सुप्रसिद्ध नाटककार, लेखक विजय तेंडुलकर

तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.



विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुण्यात आणि मुंबईत त्यांचे वास्तव्य होते.

चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये ‘आमच्यावर प्रेम कोण करणार’ ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते.

लेखनदृष्ट्या ‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. परंतु पुढे त्यानी त्याचे ‘ कावळ्यांची शाळा ‘ या नावाने पुनर्लेखन केले. मात्र ‘श्रीमंत’ हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. ‘ शांतता कोर्ट चालू आहे ‘ यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्‍या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यप्रकार त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.

” देशातील वाढता हिंसाचार ” या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी “टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस” या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्‍या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांनी अजगर आणि गंधर्व , थीफ:पोलीस , रात्र आणि इतर एकांकिका लिहिल्या .त्यांनी अजगर आणि गंधर्व , अशी पाखरे येती, एक हत्ती मुलगी, कन्यादान , कमला , कावळ्यांची शाळा , गृहस्थ, गिधाडे , घरटे अमुचे छान , घाशीराम कोतवाल , चिमणीचं घर होती मेणाचं , बेबी , मधल्या भिती , माणूस नावाचे बेट ही महत्वाची नाटके लिहिली. नाटके लिहिली. त्यांनी काही बालनाट्येपण लिहिली. अर्धसत्य , आक्रित , आक्रोश , उंबरठा , कमला, गहराई , घाशीराम कोतवाल अशा अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. तेडुकरांच्या जवळजवळ सर्वच नाटकातून मानवी मनाचे आतले कप्पे उघडे व्ह्यायचे . त्याच्यावर टीकाही झाले. त्याच्या काही विधानांवर वादही झाले. त्यांची कोवळी उन्हे , रातराणी , फुगे साबणाचे , रामप्रहर ही ललित लेखांची पुस्तके आहेत. विजय तेंडुलकर यांना संपूर्ण भारतात मान आहे तसा देशाबाहेरही आहे दुर्देवाने महाराष्ट्रात मात्र त्याच्याकडे दुर्लक्षच झाले. ते त्यांच्या परखड मतांमुळे .

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव , सरस्वती सन्मान , मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरवपदक , कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले.

तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.

मराठी नाटकाला आणि मराठी साहित्याला वेगळी दिशा दाखवणाऱ्या या महान लेखकाचे १९ मे २००८ रोजी पुण्यात निधन झाले.

— सतीश चाफेकर

Author