त्यांच्या स्वभावातच अणकुचीदारपणा होता. टीका करायची तर ती समोरच्या व्यक्तीला बोचणारीच असली पाहिजे, तरच त्या टीकेला काही अर्थ असे. आपले म्हणणे स्पष्टपणे समोरच्याला समजेल अशा भाषेत सांगताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. चित्रे काढायची तर त्यातही कुंचल्याचा फटकारा ‘शार्प’ असे. कुशल प्रशासक, कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला न जाता समाजाशी कायम आपले लागेबांधे ठेवणारा आणि तरीही राज्याचा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी मनाचा हळवा कोपराही जपणारा असे एक वेगळे रसायन सदाशिवराव तिनईकर यांच्यात होते.
म्हणूनच शिवसेनेशी शाब्दिक दोन हात करणारे आयुक्त तिनईकर महाराष्ट्राच्या ‘मराठी’ सांस्कृतिक ठेव्याला उत्तेजन देण्यासाठीही प्रयत्नरत असत. दर महिन्याला विविध प्रांतांतील सर्वोत्तम गायक, वादकांना आमंत्रित करून त्यांची कला निमंत्रितांपुढे ते सादर करत. एका वर्षी तुकाराम बीज साजरी करण्यासाठी त्यांनी वि. स. पागे यांचे कीर्तन आयोजित केले होते. राज्य सरकारने वेदपठण करणाऱ्या मंडळींचा सत्कार केला तेव्हा त्या मंडळींना त्यांनी आयुक्तांच्या बंगल्यावर बोलवून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. वाङ्मय, साहित्य, कला यात रुची असणाऱ्या तिनईकरांचे इंग्रजीवर फर्डे प्रभुत्व होते. मुंबईत सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांना सुरुवात झाली ती त्यांच्याच काळात. स्वातंत्र्योत्तर काळात देशात नवनिर्माणाच्या संकल्पनेचा पुरस्कार करणारी उच्चविद्याविभूषितांची जी एक तडफदार पिढी उदयाला आली तिची अस्सल ओळखमुद्रा म्हणजे सदाशिव तिनईकर. भारतीय प्रशासन सेवेच्या माध्यमातून सरकारच्या विविध विभागांची शक्य तितकी ‘साफसफाई’ करणाऱ्या या कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्वाच्या कारकीर्दीचा अखेरचा टप्पा म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद. तिनईकरांनी अशी काही कामगिरी बजावली की, ती एखाद्या सनदी अधिकाऱ्याने आपल्या सत्यान्वेषणाच्या भूमिकेबाबत अखेपर्यंत कसे आग्रही असायला हवे, याचा वस्तुपाठ ठरली. भारतीय प्रशासन सेवेच्या १९५६ च्या तुकडीतून जे पाच अधिकारी महाराष्ट्राच्या सेवेत आले त्यापैकी तिघे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. जमशेद कांगा, द. म. सुकथनकर आणि सदाशिव तिनईकर. या तिघांनीही आयुक्तपदाच्या कारकीर्दीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. मात्र तिनईकर हे सर्वार्थाने ‘मुंबईकर’ ठरले. या शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि त्यांनी हे शहर बकाल होण्यास कारणीभूत असणाऱ्या प्रवृत्तींवर अंकुश ठेवला. तो ज्यांना रक्तबंबाळ करून गेला त्या सत्ताधारी शिवसेनेने अर्थातच तिनईकरांविरोधात आकांडतांडव केले. विशेषत: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि तिनईकर यांचे महापौर आणि आयुक्तांच्या अधिकारांबाबत तीव्र मतभेद झाले. मात्र नियम आणि कायद्यापुढे कुणीही व्यक्ती मोठी नाही, हे तत्त्व तिनईकरांनी ठामपणे पाळले. त्यांची शिवसेनाविरोधाची ही प्रतिमा एवढी मोठी झाली की, काही काळ हीच त्यांची ओळख ठरली. मात्र हे चित्र खरे नव्हते. याचे कारण तिनईकरांची तळमळ ही महानगरपालिकेतील आर्थिक बजबजपुरीविरोधात होती. तिनईकरांच्या पालिका बरखास्तीच्या शिफारशीवरून तर राजकीय पक्षांत गहजब झाला. पालिका प्रशासन, पालिकेची आर्थिक घडी यांचा तिनईकरांनी खास अभ्यास केला होता. झपाटय़ाने वाढत चाललेल्या मुंबई शहराचे विद्रूपीकरण पालिकेच्या माध्यमातूनच कसे रोखता येईल, याबाबत ते कमालीचे दक्ष होते. मुंबईबाबतची त्यांची ही कळकळ जाणूनच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यांना बोलावून आपल्या नगरसेवकांना उपदेशाचे चार डोस पाजले आणि नियतीच्या अजब न्यायाचे एक वर्तुळ पुरे झाले. स्वच्छ चारित्र्याचा आग्रह, स्पष्टवक्तेपणा आणि उत्तम प्रशासकाची दूरदृष्टी लाभलेल्या तिनईकरांचे म्हणूनच देशपातळीवर कौतुक झाले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही तिनईकरांच्या कर्तव्यकठोरतेची आणि मतांची दखल घेतली होती. विधिनिषेधशून्यता आणि भ्रष्ट आचरणाचा कळस गाठल्या जाणाऱ्या काळात तिनईकर ताठ मानेने वावरले आणि व्रतस्थ योग्याप्रमाणे ठाम राहात निर्भीडपणे जगले.
Text from News-0012-LS
----------------------------------
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त स. शं. तिनईकर यांचे निधन
प्रशासकीय सेवेवर कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे आणि कडक शिस्तीचे भोक्ते असणारे मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सदाशिवराव तिनईकर पालिकेतील सत्तारूढ शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष तिनईकर यांच्या काळात टिपेला पोहोचला होता. मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची अनधिकृत कार्यालये तोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र बहुतांशी शिवसेनेच्या शाखांवरच त्यांचा हातोडा पडल्याने शिवसेना आणि त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. महापालिका तोट्यात गेली असताना तिनईकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या शिफारशींमुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली होती. प्रशासनाचा एखादा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये मंजूर करण्यात आला नाहि तर तो मंजूर झाला असे गृहीत धरण्यात येईल. असे फर्मान तिनईकर यांनी काढले होते. त्याचे तीव्र पडसाद त्यावेळी पालिकेत उमटले होते.
VV
News
त्यांच्या स्वभावातच अणकुचीदारपणा होता. टीका करायची तर ती समोरच्या व्यक्तीला बोचणारीच असली पाहिजे, तरच त्या टीकेला काही अर्थ असे. आपले म्हणणे स्पष्टपणे समोरच्याला समजेल अशा भाषेत सांगताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. चित्रे काढायची तर त्यातही कुंचल्याचा फटकारा ‘शार्प’ असे. कुशल प्रशासक, कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला न जाता समाजाशी कायम आपले लागेबांधे ठेवणारा आणि तरीही राज्याचा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी मनाचा हळवा कोपराही जपणारा असे एक वेगळे रसायन सदाशिवराव तिनईकर यांच्यात होते.
म्हणूनच शिवसेनेशी शाब्दिक दोन हात करणारे आयुक्त तिनईकर महाराष्ट्राच्या ‘मराठी’ सांस्कृतिक ठेव्याला उत्तेजन देण्यासाठीही प्रयत्नरत असत. दर महिन्याला विविध प्रांतांतील सर्वोत्तम गायक, वादकांना आमंत्रित करून त्यांची कला निमंत्रितांपुढे ते सादर करत. एका वर्षी तुकाराम बीज साजरी करण्यासाठी त्यांनी वि. स. पागे यांचे कीर्तन आयोजित केले होते. राज्य सरकारने वेदपठण करणाऱ्या मंडळींचा सत्कार केला तेव्हा त्या मंडळींना त्यांनी आयुक्तांच्या बंगल्यावर बोलवून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. वाङ्मय, साहित्य, कला यात रुची असणाऱ्या तिनईकरांचे इंग्रजीवर फर्डे प्रभुत्व होते. मुंबईत सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांना सुरुवात झाली ती त्यांच्याच काळात. स्वातंत्र्योत्तर काळात देशात नवनिर्माणाच्या संकल्पनेचा पुरस्कार करणारी उच्चविद्याविभूषितांची जी एक तडफदार पिढी उदयाला आली तिची अस्सल ओळखमुद्रा म्हणजे सदाशिव तिनईकर. भारतीय प्रशासन सेवेच्या माध्यमातून सरकारच्या विविध विभागांची शक्य तितकी ‘साफसफाई’ करणाऱ्या या कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्वाच्या कारकीर्दीचा अखेरचा टप्पा म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद. तिनईकरांनी अशी काही कामगिरी बजावली की, ती एखाद्या सनदी अधिकाऱ्याने आपल्या सत्यान्वेषणाच्या भूमिकेबाबत अखेपर्यंत कसे आग्रही असायला हवे, याचा वस्तुपाठ ठरली. भारतीय प्रशासन सेवेच्या १९५६ च्या तुकडीतून जे पाच अधिकारी महाराष्ट्राच्या सेवेत आले त्यापैकी तिघे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. जमशेद कांगा, द. म. सुकथनकर आणि सदाशिव तिनईकर. या तिघांनीही आयुक्तपदाच्या कारकीर्दीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. मात्र तिनईकर हे सर्वार्थाने ‘मुंबईकर’ ठरले. या शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि त्यांनी हे शहर बकाल होण्यास कारणीभूत असणाऱ्या प्रवृत्तींवर अंकुश ठेवला. तो ज्यांना रक्तबंबाळ करून गेला त्या सत्ताधारी शिवसेनेने अर्थातच तिनईकरांविरोधात आकांडतांडव केले. विशेषत: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि तिनईकर यांचे महापौर आणि आयुक्तांच्या अधिकारांबाबत तीव्र मतभेद झाले. मात्र नियम आणि कायद्यापुढे कुणीही व्यक्ती मोठी नाही, हे तत्त्व तिनईकरांनी ठामपणे पाळले. त्यांची शिवसेनाविरोधाची ही प्रतिमा एवढी मोठी झाली की, काही काळ हीच त्यांची ओळख ठरली. मात्र हे चित्र खरे नव्हते. याचे कारण तिनईकरांची तळमळ ही महानगरपालिकेतील आर्थिक बजबजपुरीविरोधात होती. तिनईकरांच्या पालिका बरखास्तीच्या शिफारशीवरून तर राजकीय पक्षांत गहजब झाला. पालिका प्रशासन, पालिकेची आर्थिक घडी यांचा तिनईकरांनी खास अभ्यास केला होता. झपाटय़ाने वाढत चाललेल्या मुंबई शहराचे विद्रूपीकरण पालिकेच्या माध्यमातूनच कसे रोखता येईल, याबाबत ते कमालीचे दक्ष होते. मुंबईबाबतची त्यांची ही कळकळ जाणूनच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यांना बोलावून आपल्या नगरसेवकांना उपदेशाचे चार डोस पाजले आणि नियतीच्या अजब न्यायाचे एक वर्तुळ पुरे झाले. स्वच्छ चारित्र्याचा आग्रह, स्पष्टवक्तेपणा आणि उत्तम प्रशासकाची दूरदृष्टी लाभलेल्या तिनईकरांचे म्हणूनच देशपातळीवर कौतुक झाले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही तिनईकरांच्या कर्तव्यकठोरतेची आणि मतांची दखल घेतली होती. विधिनिषेधशून्यता आणि भ्रष्ट आचरणाचा कळस गाठल्या जाणाऱ्या काळात तिनईकर ताठ मानेने वावरले आणि व्रतस्थ योग्याप्रमाणे ठाम राहात निर्भीडपणे जगले.
Text from News-0012-LS
———————————-
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त स. शं. तिनईकर यांचे निधन
प्रशासकीय सेवेवर कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे आणि कडक शिस्तीचे भोक्ते असणारे मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सदाशिवराव तिनईकर पालिकेतील सत्तारूढ शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष तिनईकर यांच्या काळात टिपेला पोहोचला होता. मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची अनधिकृत कार्यालये तोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र बहुतांशी शिवसेनेच्या शाखांवरच त्यांचा हातोडा पडल्याने शिवसेना आणि त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. महापालिका तोट्यात गेली असताना तिनईकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या शिफारशींमुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली होती. प्रशासनाचा एखादा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये मंजूर करण्यात आला नाहि तर तो मंजूर झाला असे गृहीत धरण्यात येईल. असे फर्मान तिनईकर यांनी काढले होते. त्याचे तीव्र पडसाद त्यावेळी पालिकेत उमटले होते.