने सुचलेले शब्द, आतून आलेले लिखाण हे जगास उपयुक्त ठरते. हे श्री समर्थांच्या कडे पाहून मनोमन पटते.

— सुमंत परचुरे.

Author

सुमंत जयंत परचुरे.