अंगणातल्या शांत कोपऱ्यात
एक चाफा उभा असतो,
ना त्याला गर्व कसला,
ना कुणाकडून मान हवा असतो.
पहाटेच्या मंद वाऱ्यात
त्याच्या पाकळ्या हलक्या थरथरतात,
आणि त्या शुभ्र हास्यातून
तो आयुष्याचं गूढ सांगत राहतो.
कधी उन्हाची तीव्र झळ,
कधी पावसाची ओल,
कधी वाऱ्याचे जोरदार झोके,
सगळं काही तो शांतपणे सहन करतो.
तरीही प्रत्येक सकाळी
तो पुन्हा फुलतो,
जणू जगाला सांगतो…
“सहन कर, पण सुगंध देणं थांबवू नको.”
लोक येतात, जातात,
कुणी त्याची फुलं वेचून नेतं,
कुणी देवाच्या चरणी अर्पण करतं,
कुणी केसांत गुंफून माळतं.
पण चाफा मात्र
कधीच काही मागत नाही…
तो फक्त देत राहतो
आपली शांतता, आपला सुगंध.
एक दिवस त्याची पाकळी
हळूच जमिनीवर पडते,
कुणाच्या नजरेत न येता
मातीशी एकरूप होते.
पण त्या गळलेल्या पाकळीचाही
सुगंध हवेत राहतो,
जणू सांगतो…
“अस्तित्व संपलं तरी
प्रेम कधी मरत नाही.”
तसंच माणसाचं आयुष्य
क्षणभंगुर, नाजूक,
आज आहे, उद्या नाही…
पण माणूस निघून गेला तरी
त्याचं हसू, त्याची माया,
त्याचे शब्द, त्याचा स्पर्श
लोकांच्या मनात जिवंत राहतो.
म्हणून चाफ्यासारखं जगावं
शांत, साधं, निरागस,
स्वतः फुलत राहावं
आणि आपल्या सुगंधाने
इतरांच्या आयुष्यात
आनंदाचा वसंत पेरत राहावा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212