पहिला पाऊस अलगद बरसला,
आणि मन पुन्हा तिच्याकडे वळलं,
मातीच्या त्या ओल्या सुगंधात
तिचं अस्तित्व पुन्हा दरवळलं.
थेंबांच्या प्रत्येक सरीसोबत
तिच्या हास्याचे सूर झंकारले,
आभाळात चमकणाऱ्या विजेसंगे
तिच्या डोळ्यांचे तेज उजळले.
खिडकीत उभा मी एकटा,
पावसाला अलगद स्पर्शत होतो,
पण प्रत्येक थेंबात तिच्याच
आठवणींचं विश्व शोधत होतो.
रस्ते भिजले, झाडं भिजली,
भिजलं सारं आसमंत,
पण सर्वांत जास्त भिजलं होतं
तिच्या विरहाने व्याकूळ मन.
अशाच पावसात कधीतरी
आपणही हातात हात घेऊन चाललो होतो,
स्वप्नांच्या छोट्याशा दुनियेत
एकमेकांत हरवून गेलो होतो.
आज पुन्हा तोच पाऊस आला,
तसाच गंध, तसाच वारा,
फरक इतकाच…
यावेळी तिचा नाही सहारा.
सर ओसरली, ढग सरले,
आभाळ पुन्हा निळं झालं,
पण तिच्या आठवणींचं पावसाळं
मनात अजूनही तसंच बरसलं.
पहिला पाऊस दरवर्षी येतो,
निसर्गाला नवसंजीवनी देतो,
पण तिची आठवण मात्र
प्रत्येक सरीसोबत मनाला पुन्हा भिजवून जाते…
अखंड… निःशब्द… अनंत…
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212