पाऊलोपाऊल चालत जाते,
मनामधली एक वारी,
ना टाळ, ना मृदुंग हाती,
तरी भक्तीची गोड तयारी.
रस्ता नाही धुळीचा येथे,
ना दिंडींची गर्दी भारी,
अंतर्मनाच्या शांत वाटेवर,
अखंड सुरू ईश्वराची वारी.
सुख-दुःखांचे डोंगर ओलांडत,
आशा-निराशेच्या पलीकडे सारी,
प्रत्येक श्वासात नाम गुंजते,
हीच खरी जीवनवारी.
अहंकाराचे ओझे टाकून,
प्रेमाची घेऊन शिदोरी,
करुणा, श्रद्धा, सत्य सोबती,
नेते आत्म्याला प्रभूच्या दारी.
कधी अश्रूंनी पाऊल भिजते,
कधी आनंदाची फुले फुलती,
तरी न थांबे हा अंतःप्रवास,
ओढ लागलेली पंढरीची न्यारी.
शेवट नसतो या प्रवासाला,
ना थांबे कधी ही स्वारी,
ईश्वर भेटतो अंतःकरणी,
जेव्हा पूर्ण होते मनाची वारी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212