ध्यास आणि वेड या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीच्या ध्यासापायी सारे आयुष्य वेचणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही. त्यामध्ये प्र. के. घाणेकर यांचे नाव आता अग्रेसर ठरते आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने या वर्षीचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार त्यांना देण्यात आला, तेव्हा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांनाही कमालीचा आनंद झाला.
गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जे कुणी घाणेकर सरांच्या सान्निध्यात आले, ते त्यांच्या परिवाराचे सदस्य बनले. किल्ले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक व्यवच्छेदक भाग आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी या नव्या संस्कृतीचा उगम घडवताना ज्या अनेक गोष्टी विचारात घेतल्या होत्या, त्यांपैकी पर्यावरण आणि वनस्पती याही महत्त्वाच्या बाबी होत्या, याची जाणीव घाणेकर यांना अगदी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाली. कारण त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, वनस्पतिशास्त्र. प्रा. हेमा साने या त्यांच्या अध्यापक. त्यांच्या मते वनस्पतिशास्त्र वर्गात शिकता येत नाही, त्यासाठी निसर्गातच जायला हवे. म्हणून किल्ले, दुर्ग अशा ठिकाणी अभ्यास सहली जाऊ लागल्या. घाणेकरांच्या मनात वनस्पतींबरोबरच त्या किल्ल्यांच्या इतिहासाबद्दलही कुतूहल जागृत झाले आणि मग त्यांनी त्या इतिहासाकडे आपला मोर्चा वळवला. ३८ वर्षे वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी इतक्या व्यापक परिसरात भ्रमण केले, की एका माणसाला एका आयुष्यात एवढे सगळे कसे करता येईल, अशी आपल्याला चिंता वाटावी. ज्या काळात पर्यावरण हा विषय चर्चेतही नव्हता, तेव्हा म्हणजे १९८२ मध्ये प्रा. घाणेकर यांनी त्यावर पहिले पुस्तक लिहिले. ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ या त्यांच्या पुस्तकात वनस्पतींमुळे घडलेल्या इतिहासाची रोचक कहाणी आहे. म्हणजे भारतात मसाल्याच्या वनस्पती पिकत असल्यानेच भारतावर आक्रमण झाले आणि पारतंत्र्य आले, असे त्यांचे म्हणणे. इतिहास समजून घेण्यासाठी किल्ले पाहायचे, तर त्यात भटकंतीचाही आनंद मिळवता आला पाहिजे. त्यामुळे त्यांनी भटकंती या विषयावरही अर्धा डझन पुस्तके लिहिली. ५६ पुस्तकांचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, परंतु हिमालय, वृक्ष, निसर्ग, किल्ले या विषयांवर त्यांनी सादर केलेल्या ‘स्लाईड शो’चे किमान पाचशे कार्यक्रम झाले आहेत. देशभरात हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी या अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि हा वाचायज्ञ अजूनही तेवढय़ाच दमदार रीतीने सुरू आहे. त्यांच्याकडे सातवाहन कालापासूनच्या नाण्यांचा अमूल्य संग्रह आहे. अनेक प्रकारच्या जीवाश्मांचे, शंख-शिंपल्यांचे एक उत्तम संग्रहालयच त्यांच्या घरी आहे. त्याशिवाय त्यांच्या आवडीच्या विषयांवरील किमान पंधरा हजार कात्रणांचा संग्रहही त्यांनी तयार केला आहे. एवढे सगळे घडताना आपल्याला आयुष्यात नेहमी उत्तम गुरू मिळाले, याचे समाधान ते नेहमीच व्यक्त करतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला सलामच आहे.
घाणेकर, प्र. के.
ध्यास आणि वेड या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीच्या ध्यासापायी सारे आयुष्य वेचणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही. त्यामध्ये प्र. के. घाणेकर यांचे नाव आता अग्रेसर ठरते आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने या वर्षीचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार त्यांना देण्यात आला, तेव्हा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांनाही कमालीचा आनंद झाला.
गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जे कुणी घाणेकर सरांच्या सान्निध्यात आले, ते त्यांच्या परिवाराचे सदस्य बनले. किल्ले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक व्यवच्छेदक भाग आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी या नव्या संस्कृतीचा उगम घडवताना ज्या अनेक गोष्टी विचारात घेतल्या होत्या, त्यांपैकी पर्यावरण आणि वनस्पती याही महत्त्वाच्या बाबी होत्या, याची जाणीव घाणेकर यांना अगदी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाली. कारण त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, वनस्पतिशास्त्र. प्रा. हेमा साने या त्यांच्या अध्यापक. त्यांच्या मते वनस्पतिशास्त्र वर्गात शिकता येत नाही, त्यासाठी निसर्गातच जायला हवे. म्हणून किल्ले, दुर्ग अशा ठिकाणी अभ्यास सहली जाऊ लागल्या. घाणेकरांच्या मनात वनस्पतींबरोबरच त्या किल्ल्यांच्या इतिहासाबद्दलही कुतूहल जागृत झाले आणि मग त्यांनी त्या इतिहासाकडे आपला मोर्चा वळवला. ३८ वर्षे वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी इतक्या व्यापक परिसरात भ्रमण केले, की एका माणसाला एका आयुष्यात एवढे सगळे कसे करता येईल, अशी आपल्याला चिंता वाटावी. ज्या काळात पर्यावरण हा विषय चर्चेतही नव्हता, तेव्हा म्हणजे १९८२ मध्ये प्रा. घाणेकर यांनी त्यावर पहिले पुस्तक लिहिले. ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ या त्यांच्या पुस्तकात वनस्पतींमुळे घडलेल्या इतिहासाची रोचक कहाणी आहे. म्हणजे भारतात मसाल्याच्या वनस्पती पिकत असल्यानेच भारतावर आक्रमण झाले आणि पारतंत्र्य आले, असे त्यांचे म्हणणे. इतिहास समजून घेण्यासाठी किल्ले पाहायचे, तर त्यात भटकंतीचाही आनंद मिळवता आला पाहिजे. त्यामुळे त्यांनी भटकंती या विषयावरही अर्धा डझन पुस्तके लिहिली. ५६ पुस्तकांचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, परंतु हिमालय, वृक्ष, निसर्ग, किल्ले या विषयांवर त्यांनी सादर केलेल्या ‘स्लाईड शो’चे किमान पाचशे कार्यक्रम झाले आहेत. देशभरात हजारांहून अधिक ठिकाणी त्यांनी या अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि हा वाचायज्ञ अजूनही तेवढय़ाच दमदार रीतीने सुरू आहे. त्यांच्याकडे सातवाहन कालापासूनच्या नाण्यांचा अमूल्य संग्रह आहे. अनेक प्रकारच्या जीवाश्मांचे, शंख-शिंपल्यांचे एक उत्तम संग्रहालयच त्यांच्या घरी आहे. त्याशिवाय त्यांच्या आवडीच्या विषयांवरील किमान पंधरा हजार कात्रणांचा संग्रहही त्यांनी तयार केला आहे. एवढे सगळे घडताना आपल्याला आयुष्यात नेहमी उत्तम गुरू मिळाले, याचे समाधान ते नेहमीच व्यक्त करतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला सलामच आहे.